शालिनीच्या कॉलेजमधील मत्रिणी घरी येणार होत्या. शालिनी आईला म्हणाली, ‘आई, आज मत्रिणी येतील, तेव्हा तू जरा नीट रहा आणि नीट वागसुद्धा.’
 ‘म्हणजे कसं?’ मातोश्रींना खटकलंच. ‘उगीच फालतू चौकशा करू नकोस. विचारपूसही अगदी वरवरची कर. फार बोलतेस तू.’
 ‘हो का? येणारच नाही बाहेर. मग झालं?’. शब्द दुरावा निर्माण करतात. पण नीट वागल्याने त्यांचीच प्रतिमा चांगली राहणार असते ना, मग नको सांगायला? ‘जरा नीट वाग.’
मूल पाच-सहा वर्षांचं होईपर्यंत फारसं कळतं नसतं. कसंही वागलं तरी कौतुकच होतं, चिमुरडय़ाच्याही लक्षात येतात आपले लाड. पुढची पाच वष्रे दंगाधोपा, मस्ती करीत भराभर सरकतात. चालायचंच, अशीच त्रास देतात सगळी. बाल्य पुसट होत जातं. ‘समजतं, की नाही समजत’ असा संभ्रमाचा युवाकाळ. ‘मला घरातले कोणी रागवत नाही, हवे ते मिळवायचं कसं ते मला नक्की समजलं.’ इतकी जाण आलेली असते. हेकटपणा शिगेला जातो, खोडय़ांची जात बदलते. घरातले म्हणतात, ‘आत्ताशी कुठे समजायला लागलं, वागेल नीट, म्हणून सोडून दिलं जातं. हा हा म्हणता, तारुण्याची धुंदी चढू पाहते. गद्धेपंचविशीत जोरात धावते गाडी, वेडीवाकडी, भरधाव कुठेही कशीही. स्वभावाचे एकेक पलू घट्ट झालेले जाणवतात. घरातल्यांना खटकलं, तरी कोणी स्पष्टपणे वाच्यता करायला धजतच नाही. सक्तीचं लादणं होतं. आईबाबा आपापसात हळूच म्हणतात, ‘‘किती विचित्र वागतो/वागते. कसं सांगायचं? आधी नाही सांगितलं काही, आता उशीर झाला?  कसा बदलणार आता स्वभाव? जरा नीट वागेल तर शपथ.’
 काहीतरी नक्कीच चुकले एव्हढे खरं. अशी चूक होऊ नये, मुलांवर वाईट वेळ यायला नको म्हणून आईवडील, जवळचे, घरातले सारखे सांगत असतात, ‘जरा नीट वाग’. लहानपणापासून सांगत राहिलं म्हणजे मुलांना त्यात काही तथ्य आहे याची जाण येते. कधीतरी त्यानुसार केलेला प्रयोग शिक्षक बनतो. एखाद्या गोष्टीत निर्णय घेताना आईवडिलांना विश्वासात घेतलं जातं. त्यांच्या मतांचा आदर केला जातो. जबाबदार व्यक्तिमत्त्व असेच घडत जाते. माणूस घडविण्याच्या प्रक्रियेमधील महत्त्वाची पायरी असते, ‘जरा नीट वाग’.
नीट आठवा हे दृश्य. रस्त्यांनी जाता-येता सगळ्यांनी टिपलेले. गळणारा नळ, त्यातून सतत टीप टीप पडणारे पाण्याचे थेंब, खाली एक दगड. एकाच जागी थेंब पडल्याने दगडाला पडत जातो खड्डा. थेंबाऐवजी जर एकदम बादलीभर पाणी दगडावर ओतले तर, लगेच वाहून जाणार, दगड राहणार कोरडा. पाणी पडलं, वाहून गेलं, त्यात काय? अर्थ काय घ्यायचा यातून? एखादी चांगली गोष्ट नियमितपणे सातत्याने केली, बोलली, सांगितली, करवून घेतली, म्हणजे लक्षात राहते. थेंबथेंब पडणाऱ्या पाण्याने दगडाला खड्डा पडला. आपण तर माणूस, हाडामासांचा, भावभावनांचा. मग आपल्यावर परिणाम झाल्याशिवाय थोडेच राहणार? मग नित्यनेमाने केलेल्या संस्कारांची रुजवात होणारच. कोवळ्या वयात मन संस्कारक्षम असताना िशपण केली गेली तर स्वीकार होतो मूल्यांचा आतपर्यंत. घट्ट रुतून बसतात खोलवर. चुकूनमाकून काही वेगळं घडलं तर पटकन मशागत करता येते अशा मनाची. पण, एकदम मोठा झाल्यावर दिलेलं लेक्चर म्हणजे बादलीभर पाणी. पडलं, गेलं वाहून. म्हणून, नको का सावरायला स्वत:ला, आपल्या मुलांना, फक्त आपल्याच नाही तर आजूबाजूच्या सगळ्यांना.
