सानिया भालेराव ‘किताबखान्याचा आत्माच मुळी वाचक आणि पुस्तकांमधलं नातं हा आहे. स्पर्शाचं, जाणिवेचं हे नातं ऑनलाइन पुस्तक खरेदी करून निर्माण होऊ शकतं का?’ हा प्रश्न करणाऱ्या अम्रिता सोमय्या यांनी म्हणूनच दहा वर्षांपूर्वी सुरूके लेल्या आणि तीन महिन्यांपूर्वी आगीत भस्मसात झालेल्या ‘किताबखान्या’ला पुन्हा उभं के लंय. आज पुस्तक वाचनाची आवड कमी झाली आहे हे गृहीतक पुसून काढत उलट ते वाढवण्यासाठी थेट वाचक-लेखकांची भेट घालून देणारी, गप्पा मारत पुस्तकांच्या जगात रमायला लावणारी ही वास्तू पुन्हा दिमाखात उभी राहाते आहे. किताबखान्याच्या माध्यमातून वाचनसंस्कृती जाणीवपूर्वक जपणाऱ्या अम्रिता यांच्याशी मारलेल्या या गप्पा. गेल्या वर्षीचा डिसेंबर महिना. सगळा देश टाळेबंदीत. आणि अचानक लागलेल्या आगीत ‘किताबखाना’ भस्मसात झाला. जवळपास ४५ हजार पुस्तकं आणि वास्तूचंही मोठं नुकसान झालं. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या अम्रिता आणि समीर यांच्या डोळ्यांसमोर राख झालेलं त्यांचं स्वप्न जळालेल्या अवस्थेत उभं होतं. समोर फक्त धूर, काही अर्धवट जळलेली तर काही राख झालेली पुस्तकं. आणि हताश झालेली त्यांची संपूर्ण टीम उभी होती. इतक्यात अम्रिता यांच्या वडिलांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्या डॉक्टरांचा फोन आला, ‘‘तुमच्या वडिलांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवायचं का? एक शेवटचा चान्स घ्यायचा का?’’ अम्रितांसाठी तो निर्णायक क्षण होता. त्यांनी डॉक्टारांना ‘हो’ सांगितलं. त्याच वेळी हेही ठरवलं, की आपल्या वडिलांना श्वास घेण्यासाठी जसा ‘ब्रीदर’ देणं गरजेचंच आहे, तसंच आपल्या या स्वप्नालासुद्धा श्वास घेण्यासाठी पुन्हा एक संधी द्याायला हवी. तो एक क्षण. अम्रिता आणि समीर यांनी ‘किताबखाना’ राखेतून जिवंत करायचा हे पक्कं केलं. आणि अवघ्या तीन महिन्यांमध्ये किताबखाना पुन्हा उभा राहिलाही. नुकतीच पुन्हा एकदा वाचकांसाठी ही पंढरी उघडली आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी मुंबईत फोर्ट परिसरात या जोडप्यानं पुस्तकांचं दुकान उघडलं. १५० वर्षं जुन्या सोमय्या भवनातील वास्तूमध्ये हे दुकान सुरू झालं. बोस्टन मधून अर्थशास्त्रातली पदवी मिळवलेल्या अम्रिता आणि ‘हार्वर्ड’ व ‘कॉर्नेल’ विद्याापीठातून मास्टर्स डिग्री मिळवणारे त्यांचे पती समीर सोमय्या या दोघांनी मिळून सुरु केलेलं हे दुकान! या जोडप्यानं त्यांच्या दुकानाला नाव दिलं, ‘किताबखाना’. पुस्तकांवर प्रचंड प्रेम करणारे जे माझ्यासारखे जीव आहेत त्यांना हे नाव ऐकल्यावर पुस्तकांची एक जादूई दुनिया दिसू लागते. अगदी अशीच जादूई वास्तू अम्रिता आणि समीर यांनी निर्माण केली. ‘किताबखाना’ म्हणूनच अगदी अल्प काळात पुस्तकवेड्यांच्या