धन किंवा स्थूल वस्तू यांचे दान करणारी व्यक्ती ‘दानी’ म्हटली जाते. ज्ञानाचे दान करणारी व्यक्ती ‘महादानी’ म्हटली जाते. तर गुण व शक्तीचं दान देणारी व्यक्ती ‘वरदानी’ म्हटली जाते. मात्र ईश्वरीय ज्ञानानुसार यथार्थ दान तेच असते ज्या दानाने देणार व घेणारा या दोहोंचाही जीवनचंद्रमा चढत्या कलेत प्रवेश करतो. थोडक्यात उभयतांचे जीवन सर्वकाळ सुखमय होते.

मनुष्यप्राणी जेव्हा जीवनात केवळ स्वत:साठी झिजतो तेव्हा ते म्हटले जाते सामान्य जीवन. पण जेव्हा ‘देह होतो चंदनाचा’ म्हटले जाते, अर्थात मनुष्य आपल्या परोपकारी वृत्तीमुळे, कृतीमुळे सतत दुसऱ्याच्या कामी येतो तेव्हा ते असते असामान्य जीवन. खरे पाहता मनुष्यजीवनाची इमारत ही सत्कर्माच्या बळावरच उभी असते. ‘दान’ हेदेखील सत्कर्माचे एक उत्कृष्ट स्वरूपच आहे.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?
Numerology Mulank Five People
Numerology: ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात बुद्धिमान आणि हुशार, कामाच्या ठिकाणी होते त्यांचे कौतूक

ऐसी कळवळय़ाची जाती। करी लाभविण प्रीती॥
दुसऱ्यांच्या व्यथेला, वेदनेला जाणून, संसाररूपी उन्हाने तप्त झालेल्या लोकांसाठी प्रेमरूपी, वात्सल्यरूपी सावली देणारं झाड जरूर बनावं. ही भावना केवळ संवेदनशील व्यक्तीच्या हृदयात उत्पन्न होते. त्या वेळी मनाला करुणतेचा स्पर्श होतो. त्यातून जी सेवा घडते तेच दानाचे प्रकट रूप होय. 

श्रीमद्भगवद्गीतादेखील सांगते ‘दान’ हा एक दैवी गुण आहे. महाभारत म्हणते-
अद्रोह : सर्वभुतेषु कर्मणा मनसा गिरा।
अनुग्रहश्च दानं च एष धर्म: सनातन:।
अर्थात कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये. सर्वावर कृपा करावी व सर्वानाही चांगल्या गोष्टीचे दान द्यावे हाच सत्पुरुषांचा सनातन धर्म आहे. निरपेक्ष वृत्तीने केलेले दान हे ‘सात्त्विक दान’ म्हटले जाते. जे दान परतफेडीची अपेक्षा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते ते ‘राजसिक दान’ म्हटले जाते व अपात्र व्यक्तीला अनादरासहित दिले जाणारे दान हे ‘तामसिक दान’ म्हटले जाते.
एक मात्र खरे, दानाचा गाजावाजा मात्र नसावा. या हाताने दिलेले दान त्या हातालाही कळू दिले जाऊ नये. याला म्हणतात, ‘उत्तम दान.’ एक सुविचार आठवतो. तुम्ही या विशाल जगतासाठी जे कराल, ते कधीही फुकट जाणार नाही आणि हृदय ओतून द्याल तर त्याची किंमतच करता येणार नाही. कारण खरा आनंद हा केवळ देण्यात असतो. म्हणूनच दानाची महती अगाध आहे.
