डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

नातेसंबंध हा नेहमीच गुंतागुंतीचा विषय राहिलेला आहे, अनेक नात्यात फक्त प्रश्नच प्रश्न आहेत, कारण वृत्ती तितक्या प्रवृत्ती. बदलतं तंत्रज्ञान असो की आलेलं आत्मभान, बदललेले प्राधान्यक्रम, पिढय़ांमधले वाढत चाललेले अंतर, बदलत जाणारी मूल्यव्यवस्था, भावनांची बदलती समीकरणे अशा अनेक ‘बदलत्या’ कारणांनी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आहे. पण नात्यांशिवाय जगणंही शक्य नाही मग या नात्यांमध्ये एकोपा कसा आणता येईल, हे सांगणारे हे सदर दर पंधरवडय़ाने.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

ऊर्जिता कुलकर्णी या मानसोपचार व लैंगिक समस्या यामध्ये होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत. क्यूसीआय योगोपचार (शासनमान्य) त्या करतात. या क्षेत्रात २००५ पासून त्या कार्यरत आहेत. २०१७ मध्ये या क्षेत्रात काम करण्यासाठी सुपर-वुमन पुरस्कार, २०१८ मध्ये ‘पुला’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर, ‘पालकत्व’ या संदर्भातील लेखमालिकेला सर्वोत्तम सदराचा पुरस्कार मिळाला आहे.   ऊर्जिता या कथा, कविता, स्फुटलेखनही करत असून ‘ता.क.’ ही त्यांची पहिली लघुकादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.

नाती, आणि त्यांच्या आजूबाजूला असणारी गुंतागुंत ही कोणालाही न चुकलेली बाब. या विषयावर झालेला ऊहापोहदेखील प्रचंड, अमाप! तरीही, रोज नव्याने येणारी आव्हाने आहेतच. त्यात काही नाती, तग धरून उभी राहतात, टिकतात, तर काही माना टाकून मोकळी होतात. नातेसंबंधांवर सदर चालू करूया, असा विचार झाला, तेव्हा हाच पहिला विचार डोकावला. तिथेच हेही लक्षात आले, की, त्यांच्या सभोवती फिरत राहणाऱ्या विषयांवर चर्चा करण्याऐवजी, मूलभूत म्हणवणाऱ्या प्रश्नांवर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. शिवाय शक्य तितकी त्यांची, सर्वसमावेशक उत्तरे देणंसुद्धा!

नात्यांची व्याख्याच सरसकट बदलत आहे. अर्थात ते गरजेचेही आहे. त्यांना असणारे नवीन कंगोरे नेमके कुठले? त्यामागची कारणे काय असू शकतील? बदलत्या प्रवाहाबरोबर हे समजूनच नाही घेतले, आणि काही बाबी प्रमाण मानून आपण बदल न करता, न घडवता तसेच राहिलो तर कदाचित आपण पूर्वग्रहदूषित म्हणून एकाच टोकावरून विचार करतोय असं होऊ शकेल का? तसे असेल तर त्याला उपाय काय? हेच या सदरात आपण बघणार आहोत.

सध्या अगदी सगळ्याच स्तरावर व्यापून उरलेला एक विषय म्हणजे, तंत्रज्ञान. त्याचे वाढत जाणारे जाळे. त्यातून तयार झालेली नवीन माध्यमे. आणि या माध्यमांच्या; नात्यांवर खोलवर होणाऱ्या परिणामांच्या बेरीज-वजाबाकीचे गणित! यामध्ये सध्या दिसणारे ठळक प्रश्न तर आहेतच, पण त्याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो? पण म्हणून त्यांना खलनायकी भूमिकेतच ठेवणे कितपत योग्य? मुळात हे असेच आहे की या मागे अजून काही आहे?

नातेसंबंध म्हटल्यावर अगदी पटकन डोक्यात येणारी गोष्ट म्हणजे, त्यात असणारे प्राधान्य. ते व्यक्ती, घटना, वस्तू, गोष्टी या साऱ्याच बाबत! तिथे अगदी सहज गल्लत होतेय का? किंवा काही वेळा ते जास्त ठळकपणे माहीत असणं धोकादायक आहे? त्याला नेमके किती महत्त्व असावे? याचा सखोल विचार झालाय की केवळ वरवरचे दिसणारे धागे पकडले गेलेत?

