डॉ. राजन भोसले

आपल्या नवऱ्याच्या वागण्याने दुखावलेल्या कुसुमताई तारतम्य गमावून पुरुषांबद्दलच्या पूर्वग्रहांचा ‘भडिमार’ जुईवर सतत करत असत. आईवर सर्वतोपरी अवलंबून असलेली जुई आईचा प्रत्येक शब्द आत्मसात करत असे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जुईवर सातत्याने झालेले हे संस्कार जुईच्या भावी जीवनावर ओरखडे काढत होते.. लादलेले पूर्वग्रह : किती बाधक, कसे घातक ठरतात त्याचं हे उदाहरण..

मराठी कन्याशाळेत शिकवणाऱ्या कुसुमताई, नवऱ्याशी झालेल्या घटस्फोटानंतर, आपल्या वृद्ध आई व मुलीसह शाळेपासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सोसायटीमध्ये राहत होत्या. कुसुमताईंचे वडील त्या लहान असतानाच वारले. त्यांच्या आईने एकटीनेच त्यांना वाढवलं. कुसुमताईंच्या नवऱ्याने त्यांची मुलगी जुई आठ वर्षांची असताना घटस्फोट मागितला. त्याचं कुणावर तरी प्रेम होतं व विभक्त होताच त्यानं त्या व्यक्तीशी लग्नही केलं. लहान जुई आईबरोबरच राहिली. वडिलांनी कसल्याही प्रकारचा संपर्क त्यानंतर जुईशी ठेवला नाही. आई आणि आजीबरोबर राहतच जुई मोठी झाली.

घटस्फोटाआधी आई-वडिलांमधले गंभीर तणाव, झालेले टोकाचे वाद जुईने जवळून पाहिले होते. ‘वडिलांनी दुसऱ्या स्त्रीसाठी आपल्या आईला व आपल्याला कायमचं सोडलं,’ हे बोचरं सत्य जुईला चांगलं माहिती होतं. आई व आजी यांच्यात याबाबत झालेल्या अनेक पराकोटीच्या चर्चा जुईने ऐकल्या होत्या. त्या दोघींना त्यामुळे झालेला त्रास व अवहेलना तिने जवळून पाहिली होती. ‘आपल्या आईने खूप दु:ख सोसलं आहे; आपण त्यात कसलीही भर टाकायला नको,’ असा विचार करून ‘आपण केवळ आज्ञाधारक असं वर्तन करायचं.’ हेच जणू तिने ठरवलं होतं.

जुई मोठी होत असताना आई आणि आजी या दोघींच्या बोलण्यात काही गोष्टी वारंवार व प्रकर्षांने येत- ‘पुरुषांचा भरवसा नसतो. त्यांची मनं कधीही बदलू शकतात. त्यांच्यापासून दूरच राहावं. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नये. त्यांच्यावर अवलंबून राहणं धोक्याचं.’ कधी-कधी अशी विधानं नकळत व अप्रत्यक्षरीत्या केली जात; तर कधी जुईच्या मनावर बिंबवण्याच्या उद्देशाने निक्षून केली जात.

‘‘मुलांपासून दूर राहा. त्यांच्याशी मत्री करू नये. त्यांच्यात कशाही प्रकारे गुंतू नये. ते आपला गरफायदा घेऊ शकतात,’’ अशी सरसकट विधानं करताना व असे एकांगी संकेत जुईला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष देत असताना त्याचे काही दूरगामी दुष्परिणामही तिच्यावर होऊ शकतील याचा विचार कुसुमताईंनी मात्र फारसा कधी केला नाही. जुई स्वभावाने शांत, थोडी अबोल तर बरीच घाबरट. आई शिकवत असलेल्या कन्याशाळेतच शिकत असल्याने शाळेत दोघी एकत्रच जात-येत असत. मित्र करणं तर दूरच पण मत्रिणी करणंसुद्धा जुईला फारसं कधी जमलं नाही. आई-आजी यांच्यातच रमणं व घरातच राहणं हा तिचा परिपाठ. अभ्यासात जुई हुशार होती व वाढत्या वयाबरोबर तिचं रंग-रूपही आकर्षक होत गेलं. राहणी, पेहेराव साधारण असले तरीही आईसारखाच गोरा रंग, सडपातळ बांधा व रेखीव चेहरा यामुळे ती चटकन् लक्ष वेधून घेत असे.

