आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये अतिउत्तम म्हणून सफरचंद हे फळ मानले जाते.  मधुर, आंबट चवीचे सफरचंद हे बऱ्याच अंशी पूर्ण असल्याने आरोग्यसंरक्षक फळ मानले गेले आहे. ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा’ हे बोधवाक्य सफरचंदाची महती विशद करते.     सफरचंद हे रोझेसी कुळातील फळ असून मूळचे पूर्व युरोपातील आणि पश्चिम आशियातील आहे. भारतात सफरचंदाचे उत्पादन मुख्यत्वे करून काश्मीर, कुलू-मनाली या थंड व डोंगराळ प्रदेशात घेतले जाते.
औषधी गुणधर्म  –
सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषणमूल्ये असतात.  यात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ही खनिजे तर ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात.  तसेच तंतुमय भाग, प्रथिने व आद्र्रता हे घटकही असतात.  मधुर आंबट चवीचे सफरचंद पिकताना त्यातील आंबटपणा कमी होऊन गोडवा वाढतो. यात मॅलिक अ‍ॅसिडचे प्रमाण आधिक असून ते शरीराच्या चयापचय क्रियेस उपयोगी पडते. तसेच यामध्ये पेक्टिन हा महत्त्वाचा औषधी घटक असतो.  काही आजारांमध्ये शरीरात अनेक विषद्रव्ये निर्माण होतात. ही अपायकारक विषद्रव्ये शरीराबाहेर काढून त्यांचा निचरा करण्यासाठी व विषद्रव्याची तीव्रता कमी करण्यासाठी गॅलॅक्टुरॉनिक अ‍ॅसिड लागते. ते सफरचंदाच्या गरामध्ये असते म्हणून सफरचंद खाणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अनेक जणांना सफरचंदचा गर खूप आवडतो.  म्हणून ते साल काढून खातात, परंतु अशा प्रकारे साल काढलेल्या सफरचंदाचे पोषणमूल्य कमी होते.  कारण ही साल व तिच्या लगतचा गर यात आतील गरापेक्षा जास्त प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असते.  तसेच आतील गराच्या पाचपट ‘अ’ जीवनसत्त्व सालीमध्ये असते.
उपयोग –
आयुर्वेद शास्त्रानुसार अनेक आजारांमध्ये पथ्यासाठी सफरचंदाचा उपयोग करावा. सफरचंद हे रक्तशुद्धीकारक, पित्तशामक, वायुनाशक व श्रमहारक आहे. मधुर आम्ल चवीचे, शीत, रुचकर व पौष्टिक गुणधर्माचे असल्यामुळे अतिसार, प्रवाहिका, अजीर्ण, मलावष्टंभ, जीर्णज्वर, अरुची, अशक्तपणा, डोकेदुखी, स्थौल्य, विस्मरण, यकृतवृद्धी, मूतखडा, जीर्णकास तसेच वातविकारांमध्ये सफरचंद हितकर आहे.
रुग्णांना आजारपणामध्ये इतर कोणताही आहार देण्यापेक्षा सफरचंद किंवा त्याचा रस दिल्यास काही दिवसांतच त्याची प्रतिकारशक्ती वाढून सर्व विकार दूर होतात.  त्याचा अशक्तपणा दूर होऊन ऊर्जानिर्मिती होते व उत्साह संचारतो.
० सफरचंद नियमित खाल्ल्याने दातावरचे किटण जाऊन दात स्वच्छ होतात. सफरचंद चांगले बारीक चावून खाल्ल्याने तोंडातील व दातामधील जंतूंना आळा बसतो व त्यातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे दातांबरोबरच हिरडय़ांचेही आरोग्य चांगले राहते. सफरचंदाच्या सेवनाने हिरडय़ा मजबूत होतात.  तसेच तोंड स्वच्छ करण्याचा गुणधर्म सफरचंदामधील अन्नघटकांमध्ये असतो.  म्हणून दातांच्या तक्रारींवर सफरचंदाचा वापर नियमित करावा.
