अंधश्रद्धेच्या विरोधात लढणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि त्यांनी मांडलेले विचार समाजात रुजवणं किती गरजेचं आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ हा त्यांनी अनेकदा मांडलेला विषय होता. स्त्रिया त्यांच्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीमुळे अंधश्रद्धांना जास्त सहजपणे बळी पडतात; एवढंच नव्हे तर अंधश्रद्धेचे त्यांच्यावर झालेले संस्कार त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवतात, म्हणूनच स्त्रियांचं प्रबोधन हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातील मोठा हिस्सा होता. त्याच प्रबोधनाची गरज व्यक्त करणारा सुमन ओक यांचा लेख….
सोमवारी सकाळी फोन वाजला. डॉ. दाभोलकरांचा आश्वासक आवाज ऐकू आला, ‘सुमनताई आपल्याला असं करायला पाहिजे की..’ आणि अखेरीस, ‘मी आज मुंबईला जातो आहे. डॉ शरद जहागीरदारांना (दिवंगत जस्टिस जहागीरदार यांच्या सुविद्य पत्नी) भेटणार आहे. त्यांच्यासाठी आपल्या पुस्तकाच्या (माझं ‘विवेकवादाची वाटचाल आणि अंनिसचे योगदान’ हे पुस्तक जस्टिस जहागीरदार यांना अर्पण केलेले आहे.) किती प्रती घेऊन जाऊ?’ इतक्या लहानसहान बाबतीत स्वत दखल घ्यायची आणि त्यासाठी त्या विषयाशी संबंधित असलेल्या एखाद्या सामान्य व्यक्तीचाही सल्ला घ्यायचा ही
डॉ. दाभोलकरांची नेहमीचीच सवय. प्रत्येकाला आपण किती उपयोगी आहोत ह्याची जाणीव करून देणं हा त्यामागचा हेतू असावा.
दुसऱ्या दिवशी, मंगळवारी सकाळी डॉ. शरद जहागीरदारांचा फोन, ‘अहो तुम्ही ऐकलंत का? काय भयंकर बातमी हो! कालच संध्याकाळी आम्ही जवळजवळ पाऊण तास गप्पा मारत होतो..’ ताबडतोब टीव्ही लावला आणि ते सुन्न करणारे वृत्त आणि दृश्य ऐकू-दिसू लागली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीशी निगडित असलेल्या आम्हा लाखो लोकांचे प्रेमळ मित्र, आमच्याबरोबर चालणारे मार्गदर्शक, आणि कोणताही मुद्दा स्पष्टपणे सोप्या भाषेत मांडणारे तत्त्वज्ञ डॉ. दाभोलकर यांना प्रतिगामी शक्तींनी गोळ्या घालून त्यांची आणि आमची कायमची ताटातूट केली. क्षणभर सगळं संपलंय असं वाटलं..
‘तिमिरातून तेजाकडे : समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे’ या त्यांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती एप्रिल २०१० ला प्रकाशित झाली. त्यातील एका प्रकरणात ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय त्यांनी सविस्तर मांडला आहे. हा विषय डॉक्टरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. कारण स्त्रिया त्यांच्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीमुळे, गुदमरून टाकणाऱ्या वातावरणामुळे अंधश्रद्धांना जास्त सहजपणे बळी पडतात; एवढंच नव्हे तर अंधश्रद्धेचे त्यांच्यावर झालेले संस्कार त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवतात; कित्येक वेळा त्या पार पाडीत असलेल्या पूजाअर्चा, कर्मकांडे निर्थक आहेत, वेळ-पसा-मेहनत यांचा अपव्यय त्यामध्ये होतो, हे पटूनसुद्धा त्यांना यातून बाहेर पडता येत नाही. स्त्रियांचं प्रबोधन हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातील मोठा हिस्सा होता.     
