सुकेशा सातवळेकर

यकृताच्या कामकाजात काही अडचणी आल्या तर तब्येतीवर खूप खोलवर परिणाम होतो. यकृताची काळजी आपण घेतली, तर तेसुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घेतं. यकृताचे आजार टाळायचे किंवा आटोक्यात ठेवायचे असतील तर कायम योग्य वजन सांभाळणं आणि नियमित हालचाल, व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे.

मानवी शरीरातील अतिशय महत्त्वाचा अंतर्गत अवयव म्हणजे, यकृत. आपल्या छातीच्या उजव्या बरगडय़ांखाली असलेलं  साधारणपणे १५०० ग्रॅम वजनाचं यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. स्वादुपिंड आणि यकृत, पचनसंस्था आणि चयापचयाच्या कार्यासाठी अत्यावश्यक योगदान देतात.

पण लक्षात घ्या, काही अपरिहार्य कारणाने शरीरातून स्वादुपिंड काढून टाकायची वेळ आली तरी शरीर, परिस्थितीशी जुळवून घेतं, मात्र यकृताशिवाय माणूस जगू शकत नाही. चयापचय संस्थेतील बहुतेक सर्व घडामोडींमध्ये यकृताचा महत्त्वाचा सहभाग असतो. शरीरांतर्गत पाचशेहून अधिक महत्त्वाची कामं यकृत पार पाडतं. आपण खातपीत असलेल्या सर्व अन्नपदार्थावर प्रक्रिया करून; त्यांच्यापासून अत्यावश्यक अन्नघटक तसंच ऊर्जा तयार करण्याचं काम यकृत अव्याहतपणे करत असतं.

यकृताचं सर्वात महत्त्वाचं काम असतं; कबरेदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थाचं चयापचय. जीवनसत्त्वं आणि खनिजांची साठवणूक करणं आणि त्यांना कार्यरत करून शरीरात सर्वत्र पोचवण्याचं कामही यकृत करतं. यकृत, ‘फिल्टर’ म्हणून काम करतं; रक्तात जर घातक असे जीवाणू आणि टॉकीन्स (विषारी पदार्थ) असतील तर ते काढून टाकले जातात. शरीराला घातक काही घटकपदार्थ, अल्कोहोल, अमली पदार्थाच्या ‘डीटॉक्सिफिकेशन’ची जबाबदारी यकृत पार पाडतं.

अतिशय महत्त्वपूर्ण अशा यकृताच्या कामकाजात काही अडचणी आल्या तर तब्येतीवर खूप खोलवर परिणाम होतो. यकृताची काळजी आपण घेतली, तर तेसुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घेतं. शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झालंय, की आहारातील अत्यावश्यक अन्नघटकांच्या कमतरतेचा थेट परिणाम यकृताच्या कार्यावर होतो. तसंच कुपोषणामुळे; घातक द्रव्यं आणि जंतुसंसर्गाच्या यकृतावर होणाऱ्या दुष्परिणामांचं प्रमाण वाढतं. अनारोग्यकारक असे तळलेले, तेलकट, तुपकट पदार्थ अति प्रमाणात खाणं, नको इतक्या प्रमाणात मीठ आहारात असणं म्हणजे तुमच्या यकृतावर अक्षरश: हल्ला करण्यासारखंच आहे. फास्ट फूड किंवा जंक फूडमधील अति प्रमाणातील फॅट्स, रासायनिक पदार्थ, साखर, मीठ यांच्यामुळे यकृतावरचा ताण वाढतो.

यकृताचे आजार टाळायचे किंवा आटोक्यात ठेवायचे असतील तर कायम योग्य वजन सांभाळणं आणि नियमित हालचाल, व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. अख्खी धान्यं, कडधान्यं, डाळी, मांसाहार, भाज्या, फळं, दूध, तेलबिया आणि तेल असे अत्यावश्यक अन्नघटक पुरवणारे सर्व पदार्थ, योग्य प्रमाणात असणारा संतुलित आहार घ्यायला हवा. पालेभाज्या, शेंगांच्या, शिरांच्या, सॅलडच्या भाज्या, फळं, सालीसकट डाळी आणि कडधान्यं असे चघळचोथायुक्त पदार्थ; यकृताचं कामकाज सुरळीत पार पडायला मदत करतात. पाणी भरपूर प्यायला हवं, त्यामुळे शुष्कता होत नाही आणि यकृताच्या कार्याला मदत होते.