अशीच एक महत्त्वाची बाब म्हणजे आयुष्यात असणारी ध्येये. ती ठरवताना काही गोंधळ होतोय का? ध्येयांच्या नावाखाली स्वत:चीच दिशाभूल केली जातेय का? आपण, आपला जोडीदार, आपल्या आजुबाजूच्या संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती, जसे मुले, आई-वडील, इतर मित्रमंडळी यांना ती कितपत ठाऊक आहेत? त्याविषयी जर तफावत असेल, तर ते मान्य केलं जातंय की सहन केलं जातंय? इथे समजूतदारपणाने काही उत्तरे नक्कीच देता येतील, ती कोणती? जगताना ठेवलं जाणारं आत्मभान आपण जपतोय का? आत्मभान म्हणजे नेमके काय? त्याची गरज का आहे? ते योग्य असेल, तर नातेसंबंध सुरळीतच राहतात की तरीही त्यात काही, अडथळे येऊ शकतात? आलेच तर त्यांच्याकडे काय पद्धतीने पहावे?

नात्यांमध्ये असणारी, केली जाणारी तुलना हादेखील महत्त्वाचा भाग आहे. तुलना करण्याची मानसिकता नेमकी कशी जन्म घेते? ती कशा पद्धतीने मारक ठरू शकते? इथे व्यक्ती, त्याला असणारे महत्त्व बदलते का? नीतिमूल्ये, जीवनमूल्ये; प्रत्येकाबाबत वेगवेगळी असू शकतात. बदलणारी नीतिमूल्ये याने नात्यांमधील तणाव वाढतोय, की त्यांच्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन प्राप्त होतोय? आपण या बदलांसाठी कितपत तयार आहोत? किंवा असे म्हणू या की त्याची गरज का आहे?

अगदी रोज कळत-नकळत परिणाम करणारी बाब म्हणजे, दिली-घेतली जाणारी प्रतिक्रिया. त्यांचे सखोल परिणाम होतात, तेव्हा नाती का बदलतात? केवळ प्रतिक्रिया इतकंच नात्याचं स्वरूप बऱ्याचदा दिसतं असे का? एखाद्या व्यक्तीच्या प्रतिक्रिये भोवती, आपले नाते बांधून ठेवणे, जग बांधून ठेवणे कितपत योग्य?

नाते म्हणजे, एखाद्या व्यक्तीशी, वस्तूशी, असणारा अर्थपूर्ण संबंध! त्यातील ‘अर्थ’ निघून जाऊन, केवळ नावापुरते संबंध उरतात. हे कोणत्याही नात्यात दिसू शकते. असे का? त्यातील जिवंतपणा टिकवण्यासाठी आपण नेमके काय प्रयत्न करतो? ते आपल्याला योग्य वाटतात तसे करतो, की नात्यासाठी आवश्यक आहेत म्हणून करतो? त्यासाठी किती वेळ कळ सोसण्याची आपली तयारी असते? अपेक्षांचे ओझे वाहत असताना, स्वत:चा विचार संपूर्णपणे मागे पडतोय का? असे होण्यासाठी आपण स्वत:च कसे कारणीभूत आहोत? काही नियम म्हणून किंवा मनाची स्वयंशिस्त म्हणून स्वत:त बदल करणे गरजेचे असते. ते आपण करतोय का? याच्या अगदी विरुद्ध म्हणजे, आपण आत्मकेंद्री आयुष्य जगत, इतरांना केवळ गृहीत धरत आहोत, असं होतंय का? त्या आत्मकेंद्री परिघात आपण स्वार्थीपणे केवळ स्वत:चा विचार करत असताना इतरांच्या भावनांची पायमल्ली होतेय हे विसरून जातो. तिथे काय करणे गरजेचे आहे?