मनात घर करून गेलं. जगभरातील वेगवेगळ्या ‘जॉनर्स’ची पुस्तकं या दोघांनी आणि त्यांच्या टीमनं इथे वाचकांसाठी उपलब्ध करून दिली. एक छानसं कॅफेसुद्धा सुरू करण्यात आलं. पुस्तकं आणि सोबतीला रुचकर अन्न. भन्नाट कल्पना, तीही दहा वर्षांपूर्वींची! अम्रिता यांचे वडील जितेंद्र मिस्त्री यांनी ‘किताबखाना’चं आर्किटेक्चरल डिझाईन तयार केलं आणि हे स्वप्न वास्तवात आलं. अम्रिता यांच्याशी बोलत असताना हे जाणवत राहातं, की बिकट परिस्थितीमध्येसुद्धा आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचं त्यांचं कसब किताबखान्याला आज या उंचीवर घेऊन आलं आहे. दुकानासाठी पुस्तकांची निवड कशी केली जाते हे जाणून घेत असताना अम्रिता यांचं पुस्तकांवर असलेलं प्रेम जागोजागी दिसून येत होतं. समीर आणि अम्रिता दरवर्षी ‘लंडन बुक फेअर’ला उपस्थित राहातात. तिथून नवनवीन पुस्तकांबद्दल त्यांना माहिती होते. अम्रिता म्हणतात, की जगभरात वाचली जाणारी पुस्तकं माहिती असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या विचारांच्या आणि वाचनाच्या कक्षा यामुळे विस्तारत जातात. त्यांची मुलं लहान होती तेव्हापासून मुलांना वाचनाची गोडी लागली होती, जशी अम्रिता आणि समीर यांना लहान असताना होती. त्यांची मुलगी दहा वर्षांची असताना तिला मुंबईमध्ये कोणत्या पुस्तकांच्या दुकानात घेऊन जावं, जिथे ती रमेल, असा प्रश्न त्यांना पडला आणि तिथेच ‘किताबखान्या’चं बीज रोवलं गेलं. त्यांच्या या दुकानातल्या बालसाहित्याचा विभाग त्या स्वत: फार आवडीनं बघतात. तसंच त्यांना ‘हिस्टोरिकल फिक्शन’ आवडतात. समीर यांनाही वाचनाची प्रचंड आवड असल्यानं आणि त्यांचं वाचन केवळ ललित साहित्यापुरतं मर्यादित नसून वेगवेगळे ‘जॉनर’ ते वाचत असल्यामुळे त्यांचासुद्धा पुस्तक निवडीमध्ये फार मोलाचा सहभाग असतो, असं अम्रिता सांगतात. तसंच त्यांच्या टीममधले जगत सर हेदेखील पुस्तकांची निवड करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. अत्यंत सुरेख आणि रेखीव असं हे ‘टीमवर्क’ असल्यामुळे ‘किताबखाना’ पुन्हा इतक्या लवकर उभा राहिला, असं वाटून गेलं. आपल्या सगळ्यांना असं वाटतं, की ‘डिजिटलायझेशन’मुळे पुस्तकं वाचणाºयांचं प्रमाण कमी होत आहे. पण अम्रिता म्हणतात, की जगभरातले आकडे असं अजिबात सांगत नाहीत. पुस्तक वाचणारे लोक आजही आहेत आणि हल्ली तर अगदी शाळांमधूनही मुलांना वाचनाची गोडी लावली जाते आहे. त्यामुळे पुस्तकांमध्ये रमणारे जीव वाढतच जातील यात शंका नाही. जिथे अगदी पिझ्झापासून ते गाडीपर्यंत सगळं काही एका ‘क्लिक’वर आपल्याला विकत घेता येऊ शकतं, तिथे लोकांनी दुकानात जाऊन पुस्तकं विकत घेणं हे कितपत व्यावहारिक आहे? आणि आजचा ‘ई-कॉमर्स’चा ट्रेंड बघता ‘किताबखाना’ ऑनलाइन पुस्तक विक्री सुरू करणार का, हा प्रश्न ओघानंच आला. यावर थोडंसं हसून अगदी सहजपणे अम्रिता म्हणतात, ‘‘अजिबात नाही. ‘किताबखान्या’चा आत्माच मुळी वाचक आणि पुस्तकांमधलं नातं हा आहे. स्पर्शाचं, जाणिवेचं हे नातं असं ऑनलाइन पुस्तक खरेदी करून निर्माण होऊ शकतं का?’’ माझ्यातल्या पुस्तकवेड्या जिवाला तर त्यांचं हे म्हणणं मनोमन पटलं! पुस्तक हातात घेणं, नवीन कोऱ्या पुस्तकाचा वास नाकातून मेंदूमध्ये शिरल्यावर एक गजब समाधान मिळणं, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अलगद हात फिरवून त्याला डोळे भरून पाहाणं आणि मग आपल्याला साद घालणाऱ्या पुस्तकाला घरी घेऊन येणं, ही सगळी जी काही प्रक्रिया आहे ना, ती अत्यंत विलोभनीय आहे. तिला काहीही तोड नाही. मला वाटतं, अम्रिता यांनासुद्धा हेच अपेक्षित आहे. म्हणूनच केवळ व्यवसाय वाढावा असा विचार न करता ‘किताबखाना’ आजही आपला मूळ हेतू टिकवून आहे. अम्रिता आणि समीर सोमय्या यांनी केवळ एक पुस्तकाचं दुकान उघडायचं असं स्वप्न कधी पाहिलंच नव्हतं. त्यांना वाचनाची गोडी निर्माण करायची होती, वाचनसंस्कृती जपण्याचं, वाढवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. वाचनाला भाषेच्या, भौगोलिक सीमारेषांमध्ये त्यांना अडकवून ठेवायचं नव्हतं. ‘किताबखाना’ हा वाचक आणि लेखक यांच्यामधला दुवा बनला तो केवळ अम्रिता यांच्या दृष्टीमुळे. किताबखान्यामध्ये लेखकांची ‘लाईव्ह सेशन्स’ होतात. लेखक वाचकांपर्यंत आपलं म्हणणं इथे पोहोचवू शकतो आणि वाचक आपल्या आवडत्या लेखकाला जाणून घेऊ शकतात. ही संस्कृती दिल्ली परिसरात बरीच बघायला मिळत असली तरी किताबखान्यानं खऱ्या अर्थानं याची सुरुवात मुंबईमध्ये केली. आज जाणिवांच्या कमतरतेमध्ये आपल्या आयुष्यातून वैयक्तिक स्पर्श (पर्सनल टच) जवळपास नाहीसा होत असताना ‘किताबखाना’ हाच ‘यूएसपी’ घेऊन अगदी रुबाबात पुन्हा उभा राहातो आहे. तो नव्यानं उभा करत असताना हे सगळं चाललं नाही, आर्थिक नुकसान जर भरून निघालं नाही तर काय, असा विचारसुद्धा अम्रिता यांच्या मनात डोकावत नाही. पुस्तकांवर प्रेम करणं, वाचनाची गोडी निर्माण करणं आणि मनोरंजनाच्या दुनियेतील वेगवेगळ्या ‘डिजिटल प्लॅटफॉर्मस्’चं जाळं फोफावत असताना नवीन पिढ्यांना पुस्तकांच्या जगात रममाण होण्याची वाट करून देणं, या आपल्या मूळ हेतूशी इतकं प्रामाणिक राहाणं अम्रिता यांना जमतं आहे ते त्यांच्यावरच्या वाचन संस्कारांमुळेच! राखेतून पुन्हा एकदा उभारी घेणाऱ्या या किताबखान्याला आजवर वाचनप्रेमींकडून जितकं प्रेम मिळालं आहे, त्याहून कित्येक पटींनी अधिक प्रेम आता मिळेल अशी खात्री वाटते. पुस्तकांमध्ये जीव जडलेले माझ्यासारखे तमाम वाचनवेडे तेथे अधिकाधिक रमोत यासाठी ‘किताबखाना’च्या पुढील प्रवासाकरिता खूप शुभेच्छा!saniya.bhalerao@gmail.com