अभिजीत ताम्हणे

स्वत:च्या हयातीत प्रचंड मोठं, ज्याला ‘सिंहावलोकन’ म्हणतात तसं प्रदर्शन राष्ट्रीय कलादालनात करू शकलेल्या नवजोत या पहिल्याच स्त्री दृश्यकलावंत आहेत. पर्यावरण, आदिवासींच्या संस्कृतीची आत्ता असलेली गत, वेश्यांचं जगणं, मुंबईचं गिरणगाव आणि कामगार चळवळ, जातीय दंगली आणि त्या घडवणाऱ्यांपैकी काही जणांना मिळणारं अभय, असे सामाजिक विषय नवजोत यांनी खुबीनं हाताळले आहेत. नवजोत या ज्येष्ठ चित्रकर्तीचा, गेल्या ५० वर्षांतला कलाप्रवास मांडणारं पाच मजली प्रदर्शन ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’त २५ जानेवारी पर्यंत पाहता येईल.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश

चित्रं कळत नाहीत’ म्हणताय ना तुम्ही? ठीकाय.. पण मग तुमच्या आसपासच्या जगात तरी रस आहे की नाही तुम्हाला, चला आपण चित्राबित्रांबद्दल नंतर बघू आणि आधी जगच पाहू या..

अशा काहीशा पद्धतीनं प्रेक्षकांना कवेत घेऊन, त्यांना जगाचा विचार करू देऊन हळूहळू कलाआस्वादाकडे नेणारं एक मोठ्ठं प्रदर्शन सध्या मुंबईत भरलंय. पाच मजली प्रदर्शन! कुठे, कधीपर्यंत, याची माहिती नंतर घेऊच पण या प्रदर्शनाच्या निराळेपणाचा एक अनुभव या प्रदर्शनाच्या तळमजल्यावरच येणार आहे. नवजोत यांनी केलेली सर्वात नवी फिल्म या प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच आहे. ही फिल्म दोन पडद्यांवर दिसते. दोन्ही पडद्यांवरली दृश्यं कधी सारखीच, दोन वेगवेगळय़ा कोनांमधून टिपलेली, कधी निरनिराळी आहेत. पण ही सारी दृश्यं, डॉक्युमेंटरीवजा या फिल्ममध्ये बोलणारी सारी माणसं ओदिशा ते बिहार या कोळसाखाणींच्या भागातली आहेत. कोळशाच्या मोठय़ा खाणींसाठी आम्ही जमीन गमावली, पण नोकऱ्या छोटय़ामोठय़ाच मिळाल्या आणि काही वर्षांपूर्वी १५ प्रकारचा तांदूळ पिकवणारे आम्ही, रेशनच्या तांदळाला मोहताज झालो, असं ही माणसं सांगताहेत. बऱ्याच शहरी लोकांना आदिवासींच्या दु:खांकडे पाहायला वेळ नसतो, तीच गत या फिल्मचीही होते आहे.. हा अनुभव विचित्रच म्हणायचा, कारण काहीतरी नवं समजतंय, ते उत्तम दर्जाच्या दृश्यांमधून आपल्यासमोर येतंय तरीही आपल्याला ‘वेळ नाही’!