माणसाला आपली बुद्धी गहाण ठेवायला उद्युक्त करणं हा अंधश्रद्धेचा खरा धोका आहे. त्यातून शोषण करणाऱ्यांना रान मोकळं सापडतं आणि स्त्रियांच्या बाबतीत तर स्वतची बुद्धी वापरणं हा जणू गुन्हाच मानला जात असल्याने त्यांचं शोषण फारच सुलभ असतं. परंपरागत धार्मिक-सांस्कृतिक संस्कारातून, व्रतवैकल्य आणि कर्मकांड मोठय़ा असोशीने पाळणं म्हणजे आपली महान संस्कृती जपणं हे जसं केवळ स्त्रियांचंच कर्तव्य मानलं जातं तसंच त्यामागच्या भाकड कथा खऱ्या मानून त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचविणं हेही स्त्रियांचं कर्तव्यच आहे असं स्त्रियाही मानतात. कुटुंब, समाज, धर्म या सर्वच बाबतीत स्त्रीला दुय्यम स्थान असतं. कुठल्याही बाबतीत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिला नसतं. स्वतच्या मुलीचं कन्यादान करण्याचा हक्कही स्त्रीला नसतो. लग्न होणं आणि मुलगा जन्माला घालणं हे तर स्त्रीसाठी सर्वस्व असतं. म्हणूनच स्त्री ही कुमारी असते, प्रौढ कुमारिका, सौभाग्यकांक्षिणी आणि सौभाग्यवती असते. तशी नसेल तर ती घटस्फोटिता, परित्यक्ता किंवा विधवा अशी कोणीतरी असते. म्हणजे पुरुषाच्या संदर्भाव्यतिरिक्त तिचे अस्तित्वच असू शकत नाही. लग्न करणं स्त्रीला अनिवार्य असतं.
पुरुष मात्र लग्न करतो ते बऱ्याचदा त्याच्या आईवडिलांच्या आग्रहासाठी, हट्टासाठी, घराण्याला वारस हवा म्हणून किंवा खानदानाच्या इभ्रतीसाठी. स्वतसाठी नाही असे दाखविण्याचा प्रघात काही वषापूर्वी मध्यमवर्गीय पांढरपेशांमधेही होता. साहजिक आहे. मला लग्नच करायचं नव्हतं तरी मी तुला पत्करलं, आणि तुझ्यावर उपकार केलेत असं बायकोला दाखवता येतं. विवाहबाह्य संबंधाचे धोके त्याला सहन करायचे नसतात. असा उपकार म्हणून लग्न करणारा नवरा, दुसऱ्याच्या मुलीला आपलं मानण्याइतकं मोठं मन नसलेले, सुनेवर सत्ता गाजवणारे सासू-सासरे अशा कौटुंबिक वातावरणात स्त्रीची फार घुसमट होत असते. त्यामध्ये मूल न होणं किंवा मुलीचं होणं हा जर ‘गुन्हा’ तिच्या हातून घडत असेल तर तिच्या दुर्दैवाला पारावार नसतो.
