पती-पत्नीच्या नात्यामध्ये पारदर्शकता किती आणि कशी असायला हवी, हे खूप महत्त्वाचे आहे. आपले नाते सुदृढ होण्यासाठी ‘मी’ नेमकं काय करणार आहे, माझं योगदान काय असणार आहे, मी परिस्थितीशी आणि माणसांशी कसं कसं जुळवून घेणार आहे, हा विचार महत्त्वाचा ठरतो. आणि कोणतंही नातं छान पद्धतीनं फुलवण्यासाठी सुरुवात स्वत:पासून करायची असते, हेही तितकंच महत्त्वाचं. त्यानेच होईल त्याचं-तिचं लाइफ आनंदी.

पाहता पाहता वर्ष सरलं. अशीच अनेक र्वष जातील. ‘त्याचं-तिचं लाइफ’ चालूच राहील. येतील कधी सुखाचे क्षण, कधी दु:खाचे, तर कधी आनंदाचे, तर कधी भांडणाचे आणि अनेकदा जमवून घेण्याचेही. हे असे अनुभव शब्दबद्ध करताना खूप आनंद मिळाला. अनेकांनी मेल्स आणि फोनद्वारा, तसंच  प्रत्यक्ष भेटून आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. काहींनी लेखात सुचवलेलं प्रत्यक्षात जगूनही पाहिलं आणि काय अनुभवलं तेही कळवलं.
लग्नापूर्वीच काय शिकायला हवं याचा विचार करताना कुटुंबाच्या सर्व विषयांना स्पर्श करायचा प्रयत्न केला. नवरा-बायको, सासू-सासरे, आई-वडील ही सगळी नाती निभावताना येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचारही केला. लग्न ठरवताना अपेक्षा पक्क्या करणं, शारीरिक आणि मानसिक अनुरूपता म्हणजे नेमकं काय? नकार आला तर कसं वागावं, गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड आणि ब्रेक अप्स, ऑफ बीट करिअर असणाऱ्यांनी काय करावं अशा अनेक विषयांवर गप्पा केल्या. इतका सगळा विचार करून देखील आणि सगळा अभ्यास करूनसुद्धा  प्रत्यक्षात ज्या गोष्टींना सामोर जावं लागेल अशा गोष्टी निराळ्याच असू शकतात, नव्हे असणारच आहेत. अशा वेळी आपण कसं वागणार आहोत, यावर आपला सुसंस्कृतपणा अवलंबून असतो.
पती-पत्नीच्या नात्यामध्ये पारदर्शकता किती आणि कशी असायला हवी. हेही खूप महत्त्वाचे आहे. आपले नाते सुदृढ होण्यासाठी ‘मी’ नेमकं काय करणार आहे, माझं योगदान काय असणार आहे, मी परिस्थितीशी आणि माणसांशी कसं कसं जुळवून घेणार आहे, हा विचार महत्त्वाचा ठरतो. आणि कोणतंही नातं छान पद्धतीनं फुलवण्यासाठी सुरुवात स्वत:पासून करायची असते, हेही तितकंच महत्त्वाचं.
एकमेकांच्या सहवासात फुलत जाणं, आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त करून देणं हे संपूर्ण जीवनाचे गमक असायला हवं. माझ्याबरोबर राहणाऱ्या माणसांना माझ्याबरोबर राहताना सुखकारक वाटायला हवं, हे उद्दिष्ट प्रत्येकासमोर असायला हवं.
असं उद्दिष्ट जेव्हा कुटुंबातल्या प्रत्येकासमोर असतं तेव्हा आपोआपच घरातल्या चिमुकल्यांच्या मनात ते सहजपणे झिरपतं. त्यासाठी वेगळे संस्कार करायची गरज नाही उरत. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझे पती महेंद्र एका कार्यशाळेत सहभागी झालो होतो. तिथल्या तज्ज्ञांनी सांगितलं की, ‘‘माझ्याबरोबर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझ्याबरोबर राहताना बरं वाटलं पाहिजे ही जबाबदारी निश्चितपणे माझीच असायला हवी. असा विचार कुटुंबातल्या प्रत्येकाने करायला हवा.’’ त्या वेळी आमच्याबरोबर आमचा मुलगा होता. त्यावेळी त्याचं वय असेल सहा सात वर्षांचं. या घटनेनंतर घरात त्याबाबतीत काहीच बोलणं झालं नाही. कालांतराने  मी कुठल्याशा ट्रेिनगसाठी बाहेरगावी गेले होते. महेंद्र पण तेव्हा कामानिमित्त बाहेर होता. सुमारे आठ दिवसांनी मी परत आले. घरात माझे दोन्ही मुलगे होते. वय वष्रे अकरा आणि हा धाकटा सहा-सात वर्षांचा. घरी आले तर घर छान आवरलेलं होतं. बाथरूममध्ये पाण्याची बादली भरलेली होती. घरी दूध आणून ठेवलेलं होतं. बाथरूममध्ये जाऊन मी हात-पाय धुऊन बाहेर आले तर धाकटय़ाने कानात सांगितलं, ‘‘आई इतक्यात कपाट उघडू नकोस हं.’’ मनात म्हटलं, ‘काहीतरी गडबड दिसत्येय.’ तेव्हढय़ात मोठय़ाने माझ्यासाठी चहा केला. आम्ही तिघांनी मिळून गेल्या आठ दिवसांतल्या गप्पा मारल्या. माझं ट्रेिनग कसं झालं वगरे सांगितलं आणि मग प्रवासाचे कपडे बदलावेत, असा  विचार करून मी कपाट उघडलं तर कपाटातून भराभर खूप कपडे खाली पडले. मुलांनी आठवडाभराचे कपडे  नुसते त्यात कोंबले होते. धाकटा पटकन बिलगला आणि म्हणाला,‘‘आई तुला आल्या आल्या बरं वाटलं की नाही? तुला पसारा नाही ना आवडत? पण मला कपडय़ांच्या घडय़ा नाही घालता आल्या. मग मी सगळे कपडे कपाटात नुसते ठेऊन दिले. रागावली नाहीस न? त्या दिवशी नाही का त्या कुठल्याशा क्लासमध्ये ते सांगत होते की, माझ्याबरोबर राहताना तुला बरं वाटलं पाहिजे. हो ना ?’’ माझ्या डोळ्यात पाणी आलं. मुलं इतकी टीप कागदासारखं टिपतात हे मला त्या दिवशी खूप जवळून कळलं.
