रजनी परांजपे

केवळ पुणे शहरात फक्त बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांची शाळेत न जाणारी मुले मोजली तरी ती सहज १५ ते २० हजारांच्या घरात जातील. ही मुले तर तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांसारखीच आहेत. रस्त्यावर भीक मागणारी नाहीत की घरी भांडणतंटा करून घरून पळून आलेली  नाहीत,

ती आपली सरळपणे आपापल्या घरी राहतात, आपल्या आई-वडिलांबरोबर गावोगावी हिंडतात. त्यांचे शिकण्याचे वय कधी निघून जाते आणि ती आई-वडिलांबरोबर कधी कामाला जायला लागतात हे कळतच नाही. अशा मुलांच्या शिक्षणाचे काय..

साधारण २०००-२००१च्या सुमाराचा काळ. पुणे शहरात नवी नवी बांधकामे उभी राहताना नजरेस पडायला सुरुवात झालेली. आमच्या वस्त्यांवरच्या वर्गात अधूनमधून जवळपास चाललेल्या बांधकामावरची मुले येत. पण तरीही आमचे या गटाकडे फारसे लक्ष गेले नव्हते. ते पहिल्यांदा गेले ते कर्वे रोडलगत चाललेल्या एका बांधकामामुळे. त्यांनी आपणहून आम्हाला त्यांच्या बांधकामावर जागा दिली आणि मजुरांच्या मुलांसाठी वर्ग लावण्यास सांगितले. एवढेच नाही तर शिक्षिकेचा पगारही देऊ केला.

एकदा या गटाशी ओळख झाल्यावर पुढे २००३ मधे आम्ही पुण्यातील बांधकाम मजुरांच्या मुलांचं एक सर्वेक्षण केलं. प्रथम महानगरपालिकेतून पुणे शहरात चालू असलेल्या बांधकामाची यादी आणली. साधारण १५०० च्या आसपास लहान-मोठी बांधकामे त्या वेळेस चालू होती. त्यातल्या ३८० बांधकामांवरील मजुरांच्या मुलांचे आम्ही सर्वेक्षण केले आणि आम्हाला या ३८० वस्त्यांवर पाच ते पंधरा वयोगटातील शाळेत न जाणारी अशी जवळजवळ ५००० मुले सापडली. ३८० वस्त्यांवर जर इतकी मुले तर १५०० वर किती असे साधे गणित केले आणि लक्षात आले की केवळ पुणे शहरात फक्त बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांची शाळेत न जाणारी मुले मोजली तरी ती सहज १५ ते २० हजारांच्या घरात जातील. ही मुले तर तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांसारखीच आहेत. फरक एवढाच की, त्यांचे आई-वडील गरीब आहेत, बहुतांश कधीही शाळेत न गेलेले आणि कामाच्या निमित्ताने सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हिंडणारे आहेत. केवळ त्यामुळेच त्यांच्या मुलांचे शिक्षण होत नाही. ही मुले रस्त्यावर भीक मागणारी नाहीत की घरी भांडणतंटा करून घरून पळून आलेली  नाहीत, ती आपली सरळपणे आपापल्या घरी राहतात, आपल्या आई-वडिलांबरोबर गावोगावी हिंडतात. त्यांचे शिकण्याचे वय कधी निघून जाते आणि ती आई-वडिलांबरोबर कधी कामाला जायला लागतात हे कळतच नाही.

आपल्याकडे केंद्रीय विद्यालये आहेत. केंद्र सरकारमध्ये काम करणारे कर्मचारी एका गावाहून दुसऱ्या गावाला, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरीनिमित्त हिंडतात तेव्हा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून काढलेली. खरे तर या मुलांसाठी पण अशी काही तरी सोय हवी. पण तेव्हा ती नव्हती आणि तसे म्हटले तर आताही नाही. निरनिराळ्या योजना निघतात आणि सरकारे जशी बदलतात तशा बदलतातही. कामानिमित्त वांरवार स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणाची अजूनही ठोस अशी काही व्यवस्था नाही.

तर ही बांधकाम मजुरांची मुले. कामानिमित्त वांरवार स्थलांतरित व्हावे लागणारे, वीटभट्टी कामगार, ऊसतोडणी कामगार वगरेंसारखेच हे एक. यांचे स्थलांतर या दोनही गटांपेक्षा थोडे वेगळ्या स्वरूपाचे. म्हणजे त्यांचे स्थलांतर कधी आणि कुठे होईल याबद्दल काही सांगता येत नाही आणि त्यामुळेच की काय या गटाबरोबर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाही तुरळकच. हे लक्षात आल्यावर आम्ही या गटाबरोबर काम करण्याचे ठरवले.

यांच्या बरोबर काम करतो असे कुणालाही सांगितले की, ऐकणाऱ्याचा पहिला प्रश्न असतो की, ही मुले जर एका जागेवर राहत नाहीत, कुठून कुठे जातील, केव्हा परत येतील, साधारणपणे किती दिवस एका जागी राहतील, याचा जर काहीच नेम नसेल तर मग यांच्याबरोबर काम करण्याचा उपयोग तरी काय?

