डॉ. ऊर्जिता कुलकर्णी urjita.kulkarni@gmail.com

सध्या एक विचारप्रणाली प्रचंड जोर धरतेय. एकमेकांना माहीत नसलेल्या अगदीच अनभिज्ञ व्यक्ती एकत्र येतात आणि सहलींना जातात. देशोदेशी फिरून येतात. त्यात आनंद शोधून मिळवतात. असे का? खोल कुठे तरी, सतत कुटुंब म्हणून जवळच्या व्यक्तींकडून होणारे काटेरी हल्ले सगळ्यांनाच नकोसे झालेत का? परंतु व्यक्ती म्हणून माझे जगण्याचे निकष ज्यांना मान्य नाहीत किंवा पटवून घेण्याची इच्छा नाही अशा माझ्याच कुटुंबातील व्यक्तींना त्रास का द्या, हाही प्रगल्भ विचार त्यामागे असू असतो.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप

नाती समजून घेण्याआधी नातं, याची साधी-सोपी व्याख्या जाणून घ्यायला हवी. दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टी यांच्यातला अर्थपूर्ण संबंध म्हणजे नातं! किती छान, सरळ व्याख्या. यातल्या ‘अर्थपूर्ण’ या शब्दाला खरं महत्त्व. त्याच्या जागी, इतर शब्द त्यांच्या अर्थासह येऊन बसायला लागले की मात्र ही व्याख्या बदललीच म्हणून समजावं. जसं की, ‘कामापुरते’, ‘वेळ जात नाही म्हणून’, ‘अप्पलपोटी’, ‘एकतर्फी’, ‘बळजबरीचे’, ‘भीतीयुक्त’, ‘नावापुरते’, ‘तात्पुरते’, ‘असायलाच पाहिजेत म्हणून’, ‘रक्ताचेच’, इत्यादी. यातला कुठलाही शब्द, ‘अर्थपूर्ण’ याऐवजी घालून पुन्हा ही वरची व्याख्या वाचा म्हणजे लक्षात येईल.

‘अर्थपूर्ण’ म्हणजेच ज्यामुळे त्या नात्याशी बांधल्या गेलेल्या संबंधित व्यक्तींच्या जगण्यात हवासा अर्थ निर्माण होतो. आयुष्य सकारात्मकतेने जगण्याची ऊर्मी निर्माण होते, टिकून राहते. व्यक्ती म्हणून अशा नात्यात बांधला गेलेला प्रत्येक घटक प्रगल्भ होण्याची सुरुवात आणि मदत होते. साहजिकच निर्माण होणाऱ्या, आपसूक असणाऱ्या काही भावना याच्या मुळाशी असतात. जसे प्रेम, जिव्हाळा, एकमेकांविषयी असणारी काळजी, आदर, उत्कंठा, नवलाई, विश्वास, सुरक्षितता इत्यादी. या भावना अशा नात्यांमध्ये केवळ टिकून न राहता काळासोबत वृिद्धगत होतात.

मी ‘नातं’ असं म्हटल्यावर, डोळ्यांसमोर येतं; आई, वडील, आजी, आजोबा, नवरा, बायको, भाऊ, बहीण, जवळचे मित्र-मत्रिणी, फार फार तर, एखादा पाळीव प्राणी, इतकंच!

विस्तृत स्वरूपात नात्याविषयी बोलायचं झालं, तर ते दोन किंवा अधिक व्यक्ती यांच्यात, किंवा त्याही पुढे जाऊन नातं, हे एखाद्या गोष्टीशी संबंधित असू शकतं. जसं एखादं आवडीचं पुस्तक, आपल्या आवडीची जागा, आपल्या घरातील झाडं, किंवा एखादी सायकल असं काहीही! आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं नातं म्हणजे स्वत:चं स्वत:शीच असणारं! जे आपण बहुतेक वेळा विसरून जातो, कमी महत्त्वाचे समजतो.

