रजनी परांजपे

जी ‘स्कूल ऑन व्हील्स’ बस इतर ठिकाणी आकर्षण ठरते तीच इथे थोडी अडचणीची झाली. कारण या बसमध्ये घालून मुलांना आम्ही पळवून नेऊ असा समज वस्तीत पसरला. शेवटी बसमधली चटई बाहेर काढून बसशेजारीच उघडय़ावर बसून मुलांबरोबर लहान लहान खेळ,

गाणी, गोष्टी असे उपक्रम सुरू केले. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज दहा वर्षांनंतरही तेथे अभ्यासवर्ग अखंडित सुरू आहेत.

पुण्यातील सदानंद हॉटेलसमोरची एक वस्ती. या वस्तीत निरनिराळे व्यवसाय करणारी कुटुंबे, नंदीबैलवाले, भंगार गोळा करणारे, नाक्यावर उभे राहून मजुरी रोज शोधणारे असे विविध व्यवसाय करून गुजराण करणारी १५-२० कुटुंबे. आम्ही या वस्तीत काम सुरू केले त्याला आता जवळजवळ दहा वर्षे झाली.

काम करायला सुरुवात केली तेव्हा वस्तीत आमचे स्वागत फारच थंड झाले. आमच्या शिक्षिका वस्तीत गेल्या आणि एखाद्या झोपडीच्या तोंडाशी उभे राहून आतील व्यक्तीशी बोलायला लागल्या तरी त्यांच्याकडे मान वर करूनही कोणी बघेना. त्यामुळे वस्तीत सर्वेक्षण वगरे न करता एकदम बसच नेऊन उभी करू, बसच्या आकर्षणाने मुले जमतील, असा विचार करून झोपडय़ांजवळच मोकळ्या जागेत बस उभी केली. अपेक्षेप्रमाणे मुले जमली. दूर उभं राहून काहीशा कुतूहलाने, काहीशा अविश्वासाने बसकडे बघत राहिली आणि पाठोपाठ वस्तीलाही जाग आली. घरातील आया-बायाही आल्या. त्यातल्याच कोणीतरी धीटपणाने पुढे होऊन जाब विचारण्याच्या आवेशात, ‘‘इथे कशाला आलात? काय काम आहे? बस कशाला आणली?’’ असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि संवाद सुरू झाला..

जी ‘स्कूल ऑन व्हील्स’ बस इतर ठिकाणी आकर्षण ठरते तीच इथे थोडी अडचणीची झाली. कारण या बसमध्ये घालून मुलांना आम्ही पळवून नेऊ, असा समज वस्तीत पसरला. मोठी माणसे आत येऊन बस बघून जात. पण मुलांना मात्र बसमध्ये चढू  देईनात. शेवटी बसमधली चटई बाहेर काढून बसशेजारीच उघडय़ावर बसून मुलांबरोबर लहान लहान खेळ, गाणी, गोष्टी असे उपक्रम सुरू केले. घरीच असणाऱ्या बाया-बापडय़ा मुलांवर लक्ष ठेवता ठेवता या खेळात थोडा थोडा रस घेऊ लागल्या. एखाद-दुसरा पुरुष प्रौढपणाने पुढे येऊन आम्ही काय कुठले याची चौकशी करू लागला. आम्हीही तेथे गाडी नेणे बंद केले आणि काही दिवस तेथेच उघडय़ावर वर्ग घेतले. हळूहळू ओळख वाढत गेली, मुले उन्हात किती वेळ बसणार अशा सबबीने तिथेच गोठासदृश तयार केलेल्या जागेत वर्गाचे बिऱ्हाड हलवले. तेथील नंदीबल दिवसा बाहेर जात. तेथेच जागा साफ करून वर्ग लावायला सुरुवात केली. पण वर्ग लावायचा म्हणजे नुसतीच गाणी, गोष्टी, खेळ घेऊन चालत नाही. वर्गाला हवे फळा, पाठय़पुस्तके, खडू, पेन्सिल, ‘अ, आ, इ, ई ’चे तक्ते असे साहित्य. ते असल्याशिवाय वर्ग कसा लावणार? मुलांना गुंतवून तरी कसे ठेवणार? बस असेल तर बसमध्ये हे सर्व साहित्य असते आणि या गोष्टी रोज रोज वाहून नेण्यासारख्याही नाहीत. मग तेथेच कोणाकडे तरी पत्र्याच्या पेटीत हे सर्व साहित्य ठेवायला सुरुवात केली. पुढे वस्तीतील मंडळींशी आणखी ओळख झाली. आमच्याविषयीचा त्यांच्या मनातला संशय हळूहळू दूर झाला, पण अजूनही मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी होताना दिसेना.

घरातील एक मूल शिकलेले असले की पाठोपाठ येणारी दुसरी मुलेही शिकतात, असे आपण नेहमी म्हणतो. बऱ्याच अंशी ते खरेही असते. पण या वस्तीत असे घडले नाही. येथील काही तरुण मुले लहानपणी शाळेत गेलेली होती. वस्तीतील कोणीच शाळा कधी बघितलेली नव्हती असे नव्हते. एकदोघेजण तर दहावीपर्यंत पोहोचलेले, दहावीची परीक्षा दिलेले असेही होते. पण या गोष्टीचा येथे उपयोग होण्याऐवजी अडसरच झाला. कारण दहा दहा वर्षे शाळेत घालवूनही शेवटी त्यांना पिढय़ान्पिढय़ा चालत आलेला नंदीबलाचा किंवा मोलमजुरीचा धंदाच करावा लागत होता. तुमच्या मुलाला शाळेत पाठवा हे सांगताना जी उदाहरणे आपण पुढे करतो ती येथे उपयोगी नव्हती.

