डॉ. स्मिता लेले - dr.smita.lele@gmail.com आपल्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर विज्ञानाचा सहभाग मोलाचा आहे, अगदी आहारातही. आहारातल्या या विज्ञानालाच समोर ठेवून सुरू झालेलं हे सदर ‘करोना’मुळे अधिक र्सवकष झालं. कारण त्यामुळे शरीर आणि आरोग्य यांच्यातील नात्याचा अधिक खोलवर जाऊन विचार के ला गेला. हे सदर आज संपत असलं तरी या लेखाच्या माध्यमातून दिली गेलेली आरोग्यविषयक माहिती कायमच बरोबर राहील. हा हा म्हणता २०२० र्वष संपण्याची वेळ आली. संपूर्ण जगाला ‘करोना’च्या भीतीमुळे कायम लक्षात राहील असं हे वर्ष. एखादा मीटर शून्यावर आणून परत सुरू करावा तसे या विषाणूमुळे गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, बलवान आणि कमी सशक्त असे सर्व देश एका पातळीवर आले. एका नवीन जीवनपद्धतीचा आरंभ झाला. शिक्षणाचं आणि संपर्काचं नवीन दालनच झालेल्या इंटरनेटचा आणि वेबिनार, यूटय़ूबसारख्या दृक्श्राव्य माध्यमांचा उपयोग चिमुरडय़ा मुलांपासून वयोवृद्ध आज्या-पणज्यांपर्यंतची मंडळी सर्रास करू लागली ही त्यातली जमेची बाजू. काय खावं, काय खाऊ नये, प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, या आणि अशा अनेक गोष्टी या नवीन माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. समारोपाचा हा लेख लिहिताना माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. जणू घरात आणलेल्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी जसं घरच्या कर्त्यां बाईला वाटतं तसंच काहीसं. आपल्यावरची जबाबदारी पूर्णपणे, नीट पार पडली याचं समाधान आणि हुरहुरही वाटत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये जेव्हा ‘चतुरंग’कडून या सदरासाठी विचारणा झाली तेव्हा मला पहिला प्रश्न पडला की मराठीत बोलणं सोपं, पण विज्ञान आणि तेदेखील शुद्ध, सोप्या मराठी भाषेत लिहायचं आणि संगणकावर ते टाइप करायचं म्हणजे जरा कठीण काम आहे. पण माझा स्वभाव आव्हानं स्वीकारण्याचा. शिवाय ‘लोकसत्ता चतुरंग’ या पुरवणीची जनमानसात अतिशय उत्तम प्रतिमा आहे. शिकवण्याची अत्यंत आवड असल्याने आणि सर्वसामान्य लोक आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी उत्सुक वाचकांपर्यंत पोहोचण्याची याहून अधिक चांगली संधी कधी मिळणार? असा विचार करून होकार दिला. सदरासाठी नाव ठरवलं, ‘जीवन विज्ञान’. पहिली मूलभूत गरज अन्न आणि म्हणून या सदरातून मुख्यत: आहार या विषयावर लिहायचं ठरलं. काय खावं आणि काय खाऊ नये याची इंटरनेटवर इतकी उलटसुलट माहिती आहे, की सुशिक्षित वाचकाच्या, विशेषत: स्त्रियांच्या डोक्यात ‘माहितीचा ट्रॅफिक जॅम’ होत आहे. कुटुंबातील मुलांना तसंच मधुमेह, हृदयरोग असलेल्या कुटुंबीयांना रोज काय खायला द्यायचं, हा यक्षप्रश्न स्त्रियांना रोज सोडवावा लागतो. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून टाळेबंदीमुळे सगळेजण घरात अडकले, कामवाली बाई नाही, बाहेर जाता न आल्यामुळे घरी खायच्या वेळा वाढल्या. यात भर म्हणजे हॉटेल, घरपोच खाणं सगळं बंद होतं. अशा कठीण काळात वाचकांना या सदराचा थोडा आधार मिळाला असेल असं वाटतं. ‘जीवन विज्ञान’ या लेखमालेतून एक मुख्य संदेश असा दिला आहे, की जर आपण रोजच्या जगण्यामध्ये थोडासा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवला तर आयुष्य अधिक सुखी, आरोग्यदायी होईल. शिवाय स्वयंपाकघरात ऊर्जेची बचत, वेळेची बचत होऊन अन्नाची पोषणमूल्यं वाढतात. पारंपरिक शहाणपण, जुन्या-नव्या विज्ञान आणि पद्धतींचा सुवर्णमध्य साधणं चांगलं. आहार, विहार आणि विचार यामुळे आपलं शरीर आणि जीवन समृद्ध बनतं आणि त्यात चुका झाल्यास रोग, ताण आणि दु:ख निर्माण होतं. म्हणून काय खाता, कसे खाता, किती खाताय याबरोबर हे अन्नसेवन कोण करत आहे आणि त्याचं पचन कसं होत आहे हे सर्व लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून पहिल्या ४-५ लेखांमार्फत पचनशक्तीविषयी बरीच माहिती या सदरातून दिली गेली. परंतु केवळ शालेय पुस्तकातील माहिती न देता त्याला मूलभूत विचारांची जोड देऊन जीवनोपयोगी करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या जैविक संयंत्राप्रमाणे काम करणारं हे शरीर सूर्याच्या गतीवर जैविक घडय़ाळानुसार चालतं. तसंच प्रत्येक शरीरसंस्थेला एक स्वत:चा असा बदल घडण्याचा आणि स्थिर स्थिती येण्याचा काळ असतो. हा काळ पचनसंस्थेसाठी, तसंच शरीर बनण्यासाठी किती असतो, अशी माहिती बऱ्याच वाचकांसाठी नवी होती. ‘डाएट’च्या मदतीनं २ ते ४ आठवडय़ांत कमी-जास्त झालेलं वजन टिकवण्यासाठी ते नवीन ‘स्थिर स्थिती’मध्ये दीड-दोन र्वष ठेवावं का लागतं, हे कोडंही उलगडून संगितलं गेलं. पहिल्या काही महिन्यांमध्ये पचनसंस्थेविषयी माहिती समजून घेतल्यावर महत्त्वाचे अन्नघटक आपण समजून घेतले. आहारात मिठाचं महत्त्व, पिण्याचं पाणी आणि पाण्याचं जीवनातील स्थान तसेच काही रासायनिक गुण- जसे ‘पीएच’ म्हणजे काय, अल्कलाइन अन्न, अल्कलाइन पाणी याविषयीही माहिती या लेखांमध्ये होती. भूक, आहार, त्यातलं समाधान यातील फरक खूप जणांना समजून घ्यायला आवडला. आपण आजारी का पडतो?, वृद्धत्व का येतं?, ‘अँटीऑक्सिडंट’ अन्न कोणतं?, ५ रंगांच्या भाज्याचं महत्त्व आणि ‘५ का फंडा’ ही माहिती पुढच्या लेखांतून दिली गेली. मुख्य आहारातील महत्त्वाचे घटक, अर्थात प्रथिनं, तेल-तूप, साखर याबरोबरच मध आणि कृत्रिम गोडी देणारे पदार्थ यावरील लेख वाचकांनी आवडीनं वाचले. खूप नवीन माहिती साध्या-सोप्या भाषेत मिळाली, अशा आशयाच्या ई-मेल मला अनेक वाचकांकडून मिळाल्या आणि त्यापैकी कित्येक वाचकांनी माझ्या मित्रपरिवारात कायमचं स्थानही मिळवलं. वाचकांकडून आलेल्या सूचना, त्यांच्या मनातील प्रश्न आणि क्वचितप्रसंगी काही टीका यामुळे माझ्याकडून अधिक परिपूर्ण लिखाण केलं गेलं. म्हणून सर्वाचे आभार. या लेखमालेतील प्रत्येक लेख लिहिताना मला १०-१५ तासांचा अभ्यास करावा लागे. पण माझी खरी परीक्षा होती जेव्हा ‘करोना’च्या काळात प्रतिकारशक्ती या विषयावर लेख लिहिण्याची