हे प्रदर्शन नवजोत या ज्येष्ठ चित्रकर्तीचा, गेल्या ५० वर्षांतला कलाप्रवास मांडणारं आहे. नवजोत १९६९ मध्ये कलाशिक्षण संपवून सर ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या आवाराबाहेर पडल्या. नवजोतसाठी त्यानंतरचं दशक हे प्रेम, लग्न, मुलीचा जन्म यांचं होतं.. पण जोडीदार अल्ताफ हेही चित्रकार असल्यामुळे म्हणा किंवा त्यांचीच आंतरिक ऊर्मी म्हणा, हे दशक फुकट नाही गेलं.. पेन, शाई आणि कागद एवढीच साधनं बहुतेकदा वापरून त्या काम करत राहिल्या. त्यांची त्या वेळची चित्रं एखाद्या संघटनेसाठी किंवा फक्त स्वत:साठी केलेली असायची. मात्र १९९० नंतर जणू त्यांची नवी सुरुवात झाली. एकेकाळी भरपूर स्केचिंग करणाऱ्या, ‘माणसासारखा हुबेहूब माणूस’ काढण्यात पटाईत झालेल्या नवजोत १९९६ पासून आदिवासी कलावंतांसह काम करू लागल्या. राजकुमार आणि शांतीबाई या दोघा आदिवासी कलावंतांचं प्रदर्शन मुंबईत महत्त्वाच्या खासगी कलादालनात भरवण्याची कल्पना त्यांनी तडीला नेली. आणि पुढेही, लोकांचीच खासगी किंवा सामाजिक सुखंदु:खं त्या त्यांच्या कलाकृतींतून मांडत राहिल्या. व्हिडीओ वापरून केलेली मांडणशिल्पं हा कलाप्रकार नवजोत यांनी हाताळला.

या प्रवासातले निवडक टप्पे मुंबईच्या कुलाबा भागात, रीगल सिनेमासमोरच्या चौकातच असलेल्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’त प्रदर्शनरूपानं येत्या शुक्रवापर्यंत (२५ जानेवारी) मांडले गेले आहेत. हे प्रदर्शन सोमवारखेरीज दररोज सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत पाहता येईल. या चित्रांची निवड नॅन्सी अदजानिया यांनी केली आहे आणि त्यांनीच या चित्रांबद्दल इंग्रजीत केलेलं लिखाणही, प्रत्येक मजल्यावर एकदोन परिच्छेद अशा प्रकारे मांडलं आहे. शिवाय काही मार्गदर्शक व्यक्ती, कलादालनात येणाऱ्यांना चित्रांची माहितीपूर्ण सफर घडवण्यासाठी सज्ज आहेत.

प्रदर्शनात काय आहे, हा प्रश्न महत्त्वाचाच. पण स्वत:च्या हयातीत असं मोठं, ज्याला ‘सिंहावलोकन’ म्हणतात तसं प्रदर्शन या राष्ट्रीय कलादालनात करू शकलेल्या नवजोत या पहिल्याच स्त्री दृश्यकलावंत आहेत. पर्यावरण, आदिवासींच्या संस्कृतीची आत्ता असलेली गत, वेश्यांचं जगणं, मुंबईचं गिरणगाव आणि कामगार चळवळ, जातीय दंगली आणि त्या घडवणाऱ्यांपैकी काही जणांना मिळणारं अभय, असे सामाजिक विषय नवजोत यांनी अशा खुबीनं हाताळले आहेत की, त्यांच्या कलाकृती या ‘सामाजिक विषयावरली भाषणबाजी’ वाटत नाहीत. याचं एक कारण असं की पिढय़ानपिढय़ा चालत आलेल्या मिथककथा किंवा अन्य गोष्टी, माणसं, त्यांच्या जगण्यातले प्रसंग, तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत सरस अशी कारागिरी यांची गुंफण नवजोत यांच्या कलाकृतींमध्ये असते.