आपल्याला असणाऱ्या भाव-भावना, विचारांचे जाळे खूप विस्तीर्ण, गुंतागुंतीचे आहे. ते काही क्षणात, वर्षांत आपल्याला समजावे असा विचार म्हणजे केवळ भ्रम. यातील काही भावना आपण सातत्याने अनुभवतो, जसे आनंद, दु:ख, प्रेम, विषाद इत्यादी! या कधी कधी स्वत:शी निगडित असतात, तर कधी कधी आजूबाजूची परिस्थिती, माणसे यावर. याबाबत महत्त्वाचा असणारा नियम म्हणजे आपण स्वत: सोबत किती मोकळेपणाने स्वत:ला स्वीकारण्याची तयारी ठेवतो हा! त्याचबरोबर, या भावना व्यक्त करण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपल्याला समाज या घटकाची गरज आहेच. त्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय का? किंवा स्वत:च्या भावनांना हाताशी धरून, आपण त्यातून बाहेर पडू इच्छित नाही का? असे असल्यास याची कारणे, आणि उत्तरे काय असावीत?

स्वैराचार आणि स्वातंत्र्य या दोन अतिशय जवळ जाणाऱ्या पण मधोमध एक पुसटशी रेष असणाऱ्या बाबी. हे समजून घेण्यात, समजावून सांगण्यात होणारा गोंधळ, बऱ्याच प्रश्नांच्या मुळाशी दिसतो. असे का? पिढी दर पिढी वाढत जाणारे अंतर, इतक्या सोप्या स्पष्टीकरणात आपण हा विषय गुंडाळून ठेवतो. पण याकडे विशेष लक्ष देण्याची गरज, सगळ्या वयोगटातील लोकांना आहेच!

आपल्या आयुष्यात लहानपणापासून आलेले कौटुंबिक आणि इतर अनुभव, वातावरण यातून आपली व्यक्ती म्हणून जडणघडण होते. हे होत असतानाच काही संवेदना खूप तीक्ष्ण स्वरूपात जाणवू लागतात. त्याची पाळेमुळे मात्र बालपणात दडलेली असतात! ती तशीच दडवून ठेवली, तर त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या याने केवळ आपलेच नाही, तर आपल्या स्वकीयांचेही आयुष्य बदलते. असे काही असेल तर आपण त्याकडे डोळसपणे पाहतोय का? किंवा त्यांना टाळतोय का?

प्रत्येक व्यक्ती जगत असताना, मुळात एका गोष्टीचा विचार करते. स्वत:ची सुरक्षितता! मग ती मानसिक असो अथवा शारीरिक! इथे जन्माला येतात, नको असलेले कित्येक खेळ, त्यातील कुरघोडी. इतरांवर हल्लाबोल करण्याची वृत्ती, त्यांना जबाबदार धरून, स्वत:ची कातडी वाचवण्याची तळमळ! हे सगळे सोडून, अतिशय साधेपणाने आपण नाती टिकवू शकतो का? आणि कसे?

एकमेकांमधील विश्वास ही तर कोणत्याही नात्यात असणारी घट्ट वीण! तिथे असुरक्षितता आली, किंवा संशय निर्माण झाला तर मात्र अवघड होऊन बसते. असे का होते? काही मानसिक आजारात तर हे दिसतेच. तसे आजार कोणते? परंतु त्याही शिवाय अशी स्थिती दिसते तिथे काय केले पाहिजे? नाजूकपणे वाट काढत पुढे जाणे गरजेचे आहे, ते कसे साध्य होईल?

मुळात नात्यांमध्ये असणाऱ्या व्यक्ती असा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस, एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारणं गरजेचं आहे. तो म्हणजे, या व्यक्तीचे माझ्या आयुष्यातील स्थान! आणि या नात्याचे माझ्या आयुष्यातील महत्त्व! याची उत्तरं स्वत:लाच प्रामाणिकपणे मिळायला लागली, की मग, ती व्यक्ती आणि ते नाते टिकवण्याची धडपड, दोन्ही बाजूंनी सुरू होते. पुढे ती धडपड न राहता, त्याचा एक सुखद प्रवास होतो. तिथे कोणतेही ताण-तणाव राहत नाहीत! कुरबुरी, रुसवेफुगवे, क्षणिक अडथळे येतील, परंतु, त्यांचे तिथे टिकणे केवळ अशक्य. याचे कारण नात्याच्या मुळाशी असणारे सामंजस्य, आणि कोणाही एकावर न पडणारा भार! अशी नाती हळूहळू उलगडत जातात, आणि त्याच्यासह आयुष्य नुसतेच सुसह्य़ होत नाही तर ते खऱ्या अर्थाने नंदनवन होऊन जाते!

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com