केतकी घाटे – ketaki@oikos.in

‘करोना’मुळे पर्यावरणशास्त्र (‘इकॉलॉजी’) आणि जैवविविधतेचं (बायोडायव्हर्सिटी) महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं आहे. करोनासारखे विषाणू प्राण्यांकडून माणसाकडे संक्रमित (‘झूनॉटिक’) होतात.  जगातले ६० टक्के  साथीचे रोग हे प्राण्यांकडून येतात. यातले ७२ टक्के  जंगली प्राण्यांकडून येतात. ‘सार्स’, ‘मर्स’, ‘इबोला’, ‘निपाह’, ‘झिका’, ‘एच.आय.व्ही.’ ही सगळी अशीच पिलावळ. साहजिक प्रश्न येतो, की हे सगळे जीव माणसाच्या आरोग्यासाठी कधी, कुठे, केव्हा, कसे आणि का घातक ठरतात. याची उत्तरं पर्यावरणशास्त्रात आणि उत्क्रांतीत मिळतात. म्हणूनच पर्यावरणाचं संवर्धन का करायचं याचीही कारणं त्या ओघात मिळतात.  जागतिकीकरणाच्या युगात संसर्ग होणं थांबवता येणं कठीण आहे. परंतु असे विषाणू तयार होऊ नयेत किंवा झाले तरी यातून टोकाचे संसर्ग होऊ नयेत, संसर्ग झाले तरी रोगाचं नियंत्रण करता यावं, अशा विविध पातळ्यांवर काम करता येणं शक्य आहे. काय करता येईल याविषयी..  यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

निसर्गाचं सुखावणारं सान्निध्य टाळेबंदीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनीच अनुभवलं. पण या सुखावणाऱ्या भावनेचा हात धरून आपण निसर्ग संवर्धनाच्या अजून काही पायऱ्या चढणार का? या सगळ्याच ‘करोना’ प्रकरणाचा एक धडा म्हणून विचार करून समाजातल्या सर्व घटकांसाठी, पुढच्या पिढय़ांसाठी, सुदृढ पर्यावरणाची सोय करणार का, हे खरे प्रश्न आहेत आणि आता त्याचा नव्यानं विचार करायला हवा.

निसर्गात सर्व सजीवांना एक किंवा अधिक नैसर्गिक शत्रू आहेत किंवा काही जण स्वत: सर्वोच्च भक्षक आहेत. ही सगळी व्यवस्था कोणी एक वरचढ होऊ नये या तऱ्हेनं उत्क्रांत झालेली आहे. माणूस स्वत:ला ‘होमो सेपियन सेपियन’ (माणसाचं शास्त्रीय नाव- ज्याचा अर्थ हुशार – म्हणजेच जाणिवेची जाणीव असणारा सजीव असा होतो) म्हणवून घेत या अनेक सर्वोच्च भक्षकांसहित सर्व नैसर्गिक परिसंस्थांवर स्वार झाला. इतर भक्षक हे नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून त्या स्थानावर पोहोचले आहेत. माणूस हा पृथ्वीच्या आयुष्यातील एकमेव अपवाद आहे, जो तंत्रज्ञानाच्या आधारे या स्थानावर पोहोचला आहे. आणि आपण खरोखर सर्वोच्च भक्षक असल्याच्या थाटात या पृथ्वीवरची संसाधनं, निसर्ग, जैवविविधता हवी तशी वापरत आहोत. स्वत:ला तगवण्याच्या घाईत या वापराचा ‘वेग’ आणि ‘प्रमाण’ असं काही वाढलं आहे, की त्यातून जी द्रव्यं तयार झाली ती विषारी ठरली आणि ती हवामानबदलासारख्या रूपानं म्हणा किंवा स्थानिक पातळीवरच्या नदीप्रदूषणासारख्या गोष्टींमुळे म्हणा, पुन:श्च मानवजातीलाच घातक ठरत आहेत. रोग वाढले आहेत, सामाजिक, आर्थिक विषमता वाढते आहे, गुन्हेगारी वाढते आहे, मानसिक स्वास्थ्य चिंताजनक आहे. परंतु या सगळ्याचा आपल्यावर काहीएक परिणाम झाला नाही, तो या ‘करोना’नामक एका अतिसूक्ष्म विषाणूमुळे मात्र निश्चितच झाला आहे.  या निमित्तानं एक नवीन जाणीव तयार होते आहे, आपण अनेक प्राण्यांप्रमाणे एक प्राणी असल्याची आणि आपल्यावरही अंकुश ठेवणारा कोणी असू शकतो, हे समजून घेण्याची. अर्थात हे काही इतिहासात प्रथमच घडतं आहे असं नाही, परंतु जागतिकीकरणाच्या या टप्प्यावर ही जाणीव तीव्र झाली आहे. मुद्दा असा आहे, की या इशाऱ्याकडे आपण कसं बघणार, यातून काय शिकणार, भविष्याचं नियोजन कसं करणार, निसर्गातला एक प्राणी म्हणून असलेली आपली जबाबदारी आपण ओळखणार का? आपला कार्यभाग नक्की काय? अगदी स्वार्थीपणे स्वत:च्या जातीला तगवण्याचा जरी आपण विचार केला, तरी तो मार्ग शाश्वत आणि सर्वसमावेशक असण्याचे फायदे या निमित्तानं लक्षात घेणार का?