काहीजणांना ‘जरा नीट वाग’ची कॅसेट नको असते. इकडून आदळली, तिकडून गेली बाहेर, विरलीसुद्धा हवेत. एकदा सुरेखा अशीच चिडली आईवर, ‘सारखं काय नीट वाग, नीट वाग. मी वाईट वागते का? किती बडबड सारखी. मला कळतं आता. मोठी झालेय आता मी.’ तरी आई जातेच मध्ये मध्ये. आईच ती. शांतपणे समजावणीच्या सुरात, वेगळ्या धाटणीने म्हणायचे तेच िबबवत राहते. सुरेखाला जाणवते आईची काळजी. तिच्याकडून स्वत:चे वागणे तपासले जाते. मुलांना नुसता जन्म देऊन भागत नाही. योग्य आकार द्यायचा असतो जीवनाला.
सळसळत्या तारुण्यात डोस पचत नाहीत. थोडं अनुभवाचं पारडं जड झाल्यावर आठवतात आईवडिलांचे शब्द. ‘‘ऐकायला हवं होतं मी बाबांचं. नीट सांभाळून घे म्हणाले होते.’’
 ‘जपून गं पोरी, काळजी लागून राहते जिवाला. नीट रहा,’ आईचा ओथंबलेला स्वर, काठोकाठ भरलेले डोळे. आठवलं तरी, कासावीस होतो जीव. एकटेपण खायला उठते. दडपणाखाली जगायला सुरुवात होते. क्वचित आईजवळ मोकळं झाल्यावर बरं वाटतं. तरुणाई पटकन जायला धजावत नाही, कारण त्यांनी ऐकलेलं नसतं. कसं घेतलं जाईल ही साशंकता अडवते. अशा वेळी धाव घ्यावी घरी. इथे घरही उबदार विश्वासाचे हवे. आई-वडिलांची वागणूक पाहून मुलं वागतात. चूक सांगितली, तर तिचा पोत, परिणाम, याचा सारासारविचार होईल, आधार मिळेल, अशी खात्री लागते मुलांना. विचारावं आईबाबांना,
‘‘काय करू आता?’’  
सांगतील, ‘‘आता तरी नीट वाग जरा.’’
कोण कसं वागतं? याची नोंद आजूबाजूचे घेत असतात. टिंगलटवाळी करून धम्माल करण्यात मज्जा चाखायला मिळते टग्यांना. वागण्याचा पाठपुरावा करणारे जवळचे हितचिंतक, नातेवाईक, मित्रमत्रिणी असतात. सांगत राहतात सारखे, ‘नीट वाग जरा. नसेना का व्याख्या ‘नीट’ या शब्दाची, पण शब्दांची पुनरावृती सावरून घेते. प्रत्येकाची परिस्थिती, वेळ, विचार, संस्कार, क्षमता यातून तयार होते नीट वागण्याची चौकट.’  दर वेळी चौकट तोडून धावायचं नसतं. चौकाटीबद्ध असलं तरीही सुखाचं, संस्कारित आयुष्य इथेच घडतं. चौकटीत घडी विस्काटायची शक्यता कमी असते. ‘नीट वागणं’ एखादा नियम किंवा सिद्धांत नाही की अगदी त्यानुसारचं व्हायला हवं सारं काही. हे एक वर्तनाचे मोजमाप आहे. हेच बघा,

‘‘जावईबापू छान आहे हो. नीट समजुतीने वागत बोलत होता सगळ्यांशी.’’ खूप काही करावं लागत  नाही यासाठी. जरा नीट वागल्यावर मिळतात असेही सुंदर रिमार्क्‍स.
