‘व्हॅलेंटाईन डे’चा तरुणाईचा प्रवास आज धमाल, बिनधास्तपणा आणि उत्साह इथपर्यंत नक्कीच पोहोचला आहे,  पण व्यक्ती आणि समाज म्हणून आपण प्रेमाबाबत प्रगल्भ झालो आहोत का? सफल किंवा विफल प्रेमासाठी संपूर्ण आयुष्य त्यागात अथवा दु:खात काढणं हा तेव्हा आदर्श होता. आजची तरुणाई सहजपणे म्हणते, ‘‘आजकाल महिन्याला दोनएक ब्रेकअपही होऊ शकतात. त्यात आम्हाला काही विशेष वाटत नाही.’’ प्रेमाच्या मोजपट्टीची ही दोन टोकं मानली तर आपली स्वत:ची प्रेमाबाबतची प्रगल्भता त्यातल्या कुठल्या िबदूपाशी आहे? येत्या शुक्रवारच्या  व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं हे ज्याचं त्यानंच शोधायला हवं..

एका वयात खरं तर सगळेच जण प्रेमात पडतात. कोणी व्यक्त करतं, कोणी करत नाही एवढंच. विवाहापर्यंत पोहोचलेलं सफल प्रेम आजकाल ‘व्हॅलेंटाइन डे’ला लाल गुलाबाच्या फुलांनी, छोटय़ा-मोठय़ा गिफ्टस्नी, शुभेच्छांनी साजरं केलं जातं. तसं पाहिलं तर प्रेम सफल असो की विफल, पण त्या त्या क्षणी अनुभवलेली उत्कटता विलक्षण असते. संपूर्ण आयुष्यातल्या प्रगल्भतेची घडण अनेकदा याच वळणावर होते. प्रेमाबाबतचे अनुभव आपल्या एकूणच प्रगल्भतेची पातळी वाढवायला कारणीभूत असतात. कारण आनंदापासून निराशेपर्यंतच्या सर्व भावनांचा खरा आणि टोकाचा असा संपूर्ण अनुभव आपल्याला त्या काळात येतो. फक्त त्याबद्दल सहजपणे बोललं जातंच असं नाही.  तो अनुभव असतो, ज्याचा त्याचा.
  मोकळं वातावरण असणाऱ्या घरातले आई-वडील, काका, मामा त्या काळात आपल्याबाबत घडलेले काही ‘सेफ’ आणि गमतीदार प्रसंग घरच्यांशी, तरुण मुलांशी शेअर करतातही, पण किती वडील आपल्या वयात आलेल्या मुलाशी आपल्या तरुणपणातल्या अनुभवांमधली उत्कटता शेअर करतात? वैफल्य सांगतात? आपल्या मैत्रिणींबद्दल मोकळेपणानं बोलतात? (किती आया मित्रांबद्दल सांगतात? कुणी तरी आवडलं होतं, हे उत्कटपणे सांगतात? हे तर कंसातलेच प्रश्न.)   
पस्तिशीच्या सीमाताई एक सुखवस्तू गृहिणी. यंदा बऱ्याच वर्षांनी कॉलेजातल्या मैत्रिणींचा ग्रुप काही निमित्तानं भेटला. बहुतेक मैत्रिणी घरेलू, पदवीनंतर लगेच लग्न करून संसाराला लागलेल्या. संसारात सुखी पण प्रपंचात अडकलेल्या. जरा मोकळं व्हायचं म्हणून त्यांनी थायलंड, बँकॉकची आठवडय़ाभराची ट्रिप बुक केली. ट्रिप मस्त झाली. टूर मॅनेजर धम्रेश सर्वाना आवडला. हसतमुख, बोलका, सर्वाशी हसूनखेळून वागणारा आणि त्यातही महिला वर्गाची जास्त काळजी घेणारा. कॉलेजच्या वयातदेखील फार कुणात न मिसळणाऱ्या या मैत्रिणींना एवढा छान मित्र कधीच भेटला नव्हता. त्यांच्यापेक्षा तो वयानं थोडा लहान होता. पण जुन्या सिनेमा-गाण्यांच्या त्यांच्या आवडी जुळत होत्या आणि धम्रेशचा हजरजबाबीपणा तर कमावलेलाच. तो त्या ट्रिपची ‘जान’ झाला होता. परतल्यानंतर आपली अकरावीतली कन्या श्रद्धा आणि पती राघव यांना  ट्रिपच्या गमती सांगणाऱ्या सीमाताईंची कुठलीच आठवण धम्रेशच्या नावाशिवाय पूर्ण होत नव्हती. एकदा श्रद्धा वैतागून म्हणाली, ‘‘अगं, आता मला बोअर करतोय हं तुझा धम्रेश. दुसरं कुणी ट्रिपमध्ये नव्हतंच का!’’