तिच्याच सोसायटीत जुईला लहानपणापासून ओळखणारा तिचा एक समवयस्क शेजारी युवक विवेक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकत होता. त्याचे आई-वडील दोघेही व्यवसायाने डॉक्टर होते. विवेकला जुई आवडत असे. त्याने तिच्याशी बोलण्याचा किंवा मत्री करण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण लाजरी-बुजरी जुई कधीच त्याला कसलाही प्रतिसाद देत नसे. विवेकशीच नव्हे तर कुठल्याही मुलाशी बोलणं किंवा साधी नजरानजर करणंही ती प्रकर्षांने टाळत असे. तिचं महाविद्यालयही फक्त मुलींचंच असल्याने असे प्रसंगही तिच्या वाटय़ाला कमी येत.

पाहता पाहता विवेक डॉक्टर झाला व जुईनेही आपलं बी.एड. पूर्ण केलं. आपल्याला जुई आवडते हे विवेकने आपल्या आई-वडिलांना सांगताच विवेकच्या आईने जुईच्या आईकडे सहजपणे जुईबद्दल विचारणा केली. विवेकचे आई-वडील दोघे डॉक्टर तर होतेच पण सोसायटीमध्ये सर्व जण त्यांचा आदर करत. विवेकच्या आईकडून सहजपणे जुईसाठी मागणी येताच कुसुमताई थोडय़ा गोंधळल्या. ‘जुईचं लग्न’ या विषयाचा साधा विचारही त्यांच्या मनात अजूनपर्यंत आला नव्हता. विवेक एक गुणी, अभ्यासू व सोज्वळ मुलगा आहे हे त्यांनीही त्याच्या लहानपणापासून पाहिलं होतं. शिवाय त्याच्या आई-वडिलांची समाजातलं स्थान व सर्वानाच त्यांच्याबद्दल वाटणारा आदर लक्षणीय होता. एका चांगल्या डॉक्टर कुटुंबातून जुईसाठी समोरून आलेली ही लग्नाची मागणी कुसुमताईंच्या दृष्टीने अगदीच अनपेक्षित होती. त्याला ‘नाही’ तरी कसं म्हणावं किंवा ‘हो’ तरी कसं म्हणावं हे त्यांना कळेना. स्वत:ला थोडंसं सावरून व आपल्या वृद्ध आईशी सल्ला-मसलत करून त्यांनी जुईपाशी हा विषय काढला. जुईने ‘तुम्ही दोघी म्हणाल तसं’ असं म्हणत निर्णय घेण्याची पूर्ण जबाबदारी आई व आजीवर टाकली. काहीशा गोंधळलेल्या पण सकारात्मक निर्णयापर्यंत कुसुमताई अखेरीस पोहोचल्या.