हस्तस्य भूषणम् दानं सत्यं कंठस्य भूषणम्।
श्रोत्रस्थ भूषणम् शास्त्रं भूषण: की प्रयोजनम्।
या सुभाषिताचा अर्थ होतो- बंधूनो, हाताचं भूषण दान आहे, कंठाचे भूषण सत्य बोलणं आहे, कानाचं भूषण शास्त्र म्हणजेच ज्ञान श्रवण करणं आहे आणि असे असेल तर या नरदेहाला आलंकृत करण्यासाठी आणखी वेगळ्या, कृत्रिम आभूषणांची काय बरे आवश्यकता? म्हणूनच प्रत्येकाने सतत दुसऱ्याला काही तरी चांगलं देण्याची सवय लावलीच पाहिजे. देणारा तो देवता! कोणत्याही देवी-देवतांचे चित्र पहा! त्यांच्या चित्रातूनच त्यांच्या चरित्राचे दर्शन घडते. प्रसन्न मुद्रा व आपल्या वरदानी हातांनी सदैव आशीर्वाद देण्यासाठीच ते जणू कटिबद्ध असतात.
या स्थूल जगात दान करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. अन्नदान, जलदान, वस्त्रदान, रक्तदान, भूदान, गो-दान, नेत्रदान, देहदान यांना स्थूल दान म्हटले जाते. शुभभावना, शुभकामना यांचा अंतर्भाव असलेले शांती व प्रेमाचे दान यास ‘सूक्ष्म दान’ म्हटले जाते. संपूर्ण विश्व हे माझे कुटुंब आहे या भावनेमुळे विश्वकल्याणाची निरंतर तळमळ त्यांना लागते ते या बहुमोल कार्यासाठी आपला बहुमोल समय प्रदान करतात त्याला ‘समयदान’ म्हटले जाते. महर्षी चरकांनी तर आरोग्यदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटले आहे. भुकेलेल्या व्यक्तीला अन्नाचे दोन घास भरवल्यास उपाशी व्यक्तीचा आत्मा संतुष्ट होऊन त्याच्या मुखाद्वारा आशीर्वादाचे बोल बाहेर पडतात.
आपल्या देशात दानाची थोर परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आली आहे. महाभारतातील ‘कर्ण’ म्हणजे दानशूरतेचा आदर्श. कर्णाचे जीवन त्यागाचे व औदार्याचे प्रतीक आहे. कुरुक्षेत्रावरील कौरव-पांडवांच्या युद्धाचा प्रसंग आठवतो. अर्जुनाने सोडलेला अंजलिक बाण. त्याच्या प्रहाराने घायाळ झालेला कर्ण रक्ताच्या थारोळ्यात प्राणांतिक वेदनेने विव्हळत असलेला. सर्व योद्धे कर्णाच्या भोवती जमलेले अगदी त्याच वेळी कुणी एक वृद्ध याचक युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या पुत्राच्या अंत्यविधीच्या क्रियेसाठी पैशांची मदत मागण्यासाठी आलेला. त्या गरीब, वृद्ध ब्राह्मणाकडे कुणीच लक्ष देत नाही. पण कर्णाच्या कानी मात्र त्याही अवस्थेत त्याचा आवाज पडतो. स्वत:च्या आत्यंतिक दु:खद वेदनेला विसरून कर्ण आपला पुत्र चित्रसेन यास त्या याचकास बोलावण्यास सांगतो. रणभूमीवरची अंतिम अवस्था, अंतिम क्षण जवळ आलेला असतानाही देण्याची भावना त्याच्या मनात जन्म घेते. काय द्यावे हा विचार त्याच्या मनात फिरू लागतो. अधिक विचार करता त्याला आपल्या तोंडातील सोन्याचा दात आठवतो. चित्रसेनास तो दगड आणावण्यास सांगतो व आपल्या तोंडातील दात त्या दगडाने पाडण्याचा आदेश आपल्या पुत्राला देतो. पितृइच्छेखातर नाइलाजाने का असेना, चित्रसेन सांगितलेले कर्म करतो. कर्ण आपल्या अश्रुधारांनी रक्ताने माखलेला दात स्वच्छ धुवून प्रसन्न मुद्रेने ब्राह्मणाच्या हाती ठेवतो.
