मुलाखत मंडळाच्या प्रश्नांना अनुरूप उत्तरे देताना शब्द मोजूनमापून वापरण्यासाठी आणि चपखल शब्दांची निवड करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व हवे. वक्तृत्व, वादविवाद तसेच निबंध स्पर्धा यांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांची पाश्र्वभूमी असणाऱ्या उमेदवारांचे संवादकौशल्य साहजिकच उत्तम असते. एखाद्या विषयानुरूप गरजेनुसार साध्या आणि चपखल शब्दांची निवड करणे आणि किमान शब्दांत महत्त्वाच्या मुद्दय़ांद्वारे आपले मत व्यक्त करणे या सर्व बाबी प्रभावी संवादकौशल्याचा भाग मानल्या जातात.

विचारांतील स्पष्टपणा आणि ठामपणा हा अभ्यासाशिवाय प्राप्त होत नाही. अभ्यास चांगला असेल तर साहजिकच आत्मविश्वासाचा स्तरही उंचावतो. अभ्यास आणि आत्मविश्वास या दोहोंच्या साहाय्याने संवादाला धार प्राप्त होते. यासाठी प्रश्नानुरूप, विषयानुरूप आपली मते मांडणे फार आवश्यक आहे.

उलटपक्षी जर संकल्पना स्पष्ट नसतील, अभ्यास तोकडा असेल, तर त्याचा विपरीत परिणाम आत्मविश्वासावर आणि संवादाच्या शैलीवर होतो. अपुरी माहिती किंवा चुकीच्या माहितीवर आधारित उत्तर देताना उमेदवाराची विनाकारण दमछाक होते आणि विषयांतर होऊन तुमच्या निर्थक बडबडीने मुलाखत मंडळावर तुमची नकारात्मक छाप पडू शकते. यासाठी उमेदवाराने पारदर्शी असायला हवे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आलेच पाहिजे. विचारलेल्या विषयाची माहिती असलीच पाहिजे हे काही अनिवार्य नाही. फक्त मुलाखत तयारीचा भाग म्हणून नाही, तर एकूणच स्पर्धा परीक्षा तयारीचा भाग म्हणून एक बाब उमेदवारांनी समजून घेतली पाहिजे आणि शिकली पाहिजे ती ही की, योग्य वेळी ‘नाही’ म्हणता आले पाहिजे. ‘सर याविषयी मला माहीत नाही, याविषयी मी वाचलेले नाही,’ असे स्पष्टपणे सांगता यायला हवे. प्रभावी संवादासाठी स्पष्टपणा व पारदर्शकता महत्त्वाची आहे.

उमेदवारांनी आपल्या शब्दोच्चारांकडे लक्ष दिले पाहिजे. तुमचे उच्चार सुस्पष्ट असायला हवेत. तुम्ही आत्मविश्वासाने बोलायला हवे. बोलताना थुंकी उडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. िशक आली तर तोंडावर रुमाल ठेवून िशका आणि ‘सॉरी’ जरूर म्हणा. यासाठी मुलाखतीला जाण्यापूर्वी खिशात स्वच्छ रुमाल ठेवायला विसरू नका. ज्या शब्दांच्या उच्चारांबाबत तुम्ही साशंक आहात ते शब्द वापरू नका. आवेगात येऊन िहदी, इंग्रजी, उर्दू शब्दांचा वापर करू नका. बऱ्याचदा उमेदवारांची मराठी भाषा खूप चांगली असते, पण जर तो संवाद चांगल्या पद्धतीने करू शकला नाही तर त्याच्या शब्दसंपत्तीचा काही उपयोग होत नाही.

नागरी सेवा परीक्षेची मुलाखत इंग्रजी माध्यमातून देणाऱ्यांना भाषेवर प्रभुत्व नसल्यास न्यूनगंड येऊ शकतो. मुलाखतीसाठी साधे व माहितीतले सामान्य शब्द वापरावेत. इंग्रजीची अवाजवी धास्ती बाळगू नये. या भीतीवर मात करण्यासाठी दररोज इंग्रजीतून संभाषण करावे. राज्य लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीसाठी माध्यमासंदर्भात वेगळा अर्ज वगरे भरून घेण्याची तरतूद उरलेली नाही. पूर्व व मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या झाल्याने माध्यम नावाची समस्या मोडीत निघाली आहे. उमेदवाराचा कल लक्षात घेऊन त्यानुसार मराठीत/इंग्रजीत मुलाखती होतात. युपीएससीत मात्र माध्यम निवडावे लागते. यापूर्वी मराठी माध्यमात शिकलेल्या अनेक उमेदवारांनी इंग्रजीत मुलाखत देऊन यश मिळविल्याची अनेक उदाहरणे आहेत.

एका उमेदवाराला नेपाळ मधील तत्कालीन घडामोडींचा संदर्भ देवून त्यांचा भारतावर काय परिणाम होवू शकेल असे विचारण्यात आले. आपले मुददे मांडून उमेदवाराने समारोप केला की, यामुळे भारताची नेपाळवरील ‘पकड’ (ऌीॠीेल्ल८) धोक्यात येऊ शकेल. यावर भारताची नेपाळवर पकड आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असे विचाराण्यात आले. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ‘पकड’ या शब्दाचा अर्थ नकारात्मक घेतला जातो हे लक्षात आल्यावर उमेदवाराने नेपाळमधील भारताचे हितसंबंध धोक्यात येतील असे सांगून आपली चूक दुरुस्त केली. संवाद प्रभावीपणे साधायचा असेल तर समर्पक आणि उचित शब्दांची निवड, शब्दांचे योग्य पध्दतीने उच्चारण आणि आवश्यक तेथे चढ उतार या सर्व बाबी अत्यंत आवश्यक आहेत. तेव्हा शब्द शब्द जपून..!