‘‘श्रद्धा, खूप वर्षांनी आई एकटी, माझ्याशिवाय बाहेर पडलीय. कुणी तरी मनातलं ओळखणारा नवा मित्र भेटलाय, एक्साइटमेंट असणारच..’’ राघव अचानक म्हणाले. श्रद्धा जरा अस्वस्थ झाली, पण वडील मिस्कीलपणे हसत होते आणि आई खोडकरपणे, किंचित गोरीमोरी होऊन. श्रद्धाला एकदम मोकळं वाटलं. एका विवाहित स्त्रीच्या आयुष्यात एक उमदा पुरुष काही काळासाठी आला, त्याच्या अस्तित्वानं तिला छान वाटलं, बस इतकंच. भांडायचंच असतं तर इमोशनल ड्रामाची किती बीजं त्या प्रसंगात होती, पण वडिलांना त्याचा इश्यू नव्हताच. बायकोची मस्करी करण्याचा खिलाडूपणा त्यांच्यात होता आणि ती स्वीकारण्याचा खटय़ाळपणा आईकडे होता. एकमेकांवर गाढ विश्वास असल्याशिवाय इतकी सहजता येऊच शकत नाही. श्रद्धाला भारीच वाटलं.    
 मोकळेपणानं बोलणं याचा अर्थ असा नाही की जगापुढे आपलं सगळं आयुष्य उघडून ठेवावं. तर इतर कुठल्याही विषयांबद्दल आपण ज्या सहजपणानं बोलतो, तसंच याही विषयावर बोललं पाहिजे. स्थळ, काळ, व्यक्तींचं तारतम्य पाळणं गृहीत आहे, पण मनाच्या तळाशी ठेवलेलं खूप जिवाभावाचं काही कधी बोलावंसं वाटलंच तर त्यांना सामाजिक बंधनं आणि परिणामांची भीती नसावी. अनुभवांमधली स्वाभाविकता व्यक्ती आणि समाज दोघांनाही स्वीकारार्ह असायला हवी. पण आपण साध्या साध्या गोष्टीसुद्धा सहज घेऊ शकत नाही.
‘‘हा पोषाख तुला खूप छान दिसतो,’’ असं एखाद्या मुलीला एका मैत्रिणीपेक्षा मित्रानं सांगितलेलं आणि मुलाला मैत्रिणीनं सांगितलेलं जास्त छान वाटेल हे स्वाभाविक असतं. पण अनेकदा साध्या साध्या गोष्टींवर संशय आणि वादविवाद घडतात किंवा समर्थनं दिली जातात. हा बालिशपणा आहे हेदेखील आपल्या लक्षात येत नाही.
माझ्या परिचयातल्या एका विधुर गृहस्थांनी पुनर्वविाह केला. एकेकटं कुढत राहण्यापेक्षा दोघांचाही पुनर्वविाह हा निर्णय खरं तर किती छान होता, पण सोबत मिळाल्याच्या आनंदापेक्षाही दोघंही लोकांना सांगत होते, की  ‘‘आम्ही फक्त सोबतीसाठी एकत्र आलो आहोत. आमच्या नात्यात शारीरिक जवळीक नसेल हे आम्ही आधीच ठरवलेलं आहे.’’ खरं तर आपल्या स्वत:च्या घरात ज्याला जसं राहायचं असेल तसं त्यानं राहावं. पण इतक्या व्यक्तिगत गोष्टीची अस्थानी जाहिरात करून त्यांनी तिचा सन्मानच संपवून टाकला.  दाखवलेलं धाडस केविलवाणं होऊन गेलं. सहजभाव नसेल तर असा गोंधळ होतो. जे बोलायला हवं ते आयुष्यभर बोललं जात नाही आणि जिथे आत्मसन्मान जपला पाहिजे तिथला हळुवारपणा पोहोचतच नाही. याला लोकोपवादाची भीती म्हणावं, अपराधीभाव म्हणावं की स्पष्टता नसणं?