विनंती केली गेली तेव्हा. मी शिकले आहे रसायन -अन्न तंत्रज्ञान आणि आता मला रोग, प्रतिकार, रोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि जर रोग झाला तर काय खावं या सगळ्याचा अभ्यास करणं भाग होतं. हाडाचा शिक्षक हा स्वत: जन्मभर विद्यार्थी असतो हे लक्षात घेऊन माझी अभ्यासाला सुरुवात झाली. त्यासाठी माझ्या दोन प्राध्यापक मैत्रिणींची खूप मोलाची मदत मिळाली. औषधशास्त्र विषयातील तज्ज्ञ आणि प्राण्यांवर प्रयोग करणारी डॉ. साधना साठे आणि जैवरसायनशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. लक्ष्मी अनंतनारायण. या दोघींना मी वेळीअवेळी फोन केले, हक्कानं कामाला लावलं, इतकंच नव्हे तर संपादकांना लेख पाठवण्यापूर्वी माझा लेख तपासून त्यात काही चुका असतील तर दुरुस्ती सुचवा अशी हक्कानं गळ घातली. दोघींनीही मला मनापासून आणि आनंदानं सहाय्य केलं, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. ‘जीवन विज्ञान’ सदराच्या यशामध्ये चित्रकार नीलेश यांचे योगदान आहेच. तो कल्पकतेचा भन्नाट कलाकार आहे. छत्री घेतलेला पावसाचा थेंब, ‘छान’ अशी खूण करणारा काटा चमचा, ‘करोना’ विषाणूला भाल्यानं भोसकणारा प्रतिकारशक्तीरूपी सैनिक! अशा पकड घेणाऱ्या चित्रांमुळे प्रत्येक लेखाची खुमारी अधिक वाढली. या लेखमालेचा वैयक्तिक पातळीवर मला खूप फायदा झाला आहे. अक्षरश: शेकडो मित्रमैत्रिणी आणि चाहते मिळाले. मोबाइल आणि व्हॉट्सअॅपच्या काळात एकमेकांशी संबंध ठेवणं खूप सोपं झालं आहे. कित्येक जुन्या मैत्रिणी आणि परिचित लोक परत एकदा संपर्कात आले. माझ्या ज्ञानातदेखील मोलाची भर पडली. नव्या मित्रपरिवारकडून काही नवे उपक्रम आणि गोष्टी कळल्या. देऊन वाढतं ते ज्ञान आणि देऊन ज्याचं महत्त्व कमी होतं ती साधी माहिती. तशातच विज्ञान म्हणजे तर विशेष ज्ञान. असं हे जीवन विज्ञान तुम्हाला देण्याच्या निमित्तानं मलाही भरभरून सर्व काही मिळालं, म्हणून मी तुम्हा सर्वाची आणि ‘लोकसत्ता टीम’ची खूप आभारी आहे. या सर्व लेखांचं संकलन करावं अशी सूचना खूप जणांनी केली आहे. त्यावर विचार सुरू आहे. सदर संपवताना शेवटी आरोग्य राखण्यासाठी एक संदेश- रोजचं जेवण म्हणजे जणू इंद्रधनुषी रंगाचं ताट असावं. विविध रंगांच्या भाज्या आणि फळं रोजच्या आहारात हवीत. आपलं शरीर एखाद्या ‘रेसिंग कार’सारखं आहे. या गाडीचं इंधन कबरेदकं आणि तेल-तूप. पारंपरिक मराठी जेवणातील पहिला गरम वरण-भात, त्यावर थोडं साजूक तूप आणि लिंबू खाणं महत्त्वाचं. फक्त ४ घासच खावे, परंतु ‘डाएट’च्या नावाखाली त्याला फाटा देऊ नका. नंतर पोळी-भाजी अथवा भाकरी-पिठलं- पोटभर नको, अर्ध पोट भरेल इतकं. बाकी पोट भरावं रंगीबेरंगी भाज्या, कोशिंबिरी खाऊन, काही कच्च्या, काही किंचित शिजवून. फळं जेवणात नको, सकाळी नाश्त्याला आणि दुपारी ४ वाजता चांगली. तेव्हा नववर्षांचा संकल्प- जेवणाचं ताट इंद्रधनुषी रंगाचं! (सदर समाप्त) अधिक माहितीसाठी डॉ. स्मिता लेले यांच्या यूटय़ूब चॅनल - Dr. Smita Lele याला भेट द्या.