womanyaअर्ध जग व्यापून राहिलेल्या स्त्री जगतात सतत काही तरी घडत असतंच. कधी ती बातमीचा विषय असते तर कधी ती बातमी घडवते. अशाच या काही परदेशातल्या घटना. जरा हटके अंदाजात.
आपल्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप ठेवला म्हणून टीव्हीवर ढसाढसा रडणारा कपिलदेव  किंवा सिनेमात आपल्या प्रेयसीचं लग्न होताना पाहून ओक्साबोक्सी रडणारा शाहरुख खान.. ही काही खरी-खोटी उदाहरणं..पुरुष रडतात त्याची. अन्यथा पुरुष म्हणजे भावनांवर ताबा मिळवलेला. रडणं थोपवून धरणारा, अशीच त्याची प्रतिमा आजपर्यंत रंगवली गेली आहे.
यस्स.. ती रंगवलीच गेलेली आहे. कारण पुरुषांचा स्वत:वर, भावनांवर ताबा आहे. ते कठोर होऊ शकतात वगरे वगरे यात त्याचं असं काही फार कर्तृत्व नाही बरे. पुरुष फारसे रडत नाहीत आणि बायका रडतात याचं कारण दडलंय ते अनेक वर्षे चालत आलेल्या सामाजिक संस्कारामध्ये आणि स्त्री-पुरुषांच्या शरीररचनेमध्ये.
बाई रडते, कारण तिने रडलेलं समाजाला चालतं. किंबहुना ती रडली नाही तरच कठोर ह्रदयी ठरते. पण पुरुष रडला तर मात्र त्याच्या आईलाही चालत नाही.  सगळीच मुलं लहान असताना अगदी धाय मोकलून रडतात. पण एकदा का मुलगे मोठे व्हायला लागले की रडणं हे बाईपणाचं लक्षण आहे यावर शिक्कामोर्तब होतं. आपण टिपं गाळायची नाहीत, याची नोंद पुरुषाच्या मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये कायमची बंदिस्त होते. उद्या समजा नाटक असो वा सिनेमा या माध्यमांनीच पुरुषांना सतत रडताना दाखवलं. भावनाविवश, भावविभोर, भावव्याकूळ वगरे वगरे वगरे होताना दाखवलं तर.. चालणार आहे? नाहीच. तशी मानसिकताच नाही आपली. आणि या उलट स्त्रिया. आपण हळवं असलंच पाहिजे. ते म्हणजेच स्त्रीत्व हेच मानत आल्या आहेत. आणि तेच खरं मानत आल्या आहेत..
नुकताच ३७ देशांतल्या ५००० स्त्री-पुरुषांशी बोलून एक अभ्यास केला गेला. त्यात असं म्हटलंय की स्त्री वर्षांतून सुमारे ३० ते ६४ वेळा रडू शकते. तिचं हे रडू सलग सहा मिनिटं ते अगदी तासभर किंवा त्यापेक्षाही जास्त टिकू शकतं.पण पुरुष मात्र वर्षांतून फक्त ६ ते १७ वेळा रडतो आणि तेही फक्त दोन ते तीन मिनिटंच सलग. ढसाढसा रडणं वगरे फारच कमी पुरुषांत आढळतं.
अर्थात स्त्री-पुरुषाच्या शरीररचनेचाही यात भाग असल्याचं ह्य़ूमन जेनेटिक्सचे अभ्यासक सांगतात. स्त्रियांच्या अश्रुवाहिन्या वा अश्रुिपड एकदम उथळ असतात. त्यामुळे त्या भावनिक झाल्या की पटकन अश्रू जमा होतात आणि बघता बघता गालावर ओघळतात. पुरुषांच्या अश्रुवाहिन्या मोठय़ा असतात. त्यामुळे अश्रू थोपवणे त्यांना सहजशक्य होतं. याशिवाय पुरुषांमधले टेस्टोस्टेरॉन त्यांना रडण्यावर ताबा मिळवण्यासाठी कारण ठरतात, तर स्त्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात असलेलं प्रोलॅक्टिन तिला अधिक भावनाप्रधान बनवतं.