परवा एक मत्रीण म्हणाली,‘‘अगं, यांची तब्येत बिघडलीय, डॉक्टर काहीतरी ‘हेपॅटायटीस ए’ झालाय म्हणाले. आम्ही एवढी काळजी घेतो, बाहेरचे पदार्थ शक्यतो खात नाही, यांना कसलं व्यसनही नाही, तरी कसा झाला असावा? ’’ तिच्याकडे व्यवस्थित चौकशी केल्यावर कळलं, मत्रिणीच्या यजमानांना ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, १५ दिवसांपूर्वीच कुठल्याशा देवस्थानाला २ दिवसांसाठी गेलं होतं कुटुंब. उत्सव असल्यामुळे खूप गर्दी होती तिथे. मत्रिणीच्या ‘अहोंच्या’ आजाराचं उगमस्थान लक्षात आलं.

हेपॅटायटीस म्हणजे विषाणूजन्य संसर्गामुळे यकृताला झालेलं इन्फ्लेमेशन किंवा सूज, दाह. शास्त्रज्ञांनी हेपॅटायटीसला कारणीभूत ५ प्रकारचे विषाणू शोधून काढले आहेत. यांतील ‘ए’ आणि ‘ई’ हे दोन विषाणू पसरण्याचं कारण ठरतं; ते असं अन्न किंवा पाणी, जे आधी संसर्ग झालेल्या रोग्याच्या विष्ठेमुळे दूषित झालंय. या दोन्ही प्रकारच्या आजारांवर शरीर थोडय़ाच काळात ताबा मिळवतं आणि विषाणूंचा नायनाट होतो. हेपॅटायटीस ‘बी’, ‘सी’, ‘डी’ यांचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्ताशी संपर्क आला तर हे विषाणू प्रसारित होतात. हेपॅटायटीस ‘बी’ आणि ‘डी’ संसर्गजन्य व्यक्तीच्या इतर शरीरद्रव्यांवाटेही पसरतात.

या तिन्ही प्रकारच्या आजारांवर वेळीच उपचार झाले नाहीत तर गुंतागुंत वाढून, यकृताचा सिऱ्हॉसिस होऊ शकतो. काही गंभीर रुग्णांमध्ये यकृत पूर्णपणे निकामी होऊ शकतं किंवा यकृताच्या कर्करोगाची शक्यता असते. लवकर निदान होऊन, वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार झाले तर गुंतागुंतीची शक्यता कमी होते. लहानपणीच हेपॅटायटीस ‘ए’ आणि ‘बी’ची लस, डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरावीक कालावधीत घ्यायला हवी. लहानपणी लस घ्यायची राहिली असेल तर मोठेपणी अवश्य घ्यावी. हेपॅटायटीस झालाय हे काही लक्षणांवरून ठरवता येतं. गडद पिवळ्या रंगाची लघवी, जुलाब, थकवा, ताप, खाण्यापिण्याची अनिच्छा, भूक नाहीशी होणं, करडय़ा रंगाची विष्ठा, सांधेदुखी अशी लक्षणं दिसतात. काही जणांना पोटदुखी आणि उलटय़ांचा त्रास होतो. काही जणांमध्ये काविळीची लक्षणं; म्हणजे डोळे आणि त्वचेचा रंग पिवळसर दिसतो. हेपॅटायटीसच्या उपचारांमध्ये पहिला महत्त्वाचा टप्पा असतो लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी पुरेशी विश्रांती, भरपूर प्रमाणात पाणी, इतर आरोग्यदायी पेय-पदार्थाचं सेवन आणि स्वास्थ्यपूर्ण, संतुलित आहार.

यकृताला होणारं नुकसान कमी करण्यासाठी, आरोग्यपूर्ण जीवनशैली जपायला हवी. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देऊन, यकृताची निगा राखायला हवी. काविळीमध्ये बरेचदा भूक मंदावते आणि खाण्याची इच्छा नसते, त्यामुळे एका वेळी बसून खाणं जात नाही; त्याऐवजी दिवसभरात थोडय़ा-थोडय़ा वेळाने थोडं-थोडं खावं.

हेपॅटायटीससाठी खास वेगळा असा आहार घेण्याची गरज नसते; फक्त अन्नघटकांतील संतुलन योग्य साधायला हवं. त्यासाठी भरपूर प्रमाणात भाज्या, फळं, आख्खी धान्यं, मिलेट्स खायला हवी. प्रथिनांसाठी, डाळी, मोडाची कडधान्यं, कमी स्निग्धांश असलेलं दूध आणि दुधाचे पदार्थ, मासे, चरबीविरहित चिकन, अंडय़ाचा पांढरा भाग, घेता येईल. आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ म्हणजे, तेलबिया, नट्स आणि ‘मुफा’ (मोनोसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स) स्निग्धाम्ल देणारी तेलं, (शेंगदाणा, राईसब्रान, मोहरी आणि ऑलिव्ह) वापरावीत.