०  लहान बालकांची शारीरिक व मानसिक वाढ उत्तम होण्यासाठी रोज एक सफरचंद खावे. ज्ञानतंतूच्या आणि मेंदूच्या वाढीसाठी सफरचंद उत्तम फळ आहे.
० सफरचंदातील आम्लतेमुळे सांधेदुखी, गुडघेदुखी हे विकार कमी होतात.
० सफरचंदामध्ये पोटॅशिअम आणि फॉस्फरस हे क्षार विपुल प्रमाणात असतात. अन्नातून पोटॅशिअम पुरेशा प्रमाणात ज्यांना मिळते अशा व्यक्तींना सहसा हृदयविकार होत नाही.  सफरचंदातील ‘क’ जीवनसत्त्व व पेक्टिनमुळे रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होऊन रसरक्त पुरवठा सुरळीत होतो.
० कोरडय़ा खोकल्याची ढास लागत असल्यास काही दिवस रोज गोड सफरचंदाचा गर व मध यांचे मिश्रण खावे.
० सफरचंद नियमित खाल्ल्याने मूतखडा विरघळून लघवीवाटे बाहेर पडतो.
० सफरचंदाची साल किंचित उकडवून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या कमी होऊन त्वचेची कांती वाढते.
० अतिसार, प्रवाहिका, आमांश या आजारांमध्ये सफरचंदामध्ये असणाऱ्या गॅलॅक्टुरॉनिक अ‍ॅसिड व मॅलिक अ‍ॅसिडमुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालते, तसेच नसíगक पेक्टिनमुळे आतडय़ाच्या आतून संरक्षक थर तयार होतो.  याकरिता या आजारांमध्ये सफरचंदाचा गर त्यात जिरे व दालचिनी पूड व मध मिसळून घ्यावा.
० डोकेदुखी जर तीव्र स्वरूपाची असेल तर आठवडाभर रोज सकाळी एक सफरचंद खावे याने डोकेदुखी थांबते.
० सफरचंदात लोह, आस्रेनिक व फॉस्फरस विपुल प्रमाणात असल्याने अ‍ॅनिमिया या आजारात नियमितपणे रोज एक सफरचंद खावे.
० डोळ्यांची आग होत असेल तर सफरचंद रस कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो बोळा डोळ्यावर ठेवावा.
० स्थूलता कमी करण्यासाठी जेवणाच्या आधी सफरचंद खावे त्यानंतर जेवण करावे. यामध्ये असणाऱ्या अ‍ॅसिडमुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचून स्थूलता कमी होते.
० पंचेंद्रियांसाठी सफरचंद स्फूर्तिदायक आहे. शरीर व मेंदूचा थकवा दूर करण्यासाठी नियमितपणे रोज एक सफरचंद खावे. यामुळे कांती, तेजस्वी होते व बौद्धिक थकवा कमी होतो.
०  सफरचंद हे स्वच्छ धुऊन पुसून, पण न कापता संपूर्ण खावे.  एरवी सफरचंद भाजून उकडून सुकवूनही ते खाता येते. सॅलेड, कोशिंबीर, ज्यूस, जेली, जॅम या स्वरूपातही वर्षभर त्याचा आस्वाद घेता येतो.
सावधानता :
सफरचंद हे केवळ काश्मीरसारख्या थंड हवेच्या प्रदेशात होत असल्याने संपूर्ण देशात याचे वितरण होईपर्यंत ते टिकविणे आवश्यक असते. म्हणून झाडावर फळे लागल्यापासून ते बाजारातून आपल्या घरी येईपर्यंत त्यांच्यावर अनेक औषधींचा, कीटकनाशकांचा फवारा मारला जातो.
हे फवारे आपल्या शरीरासाठी हानीकारक असतात. म्हणून सफरचंद हे सुरुवातीला शाम्पू किंवा रिठय़ाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यावीत व त्यानंतर साध्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावीत.  सकाळी स्वच्छ पुसून त्यानंतर सफरचंद खावीत. तसेच सफरचंद न कापता संपूर्ण खावे आणि कापलेच तर जास्त वेळ ठेवू नये.
डॉ. शारदा महांडुळे – sharda.mahandule@gmail.com

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!