हल्ली मात्र या शब्दांचा दुष्काळ जाणवतो. मोठी माणसं विनाकारण मुलांना घाबरतात. फाजील लाड करतात. ‘तापट स्वभावाचा आहे. रागावल्यावर भलतंच काही केलं तर?’ या भीतीपोटी कोणीही कोणालाही काहीही कधीही कशाहीबद्दल काहीच सांगायला धजावत नाहीत. हे सर्वस्वी चूक आहे. सांगताना रागावूनच सांगायला नको. संवाद असला की सहज जमून जातात या गोष्टी. पूर्वी वाडय़ातल्या सगळ्यांच मोठय़ाचा मुलांना आदरयुक्त धाक असायचा. आता, आईवडीलच मुलांना बरंवाईट समजावत नाहीत, तर शेजारच्यांची काय टाप सांगायची.  मुलांच्या मनात पालकांबद्दल भीती असते, तेही चांगले नाही. त्याऐवजी आदरयुक्त धाक असणं निकोप वाढीला आवश्यक असतं. तारतम्य सोडून उधळत जातात बिन लगामी घोडे हेच सुचवतात.  
 कधी कधी पार्टीही बदलते. शालिनीच्या कॉलेजमधील मत्रिणी घरी येणार होत्या. शालिनी आईला म्हणाली,
‘‘आई, आज मत्रिणी येतील, तेव्हा तू जरा नीट रहा आणि नीट वाग सुद्धा.’’
‘‘म्हणजे कसं?’’ मातोश्रींना खटकलंच.
‘‘उगीच फालतू चौकशा करू नकोस. विचारपूसही अगदी वरवरची कर. फार बोलतेस तू.’’
‘‘हो का? येणारच नाही बाहेर. मग झालं?’’
‘‘नुसतं नीट वाग म्हटलं तर असं. म्हणजे आम्ही तुला काही सांगायचं नाही? फक्त मोठय़ांनीच सतत आम्हाला सांगत जायचं, नीट वाग.’’ लहानपणापासून ऐकत आले. ऐकलं नाही तर रागवणं, मारणं, जेवण बंद, बोलणं बंद. किती शिक्षा केल्यात. आठवतात का तरी तुम्हा दोघांना?’’ शालिनी चिडली आणि स्पष्ट बोलली.
आईने रागावायला नको होतं. आईचे चुकलं इथेच. मुलांनी काही सुचवलं तर काय बिघडलं? कॉलेजमध्ये जाणारी समजूतदार मुलगी सांगते. आईने आनंदाने म्हणायला हवं होतं, ‘‘येऊ दे गं सगळ्यांना, मी फार नाही बोलणार, कुणलाही बोअर नाही करणार, काय करू खायला? आणि साडी पण बदलते. ही नकोच, जरा  विटल्यासारखी वाटते. पसारा नाही ना कुठे. आवरून घेते भराभरा.’’ शालिनीला आनंद झाला असता. तिनेच पसारा आवरला असता.
शालिनीच्या मनात होतं, माझी आई माझ्या मित्रमत्रिणींना आवडली पाहिजे. तिला कोणी नावं ठेवलेलं मला खपणार नाही. ती जरा जास्त बोलते इतकंच. प्रेमाने करते सगळ्यांचं. घरीच असते ना म्हणून नोकरी करणाऱ्या बायकांसारखी स्मार्ट नाही. तरी बरं, आता मी आईला एकेक सांगते, शिकवते आणि आई ऐकते माझं. तिलाही आवडतं नवीननवीन शिकायला. परवा, आईला  लॅपटॉपवर पेपर कसा वाचायचा ते दाखवलं. किती खूष झाली. वाटलं, मी आधीच तिला या गोष्टी सांगायला हव्या होत्या. माझं चुकलंच. आता नाही असं होणार माझ्याकडून. आईला बदलेन, एकदम मॉर्डन करणार. किती छान वाटेल आईला. म्हणून तर सांगितलं. ‘‘आई, जरा नीट वाग.’’