एकमेकांना समजून घेणं हे मोठय़ांकडून लहानांपर्यंत झिरपत जायला हवं. त्यासाठी घरातल्या सगळ्यांनीच प्रत्येक आठवडय़ात निदान दोन वेळा तरी एकत्र जेवायला वेळ काढायला हवा. एकमेकांबद्दलची चौकशीही करायला हवी. नवदाम्पत्याला भरपूर एकांत द्यायला हवा आणि महत्त्वाचं म्हणजे घरातल्या मोठय़ा माणसांनी स्वत:चं आयुष्य स्वत:पुरतं आखून घ्यायला हवं. प्रेम, आदर, विश्वास, जबाबदारीचं भान आणि नात्यातली पारदर्शकता, प्रामाणिकपणा या उत्तरोत्तर चढत जाणाऱ्या पायऱ्यांमुळे ‘त्याचं-तिचं लाइफ’ समृद्ध व्हायला नक्कीच मदत होईल. दोघांचं सहजीवन ज्यावेळी उत्कृष्ट असतं त्यावेळी समोर येणाऱ्या समस्यांना सहजपणे तोंड देता येतं. काहीही झालं तरी मी एकटा किंवा एकटी नाही, हा दिलासा माणसाला खूप काही देऊन जातो. मनाने आम्ही दोघं एकत्र आहोत या भावनेची ताकद खूप मोठी असते. कोणतीही दोन माणसं एकत्र येतात तेव्हा मतभेद हे होणारच. तरीही त्यातून मार्ग काढून एकत्र वाटचाल करणं हे दोघांच्याही हिताचं असतं.
चुकतमाकत जुळवून घेत अनेक जोडपी आज आनंदाने एकमेकांना सांभाळून घेत आहेत. या ठिकाणी हुशारीपेक्षा शहाणपणा जास्त उपयोगी पडलेला आढळतो. आपल्या जोडीदाराला तो किंवा ती आहे तसं स्वीकारणं हे ज्याला जमलं तो सुखी झालेला आढळतो. अर्थात या ठिकाणी दोघांच्या मूल्यधारणा एक असाव्या लागतात. स्वाती अतिशय खरेपणाने वागणारी आणि तिची गाठ एका सतत पसे खाणाऱ्या व्यक्तीशी नवरा म्हणून पडली तर त्यांचं जमणं अवघडच. इथे आहे तसं स्वीकारणं म्हणजे मूल्यांनाच सुरुंग.
अशी अनेक विजोड जोडपी आपल्या अवतीभवती असलेली आपण बघतो. या ठिकाणी  मात्र सावध असायला हवं. आपल्या मूळ धारणा ओळखायला हव्यात.

ही संपूर्ण लेखमाला लिहीत असताना माझी भूमिका ‘आम्ही कसे परफेक्ट आहोत अशी नव्हती.’ कारण या सगळ्यामध्ये योग्य-अयोग्य किंवा चूक-बरोबर असं काही नसतं. जुळवून घेत असताना आपण कम्फर्टेबल असणं आणि हा सगळा प्रवास आनंददायी होणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळेच आजच्या लेखाचं नाव आहे ‘नांदू या सौख्यभरे’.
सुखाने नांदण्यासाठीचे काही मंत्र गेले वर्षभर सांगताना आम्ही दोघेही त्याच रस्त्यावर  वाटचाल करीत आहोत. कधी चुकतो, कधी भांडतोदेखील, कधी कधी अताíकक प्रतिक्रियाही देतो. पण तरीही अखेपर्यंत एकत्र वाटचाल करायची अपेक्षा बाळगून आहोत. म्हणूनच शहाजोगपणे नुसताच ‘नांदा  सौख्यभरे’ असं आशीर्वाद न देता म्हणते ‘नांदू या सौख्य भरे’. आम्ही पण असेच चुकणाऱ्या  लोकांच्या मालिकेतलेच आहोत.
‘त्याचं-तिचं लाइफ’ हा एक आनंददायी प्रवास आहे. पडत-धडपडत पुढे जाण्याचा. अशा या मंगल प्रवासास खूप खूप शुभेच्छा !     (समाप्त)