पर्यावरणाचाविशेषत: कोळसा जाळूनच आपण कशी वीज वापरतो आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करण्यात ‘प्रगत’ मानले जाणारे जर्मनीसारखे देशसुद्धा कसे उद्दिष्टांच्या मागेच आहेत, हे सांगण्यासाठी काही आलेखांचा आधार नवजोत यांनी घेतला आहे खरा, पण हे आकडेवारीचे आलेख असलेल्या रेषा, विमानतळांच्या छपरांचे फोटो असावेत तशा प्रकारच्या दृश्यांवरफ्रेमच्या काचेवर दिसतात. ही दृश्यं कसली आहेत म्हणून जरा बारकाईनं पाहायला जावं तर लक्षात येतं.. हुबेहूब असले तरी हे फोटो नाहीत! जलरंगात रंगवलंय हे सगळं! असेच कोळसाउत्पादनाचे आलेख आणि त्याखाली जलरंगांत रंगवलेले कोळसाखाणींचे नकाशे, ही आणखी एक कलाकृती आहे. हे आलेख पाहतापाहता आपल्याला थोडं पुढे, पलीकडे दोन पडद्यांवर एक चित्रफीत दिसतच असते आणि त्या दोन पडद्यांच्या साधारण समोरच, कपाळाच्या मधोमध पांढरंशुभ्र मोठं शिल्पही दिसत असतं.. हे शिल्प आहे गाढवाचं, पण त्याला तीनच पाय आहेत आणि कपाळाच्या मधोमध या गाढवाला असलेलं शिंग हे पार जमिनीला टेकलेलं आहे. असंच कपाळावरलं एक शिंग नवजोतच्या आणखी काही शिल्पांमध्येही दिसतं. ती ‘हॉर्न इन द हेड’ ही शिल्पमालिका, एका ससानियन (हल्लीच्या पारशांचे इराणी पूर्वज) मिथककथेवर आधारित आहे. सोन्याचं एकच शिंग असलेल्या तीन पायांच्या गाढवानं आपलं लांब शिंग इराणच्या कॅस्पियन समुद्रात बुडवलं आणि ‘जगातला सर्वात मोठा तलाव’ मानला गेलेल्या या समुद्रावरलं गंडांतर टळलं, अशी ती मिथककथा.

हॉर्न इन द हेड’ ही मालिका २०१३ साली नवजोतनं सुरू केली तेव्हा अर्थातच त्या गाढवाचं शिल्प प्रथम आलं, तेच हे गाढव. कीटकांचे जीवाश्म असावेत त्यासारखी, प्लास्टर ऑफ पॅरिसची अगदी लहानलहान आकारांची ४५ हून अधिक शिल्पं इथं आहेत, त्या मालिकेचं नाव ‘पॅटर्न्स दॅट कनेक्ट’.

साधं प्लास्टर ऑफ पॅरिस वापरून, त्यावर ठसा घेऊन आणि ते रंगवून जीवाश्माचा परिणाम साधला आहे. तसंच १९७० मधल्या ‘लोगोज’ या कामातही अक्षरांसोबत कीटक दिसतात. कागदावर शाईनं केलेलं आणि ‘कमर्शिअल आर्ट’चा नमुना वाटणारं तेही काम इथं आहे. अशा साऱ्यातून ‘पर्यावरण’ या विषयाशी प्रेक्षकाचं नातं नवजोत यांना जोडायचं आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या मजल्यावर कॅनव्हासवरली तीन मोठी चित्रं दिसतात. ती सारी १९९२ च्या आसपासची आहेत. तोवर नवजोत यांनी आपल्यावरचे ‘एक्स्प्रेशनिस्ट’ प्रभाव दूर केले नव्हते, याचीच साक्ष ही चित्रं देतात. त्यापैकी दोन चित्रांचं शीर्षकच ‘मला आवडणाऱ्या चित्रकारांना आदरांजली’ असं आहे! मात्र ही मोठी चित्रं रंगवून प्रभाव मान्य करून टाकणं हा जणू ‘कन्फेशन’चाकबुली देऊन मोकळं होण्याचाभाग असावा, असं पुढल्या साऱ्या कलाकृतींमधून सिद्ध होत राहातं. ‘पलानीज डॉटर्स’ हे आदिवासी शिल्पांपासून प्रेरणा घेतलेलं शिल्प याच मजल्यावर आहे आणि एक प्रचंड म्हणावं इतकं मोठं व्हिडीओमांडणशिल्पही याच मजल्यावर आहे. ‘लॅक्यूना इन टेस्टिमनी’जाबजबाबांमधले कच्चे दुवेहे त्याचं शीर्षक. पडद्यावर समुद्राच्या लाटा आणि हलत्या दृश्यांच्या काही चौकटी आणि पुढे जमिनीवर या चौकटींसारखेच आरसे, असं या मांडणशिल्पाचं स्वरूप आहे. गुजरात दंगलीनंतर लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न नवजोत यांनी केला, पण लोक अर्धवट माहिती देत होते. नवजोतवरच संशय घेणारेही काहीजण होते. यामुळे जे र्अधमरुध काम झालं, त्यातून दिसणाऱ्या वास्तवाचा ‘समुद्र’ नवजोत यांनी तयार केला. मग सारेच जाबजबाब धूसर झाले आणि मागचा समुद्र, हळूहळू रक्तासारखा लाल होत गेला! हे दृश्य पाहताना कुठेही बीभत्सपणा, हिंसा प्रेक्षकाला जाणवत नाही. संथपणेच आपल्यासमोर जणू रक्ताचा समुद्र पसरतो, तो रक्तपात सहन करून जिवंत राहिलेले लोकही दिसत राहतात. अहमदाबादच्या रूपा मोदी यांचा तरुण मुलगा २००२ साली गुलबर्ग सोसायटीतून जो ‘बेपत्ता’ झाला तो आजतागायत कधी दिसलेला नाही, हे समजल्यावर तीस्ता सेटलवाड यांच्यासह नवजोत यांनी रूपा मोदी यांची मुलाखत घेतली, तीही इथं पाहायलाऐकायला मिळते.