स्त्रियांच्या अशा अवहेलनेला सर्वच धर्म जबाबदार आहेत. ख्रिश्चन धर्मानुसार अ‍ॅडम या पुरुषाच्या बरगडीतून देवाने स्त्री जन्माला घातली. कशासाठी? अ‍ॅडमच्या करमणुकीसाठी आणि या ईव्ह नामक स्त्रीने काय उद्योग केला तर ‘ज्ञानाचे’ फळ पुरुषाला चाखायला लावले. या ‘प्रथम’ पापाचं फळ  साऱ्या मानवजातीला युगानुयुगे भोगावे लागत आहे. इतर धर्माना स्त्रीच्या जन्माची अशी अफलातून कल्पना सुचली नाही, पण स्त्रीचं गौणत्व आणि पुरुषाचा तिच्यावरील अधिकार मात्र सर्व धर्मानी ठासून प्रतिपादन केलेला आहे. ज्यू धर्माने पत्नीच्या हातून भाकरी करपली तर तिला सोडचिठ्ठी पतीने द्यावी अशी सोय करून दिलेली आहे. मुस्लिम धर्माने सामान्य पुरुषास चार बायका करण्याचा, बायकोला तोंडी तलाक देण्याचा आणि हैद्राबादच्या निझामासारख्यांना जनाना बाळगून शेकडो स्त्रियांना कोंडवाडय़ात ठेवण्याचा अधिकार दिला आहे. दिगंबर जैनांमध्ये स्त्रीला मोक्षाचा अधिकार नाही. गौतम बुद्धांना स्त्रियांना प्रवेश दिल्यामुळे त्यांच्या चिरकाल धर्माचे आयुष्य खाडकन ५०० वर्षांवर आल्याचे जाणवले. िहदू धर्मीय आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये गार्गी-मत्रेयींसारख्या ज्ञानी स्त्रिया होऊन गेल्याचे मोठय़ा अभिमानाने सांगतात. प्रत्यक्षात स्त्रियांना धर्माने ज्ञानापासून पुरातन काळापासून वंचित ठेवले आहे. वेदाध्ययनाचा अधिकार त्यांना नाही आणि तुलनेत अलीकडचा म्हणता येईल अशा काळांत तुलसीदासांनी स्त्रियांना पशू आणि ढोल यांच्याबरोबर ‘ताडनके अधिकारी’ म्हटले आहे. आपल्या रामदासांनीसुद्धा दासबोधामध्ये स्त्रियांना नाना दूषणे लावली आहेत. आजही आपल्या पत्नीचा सल्ला घेणाऱ्या किंवा तिची विचारपूस करणाऱ्या पुरुषाला बायकोचा गुलाम म्हटलं जातं. स्त्रीला गौण मानणाऱ्या या धार्मिक वृत्तीच्या पगडय़ामुळे स्त्रिया सारासारविचारही करू शकत नाहीत. एकीकडे अहेवपणी मरण यावं म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेल्या नवऱ्याआधी आपण मरावं म्हणून मंगळागौर पुजायची आणि दुसरीकडे हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून वडाची पूजा करायची. नवऱ्याच्या आधी मरण पावणाऱ्या स्त्रीचा पुढचा जन्म नवऱ्याच्या आधीच होणार; मग नंतर जन्माला आल्याने वयाने लहान असलेल्या पुरुषाशी लग्न कसे होईल हा विरोधाभाससुद्धा आमच्या स्त्रियांना जाणवत नाही. इतकं त्यांना धार्मिक व्रतवैकल्यांनी निर्बुद्ध करून टाकलं आहे.
स्त्रियांचे आजचे सामाजिक वास्तवही यापेक्षा काही वेगळे नाही. अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत असल्या तरी आपल्या देशात ही शिक्षणाची आणि त्याद्वारे प्रगती करण्याची संधी पांढरपेशा आणि त्यातही श्रीमंत असलेल्या वर्गापुरतीच मर्यादित आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असलेल्या स्त्रीचा नवरा सरपंचाच्या खुर्चीवर बसतो आणि त्याची सरपंच असलेली बायको त्याच्या पायाजवळ बसते हे दृश्य अजूनही पाहायला मिळेल. दारू पिण्यासाठी स्त्रीची कमाई तिच्याकडून हिसकावून घ्यायचा तर पुरुषांना जन्मसिद्ध हक्कच मिळालेला असतो. सुशिक्षित स्त्रियाही आपला पगार नवऱ्याच्या अगर त्याच्या आईच्या हातात देतात आणि त्याचा विनियोग करण्याचा हक्क सोडून देतात. स्त्रिया म्हणजे केवळ भोगवस्तू आहे असं तर कित्येक पुरुष मानतात. मग ती स्त्री स्वतची बायको असो वा इतर कोणाची; अल्पवयीन मुली, दोनतीन वर्षांच्या मुली आणि प्रौढ स्त्रीवरसुद्धा बलात्कार करणं, सामूहिक बलात्कार करणं यांत काही अपराध आहे असं वाटतच नाही कित्येकांना. यातून स्त्रियांचं समाजात वावरणंच अशक्य होऊ लागलं आहे. स्त्रीने शिकावं की नाही; किती आणि काय शिकावं; कोणते कपडे घालावेत ; कोणत्या जागी जावं हे सगळं पुरुषांच्या संमतीनेच व्हायला हवं का?  हे वास्तव असताना आपण मात्र आमच्या एका मोठय़ा राजकीय पक्षाच्या अध्यक्षा, लोकसभेच्या सभापती, माजी राष्ट्राध्यक्ष स्त्रियाच आहेत असा गार्गी-मत्रेयींचा वारसा सांगत आपली पाठ थोपटून घेत असतो.
