chaturang@expressindia.com माहितीपूर्ण लेख ‘फोबो - निर्णय पंगुत्व’ - कुठलाही निर्णय घेण्याबाबतचा हा लेख (११ जानेवारी) अनेकांना मदत करणारा आहे. अलीकडच्या काळात आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर निर्णय घेणे सोपे राहिलेले नाही. प्रचंड स्पर्धा, बदललेले वातावरण, नवनवीन समस्या व कमी झालेले भावनिक मानसिक आधार पाहता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यातून निर्णयाचे बरेवाईट परिणाम तर ज्याचे त्यालाच सहन करावे लागतात तेव्हा या संदर्भात चिंता वाटणे स्वाभाविक आहे. लेखात कालसुसंगत उपाय परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी केलेले मार्गदर्शन अत्यंत उपयोगी आहेत. - प्र.मु.काळे, नाशिक निर्णय महत्त्वाचाच भूषण कोळेकर यांचा ‘एक निर्णय’ (११ जानेवारी) हा लेख वाचला. त्यांनी आपल्या आईला जेष्ठांच्या आनंदनिवासात ठेवण्याचा निर्णय अतिशय डोळसपणे, विचारपूर्वक घेतलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत उद्भवणारी ही ज्वलंत समस्या आहे, ज्यात सुधारण्याची शक्यता तर नसतेच पण दिवसेंदिवस स्थिती बिघडत जाते. उलटपक्षी ‘अवयवदान’ किंवा ‘नेत्रदाना’प्रमाणे माझ्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी स्वतच त्यानुसार लिहून, सूचना देऊन ठेवल्या तर ही निर्णय प्रक्रिया सोपी होईल. आज या लेखामुळे माझं व्यक्तिश: काम सोपं झालं. माझ्या कुटुंबीयांना मी सांगून ठेवलं आहे, असा ‘एक निर्णय’ घेण्यास कोणतीही हरकत नाही. - सुनंदा विजय चिटणीस आत्मव्यवस्थापन महत्त्वाचेच डॉ.अंजली जोशी यांचे ‘आत्मव्यवस्थापन’ वाचले. यातील मार्गदर्शन समाजाला निश्चित उपयोगी पडणार असल्याचे जाणवले. पूर्वी लोकांची राहणी अत्यंत साधी होती, समाजात एकमेकांना शारीरिक, आर्थिक वा मानसिक मदत करणे हा सहजभाव होता, त्यांत उपकारांची किंवा कर्तव्याची जाणीवही नसायची. समाजात एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदर या गोष्टी ओतप्रोत भरलेल्या असल्याने समाजजीवन हे समृद्ध, शांत, आनंदी व समाधानी होते. आजचे समाजजीवन हे व्यक्तीकेंद्रित व प्रचंड स्पर्धात्मक, धावपळीचे, जिव्हाळा म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न विचारणारे असल्याने, आताच्या समाजात अशांती, नराश्य, असमाधान सर्वत्र दिसते आहे. एकदा एक कीर्तनकार म्हणाले, ‘‘विवेकानंद जर आजच्या युगात पुन्हा अवतरले तर समाजजीवनाची शोकांतिका पाहून लगेचच अंतर्धान पावतील इतके ते खालावले आहे.’’ डॉ.अंजली जोशी यांनी या परिवर्तनासंबंधी मीमांसा करीत, पूर्वीची ‘साधी राहणी व उच्चविचारसरणी’ समाजात परत कशी रूजविता येईल याविषयी मार्गदर्शन केल्यास पुन्हा एकदा अभिरुचीसंपन्न, समृद्ध व शांत समाजजीवन अनुभवता येईल असा आशावाद वाटतो. -प्रदीप करमरकर, ठाणे