पर्यावरणातल्या बदलाचा आपण सगळेच ‘याचि देही याचि डोळा’ अनुभव घेत आहोत, विशेषत: शहरात. एरवी लाखो वाहनांचं प्रदूषण झेलणारी हवा वाहनांशिवाय स्वच्छ राहणारच. कारखाने बंद होऊन प्रदूषित पाणी नदीत न गेल्यानं नद्यांचे तळ दिसू लागले आहेत. हिमालयाच्या रांगा पार २०० किमी दूर अंतरावरून स्पष्ट दिसू लागल्या आहेत. हे गेल्या तीस वर्षांत प्रथमच घडत आहे. पक्षी, प्राणी शहरात, वस्तीजवळ पूर्वीदेखील होतेच. आता मात्र ते गर्दी नसल्यानं अधिक धीटपणे रस्त्यावर आणि वस्तीत हिंडू लागले आहेत. वन्यप्राणी जंगलांजवळील वस्त्यांमध्ये फिरू लागलेत. हे सगळे बदल बघायला माणसालाही उसंत आहे. त्यामुळे त्यांची हजेरी जाणवते आहे. निसर्गात बदल होत आहेत हे निश्चित. या सगळ्यामुळे सुरुवातीच्या दोन-तीन आठवडय़ांत निसर्गप्रेमींच्या दृष्टिकोनातून भरपूर सकारात्मक गोष्टींची चर्चा झाली. माणसाचा वेग मंदावला आणि निसर्गाला वाव मिळाला, इतके दिवस कोंडून ठेवलेला निसर्ग आता व्यक्त होतो आहे, वगैरे. हे असंच चालू राहावं अशी इच्छा शेकडो लोकांनी समाजमाध्यमांवर  भरभरून व्यक्त केली. पर्यावरण संवर्धनासाठी अर्थव्यवस्थेत योग्य धोरणं अंगीकारली जातील, अशी शक्यताही अनेकांनी व्यक्त केली. अमेरिकेत काही अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि सरकारी मंडळींनी मिळून एक ‘ग्रीन स्टिम्यूलस प्लॅन’ बनवला आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यावर विचार करत आहेत.