आजकाल काही राजकीय पक्षांच्या ‘स्पोक्सपर्सन’ म्हणून स्त्रिया टीव्ही चॅनलवर आपल्या पक्षाची बाजू हिरिरीने मांडताना दिसतात. पण लोकसभेमध्ये जनतेच्या प्रतिनिधी म्हणून जाण्याचं भाग्य फारच निवडक स्त्रियांना मिळतं. एखादी आदिवासी, भटक्या विमुक्त जमातीची स्त्री कधी निवडणूक लढवू शकत नाही. लोकसभेमधे स्त्रियांचं प्रतिनिधित्व नगण्य आहे आणि स्त्रियांना आरक्षण देण्याबाबत पुरुषप्रधान राजकीय पक्ष कसा अडथळा आणताहेत हे गेली कित्येक वष्रे आपण पाहत आहोत.      
असा आहे स्त्रीच्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, शिक्षण-आहार-आरोग्य इत्यादी घटकांनी आणि प्रामुख्याने धर्माने घडवलेल्या आयुष्याचा भौतिक पाया. स्त्रियांच्या धार्मिकतेला आणि स्वतचे सामाजिक-आíथक गौण स्थान स्वीकारण्याला रोज घालण्यात येणारा मालिकांचा रतीब, जाहिरातींचा धुडगूस आणि आध्यात्मिक प्रवचनांचा वर्षांव खतपाणी घालीत आहेत. स्वतच्या कुटुंबाच्या सर्व चालीरीती, कर्मकांड त्यासाठी तारेवरची कसरत करीत व्यवस्थित पार पाडणं, इतरही प्रांतातील राखीबंधन, करवाचौथ यांसारख्या प्रथांना नवऱ्याच्या किंवा भाऊबहिणीच्या प्रेमाची प्रतीकं मानून तीही पार पाडणं हे आपलं कर्तव्य स्त्रिया मोठय़ा निष्ठेने पार पाडीत आहेत. त्यासोबतच आत्मा, पुनर्जन्म, भुतंखेतं, परग्रहवासी यांच्याही चित्तथरारक गोष्टींच्या मालिका लोकांच्या मनामध्ये भ्रम पदा करीत आहेत. तऱ्हेतऱ्हेच्या  जाहिराती सुंदर दिसणं आणि नवऱ्यासाठी संडास नव्यासारखा चकचकीत ठेवणं हे स्त्रीला किती भूषणावह असतं हे शिकवीत आहेत.