  थोडक्यात काय, पुरुषांच्या तुलनेत बाई जास्त रडते हे सत्य आहे, पण त्यामागे आहे इतकाऽऽऽ मोठा अभ्यास, पण बाई पुरुषाला रडवते, ते का? हा मात्र ज्याचा त्याचा अभ्यास आहे.      
                                                  

स्मार्ट होता होता..
ch10बायानों, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या प्रेमात पडला आहात का? त्याच्याशिवाय एक क्षणही घालवणं तुम्हाला अशक्य झालंय? तुमची सकाळ ‘प्रभाते स्मार्टफोन दर्शनम्’नेच सुरू होतेय आणि रात्री डोळे मिटू मिटू होताहेत तरी तुम्हाला फोन खाली ठेववत नाहीए? दिवसभर टेक्स्टिंग वा एसएमएसवर गप्पा, सुख-दु:खांची देवाणघेवाण वाढलीय? फेसबुकची दिवसातून एकदा तरी वारी घडावीच लागतेय? फोटो डाऊनलोड करणं अपलोड करणं, वाटलंच तर ट्विट करणं, इंटरनेटची सर करणं, यूटय़ूबवर व्हिडीयोज् बघणं हा दिनक्रम झालाय? आणि सर्वात महत्त्वाचं, ऑनलाइन खरेदीच्या विलक्षण जगात तुम्ही पार हरखून गेला आहात?  हंहंहंहं.. अशा तुम्ही एकटय़ा नाहीत. जगातल्या असंख्य जणी तुमच्याबरोबर आहेत. पण.. भानावर या. कारण तुम्हाला स्मार्टफोनचं नुसतं वेड लागलेलं नाही तर व्यसन लागलेलं आहे आणि या बाबतीत आपण पुरुषांनाही मागे टाकलेलं आहे..
बाई म्हणून आपण कुठल्याही गॅझेट्सची इतकी हातमिळवणी कधीच केली नव्हती. तंत्रज्ञानापासून चार हात लांबच असायचो आपण.. पण स्मार्टफोन हाती आला नि आपणही स्मार्ट झालो..  
जगभरात यावर सतत अभ्यास, संशोधन, सर्वेक्षण सुरूच असतात. त्यातल्या एकात कळलंय की दहापकी सहा जणींचा प्रवास अशा स्मार्टफोनच्या व्यसनाधीनतेकडे सुरू आहे. कॉलेजकन्यकांचे दिवसातले दहा दहा तास अक्षरं टाइप करण्यात जाताहेत, तर दहातल्या आठजणीचं म्हणणं आहे, ‘जहामें जाती हूं, वहा ले जाती हूॅं..’ पूर्वी ताण घालवण्याचा उत्तम उपाय महिलावर्गाकडे होता, तो म्हणजे शॉिपग. निदान मन थोडं रिलॅक्स व्हायचं, पण आता ती जागा घेतली आहे या स्मार्टफोननं. अस्वस्थता आली  की ऑनलाइन व्हायचं, दुसऱ्याच जगात स्वत:ला हरखून टाकायचं की झालं. पण..  
 पण..स्मार्टफोनचं जगही तसं गुंतागुंतीचंच आहे की. बाहेरच्या माणसांशी अहोरात्र चॅटिंग करणारी माणसं घरातल्या माणसाच्या नजरेला नजर देऊन बोलतही नाहीत, नात्यातला तणाव वाढतो आहे. ऑनलाइन व्यवहारांमुळे वेळ वाचतो, असं म्हणणारी हीच बाई सतत ऑनलाइन असल्याने ‘वेळच नाही’चं रडगाणं गातेय. नोकरी आणि घर यांच्यातला बॅलन्स स्मार्टफोनमुळे छान साधला जातो म्हणणारी तीच कामांचं व्यवस्थापन ढासळल्यानं मानसिक बॅलन्स हरवू पाहते आहे. म्हणजे खूप आनंद देणारा हा स्मार्टफोन ताणाचंही कारण बनतो आहे. म्हणजे आपल्या हातातलं हे अस्त्र आपल्यावरच उलटायच्या आत त्यावर ताबा मिळवायला हवाय बरं..