दुसरा भाग असा की ‘नातं’ म्हणताना, आपण नकळत का होईना, त्यांना एका निकषात बांधून घालतो. रक्ताने बांधलेल्या, वैद्यकीय भाषेत, जनुकीय पद्धतीने जोडल्या जाणाऱ्या व्यक्ती, माणसं! त्यांच्याशी असणारा जैविक संबंध म्हणजे नातं. सर्व पातळ्यांवर अशीच नाती टिकवण्यासाठीची धडपड हे सर्वसाधारपणे दिसणारं दृश्य. नक्कीच; आपल्या जवळचा मित्रपरिवार, जरी आपण याच परिघात गृहीत धरत असू, तरीही, त्यांना आपण आपल्याही नकळत, एका विशिष्ट अंतरावरच ठेवतो. कधी कधी तर, त्या कुटुंबाचा भाग असतील तरीही, अट्टहासाने, स्वत:लाच हे बजावण्याचा प्रयत्न करतो की ती माझी रक्ताची माणसं नाहीत. असं का? याचा आपण विचार करतच नाही. याचं साधं उत्तर म्हणजे, आपल्या मनाची लहानपणापासून झालेली, असलेली जडणघडण! आपल्यावर पिढय़ान्पिढय़ा बिंबवण्यात आलेले विचार!

आता एका काल्पनिक बाबींचा विचार करू या. असे गृहीत धरू या, की जन्मल्यानंतर, साधारण दोन ते तीन वर्षांच्या कालावधीनंतर, आपल्याला, अमुक एक व्यक्ती म्हणजे आई, तमुक एक व्यक्ती म्हणजे भाऊ, मामा अशी कोणतीच नाती त्या नावांनी माहीत असण्याऐवजी केवळ नात्यांच्या संज्ञा आणि आजूबाजूला असणारा हा अख्खा गोतावळा म्हणजे आपल्यावर प्रेम, माया करणाऱ्याच आणि ज्यांच्यासोबत आपल्याला सुरक्षित वाटावं अशाच व्यक्ती आहेत, इतकंच माहीत आहे. त्या वयात, एकंदर परिस्थितीच्या निरीक्षणांनंतर, आपल्या स्वत:च्या वयाच्या समजुतीच्या कुवतीनुसार आपणच जर या नात्यांना संज्ञेत बांधायचे ठरवल्यास काही वेगळं नक्कीच घडू शकेल, नाही का? या आपल्याच निरीक्षणातून, वैयक्तिकरीत्या या संज्ञांना आत्तापर्यंत आपण काय अर्थ दिलाय त्यानुसार, तशाच व्यक्तींना आपण या संज्ञांसह बांधून टाकण्याची शक्यता आहे. मग एखादी नात्याने आत्त्या असलेली व्यक्ती, आई होऊ शकेल, किंवा मामा भाऊ, किंवा शेजारची आजीच आपली खरी, सख्खी आजी! त्यांचा आणि आपला जैविक संबंध असो अथवा नसो. कदाचित, आपण अगदीच अनपेक्षित अशी नाती तयार करू.