हे एकीकडे चालू असताना याच्याविरुद्ध काही बातम्या येऊ लागल्या आहेत. अमेरिकेनं नवीन वाहनांसाठी इंधन कार्यक्षमतेची मर्यादा कमी केली आहे. यामुळे अधिक इंधन जाळलं जाऊन कार्बन उत्सर्जन वाढणार हे नक्की. बरोबरीनं काही राज्यांत हवाप्रदूषणाची मर्यादादेखील कमी करण्यात आली आहे. यावर अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष बराक ओबामा यांनी काही संस्थांच्या मदतीनं आक्षेप घेतला आहे. हे कमी होतं की काय म्हणून अमेरिकेत कंपन्यांना पर्यावरण अहवाल सादरीकरण करण्यात शिथिलता दिली आहे. अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवून भारतात देखील ‘ईआयए’करता (‘एनव्हायर्नमेंटल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट’- पर्यावरणावरील परिणामांचं मूल्यांकन) नवीन अटी शिथिल करणारी नियमावली बनवली आहे. चीननं यावर कडी केली आहे. त्यांच्या मंत्रालयानं पर्यावरणविषयक सर्वच मर्यादा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. ब्राझीलनं अमेझॉनमधील पर्यावरणीय देखरेख करणाऱ्या व्यवस्थेत कपात केली आहे. इतरही अनेक देशांत देखरेख कमी झाली आहे, त्यामुळे शिकारी वाढल्या आहेत, असं ऐकिवात येतं. पर्यावरणविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांच्या देणग्या बंद झाल्यानं कर्मचारी काम करू शकत नाहीयेत. करोनाच्या पाश्र्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी ‘वापरा आणि फेका’ प्रकारच्या वस्तूंचं प्रमाण आणि वापर अनेक पटींनी वाढला आहे आणि तेवढय़ाच प्रमाणात रसायनांचा वापर आणि धोकादायक कचरादेखील. तर हे झालं निसर्गसंवर्धनाच्या बाबतीत घडणारं विरुद्ध टोक. अर्थव्यवस्था बंद पडून बेरोजगारी वाढली तर ती सुरू व्हावी याकरता सर्वच राष्ट्रं निसर्गाकडे दुर्लक्ष करून प्रयत्न करणार हे इतिहासावरून स्पष्ट आहेच आणि वर्तमानकाळात देखील हे दिसतं आहे. एकमेव आशा आहे ती म्हणजे सामान्य माणसानं योग्य पावलं उचलली तर ‘समाजाची एकत्रित निवड’ दिशादर्शक ठरू शकेल.  या सर्व करोना प्रकरणातून समाजाच्या निसर्गविषयक जाणिवा प्रगल्भ होत आहेत अशी आशा वाटते. गेल्या एक दोन वर्षांतील अनियमित आणि अतिपावसाच्या आणि पुरांच्या घटनांमुळे देखील विचारांना चालना मिळाली आहे. ती सकारात्मक कृतीत परिवर्तित व्हावी ही सदिच्छा!

करोनामुळे पर्यावरणशास्त्र (‘इकॉलॉजी’) आणि जैवविविधतेचं (बायोडायव्हर्सिटी) महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं आहे. करोनासारखे विषाणू प्राण्यांकडून माणसाकडे संक्रमित (‘झूनॉटिक’) होतात.  जगातले ६० टक्के  साथीचे रोग हे प्राण्यांकडून येतात. यातले ७२ टक्के  जंगली प्राण्यांकडून येतात. ‘सार्स’, ‘मर्स’, ‘इबोला’, ‘निपाह’, ‘झिका’, ‘एच.आय.व्ही.’ ही सगळी अशीच पिलावळ. साहजिक प्रश्न येतो, की हे सगळे जीव माणसाच्या आरोग्यासाठी कधी, कुठे, केव्हा, कसे आणि का घातक ठरतात. याची उत्तरं पर्यावरणशास्त्रात आणि उत्क्रांतीत मिळतात. म्हणूनच पर्यावरणाचं संवर्धन का करायचं याचीही कारणं त्या ओघात मिळतात. नुकसान झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आत्ताच ते टाळणं आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या युगात संसर्ग होणं थांबवता येणं कठीण आहे. परंतु असे विषाणू तयार होऊ नयेत किंवा झाले तरी यातून टोकाचे संसर्ग होऊ नयेत आणि संसर्ग झाला तरी रोगाचं नियंत्रण करता यावं, अशा विविध पातळ्यांवर काम करता येणं शक्य आहे.