कधी उघडय़ावर, कधी कुणाच्या घरात तर कधी कुणाच्या गोठय़ात वर्ग घेत घेत आम्ही दिवस ढकलत होतो. काही दिवस तर तेथे आम्हीही एक पाल ठोकले होते. पण त्याचा व्यापच झाला. रात्री तेथे अड्डा बसे आणि तो सकाळी साफ करताना शिक्षकांच्या नाकी नऊ येत. तरीही आम्ही वर्ग चालू ठेवले कारण मुलं. मुलांना या सगळ्या गोष्टींची गंमतच वाटत होती. गोष्टी, गाणी, चित्र काढणे, पाढे म्हणणे, पाटी पेन्सिल घेऊन लिहिणे आणि पुस्तक घेऊन वाचणे त्यांना गुंतवून ठेवत होते. आजचा दिवस संपताना उद्याच्या दिवसाची वाट बघायला लावणारे ते एक कारण होते. मुले रमत होती म्हणून आयाही खूश होत्या. हळूहळू त्यांचा विरोध कमी होत होता त्यातल्या काही जणींची आम्हाला मदतही होत होती. त्यात मुख्य मदत झाली ती किरणच्या आईची. सर्वजण त्यांना किरणची आईच म्हणत. बाई जबरदस्त. वस्तीवर वचक ठेवून. पाच मुली, एक मुलगा, एकदोन गुरे, काही कुत्रे, काही कोंबडय़ा असा संसार. बाई घरीच असायच्या. मुलाला शिकवायचे असे त्यांच्या मनाने घेतले. आणि त्यांनी आमची पाठ धरली आणि पाठराखणही केली.

त्यांच्या मुलाला शाळेत घातले आणि त्याबरोबरच वस्तीतील इतर मुलांनाही. शाळा फार लांब नव्हती. पण रस्ता वाहतुकीचा. लहान मुलांना एकटे सोडण्यासारखा नाही. मग ज्या बसमधून आम्ही मुलांना पळवून नेऊ अशी भीती होती त्याच बसमधून मुले रोज शाळेत जायला लागली. शाळेत घालताना वयाचा दाखला करून घेण्यापासून सुरुवात करावी लागे. रोजची स्वच्छता, अंघोळ, स्वच्छ कपडे, नीटनेटकेपणा सर्व गोष्टी लक्ष ठेवून करून घ्यायला लागत आणि तरीही शाळेत सोडल्यावर इतर मुलांच्या तुलनेत ही मुले कमीच पडत. त्यामुळे शिक्षकही मुलांना वर्गात बसवून घ्यायला नाखूशच असत. मुले तरी काय करणार? त्यांच्या घराजवळ ना पाण्याची सोय ना इतर कशाची. पाणी कुठून तरी दुरून आणायचे आणि तेही कोणाच्या तरी मेहरबानीने, दामदुपटीने पैसे भरून. स्वच्छतेची परिमाणे आणि मापदंडही त्यामुळे बदलतात, बदलावे लागतात. मुलांना शाळेत घालायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या स्वच्छतेकडे खूप लक्ष द्यावे लागे. पण पुढे सवयी बदलल्या आणि आता तो प्रश्न उरला नाही. मुलांना शाळेत घालण्याचा आणखीनही एक फायदा झाला आणि तो म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मदतीने आम्हाला शाळेतच एक खोली मिळाली. या खोलीत आम्ही मुलांचा अभ्यास वर्ग लावतो. आता वस्तीवर वर्ग घ्यावा लागत नाही. याचा आणखी एक फायदा असा झाला की, येथे येऊन मुलांना शिकवणारे स्वयंसेवक वाढले.

आता ही वस्ती तिथे नाही. ही वस्ती उठवली गेली आणि निरनिराळ्या तीन ठिकाणी पांगली. नवीन नवीन येणाऱ्या मुलांना दुसरे पालक शाळेत घालतात. पालक स्वत पैसे खर्च करून मुलांना शाळेत नेण्या-आणण्याची सोय करतात. आपल्या मुलांना लागणारी  वह्य़ा, पुस्तके विकत आणतात. हे सर्व आम्ही ठामपणे म्हणू शकतो कारण आम्ही अजूनही या मुलांसाठी अभ्यासवर्ग घेतो.

सदानंदची मुले किंबहुना सदानंदचे पालक कुठून कुठपर्यंत आले हे सांगताना शिक्षिकांचा चेहरा आनंदाने फुलून येतो. आणि तिथल्या अनुभवांविषयी किती बोलावे आणि किती नको असे त्यांना होऊन जाते आणि मग ‘केल्यावर होते मॅडम,’ असं त्या उत्स्फूर्तपणे म्हणतात तेव्हा आपल्याला ‘केल्याने होत आहे रे,’ या उक्तीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com