लग्न पार पडलं. माहेर व सासर एकाच इमारतीत असल्याने एका अर्थी जुईच्या खूप सोईचं होतं. पाहता-पाहता सहा महिने गेले. बाह्य़ांगी सर्वकाही सुरळीत चाललं असतानाच, एके दिवशी अचानक विवेकच्या आई कुसुमताईंना खास भेटायला आल्या. त्यांना जुईबद्दल काही तरी बोलायचं होतं. त्या म्हणाल्या, ‘‘जुई कर्तव्यदक्ष आहे, शांत स्वभावाची, नम्र व आज्ञाधारक आहे, पण..’’ विवेकच्या आई बोलता बोलता थबकल्या. ‘‘..पण एक पत्नी म्हणून विवेकशी कसलेही भावनिक व मानसिक संबंध ती ठेवत नाही. त्याच्याशी गरजेचं व रोजच्या व्यवहाराचं असं ती सर्व बोलते पण नवरा बायको म्हणून जी विशेष जवळीक, आकर्षण व प्रेम असायला हवं ते जराही ती दर्शवत नाही. विवेकच्या सांगण्यावरून त्यांचे शारीरिक संबंधही येतात, पण यंत्रवत. त्यात बरोबरीने सहभाग घेणं, उत्कंठा दाखवणं, उत्कट प्रतिसाद देणं हे ती जरासुद्धा करत नाही. एरवीसुद्धा विवेक पासून अलिप्त राहणं, त्याच्यात कसलीही वेगळी उत्सुकता न दाखवणं.. असं काहीसं ‘रूक्ष’ म्हणता येईल असं तिचं वागणं आहे. आपली सर्व कर्तव्यं ती कसोशीने पार पाडते पण ज्याला प्रेम, प्रणय, पॅशन किंवा रोमान्स म्हणता येईल असं काहीही ती करत नाही. जणू तिच्या व्यक्तिमत्त्वात ते अंगच नसावं असं तिचं वागणं आहे. वाद व भांडण ती अजिबात करत नाही, पण प्रेम व जवळीकीचा लवलेशही तिच्या वागण्या-बोलण्यात दिसत नाही.’’ विवेकच्या आई न थांबता बोलत होत्या. ‘‘तिच्या अशा वागण्यामुळे विवेक उदास दिसतो. लग्न होऊनही त्याला एकटेपणा जाणवतो. आपला यात काय दोष, असंही त्याला सारखं वाटतं. जुईच्या इच्छेविरुद्ध हे लग्न केलं गेलंय का? असं त्याच्या वारंवार मनात येतं.’’

विवेकच्या आईचं सर्व ऐकून घेतल्यानंतर कुसुमताई थोडय़ा त्रासलेल्या सुरात त्यांना म्हणाल्या, ‘‘तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही ठरवा.’’ त्यावर, ‘आम्ही त्या दोघांना समुपदेशनासाठी नेणार आहोत,’ असं विवेकच्या आई कुसुमताईंना म्हणाल्या.

लगेचच एका ज्येष्ठ समुपदेशनतज्ज्ञ डॉक्टरांची भेट ठरवली. या डॉक्टरांनी सगळी केस नीट ऐकून-समजून घेतल्यानंतर जुईच्या आईला खास भेटीसाठी म्हणून वेगळं बोलावलं. त्यांच्याकडून जुईचं लहानपण, आई-वडिलांच्या घटस्फोटावेळची व त्यानंतरची परिस्थिती, जुईसमोर घडलेल्या घटना, जुईला दिलेली शिकवण, अशा अनेक गोष्टींची त्यांनी बारकाईने चौकशी केली. या तमाम माहितीमधून एक स्पष्ट अनुमान समोर आलं, जुईच्या मनात खोलवर स्त्री-पुरुष नात्याबद्दल व विशेषत: पुरुषांबद्दल काही कठोर व मतांध धारणा अगदी संस्कारक्षम अशा वयात पेरल्या व रुजवल्या गेल्या होत्या. त्यातल्या बऱ्याचशा धारणा या आई-वडिलांमध्ये तिच्यादेखत घडलेले टोकाचे वाद, दाहक संघर्ष व त्यानंतर घटस्फोटाच्या रूपाने त्याचा झालेला विपर्यास, आई-आजी मध्ये या विषयांवर झालेल्या असंख्य चर्चा, त्यांनी बांधलेली अनुमानं, घेतलेले निर्णय इत्यादीतून निर्माण झालेल्या होत्या तर इतर अनेक धारणा तिला आवर्जून दिलेल्या शिकवणींमधून रुजवल्या गेल्या होत्या.

