प्रेरणादायी सदरे
नव्या वर्षांतील ‘चतुरंग’ पुरवणीचा पहिलाच अंक (४ जाने.) व त्यातील सदरे प्रेरणादायी व वाचनीय आहेत. प्रत्येक लेखामध्ये मानवाच्या विचारांची विसंगती दर्शविली आहे. ‘आवाज भीषण प्रथेविरुद्धचा’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘भावनांची ताकद’, ‘मनाचं वय नेहमी पंचवीसच असतं’ आणि ‘कीबोर्डशी मैत्री झाली’ या सर्वच लेखांमधील जिद्द, संघर्ष व जगण्याचा उद्देश, भावना, वयाची मर्यादा नसणे या बाबी विशेष उल्लेखनीय वाटल्या.
परदेशातील अनेक बाबींचे आपण गोडवे गातो, परंतु तेथील ‘एफ.जी.एम’ ही क्रूर प्रथा कोणालाही माहीत नसेल. त्या मुलींच्या संघर्षांला खरोखर त्रिवार वंदन करण्यासारखे आहे. ‘टर्निग पॉइंट’मधील लेख वडील मुलीवरच आई नसताना नको तेवढे अत्याचार करतात, तेसुद्धा कार्यालयात उत्तम प्रशासक असताना. ही घटना पित्याच्या शब्दाला काळिमा फासणारी कथा आहे. आपण मुलांना ‘मातृदेवी भव’, ‘पितृदेवी भव’ असे अनेक संस्कार शिकवत असतो. परंतु आज या गोष्टी शिकवणे लाजिरवाणे झाले आहे. पुढील भविष्यात हीच मुले त्यांना अपमानकारक वागणूक  देतात तेव्हा त्या मुलांचे खरे संस्कार आतील प्रेरणेतून मिळालेले असतात, संस्कारातून नाही, असे प्रत्ययास घेत असते. म्हणून अंतर्मन हा मुलांचा पहिला गुरू आहे, असे वाटते.
– विजया भट, बोरिवली
जणू साहित्य मेजवानीच!
अवनी अमीन यांचा ‘भावनांची ताकद’ (४ जाने.) हा लेख अप्रतिम झाला आहे. लेखिकेने जीवनाचा अभ्यास किती निष्ठेने व ताकदीने केला आहे, याची चुणूक लेखावरून जाणवले. ‘नकारात्मक भावनांचे रूपांतर सकारात्मक शेवटात करता आले पाहिजे. आतला आवाज ऐका व त्याप्रमाणे जगा. कुठल्याही दुसऱ्या जीवाला त्रास देऊ नका वा दडपण्याचा प्रयत्न करू नका.’ हे त्यांचे विचार खरंच स्तुत्य आहेत. तसेच जगण्याकडे बघताना त्यांची विचारांची, भावनांची वीण किती घट्ट व मजबूत झाली आहे हे जाणवले.
‘एकाच जन्मातला पुनर्जन्म’ हा अनघा ठोंबरे यांचा लेखही हृदयाला हात घालून गेला. मात्र मदतीसाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक द्यायला हवा होता, असे वाटले. यासह ‘मन करा रे प्रसन्न’ हे ब्रह्माकुमारी शिवानी यांचे बोधिवृक्षाचे प्रवचनही उत्तम आहे. ‘आपण मानसिक स्वास्थालाही शारीरिक स्वास्थाइतकेच महत्त्वाचे समजू तेव्हाच हा जीवनप्रवास व्यवस्थितरीत्या चालू शकेल व आपल्याला आनंदही मिळेल’ हे त्यांचे विचार मनोमन पटले. त्यांची श्रवणीय-मननीय प्रवचने टीव्हीवर ऐकली आहेत. अनुवादकांनी छान विषयशोधून उत्तम काम केलंय. त्यांना उजेडात का आणले नाही, त्यांचेही नाव छापा. ‘मनाचे वय नेहमी पंचवीसच असतं’ हा संपदा वागळे यांचाही लेख ज्येष्ठांना व तरुणांनाही लाजवणारा असाच आहे. निरुपमाताई भावे यांचा अफाट प्रवास, उपक्रम नि जिद्द पाहिली आणि नवलच वाटते. अशी माणसं कशी काय शोधता, हा प्रश्न पडला. असो. प्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्याबरोबरीचे सहजीवन उलडणारा प्रा. प्रभा गणोरकर यांचा लेख त्यांच्या ताठ कायद्याचे दर्शन देऊन गेला.