प्रदर्शनाचा दुसरा मजला ‘इतिहास’ मांडणारा आहे. नवजोत यांनी १९६८ सालापासून केलेली चित्रंसुद्धा इथे आहेत आणि सामाजिक चळवळींकडे ओढल्या जाण्यापूर्वी त्यांच्या चित्रांचे विषय कसे गोंधळलेले होते, हेही इथं दिसून येतं. मात्र इथे महत्त्वाचा भाग ठरतो तो, ‘प्रोयोम’ प्रोग्रेसिव्ह यूथ मूव्हमेंटया गटाच्या सदस्य म्हणून नवजोत यांनी केलेली प्रचारचित्रं! आणीबाणीच्या काळातली सरकारी दमनशाही, कामगारांचे अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य अशा अनेक मुद्दय़ांना स्पर्श करणाऱ्या घोषणा, नवजोत यांनी ‘स्क्रीन प्रिंटिंग’च्या तंत्राद्वारे लोकांपुढे मांडल्या होत्या. ‘प्रोयोम’च्याच काळात, गरीबवस्त्यांतील मुलांना चित्रकला शिकवण्याचे प्रयोगही नवजोत यांनी केले होते. रेल्वेसंप, गिरणीसंप, मुंबईच्या केंद्रीय कारागृहात महिला बंदींवर होणारे अत्याचार, यांसारखे विषय त्यांच्या त्या वेळच्या चित्रांमध्ये सहज उतरले होते. लेनिन, व्हिएतनाममध्ये अमेरिकी फौजांशी लढणारे लोक, ‘इंडिया इज अ डेमोक्रसी’ हे तीन तीनदा, दात काढून, ओरडून सांगणारा चेहरा (१९७७ मधलं चित्र) असे विषय आज ‘प्रचारकी’ वाटतील, पण तेव्हा ते कलाकृतींमागच्या वैचारिक दृष्टिकोनाचा भाग म्हणून आले होते.