चौरस आहार घ्यायला हवा. जेवणाच्या ताटामधील एक-चतुर्थाश भाग चघळचोथायुक्त कबरेदके म्हणजे अख्खी धान्यं असतील हे पाहावं. एक-चतुर्थाश भाग प्रथिने देणारे पदार्थ असतील आणि ताटाचा निम्मा भाग भाज्या, सॅलडच्या भाज्या आणि फळांनी भरलेला असेल. लक्षात ठेवा, नित्कृष्ट आहारामुळे यकृताचं अतोनात नुकसान होतं.

अशा प्रकारच्या रुग्णांच्या आहारातून बरेचदा गैरसमजामुळे तेल, तूप वर्ज्य केलं जातं. ‘यकृतावर त्यांचा अपायकारक परिणाम होतो.’ असा सर्वसाधारण गैरसमज रूढ आहे. पण स्निग्ध पदार्थ वर्ज्य करण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. खरं तर, या सुमारास होणारी वजनघट टाळण्यासाठी आणि तब्येतीत लवकर सुधारणा होण्यासाठी माफक प्रमाणात स्निग्ध पदार्थाचा वापर करावा लागतो. तेल-तुपामुळे पदार्थाची चव सुधारते आणि खाणंपिणं अपेक्षित प्रमाणात घेतलं जातं.

तेलातुपाचं खूप जास्त प्रमाण मात्र अपायकारक असतं, त्यामुळे यकृतातील चरबी वाढते आणि त्यामुळे हेपॅटायटीसच्या विषाणूंविरुद्ध वापरलेल्या औषधांची परिणामकारकता बदलते. तळलेले, तेलकट, तुपकट पदार्थ, बेकरीतले पदार्थ, खूप जास्त साखरेचा वापर, तसंच संपृक्त मेदाम्लं, ट्रान्स फॅट्स-पाम तेल, डालडा, मार्गारीन मात्र टाळायला हवं.

यकृताचे आजार टाळण्यासाठी आणि असलेला आजार पसरू नये म्हणून काही महत्त्वाच्या सवयी जपायला हव्यात. काहीही खाण्या-पिण्याच्या आधी आणि नंतर, तसंच अन्नपदार्थ हाताळण्याआधी आणि नंतर साबण व कोमट पाण्याने, हात किमान १५-३० सेकंद चोळून-चोळून स्वच्छ धुवावेत. रुग्णाला रक्त किंवा रक्तघटक देण्याआधी त्यांची चाचणी करून, संसर्ग झाला नसण्याची खात्री केलेली असावी.

फळं, भाज्या, मांसाहारी पदार्थावर अपायकारक सूक्ष्मजंतू असू शकतात. ते काढून टाकण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक मेडीक्लोर एम किंवा व्हिनेगर किंवा मीठ घातलेल्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. प्रक्रियायुक्त, पॅकबंद, रासायनिक घटक मिसळलेले पदार्थ, टाळायला हवेत. विकतचे, तयार पॅकबंद फळांचे रस पिऊ नयेत.

घराबाहेर खाण्याची वेळ आली, तर तुमच्यासमोर तयार केलेले, ताजे, गरम पदार्थच खावेत. मिठाचा वापर मर्यादितच करावा. अति प्रमाणात मीठ वापरलेले पदार्थ खाऊ नयेत. मद्यपान करू नये, अल्कोहोलयुक्त पेयं टाळायला हवीत; अल्कोहोलमुळे यकृताची अपरिमित हानी होते. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतीही पूरके, विशेषत: लोह, ‘अ’, ‘क’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वं घेऊ नयेत, अगदी ‘हर्बल’सुद्धा नकोत. अतिरेकी प्रमाणातील पूरकांमुळे यकृताला हानी पोचू शकते.

यकृताच्या आजारात गुंतागुंत तयार झाली असेल तर खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा रुग्णाचा आहार, प्रशिक्षित आणि अनुभवी आहारतज्ञ, वैद्यकीय टीमच्या मदतीने ठरवतात आणि तब्येतीतील चढउतारांनुसार आहारात बदल सुचवले जातात. अशा वेळी यकृताच्या जपणुकीसाठी व्यक्तिगत आहार आणि मार्गदर्शन घेणं खूपच महत्त्वाचं असतं.

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com