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जुईवर सातत्याने झालेले हे संस्कारच जुईच्या भावी जीवनाचा आलेख रचत होते. ‘‘स्त्री-पुरुष नात्यामध्ये अनन्य प्रेम, अतूट विश्वास, वचनबद्धता, वेळप्रसंगी एकमेकांना दिलेली पूरक साथ, सातत्याने दिलेला आधार.. हे मौलिक पलू नक्कीच असू शकतात; व ते असतील तर ते नातं खोलवर समाधान व परिपूर्ण आनंद देणारं असू शकतं. असं नातं आई-वडिलांमध्ये असेल तर सर्वोत्तम. पण जर हे घडू शकलं नसेल व दोघांमध्ये तात्त्विक, गंभीर व मूलभूत असे मतभेद असतील तर निदान मुलांना आपल्या क्लेशांपासून दूर ठेवणं अशक्य नसतं. दु:खाने भारावलेले व क्रोधाने ग्रासलेले स्त्री-पुरुष अनेकदा हे भान गमवून बसतात. या सगळ्याचे भक्ष बनतात त्यांची निष्पाप मुलं. आपण केवळ एकमेकांचे नवरा-बायकोच नव्हे तर मुलांचे आई-बापही आहोत याचं भान त्यांना ठेवता येत नाही. पालकत्व ही एकत्रितपणे पाळावी लागते अशी महत्त्वाची जबाबदारी आहे, हे दोघांनीही सतत ध्यानीमनी ठेवावं लागतं.’’ डॉक्टर समजावत होते. ‘जी मुलं आपण या जगात आणली त्यांच्या सर्वाग संगोपनाची जबाबदारी केवळ आपलीच असते.’ हा सर्वकाळ टिकलेला, सर्व जाती, देश, संस्कृतींमध्ये कसोशीने पाळलेला जुना व सार्थ असा विचार आहे.

जुईची केस क्लिष्ट होती. तिच्यावर झालेले आघात खोल व गंभीर होते. तिने अनेक दु:खं मनाच्या खोल गाभाऱ्यात दाबून टाकली होती. यातून समुपदेशनाच्या मार्गाने वाट काढत असताना त्यात घरातल्या सर्वाचा सहभाग गरजेचा होता. केवळ विवेकच नव्हे तर जुईची आई, आजी, सासू, सासरे या सर्वाना समुपदेशनाच्या या प्रक्रियेत समाविष्ट करून घेणं हे केवळ अगत्याचंच नव्हे तर अपरिहार्य होतं. सुदैवाने विवेक, जुईचे सासू-सासरे, हे स्वत: डॉक्टर असल्याने व स्वभावाने समंजस असल्याने त्यांनी यात पूर्ण सहकार्य दिलं.

कुसुमताईंच्या अंत:करणात स्वत:च्याच न भरलेल्या अशा अनेक दुखऱ्या जुन्या जखमा होत्या. त्यांना जुईच्या समुपदेशन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत असतानाच स्वत:च्या समुपदेशनाचीही तेवढीच गरज होती. ही सर्व प्रक्रिया एखाद्या क्लिष्ट व बिकट शस्त्रक्रियेसारखीच होती. सुदैवाने जुई व विवेक या दोघांवर सर्वाचंच प्रेम होतं. त्यामुळे अनेक महिने चाललेल्या या समुपदेशन प्रक्रियेमध्ये सर्वानी समर्पक साथ दिली व हळूहळू जुईचा कायापालट झाला. एका मोहक, तत्पर व लाघवी अशा पत्नीमध्ये तिचं रूपांतर झालं. ती व विवेकचा जणू पुनर्वविाहच झाला व ती दोघं खऱ्या अर्थाने एकत्र सौख्यभरे नांदू लागले.

कुसुमताईंनीसुद्धा जुनी दु:खं विसरून एका नवीन सकारात्मक विचारशैलीला अंगीकारलं. समुपदेशन करणाऱ्या त्या डॉक्टरांच्या सुचवण्यावरून त्यांच्याच प्रशिक्षण केंद्रात त्या स्वत: समुपदेशनाचं प्रशिक्षण घेऊ लागल्या. समुपदेनशास्त्रात पारंगत होऊन समाजातल्या अनेकानेक कुसुम व जुईंच्या जीवनात प्रेम, सामंजस्य व उल्हास आणण्याचं काम आपण करावं हे नवीन स्वप्न त्यांना आता साकारायचं होतं.

(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे पण गोपनीयतेच्या उद्देशाने नावे व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com