एकूणच शनिवार पुरवणी म्हणजे जणू साहित्य मेजवानीच! रसिक जनांना- ज्येष्ठ नागरिकांना सहज वाचता येण्यासाठी त्यातील अक्षरे ठळक असावीत, इतकीच सूचना.
– भालचंद्र गन्द्रे, ठाणे
आशादायी विचारांची पावती
‘फिरकी’ हा अमृता सुभाष यांचा लेख (११ जाने.) म्हणजे आशादायी विचारांची पावती आहे. कित्येकदा असे होते की, आयुष्यात एकामागून एक संकटांचा सामना करावा लागतो, अशा वेळी सगळेच मार्ग अंधकारमय भासू लागतात. असे वाटते की पुन्हा कधीच सुखाचे दिवस दिसणार नाहीत. अशा अवस्थेत असतानाच अचानक आशेचा किरण लुकलुकताना दिसतो आणि संपूर्ण आयुष्य उजळून टाकणारी घटना घडते. यामुळे पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर घोडदौड सुरू होते. म्हणूनच darkest before the dawn Ups & downs are part of our life & we must learn to take it in our stride it is या म्हणींची सार्थता पटते.
-केतन र. मेहेर, विरार (पूर्व)
तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार
‘कोंडी पुरुषांची!’ हा (११ जाने.) मधील प्रसाद ढवळे यांच्या सदरातील लेख खूप आवडला. सध्या पुरुषवर्ग स्त्रियांविषयी एका अनामिक भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसतो आहे. कुठल्याही स्तरावर असो, महिलांकडून होणारा छळ, आगळीक पुरुष मुकाटय़ाने सहन करतो; परंतु त्याविषयी सहसा तक्रार करीत नाही. कारण अशी तक्रार केली तर लोक आपल्याला हसतील असे त्याला वाटत असावे. हाताखालील महिलांकडून कामं करून घेणे ही पुरुष अधिकाऱ्यांची फार मोठी डोकेदुखी ठरते आहे. ‘फट म्हणता ब्रह्महत्या’ होऊ शकते, असे एक अधिकारी मित्र परवा सांगत होता. वीसेक वर्षांपूर्वी आमच्या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील मिरच्या चोरून तोडणाऱ्या महिलेला त्याने तसे का करतेस म्हणून विचारताच त्या बाईने आरडाओरड करायला सुरुवात केली. शेतकरी अर्धमेला झाला. आजूबाजूचे शेतकरी, मजूर गोळा झाले व तूच खोडी काढली असशील म्हणून त्यालाच दोष देऊ लागले. नाण्याच्या एका बाजूवर ‘हेड’ आहे म्हणजे दुसऱ्या बाजूवर ‘टेल’च असले पाहिजे, ही विचारधारा फार घातक आहे.
एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषावर लंगिक शोषणाचा आरोप केला की कुठलीही खातरजमा न करता त्या पुरुषावर टीकेची झोड उठविली जाते. अशाने निरपराध व्यक्ती आयुष्यातून उठू शकते. आजच्या समाजातील नतिकतेचा स्तर इतका खालावला आहे की कुणीही आपला हिशोब चुकता करण्यासाठी भाडोत्री व्यक्तीद्वारे प्रतिस्पध्र्यावर लंगिक शोषणाचे आरोप लावू शकतो. म्हणूनच डॉ. फारुख अब्दुल्ला हे ‘मला आता महिलांची भीती वाटू लागली आहे’ असे म्हणाले असावेत. स्त्री-पुरुषांना वेगवेगळ्या कारणांसाठी एकत्र यावेच लागते. ते टाळता येणे शक्य नसले तरी अशा एकत्र येण्याचा गरफायदा कुणी घेणार नाही याची खबरदारी संबंधितांनीच घेतली पाहिजे. त्यातूनही असे प्रकरण उद्भवलेच तर न्यायालयातून त्याचा निवाडा होईपर्यंत पत्रलेखकांनी, प्रसारमाध्यमांनी त्यातून कुठलाही निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. कारण नाण्याची दुसरी बाजू आपण समजतो तशीच असेल असे नाही.    
सोमनाथ देशमाने, अहमदनगर