मृत्यूच्या दारी असूनही गरजवंताला शक्य तेवढी व जमेल तेवढी मदत करावी, कोणासही रिकाम्या हातांनी पाठवू नये, अशा अविनाशी विचारांचा धनी असणारा कर्ण हा भारतीय संस्कृतीतील भव्यता, उदारता, धिरोदत्तता, संवेदनशीलता, त्याग यांचे प्रतिनिधित्व करतो.
संत कबीर म्हणतात,
घन रहे ना जौबन रहे, रहे छाँव ना धाम।
कबीर जगमें जस रहे, कर दे किसिका काम।
माणसांचं सुंदर, आकर्षक शरीर, त्याचं तारुण्य, त्याचं प्रशस्त निवासस्थान त्याची कमावलेली धनसंपदा यांपैकी शाश्वत, चिरंतन टिकेल असं काहीही नाही. त्यामुळे आपलं जीवन इतरांसाठी कसं मार्गदर्शक ठरू शकेल यावर लक्ष केंद्रित करावं व स्वत:चं व इतरांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न करावा.
सर्व जण यथाशक्ती दान करतातही, पण आपण केलेल्या दानाचा प्रभाव आपल्या जीवनावर कसा पडतो हे नेमके माहीत आहे का? ईश्वरीय ज्ञानानुसार यथार्थ दान तेच असते ज्या दानाने देणार व घेणारा या दोहोंचाही जीवनचंद्रमा चढत्या कलेत प्रवेश करतो. थोडक्यात उभयतांचे जीवन सर्वकाळ सुखमय होते.
धन किंवा स्थूल वस्तू यांचे दान करणारी व्यक्ती ‘दानी’ म्हटली जाते. ज्ञानाचे दान करणारी व्यक्ती ‘महादानी’ म्हटली जाते. तर गुण व शक्तीचं दान देणारी व्यक्ती ‘वरदानी’ म्हटली जाते. स्थूल वस्तू किंवा धन अल्पकाळाचे सुख देते. जेव्हा आपण एखाद्याला काही रुपयाचं दान देतो, तेव्हा ते धन आपल्याजवळ राहत नाही. दुसरा व्यक्ती त्यापासून संतुष्ट जरूर झाला, म्हणून याला ‘दान’ म्हणता येईल. आपण एखादे पुस्तक वाचून त्यातील विचार साररूपाने आपल्या बुद्धीत सामावले आणि वेळोवेळी ते विचार इतरांपर्यंत पोहचवले. ज्ञानाचे दान काही केल्या कमी होत नाही. उलट वाढते. म्हणजेच ज्ञानदानात स्वहित व जनहित साधते. म्हणून अशा दानाला ‘महादान’ म्हटले जाते. या ज्ञानाच्या बळावरच आपल्या जीवनाला दैवी गुणांनी व अष्ट शक्तींनी संपन्न करून आपल्या दिव्य आचरणाद्वारा आपल्या संगाच्या रंगात इतरांना रंगवणारे स्वत:बरोबरच इतरांची आध्यात्मिक, मानसिक, चरित्रिक उन्नती करवणारे गुण व शक्तींचे दान याला ‘वरदान’ म्हटले जाते. अशा व्यक्तींच्या सहवासामुळे अनेकांचे कवडीमोल जीवनदेखील हिरेतुल्य बनू शकते.
आपल्यामुळे अनेक आत्म्यांचे चरित्र उज्ज्वल बनेल त्यांचे कर्म व संस्कार सर्वश्रेष्ठ बनतील. त्यांच्यात संपूर्ण पवित्रतेची प्रतिष्ठापना होईल असे आपले आचरण असावे. म्हणूनच इतर दानांबरोबरच मनाद्वारा आत्मिक शक्तीच्या वृद्धीचे दान करा, वाचेद्वारा ज्ञानरत्नांचे दान करा व कर्माद्वारा सर्वही प्रकारच्या दैवी गुणांचे (देवतांसारखे) दान करा व अखंड महादानी व वरदानी बनण्याचा प्रयत्न करा.

(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रसिद्ध होणाऱ्या अध्यात्मिक प्रवचनांचा हा अनुवादित भाग)