या प्रश्नाचे उत्तर म्हणून इथे मला मेहराजची गोष्ट सांगावीशी वाटते. मेहराज बालवाडीच्या वयाची होती तेव्हा ती प्रथम आमच्या वर्गात दाखल झाली. आमचे बांधकाम मजुरांसाठीचे वर्ग बांधकामावरच असतात. या वर्गात तान्ह्य बाळांपासून ते १४-१५ वर्षांपर्यंतची मुले येतात. आम्ही सकाळी ९ ते ५  पर्यंत त्यांना सांभाळतो आणि वयानुसार त्यांना शिक्षणही देतो. तीन ते सहा वर्षे वयोगटाच्या मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण आमच्या वर्गावरच देतो. सहा वर्षांवरच्या मुलांना जवळच्याच सरकारी शाळेत दाखल करतो आणि शिक्षित पालक त्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलांचा अभ्यास ज्या प्रकारे करून घेतात त्या प्रकारे शाळेत जाणाऱ्या या मुलांचा अभ्यास आम्ही आमच्या वर्गावर करून घेतो.

तर गोष्ट मेहराजची, ही मुलगी लहाणपणीच आमच्या वर्गात दाखल झाली. तिच्या वडिलांनी मध्येच मुलाबाळांना गावी पाठवून दिले. गाव कर्नाटकातले. मेहराजची शाळा सुटली. पुढे काय झाले ते तिच्याच शब्दात ऐकू या.

‘‘मी मेहराज जिलानी मुल्लाणी. इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे. माझे वडील बांधकाम साइटवर बिगारी काम करायचे. मी माझ्या भावंडासोबत दिवसभर त्या साइटवर फिरत असायचे, एके दिवशी ऐकण्यात आले की, माझ्या वस्तीत  शाळा आली आहे. शाळा म्हटल्यावर मी घाबरले. पण त्या शाळेतील बाई मला घरी बोलवायला आल्या आणि शाळेत घेऊन गेल्या. हळूहळू  मला शाळेची  आवड निर्माण झाली. मी दररोज शाळेत जायला लागले. त्याचसोबत माझी भावंडेही शाळेत यायला लागली. मग मला बाईंनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन दिला. एकदा असे झाले की, माझ्या घरच्या अडचणीमुळे माझ्या कुटुंबासोबत मला माझ्या गावाला जावे लागले. पण तिकडे मी एकच हट्ट धरला, मला परत जायचे आहे, शेवटी नाइलाजाने माझे वडील मला परत घेऊन आले. मी दररोज शाळेत जाऊ लागले. आता मी बारावीला आणि माझी दोन भाऊ आणि एक बहीण ११वी, नववी आणि आठवीत आहेत.

कॉमर्समधून बँकिंग करण्याची माझी इच्छा आहे. मी ‘लेण्ड अ हॅण्ड इंडिया’तर्फे होणारा मल्टीस्किल- रिटेल या कोर्समध्ये रिटेल हा व्यवसायाचा कोर्स करत आहे. यात चार लेव्हल पूर्ण केल्या आहेत. मला अजून खूप शिकावे अशी इच्छा आहे.’’

मेहराजच्या आजच्या यशात तिच्या जिद्दीचा मोठा वाटा आहे. या जिद्दीच्या जोरावर ती अजून पुष्कळ पुढे जाईल. सगळीच मुले अशी नसतात. आमच्याकडे येणाऱ्या मुलांत शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांचे प्रमाण तुलनेत कमीच. मधेच शाळा सोडणारी, शिक्षण अर्धवट राहिलेली मुलेच जास्त, त्यातल्या काही जणांना तर वर्गात शिकलेली मुळाक्षरेही लक्षात राहणार नाहीत. तरीही या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे. कारण यातली कुठली मुले वाटेतच गळतील आणि कुठली शेवटपर्यंत टिकतील हे आपल्याला माहीत नसते.

या शिवाय दुसराही एक विचार असा की, शिक्षण किंवा कुटुंबातील घटकांनी शिक्षित असणे ही एक परंपरा असते. आई-वडील शिकलेले असतील तर मुले शिकणार. त्यांना शाळेत घालावे किंवा नाही असा प्रश्नच तेथे उद्भवत नाही. ते मूल शाळेत जाणारच हे गृहीतच असते. पण जी मुले अशा कुटुंबात जन्मत नाहीत त्यांच्याबाबतीत ही क्रिया अशी आपोआप घडत नाही. त्यासाठी आई-वडिलांनी निर्णय घेण्याचा एक टप्पा त्यांना पार करावा लागतो. अनुभव असे सांगतो की घरात एकदा शिक्षण शिरले की, ते तेथे चिकटून बसते. एवढेच नाही तर एखाद्या वृक्षासारखे तेथे ते वाढत जाते. आपल्या स्वतच्याच घरात डोकावून बघितले तर आपल्याला या म्हणण्याची प्रचीती येते.

शिक्षणाचे बीज एकदा पडले की, साधारण तीन पिढय़ांमधे त्याचा वृक्ष बनतो. हे बीज या कुटुंबामध्ये टाकावे म्हणून अशा प्रयत्नांची सुरुवात करणे गरजेचे. मग त्याचे फळ लगेच न का दिसेना.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com