कडूलिंब किंवा निंबाला आपल्या आयुर्वेदात कल्पवृक्ष मानले गेले आहे. त्या झाडांच्या पंचघटकांचे (पान, फुलं, फळ, सालं, मुळ्या) मानवी आरोग्यास खूप फायदे आहेत. तसेच त्याचे शेतीला उपयोगी होईल असेही फायदे आहेत. बाजारात निंबोळीची पेंड १६ ते २० रुपया किलो प्रमाणे मिळते. ही पेंड कोरडय़ा स्वरूपात असते. त्यातून झाडांना नत्र मिळते. हे खत हे झाडाला सावकाश मिळत असल्यामुळे झाडांच्या हळूवार पण खात्रीच्या वाढीस पूरक ठरते. ही खते बरेचदा माती मिश्रित असतात. ती पारखून वापरावीत. शुद्ध निंबपेड ही तेलकट असते. तिला उग्र कडू वास असतो. ती वाळवून झाडांना आठवडय़ातून एकदा चमचाभर दिली तरी उत्तम. निंबोळी खत व निंबोळी पेंड या दोन्हीत फरक आहे. निंबोळी खतात बरेचदा माती, युरिया मिसळलेला असतो. तसेच बाजारात कंरजपेंड, शेंगदाणा पेंड, खोबरे पेंड मिळते. िनबोळी पेंडीसोबत मिश्रण तयार करून झाडांसाठी वापरता येते. बरेचदा दुभत्या जनावरांना खाण्यासाठी विविध पेंडी मिळतात. पण ती त्यांच्या खाण्यायोग्य नसेल तरच वरील पेंडी निंबोळी पेंडीसोबत सम प्रमाणात एकत्र करून त्याचा वापर करावा. लाकडांची, गोवऱ्याची राख ही सुद्धा झाडांना उपयुक्त असते. ती आठवडय़ातून एकदा या प्रमाणे चमचाभर झाडांना द्यावी. तत्पूर्वी ही राख चाळणीने बारीक चाळून घ्यावी. चाळलेली ही राख दीर्घकाळ साठवता येते. आपल्या घरात दररोजच चहा तयार होतो. हा चहा गाळल्यानंतर उरणारी भुकटी वाळवून घ्यावी. वाळलेल्या चहाची भुकटी झाडाला आठवडय़ातून एकदा चमचाभर द्यावी. चहाची वाळलेली भुकटी ही गुलाबांच्या झाडांना फार उपयुक्त असते. त्यामुळे गुलाबांच्या रोपांची वाढ चांगली होते. साखर युक्त चहाचा चोथा पाण्यात मिसळून ते पाणी गाळून घेऊन आपण झाडांना वापरु शकतो. उरलेला चोथा वेगळा वापरता येतो. अशा द्रावणाला अथवा वाळलेल्या भुकटीस नंतर मुंग्या लागत नाही. -संदीप चव्हाण - sandeepkchavan79@gmail.com