 प्रेमाचे अनेक पदर आणि छटा उमजत जाणं हा एक समृद्ध करणारा प्रवास असू शकतो. प्रत्येक अनुभव आपल्याला नवी नवी जाण देत असतो. प्रेम, माया, आपलेपणा, आकर्षण अशा एकेका टप्प्यातून प्रेम उलगडत जातं. पती/पत्नी किंवा शारीरिक प्रेम एवढय़ापर्यंत पोहोचणारा तो एक मुक्काम उरत नाही. तो प्रवास आयुष्याला प्रवाही करतो. मात्र त्यासाठी  मनाची दारं उघडी हवीत. अनुभवांना सामोरं जायला हवं. भीतीनं दार बंद करून घेऊन फटीतून पाहिलं तर आकाश तेवढंच दिसणार. त्याची व्याप्ती कळणार नाही. मात्र दार संपूर्ण उघडलं तर ती नजर विस्तारते. उमगतं, प्रेम म्हणजे स्वीकार, सहजता, सन्मान, विश्वास, अवकाश आणि आनंद.  (पान १ वरून) मग नातेसंबंधांचा जुनाच राग नव्यानं समजायला लागतो.  रागाची सुरावट, वादी-संवादी, कणस्वर, मींड आणि वज्र्यस्वराचीदेखील मजा घेता यायला लागते.
इंग्लंडहून सेल्फ डेव्हलपमेंटच्या वर्कशॉपसाठी नेहमी भारतात येणारी एॅरिअल एकदा म्हणाली, ‘‘इथे समस्यांची व्हरायटी मिळते म्हणून दरवर्षी येत होते. पण वडील वारले, आईची आजारपणं त्यामुळे यंदा चार वर्षांनी आलेय.’’
‘‘यंदा आईची काय व्यवस्था केलीस?’’  
‘‘आईला मध्यंतरी तिचा कॉलेजमधला एक मित्र भेटला. तोही एकटाच होता. आईचं आजारपण स्वीकारून त्यानं तिला प्रपोज केलं. नंतर माझ्याशी बोलून मलाही विश्वास दिला. माझ्या बॉयफ्रेंडशीपण त्याची छान मैत्री झालीय. आम्ही एक कुटुंब झालोय. आमची भांडणं ते सोडवतात, त्यांची आम्ही.’’ एॅरिअल हे सांगताना तिचे आनंदानं चमकणारे डोळे प्रेमाचा एक वेगळाच रंग दाखवत होते. आपल्याकडे इतकी सहजता नाही. खरं तर एखाद्याची अशी अकस्मात सोबत मिळणं आयुष्य किती हवहवंसं करणारं आहे.
आयन रॅंडच्या पुस्तकातला एक प्रसंग लक्षात राहिलाय.. कादंबरीचा नायक मशीनमधल्या काही तांत्रिक बिघाडामुळे रात्रपाळीला ऑफिसमध्ये थांबतो. नायिकाही सोबत थांबून दुरुस्तीला मदत करते. काम संपवून कृतार्थ मनानं ते पहाटे घराकडे निघतात. यापूर्वी मैत्रीशिवाय कुठलीच भावना त्यांनी एकमेकांकडे कधी व्यक्त केलेली नसते. पहाटेची सुखद हवा, किलबिलणारे पक्षी आणि जंगलातली हिरवळ अशा वातावरणात एकमेकांकडे हसून पाहात असताना ते जवळ येतात आणि हिरवळीवरच एकमेकांचे होतात. शब्दाविना संवादू. तृप्त होऊन थोडय़ा वेळानं उठल्यावर तो म्हणतो, ‘‘इतकं सुख देणारी शरीरं आपल्याजवळ आहेत हे किती सुंदर आहे.’’ शब्दांचीही गरज नसावी एवढी मनं जुळतात तेव्हाच हे घडू शकतं. शरीर हे प्रेमाचं ‘माध्यम’ आहे हे एवढय़ा सहजसुंदर पद्धतीनं यापूर्वी कधीच कळलं नव्हतं. आयन रॅंडच्या लिखाणात सेक्सबाबत वेगळीच सहजता आहे. तिच्या नायक-नायिकांनी एकत्र येण्यापूर्वी एखादी  मोठी जबाबदारी संपवलेली असते आणि त्याचं बक्षीस असल्यासारखे ते एकत्र आलेले असतात हे तिचं आणखी एक वेगळेपण.