हा वैचारिक दृष्टिकोन जर फक्त ‘मार्क्‍सवाद’ किंवा ‘साम्यवाद’ एवढाच असता, तर १९८९ सालापासून तो खिळखिळा होत गेलेला आहेच. पण नवजोत यांचं काम तर त्यानंतरच बहरलेलं दिसतं. ‘मार्क्‍सवादा’ची चौकट मोडून पडल्यानंतरही समाजाचा विचार करून त्याचं कलारूप शोधण्याचा प्रयत्न नवजोत यांनी थांबवला नाही, हे त्यामागचं कारण. त्यामुळेच जातीयवादापासून ते पर्यावरणद्रोही धोरणांपर्यंत अनेक बाबींचा निषेध नवजोतच्या कलाकृतींमधून उमटत राहिला, दुसरीकडे व्यक्तिस्वातंत्र्य, लिंगभावसमानता, आदिवासींचे वा निसर्गकेंद्री जीवनशैली जगणाऱ्यांचे हक्क, स्त्रीकेंद्री किंवा आक्रमकतेऐवजी सांभाळ करण्याला महत्त्व देणारी धोरणं, यांचा सकारात्मक उद्घोष नवजोत यांच्या कलाकृती करत राहिल्या. प्रदर्शनाच्या तिसऱ्या मजल्यावरच्या कलाकृतींमधून व्यक्तिस्वातंत्र्यावरचं चिंतन दिसतं, तर अगदी वरच्यापाचव्या मजल्यावरच्या दोन मोठय़ा कलाकृती १९९३ च्या किंवा अन्य जातीय दंगलींनंतर केलेल्या आहेत. यापैकी एका कलाकृतीत २५ हून अधिक दरवाजे दिसतात.. जळालेल्या घरांची आठवण देणारे दरवाजे, त्यांतून फुत्कारणाऱ्या धुरासारखे काळेकुट्ट पाइप बाहेर पडताहेत, एकमेकांत मिसळताहेत. पण हेच मांडणशिल्प आणि निराळय़ा पद्धतीनंही पाहता येईल. जमिनीवरलं पाइपांचं भेंडोळं जसं एकमेकांमध्ये गुंतलं आहे तसेच शहरांतले मानवी व्यवहार असतात, असं! दुसरी कलाकृती म्हणजे दंगलीच्या संहारानंतर तरी उपरती व्हावी, यासाठी मागितलेलं पसायदान आहे. ‘मन्नत के धागे’ जसे एखाद्या जाळीला बांधलेले असतात, त्याप्रमाणे इथं खूप कागदी चिठ्ठय़ा एका मोठय़ा जाळीवर आहेत. प्रेक्षकांनी यावं, चिठ्ठी उघडावी, त्यातला मजकूर वाचून, पुन्हा चिठ्ठी जशीच्या तशी ठेवतानाच चिंतन सुरू करावं आणि तेवढं पुरेसं नाही वाटलं तर आणखी एक चिठ्ठी वाचावी, अशी या कलाकृतीची योजना आहे.

वयाची पर्वा न करता, खमकेपणानं नवजोत काम करत आहेत. केवळ बसून कलाकृती घडवणं नव्हे तर कलाकृतींमध्ये काहीएक शक्ती असावी, यासाठी बस्तरपासून मिरजेपर्यंत कुठेही जाऊन, फिरून, लोकांशी बोलून वास्तव समजून घेणं हे काम आजही त्या करत आहेत. स्त्रीवादाच्या बाबतीत ‘मुक्ती की शक्ती’ हा झगडा विनाकारण निर्माण केला जातो, त्याच्या पलीकडे जाऊन, मुक्ती आणि शक्तीचा शोध नवजोत यांनी वारंवार घेतला आहे. ही शक्ती फक्त स्त्रियांची नव्हे. ती समाजाची सुप्त शक्ती आहे. ‘पोर काल रात्रभर रडत होतं’ हे सांगणाऱ्या आईला जसं एरवी आपलं मूल एवढं रडत नाही हे माहीत असतं, तसं समाजाचं दोषदिग्दर्शन करताना याच समाजात कोणते गुण असू शकतात, हेही नवजोतसारख्या माणसांना माहीत असतं. त्यामुळेच, नवजोत यांचं हे प्रचंड प्रदर्शन काय, किंवा त्यांचं एकंदर सारं काम काय, प्रेक्षकांना शक्तिशोधाच्या प्रतिमाच त्यामधून दिसत राहतात.

((समाप्त))