प्राणायाम हा बहिरंग साधनेतून अंतरंग साधनेपर्यंत प्रवास करताना लागणाऱ्या वाटेतील पूल आहे. योगसाधनेचे उद्दिष्ट हे नियंत्रित शरीराकडून अर्धनियंत्रित श्वास नियंत्रित करणे व त्याच्या माध्यमातून अनियंत्रित अशा मनावर ताबा आणणे हे आहे. अर्थात हे अजिबात सोपे नाही, परंतु साधना करीत असताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. त्यातला पहिला म्हणजे ‘मनोयुक्तं समभ्यसेत्’ हठप्रदीपिकेमध्ये आपल्याला सांगितले आहे की प्राणायामाच्या साऱ्या कृती अत्यंत मनापासून केल्या पाहिजेत, अत्यंत प्रयत्नपूर्वक मनाला निदान साधना करताना तरी इकडे तिकडे भटकू देऊ नये. तर दुसरा मुद्दा म्हणजे -‘धारयित्वा यथाशक्ती’  म्हणजेच आपल्याला झेपेल इतपतच श्वास रोखून धरावा. (कुंभक) हा निर्देश स्पष्टपणे दिला असूनही काही वेळा श्वास अतिरिक्त रोखून धरला जातो. स्पर्धात्मक भावनेने अशा रीतीने केलेली साधना शरीराला घातक होऊ शकते. तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘यत्नवर्जति:’.
योगवासिष्ठात प्राणायामासंबंधी सांगताना वसिष्ठांनी पूरक-कुंभक रेचकाचे कोणतेही प्रमाण दिलेले नाही. सर्वात महत्त्वाची आहे संवेदनशीलता. पूरक करताना हवेचा स्पर्श अनुभवता आला पाहिजे. ‘यावत् शक्यते तावत् धारणम्’ म्हणजेच जमेल, झेपेल तेवढाच कुंभक करून रेचक करताना हवेचा स्पर्श नाकपुडय़ांच्या पुढे चार बोटे जाणवला पाहिजे. म्हणजेच साधनेतील सजगता विकसित करण्याचा उद्देश सफल झाला पाहिजे.
भस्रिका प्राणायाम
आपण आज भस्रिका प्राणायामाचा सराव करू. भस्रिका म्हणजे लोहाराचा भाता. भस्रिका प्राणायामामध्ये श्वसन नियंत्रण असले तरी पूरक -रेचकाची गतिमान आवर्तने करावयाची आहेत. प्राणायामच्या सर्व कृती माहितीसाठी लिखित दिल्या असल्या तरी योग्य गुरूंच्या सल्ल्याशिवाय, प्रत्यक्ष मार्गदर्शनाखालीच त्या करणे अपेक्षित आहे.
सुखासनात बसा. डोळे मिटून घ्या. द्रोणमुद्रा करा. एक श्वास पूर्णपणे सोडून द्या. आता हृदयाचा भाग, गळयाचा भाग, या ठिकाणी जाणवेल असा गतिमान, वेगवान पूरक रेचक पुन:पुन्हा करावा. थकवा आला तर थांबा- उजव्या नाकपुडीने पूरक करा, यशाशक्ती कुंभक व डाव्या नाकपुडीने रेचक करा. (सूर्यभेदनप्रमाणे)
रक्तदाब, हृदयविकार, पोटाचे- मानेचे- पाठीचे दुखणे असल्यास हा प्राणायाम करू नये. हा प्राणायाम करताना जराही चूक होऊ देऊ नये.