 तरी बरं, अहोरात्र िपगा घालणारे ‘वॉटस् अ‍ॅप’चे निष्कर्ष फारसे बाहेर आलेले नाहीत. ते काढल्यावर हलाहल बाहेर येईल की अमृत हे समजण्याइतके ‘स्मार्ट’ आपण नक्कीच आहोत.                 

Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

उघडय़ा पुन्हा जहाल्या, जखमा ..
खरं तर बाई म्हणून अद्याप आपल्याला याची सवय व्हायलाच हवी होती. पुरुषांकडून मार खाण्याचा आपण अजून बाऊ कसा काय करू शकतो? कोडगं होणं आपल्या रक्तामांसात खरं तर पूर्णत: भिनून जायला हवं होतं..कसं काय अजून आपण त्याच्या विरोधात आवाज वगरे उठवतो? कोर्टाबिर्टात जातो?..न्यायाची अपेक्षा करतो? ते तर फार आधीच मागे ठेवायला हवं होतं..याचं कारण? .. याचं कारण म्हणजे बाईवर होणारे शारीरिक अत्याचार हे काही आजचे नाहीत..त्याची मुळं थेट पोहोचतात अश्मयुगात. आपल्या आदिम संस्कृतीत.
 त्याचे काही पुरावे सापडले आहेत स्वीडन आणि डेन्मार्क या युरोपीय देशातल्या मातीत. नुकत्याच तिथे ४७८ मानवी कवटय़ा सापडल्या. ६००० ते ३००० वर्षांदरम्यानच्या. त्यातल्या स्त्रियांच्या कवटय़ांवर या मारहाणीच्या खुणा सापडल्या आहेत. या कवटय़ा युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्या नाहीत; तर त्या आहेत, सामान्य शेतकरी किंवा मेंढपाळाच्या. बाईला तिच्या मातृत्वाच्या जबाबदारीमुळे युद्धात सहभागी करत नसतच. त्यामुळे या कवटय़ा आहेत घरातल्या बाईच्या. आणि कौटुिंबक हिंसाचार वा ही मारहाण एक आम बात असावी, असा संशोधकांचा कयास आहे. कारण दर सहामधल्या एका बाईवर प्राणघातक हल्ल्याच्या खुणा सापडल्या आहेत, ज्या जखमा कधीच भरून आलेल्या नाहीत. अजून अभ्यास सुरू असल्याने या मारहाणीमागची कारणं फारशी उघड झालेली नाहीत.. पण ती कारणं कशाला उघड व्हायला हवीत? आम्ही सांगतो ना, इतक्या वर्षांच्या अखंड मार खाण्यातून इतकं समजू शकतंच आम्हाला की बाईला मारझोड करण्यासाठी काही सबळ कारण असावं लागतंच असं  नाही..
१. (संदर्भ- हॉलंडचे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. विन्गरहोएटस यांचं सर्वेक्षण, ह्य़ूमन जेनेटिक्सचे अभ्यासक डॉ. रिचर पोस्ट, ‘गर्ल टॉक’ मासिकाच्या संपादक आशा, शिकागो येथील प्राध्यापक डॉ. जाफ्री गुडफेलो यांचे संशोधन)
२. (संदर्भ- नेल्सन सव्‍‌र्हे, टाइम इंक आणि न्युअन्स डिजिटल मार्केटिंग यांचा संयुक्त अभ्यास, बेलोर युनिव्हर्सिटीचे मार्केटिंगचे प्राध्यापक डॉ. जेम्स रॉबर्ट यांचा सव्‍‌र्हे)
३. (संदर्भ- जर्नल ऑफ फिजिकल आन्त्रपॉलॉजी यात प्रसिद्ध झालेलं आणि स्कॉटलंड येथील एडिनबर्ग विद्यापीठातील मानवंशशास्त्रज्ञ िलडा फिबिगर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं संशोधन )
आरती कदम -arati.kadam@expressindia.com