एडविना माऊंटबॅटन आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नात्याबद्दल बोलणारी ‘एडविना अॅण्ड नेहरू’ आणि ‘द इंडियन समर’ ही दोन गाजलेली पुस्तकं. त्यांचं नातं नेमकं कसं होतं वगरे चर्चा बाजूला ठेवल्या तरीही लॉर्ड माऊंटबॅटन, एडविना आणि नेहरूंची अतिशय जवळची मत्री होती आणि तिघांनाही त्या मत्रीत आनंद होता हे निर्वविाद आहे. एडविना या मत्रीला ‘ट्रेझर्ड बॉण्ड’ म्हणत असत.
भारतीय संस्कृती आणि तो काळ पाहता परंपरागत भारतीय समाजमन अशा प्रेमाच्या विचारापर्यंतसुद्धा पोहोचू शकणार नाही.  तिघांची अशी मत्री चूक की बरोबर? अशा वादांत ती अडकून पडेल. ‘असंही असू शकतं’ हे स्वीकारता आलं तर समजतं की प्रेमाच्या प्रगल्भतेचं हे प्रतलच वेगळं आहे. अशी मत्री सहजभावानं स्वीकारण्यासाठी हवं ते पत्नीवरचं निरपेक्ष प्रेम, तिचं व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य मनापासून मान्य असणं आणि आयुष्याकडून आपल्याला आनंद हवा आहे, मनस्ताप नव्हे हे निश्चित माहीत असणं.
‘व्हॅलेंटाईन डे’ आपल्याकडे रुजून २५-३०  र्वष झाली. तेव्हा परस्परसंवादाची भीती, लाजणं आणि उत्सुकता इथपासून सुरू झालेला व्हॅलेंटाइन डेचा प्रवास आज धमाल, बिनधास्तपणा आणि उत्साह इथपर्यंत नक्कीच पोहोचला आहे. व्यक्ती आणि समाज म्हणून आपण प्रेमाबाबत प्रगल्भ झालो आहोत का?
स्वत:च्या स्वतंत्र नजरेनं आपण प्रेमाकडे पाहू शकतो का? सफल किंवा विफल प्रेमासाठी संपूर्ण आयुष्य त्यागात अथवा दु:खात काढणं हा तेव्हा आदर्श होता. आजची तरुणाई सहजपणे म्हणते, ‘‘आजकाल महिन्याला दोनएक ब्रेकअपही होऊ शकतात. त्यात आम्हाला काही विशेष वाटत नाही.’’ प्रेमाच्या मोजपट्टीची ही दोन टोकं मानली तर आपली स्वत:ची प्रेमाबाबतची प्रगल्भता त्यातल्या कुठल्या िबदूपाशी अथवा बिंदूजवळची आहे?
येत्या शुक्रवारी साजरा केल्या जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्तानं हे ज्याचं त्यानंच शोधायला हवं. कारण प्रेम उत्कटपणे जगायचं? की चर्चा करत मापायचं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक शोध असतो.    

shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
Budh Gochar Till 9 April 2024 Kendra Trikon Rajyog To Bless Vrushbh Makar Rashi
१३ दिवस केंद्र त्रिकोण राजयोग कायम; ‘या’ राशींना लाभतील सुगीचे दिवस; ‘या’ रूपात होईल लक्ष्मीचं आगमन