गीता सोनी संध्याकाळी ओमची आई न्यायला आली तेव्हा झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी तिची तीनतीनदा क्षमा मागितली. पण घटना तर घडून गेली होती आता ती माऊली तरी काय बोलणार होती..? या अपघाताला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत या जाणिवेने गेले दोन दिवस काकू पार खचून गेल्या होत्या. पहाटेचे पाच वाजले, आणि नीलाकाकूंच्या मोबाईलने रोजच्या सवयीने गजर वाजवला. काकूही रोजच्या शिरस्त्याप्रमाणे उठून बसल्या अगदी तत्काळ, कारण जागं व्हायला आज त्या झोपल्या होत्या कुठं? दिवसभराच्या दगदगीने थकलेल्या शरीराने उसंत घेतली होती पण तेव्हाही मेंदू काम करतच होता बहुतेक. बंद पेटीचं झाकण खटकन उघडावे तसे अपरात्री के व्हातरी त्यांचे डोळे अचानक उघडले, आणि पाण्याच्या तळाशी असलेलं काही उसळी मारून वर यावं तशी तीच ती अपराधाची बोचणी पुन्हा सुरू झाली.. काकूंनी बसल्या जागीच संपूर्ण घरावर नजर फिरवली, इनमिनतीन खोल्यांचं घर फिरून, त्यांची नजर भिंतीवरल्या नवऱ्याच्या फोटोवर खिळली. चाळीस वर्ष झाली, लग्न करून या घरात आलो त्याला, वयाच्या ऐन पस्तिशीत विधवा झालो आणि मूलबाळ होण्याची उरलीसुरली आशाही संपली. माहेरसासरचं कोणी नाही, गाठीशी थोडंफार सेव्हिंग आणि डोक्यावर हे छप्पर एव्हढाच काय तो आधार, खरंतर लहान मुलं आपल्याला कोण आवडायची, त्यांच्यात आपण रमायचो अगदी. स्वतची नसली म्हणून काय झालं, शेजारी पाजारी, नात्यांतली.. त्या निरागस जीवात आपण गुंतून जायचो नुसत्या, शेवटी हीच आवड कामाला आली, खालच्या मजल्या वरल्या अनु आणि सपूची आई, जुळ्या मुलांना सांभाळत नोकरी करताना पार रडकुंडीला यायची, तिला मदत म्हणून खरंतर आपण ती जुळी तान्ही बाळं सांभाळायचं काम हातात घेतलं, ते एव्हढेसे तान्हे जीव सांभाळायचे म्हणजे सोपं का होतं? डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवायला लागायचं, त्यांची दुखणी, खुपणी, त्यांचं दूध, जेवण, त्यांची आपापसातली भांडणं, मारामाऱ्या. आजारपण सगळं आपण मायेनं निस्तरलं, त्यांच्या आईलासुद्धा आपला किती आधार वाटायचा, त्यानंतर आजूबाजूच्या ओळखीच्या नोकरी करणाऱ्या बायका, त्यांच्या माहितीतल्या नोकरीवर जाणाऱ्या, अशांची कितीतरी रांगती मुलं या आपल्याच घरात लहानाची मोठी झाली. ‘नीलाकाकूंचं पाळणाघर’ असं लोकांनीच आपल्या घराचं बारसं करून टाकलं. सुरुवातीला खूप दडपण यायचं, अशी लहान लहान मुलं सांभाळताना, तेही त्यांचे आईवडील जवळपास नसताना, ही मुलं म्हणजे खूप मोठी जोखीम वाटायची. शिवाय आपण घरात एकटय़ाच म्हणजे घरातली कामं, घराबाहेरची कामं, दिवसभर मुलांची जेवणं. जीव पार थकून जायचा, शेजारपाजाऱ्यांच्या मदतीने दिवस निभावले, घरखर्चही भागवून पैसे शिल्लक रहातील एव्हढी कमाई होत होती, नाहीतरी आपल्याजवळ पुरेसं शिक्षण नव्हतं, नोकरी तरी कोण देणार होतं. दूधवाल्याने दारावरची बेल वाजवली तसं काकू भानावर आल्या. लगबगीने दूध घेऊन आत आल्या. सवयीने पातेल्यात दूध ओतून तापवायला ठेवलं. एकीकडे चहाचं आधण ठेवलं आणि भाजी चिरायला घेतली. एका जागी स्थिर उभं राहिल्यावर पुन्हा तीच अपराधी जाणीव त्यांचं मन कुरतडू लागली.. छे! इतकी वर्ष झाली. मुलांना सांभाळताना इतकीशीसुद्धा कसूर केली नाही कधी, की कधी रागाने हात उगारला नाही. त्यांच्या अंगावर ओरखडासुद्धा उठू नये म्हणून जिवापाड जपलं. काल ओमच्या बाबतीतच असं दुर्लक्ष कसं झालं आपल्या हातून..? स्वत:चाच राग आला काकूंना.. समोरच्या उकळणाऱ्या दुधाकडे पाहताना, दोन दिवसांपूर्वीचे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर आलं. कलत्या दुपारची वेळ, हॉलमधल्या पलंगावर दोन वर्षांचा ओम गाढ झोपला होता. शेजारी झोपलेल्या काकू उठल्या तशी त्याची झोपेतच चुळबुळ सुरू झाली होती, कोणत्याही क्षणी ओम जागा होईल आणि दुधासाठी भोकाड पसरेल म्हणून काकूंनी दूध तापवायला ठेवलं होतं. दुधाखालचा गॅस बंद करायला म्हणून काकू स्वयंपाकघरात शिरल्या आणि नेमक्या त्याच क्षणाला अर्धवट झोपेत असलेला