आई, वडील, भावंडं, गुरू, इत्यादी संज्ञा आपण शिकत जातो. मूल म्हणून वाढत असताना त्या पक्क्या, डोक्यात अगदी घट्ट बसतात. समजा या संज्ञाच काढून टाकल्या, तर, त्यांचं बंधन, त्यांची म्हणून असणारी ठरावीक, गृहीत धरलेली वागणूक हे सारंच बदलेल कदाचित! आता इथे एक मतप्रवाह, जो प्रकर्षांने येईल, तो म्हणजे, मग नाती समजतील कशी? किंवा यातून गोंधळ उडणार नाही का? अगदी योग्य प्रश्न! पण म्हणूनच तर ही योग्य सोय किंवा व्यवस्था समजात, कुटुंबात आहे, तरीही गोंधळ आहेच, नात्यांमध्ये बेबनाव आहेच. त्यामुळेच एकदा एखाद्या व्यक्तीशी असणारं आपलं नातं काय आहे, हे समजल्यानंतर, आपल्या मनात, विचारात, ते नातं त्या विशिष्ट संज्ञेत अडकवून ठेवून त्याकडे एकाच दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी, ती नाती, त्या व्यक्ती यांच्याशी होणारा नित्य व्यवहार, यातून समजावून घेतली तर? कदाचित, व्यक्ती म्हणून आपण त्यांना वेगळ्या प्रकारे न्याय देऊ शकू आणि पर्यायाने नात्यालासुद्धा, त्यामुळे नात्यांमध्ये असणारा ताण कमी होण्यात नक्कीच मदत होईल. म्हणजे ‘माझ्या ‘वडिलांनी’ मला ठरावीक वयापर्यंत सर्वतोपरी सांभाळणे हे त्यांचे गृहीत धरलेले कर्तव्य आहे, त्यामुळे त्यांनी ते ‘वडील’ असल्याने चोख बजावलेच पाहिजे’, या विचाराऐवजी, व्यक्ती म्हणून वडिलांचा विचार झाला तर एखाद्या वेळेस त्यांनी हातखर्चाला कमी पैसे दिले किंवा एखाद्या प्रसंगात पाठीवरून हात फिरवायला विसरले, तर त्याविषयीची अढी तरुण किंवा वयात आलेल्या मुलांच्या मनात राहणार नाही, आणि मुलांसाठी गरजेचं असणारं ‘कर्तव्य करू शकलो नाही’ अशा शल्याने वडिलांचाही ताण वाढणार नाही. त्यामुळे इथे नात्यांच्या विविक्षित व्याख्या आहेत तशा ठेवल्या तरीही त्यांच्या संकल्पनेत बदल घडून प्रत्येक नातं सोपं राहायला नक्कीच मदत होईल.

आता दुसरा मुद्दा पाहू. रक्ताची नसणारी पण तितकीच महत्त्वाची नाती! कारण काही नाती, ‘सख्खी नाती’ या व्याख्येच्या पुढे जाऊन त्याही पेक्षा घट्ट असतात. तीन कळत, वेगवेगळ्या वळणांवर तयार होतात. त्यामुळे ‘स्नेही’ हा शब्द मला अशा साऱ्याच नात्यांसाठी समर्पक वाटतो. आजूबाजूला बघितले तर खऱ्या, तथाकथित न सुटणाऱ्या समस्या ‘सख्या’ म्हणवणाऱ्या नात्यांमध्येच जास्त दिसतात. ज्यांची उत्तरे बऱ्याच वेळा या स्नेहय़ांकडूनच आपल्याला न मागता मिळतात किंवा पटतातही. स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून एक क्षण विचार करा, आणि पाहा तुम्हाला ज्यांच्याविषयी प्रेम आहे, आदर आहे, ज्यांना भेटावंसं वाटतं किंवा मदतीला धावून येतात अशा व्यक्ती, खरं तर स्नेहय़ांच्या घोळक्यातच सापडतील. हे सरसकट प्रत्येकासाठी खरं नसलं, तरीही बऱ्याच अंशी अशीच परिस्थिती आहे.

यालाही कारण असलंच पाहिजे. ते असं, आपण ज्या कुटुंबात राहतो, वाढतो, तिथे कळत नकळत आपण आपल्यासह सर्वानाच गृहीत धरणं सुरू करतो. आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयी, आपल्या अनुभवातून आपलं काही ग्रह तयार होतात. ज्याला आपण साध्या भाषेत, त्या ‘व्यक्तीचा स्वभाव’ असं म्हणतो. म्हणजे एखादी व्यक्ती रागीट आहे, याचा अर्थ ती कायम रागावलेलीच असते असं नव्हे, हे आपण विसरून जातो. किंवा कुटुंबातील, एखादी व्यक्ती समजूतदार आहे याचं अर्थ प्रत्येक वेळेस त्याच व्यक्तीने समजुतीने घ्यावं असं नाही. मुळात हा आपला त्या व्यक्तीसाठी असणारा दृष्टिकोन. त्यातूनच काही बाबी ही घरची मंडळी समजून घेणार नाहीत, किंवा आपला तिरस्कार करतील, किंवा मांडलेला मुद्दा अमान्य करतील या समजुतीने बोलण्याचं टाळतो. त्यातून संवादात दरी निर्माण होते. आणि मग इथे आपले स्नेही ही पोकळी भरून काढतात. इथेही कदाचित त्यांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आपल्याला हव्या तशा नसल्या तरीही त्यामुळे मात्र आपलं काही बिनसत नाही, त्याचं मुख्य कारण म्हणजे आपला सरसकट दुटप्पीपणा! आपणच घालून घेतलेले काही नियम. जसे घरातील मंडळींनी दिलेला नकार, हा विरोधासारखा वाटू शकतो, त्याच वेळेस स्नेहय़ांनी दिलेला नकार हा सावधानतेचा इशारा! आपापल्या आवडीनुसार कोणाला किती गुन्हे माफ करायचे आणि कोणावर थोडय़ाथोडक्या गोष्टीसाठी डाफरायचं हे गुप्तपणे आपलंच आपल्याशी ठरलेलं असतं. इथे आपण कुटुंब आणि आपले स्नेही यांना एकाच तराजूत तोलायला सुरुवात केली तर कदाचित आपले कुटुंबातील नातेसंबंध नक्कीच सुधारतील. स्नेहय़ांप्रमाणे कुटुंबातल्या व्यक्तीसुद्धा हिरमुसून कायमच्या दुरावू शकतात, त्यांना तो अधिकार आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं!