अशा साऱ्या वातावरणामध्ये मध्यम वर्गातील अशिक्षित वा सुशिक्षित, अर्थार्जन करणाऱ्यासुद्धा शहरातील स्त्रियांना आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपल्याला मेंदू आणि मनही आहे, आपल्यामध्ये अनेक क्षमता आहेत, कौशल्य आहेत, त्यांची जोपासना करणं आणि समाजासाठी त्यांचा उपयोग करणं हे आपलं कर्तव्य आहे याचं भानच उरत नाही असं वाटतं. खेडय़ातील अशिक्षित स्त्रिया अतोनात काबाडकष्ट करून, स्वतची सर्व प्रकारे आबाळ करून, नवरा दारुडा असला तरीही त्याला काही समज न देता त्याची सेवा करीत राहतात. बाजारू धार्मिकतेच्या, ढोंगी अध्यात्माच्या, दैव-प्राक्तन, संस्कृती जपण्याची जबाबदारी आदी अवास्तव समजुतींच्या बेडय़ांनी आपण जखडले गेलो आहोत हे त्यांना जाणवतच नाही. या बेडय़ांना त्या फुलाचे हार समजतात.
आपल्या विपरीत परिस्थितीचे, आपल्या ‘प्राक्तनाचे’ कारण ह्या बेडय़ा आहेत हे न समजल्याने, त्या हताश होतात आणि त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं. त्यांतून अंगात येणं, भूतबाधा आणि त्यावर उपाय म्हणून गंडेदोरे, भगत-बाबा-बुवा-माताजी यांना शरण जाणं असले भ्रामक आणि अघोरी उपाय सुरू होतात. हे बाबाबुवा-तांत्रिकमांत्रिक हेही बाजारू धर्ममरतडांच्या जातकुळीचेच असतात. स्त्रियांच्या बेडय़ांना दूर होऊ देणे त्यांच्या हिताचे नसते. भाबडय़ा लोकांच्या जमिनी, घरे हडपणे, त्यांना कर्जबाजारी करून त्यांच्या काबाडकष्टातून पसे गोळा करणे आणि एकंदरच शोषणव्यवस्थेला तडा जाऊ न देणे यातच त्यांचे हितसंबंध असतात. निर्थक कर्मकांड, सण-उत्सव यांचं प्रस्थ वाढवणाऱ्या सेलिब्रिटीज, गरज नसलेली उत्पादने लोकांच्या गळी उतरविणारे जाहिरातबाज आणि अध्यात्माचे रतीब घालणारे बाजारू धर्ममरतड हे सारे बाबा-बुवा, तांत्रिक-मांत्रिक, भगत वगरेंच्याच शोषणकर्त्यां जातकुळीचे असतात.
स्त्रियांना (आणि सर्वच वंचितांना) शिक्षण दिलं, त्यांना जागृत केलं, माणूस म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे याची त्यांना जाणीव करून दिली आणि त्यांच्यात आत्मभान निर्माण झालं तर या लोकांचं भवितव्य धोक्यात येईल. याच भीतीपोटी डॉ. दाभोलकर या शांतताप्रिय, संयमी परंतु विचार-उच्चार-आचार स्वच्छपणे मांडणाऱ्या, निर्भीडपणे लढणाऱ्या संघटकाची हत्या करण्यात आली. पण त्यांच्या सुस्पष्ट विचारांचा, त्यांनी अवलंबिलेल्या नतिकतेचा, त्यांनी बांधलेल्या शिस्तबद्ध स्वयंसेवकांच्या संघटनेचा आणि त्या स्वयंसेवकांना शिकविलेल्या संयमाचा, चिकाटीचा, लोकशाहीचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पराभव होणे केवळ अशक्य. एक प्रगत, विज्ञाननिष्ठ, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये जपणारा, धर्माची चिकित्सा करणारा, स्त्री-पुरुष समानता आणणारा असा विवेकनिष्ठ आणि मानवतावादी समाज बनवणं हे त्यांचं ध्येय होतं. ते साध्य करताना अनेक पिढय़ांना राबावं लागणार आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. हे ध्येय साध्य करायला त्यांनी अनंत सहकारी मिळवले आहेत. ते त्यांचे कार्य पुढे समर्थपणे नेतील याची सर्वांनाच खात्री आहे.
 पण आता फोनवर पाठीवर थाप मारल्याचा आनंद देणारा आवाज मात्र ऐकू येणार नाही. कधीच!

wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!