ओम लोळत पलंगावरून धाडकन जमिनीवर आपटला. काकू धावत बाहेर आल्या पण तोपर्यंत ओम जोरजोरात रडत होता. त्याच्या कपाळाला मार लागला होता. काकू तर पार भेदरूनच गेल्या. शेजारच्या रेखाताई आल्या आणि दोघींनी मिळून ओमला शांत केलं. औषध लावलं. पण लागलं त्या जागी चांगलं लिंबाएवढं टेंगुळ आलं होतं. संध्याकाळी ओमची आई न्यायला आली तेव्हा झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी तिची तीनतीनदा क्षमा मागितली. पण अपघात तर घडून गेला होता आता ती माऊली तरी काय बोलणार होती? या अपघाताला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत या जाणिवेने गेले दोन दिवस काकू पार खचून गेल्या होत्या. ‘पोटचं पोर परक्या बाईच्या जीवावर किती विश्वासाने हे आईबाप सोडून जातात.. अक्षरश: काळजाच्या तुकडय़ाला आपल्या हवाली करून जातात. आणि आपण मात्र त्या विश्वासाला नाही जागलो.. आता काय होईल? आपल्या हलगर्जीपणामुळे, ओम आता आपल्याकडे येणारच नाही का? खरंच असं झालं तर..?’ कल्पनेनेच काकूंच्या घशात हुंदका दाटून आला. एव्हाना आंघोळ आटपून काकू देवपूजेच्या तयारीला लागल्या होत्या खऱ्या पण त्याचं लक्ष कोणत्याच कामात लागत नव्हतं. डोक्यात विचारांचं थैमान सुरू होतं, ‘नक्की आपल्याला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतंय? ओम नाहीच आला तर आपली मिळकत कमी होईल त्याचं? नाही नाही, केवळ पशांसाठी आपण मुलं थोडीच सांभाळतो? या निरागस जीवांमुळे तर जगायला काहीतरी निमित्त मिळालंय, नाहीतर अशा एकाकी आयुष्याला काय अर्थ होता? अवघा ४ महिन्यांचा होता ओम. त्याची आजी अचानक गेली आणि एकटय़ा आजोबांना तो सांभाळता आला नसता. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या भरोशावर ओमच्या आईची नोकरी सुरू आहे. सुरुवातीला इतकं तान्हं बाळ सोडून जाताना बिचारीचा पाय निघत नसे. डोळ्याचं पाणी थांबत नसे. आपणच तिला धीर दिला आणि हळूहळू तिलाही सवय झाली. शिवाय गेल्या दीड वर्षांत आपल्यालाही ओमचा लळा लागला. मग परवा असं दुर्लक्ष कसं झालं आपल्याकडून? इतक्या वर्षांच्या मेहनतीने मिळवलेल्या विश्वासाला या एका चुकीने तडा गेला. हे असं व्हायला नको होतं. कालचा अख्खा दिवस ओमची वाट पाहिली आपण, पण आलाच नाही तो.. काकूंच्या मनाची घालमेल सुरू होती, इतक्यात दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला तर दारात ओमचे आजोबा. ‘हे काय आजोबा, एकटेच? ओम नाही? हातात त्याची नेहमीची बास्केटही नाही? आता काय सांगतील आजोबा?’ सगळे प्रश्न मनात घेऊन काकू आजोबांकडे पहातच राहिल्या. ‘‘काय म्हणताय काकू? सगळं ठीक आहे ना?’’ काकूंच्या धास्तावलेल्या चेहऱ्याकडे पहात आजोबांनी विचारले. ‘‘ओम? नाही आला? काल का नाही आला तो?’’ काकूंच्या तोंडून कसाबसा प्रश्न बाहेर पडला. ‘‘अहो हा काय आलाय ना!’’ आजोबा मोठय़ाने हसून म्हणाले. एव्हाना त्यांच्यामागे एक तरुण स्त्री कडेवर ओमला घेऊन उभी राहिली. ‘‘ही माझी भाची आली होती घरी तिच्याच जवळ होता ओम कालचा दिवस म्हणून नाही आला. आजसुद्धा थोडा उशीरच झाला, नाही?’’ काकूंना क्षणभर खरंच वाटेना. ‘‘आजोबा, परवा दिवशी माझ्याकडून चूक झाली हो, आणि ओमला लागलं. पण पुन्हा..’’ काकूंना मध्येच थांबवत आजोबा हसून म्हणाले, ‘‘अहो, काय हे काकू, छोटासा अपघात होता तो. गेली दीड वर्ष आम्ही पाहतोय ना, किती निगुतीने करता तुम्ही ओमचं.. अशा चुका तर आमच्याकडूनही होऊ शकतात. किती जिवाला लावून घेता ही गोष्ट? तुम्ही दुकानात पाटी लावलेली पाहिलीय की नाही, ‘चूकभूल द्यावी घ्यावी.’ तशी पाटी तुम्ही पण लावून टाका बरं! अहो, तुम्हीसुद्धा माणूस आहात. मशीन थोडीच आहात? उलट तुमच्याकडे यायचं म्हणून केवढा खूश होता ओम आज! आता बोला’’ प्रसन्न हसत आजोबा म्हणाले. आजोबांच्या बोलण्याने शंका-कुशंकांचं मळभ विरून काकूंचं मन एव्हाना अगदी स्वच्छ झालं होतं. पण समोर ओमचा निर्व्याज हसरा चेहरा पाहून आनंदाच्या भरात डोळे मात्र गढूळले होते..! geetadsoni1971@gmail.com chaturang@expressindia.com