काही ठिकाणी मात्र अगदी वेगळी परिस्थिती असू शकते. एखाद्या कुटुंबात केवळ नावालाच म्हणून उरलेली नाती असतील तर तिथे जितकी माणसं, त्याच्या कित्येक पट पोकळी असं चित्र. इथे ही पोकळी भरून काढणाऱ्या नात्यांचा शोध चालू होतो. जिथे आपलं म्हणणं ऐकणारे, समजून घेणारे कोणी तरी असावं.

सध्या एक विचारप्रणाली प्रचंड जोर धरतेय. एकमेकांना माहीत नसलेल्या अगदीच अनभिज्ञ व्यक्ती एकत्र येतात आणि सहलींना जातात. देशोदेशी फिरून येतात. त्यात आनंद शोधून मिळवतात. असे का? स्वत:च्या घट्ट नात्यांना टाळून हे का? जग पाहण्यासाठी, नवीन अनुभव किंवा नवीन बाबी शिकण्यासाठी वगैरे जरी हे खरं असलं, तरीही खोल कुठे तरी, सतत कुटुंब म्हणून जवळच्या व्यक्तींकडून होणारे काटेरी हल्ले सगळ्यांनाच नकोसं झालेत. अशा व्यक्तींना ‘स्वतंत्र’ किंवा ‘आत्मकेंद्री’ ही बिरुदं सहज चिकटवली जातात. परंतु व्यक्ती म्हणून माझे जगण्याचे निकष ज्यांना मान्य नाहीत, किंवा पटवून घेण्याची इच्छा नाही अशा माझ्याच कुटुंबातील व्यक्तींना त्रास का द्या, हाही प्रगल्भ विचार त्यामागे असू असतो. तिथे माणूस इतरांना टाळत नाही, तर इतरांना त्याच्यामुळे त्रास होऊ देणं टाळतो, त्यातून पुढील वादावादी, विसंवाद सगळेच टाळतो. मग अशी माणसं कुटुंबाबाहेर आपलं एक वेगळं कुटुंब तयार करत असतील तर ते उत्तमच म्हणायला लागेल.

म्हणूनच ‘वसुधव कुटुम्बकम्’ ही केवळ कल्पना न राहता ती आजची खरी परिस्थिती आहे. कुटुंबात राहताना, वावरताना प्रत्येक व्यक्ती खरं तर स्वतंत्र तरीही बांधलेली असते. काय हरकत आहे आपल्या जवळच्या साऱ्याच व्यक्तींचं असं स्वतंत्र असणं, त्यांचं वेगळेपण; कोणतीही आडकाठी; वयाची, सन्मानाची, कौटुंबिक स्थिती, सामाजिक पत, पातळी काहीच गृहीत न धरता त्या व्यक्तीसाठी म्हणून स्वीकारली तर?

महत्त्वाचं असं, नात्यांच्या संज्ञा असल्या तरीही त्यातून मुक्त होऊन विचार केला तरच नाती श्वासही घेऊ शकतील आणि टिकतीलही!

chaturang@expressindia.com