हे विषाणू काही विशिष्ट प्राण्यांमध्ये अधिक प्रमाणात असतात, जसं की माकड, वटवाघळं, उंदीर, काही पक्षी आदी. त्यातले काही त्याला बळी पडतात, पण सामूहिक पातळीवर त्या परजीवांशी त्या-त्या प्राण्यानं जुळवून घेतलेलं असतं. अशा प्राण्यांना ‘रीझव्‍‌र्हायर’ जाती- म्हणजे नैसर्गिक साठा असणाऱ्या जाती, असं म्हटलं जातं. या जाती आणि हे विषाणू एकमेकांबरोबर सह-उत्क्रांत (‘को-इव्होल्यूशन’) झालेले असतात आणि बऱ्याचदा हा विषाणू थेट माणसाला संसर्ग करू शकत नाही. तो एका वेगळ्या प्राण्यात शिरतो. याला ‘स्पिल ओव्हर’ म्हणतात. यापुढे या नवीन प्राण्यात ‘गुणबदल’ म्हणजे ‘म्यूटेशन’ होतात आणि त्यामुळे तो माणसाला संसर्गकारक आणि हानिकारक ठरतो. ‘गुणबदल’ म्हणजे काय, तर नवीन विषाणूच्या प्रती तयार होण्यातल्या चुका. ज्या चुका दुरुस्त करता येत नाहीत. जसं माणसात जन्मत: काही व्यंग तयार होतं. ही जनुकांच्या पातळीवर होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती थांबवणं आपल्या हातात नाही, परंतु ‘स्पिल ओव्हर’ होऊ नये अशी काळजी घेणं शक्य आहे. हा ‘स्पिल ओव्हर’ नक्की कशामुळे होतो हे ठोस सांगणं अवघड आहे. परंतु बहुतेक शास्त्रज्ञ त्याचा संबंध बदलत्या परिसंस्थेशी लावत आहेत. जंगलामध्ये किंवा संरक्षित परिसंस्थेमध्ये साधारण एकसारखी परिस्थिती असल्यानं ‘स्पिल ओव्हर’ हा मर्यादित स्वरूपात राहतो. परंतु जमीन वापर बदलला, तर वेगळी, नवीन परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ- जंगलं कापून खाणी केल्या किंवा प्राण्यांची पैदास केली किंवा व्यापारी लागवड केली, की विविध जंगली जाती (जैवविविधता), त्यांची संख्या, घनता यांवर मोठा परिणाम होतो आणि नवीन परिस्थिती निर्माण होते.

नवीन परिस्थिती म्हणजेच विषाणूंना गुणबदलाची आणि पर्यायानं ‘स्पिल ओव्हर’ संधी मिळते आणि नवीन ‘होस्ट’ मिळाला की त्यांचा गुणाकार सुरू होतो. हा ‘होस्ट’ एकच प्रकारचा जीव असेल, तर विषाणूचं काम अधिक सोपं होतं. इथे संख्या महत्त्वाची आहे. जितकी ‘एका’च प्राण्याची संख्या जास्त, तितका विषाणूचा वेगानं गुणाकार व्हायला आणि गुणबदलाला अधिक वाव मिळतो. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार विषाणू ‘अधिकाधिक यशस्वी’ होण्यातही भर पडते. यातूनच काही अधिक विषारी, संसर्गकारक ‘फेनोटाइप’ तयार होतात असं अनुवंशशास्त्र सांगतं. यावरून एका प्रकारच्या प्राण्यांची संख्या आणि घनता जितकी जास्त तेवढी संसर्ग होण्याची शक्यता किंवा संवेदनशीलता (-ज्याला आपण ‘ससेप्टिबिलिटी’ देखील म्हणतो) वाढते. नैसर्गिक परिसंस्थांची घडी मोडून किंवा त्याजागी ‘मोनोकल्चर’ आणून आपण अशा संवेदनशील प्राण्यांमध्ये भर घालतो.

हे सर्व बघता संभाव्य विषाणूंना असे मध्यस्थ उपलब्ध करून देणं म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ म्हणण्यासारखं आहे. जंगलं कापून तिथे पाळीव जनावरांची मोठय़ा प्रमाणात औद्योगिक पातळीवर पैदास करणं हे म्हणजे भविष्यातल्या अशा सर्व विषाणूंना आमंत्रण देण्यासारखं आहे. प्राणी खाणारे लोक या ‘स्पिल ओव्हर’ची शक्यता वाढवत आहेत, असं म्हटलं जात आहे. परंतु हे केवळ प्राणी खाणारे लोकच करत आहेत असं नाही. हे थेट उदाहरण झालं, पण आपण जर कोणतंही औद्योगिक उत्पादन वापरत असू, जसं की स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, तर आपण देखील अप्रत्यक्षरीत्या या विषाणूला आमंत्रण देत आहोत. कारण ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवण्यासाठी लागणारं बरंचसं साहित्य हे खाणींमधून उपसून काढावं लागतं, जसं की धातू, ‘कोलटन’सारखं दुर्मीळ धातू संयुग, तांबं, निकेल, चांदी, कोबाल्ट, इत्यादी. यातल्या बहुतांश कच्च्या मालाच्या खाणी जंगलात आहेत. तिथे खाणकामाला सुरुवात होणं म्हणजे आधीचं जंगल हटवून अधिवास नष्ट करणं. जमीन वापर बदलला, की आपण विषाणूला आपल्या जवळ खेचतो. या पाश्र्वभूमीवर आपण आपल्या निवडीचा सजगतेनं विचार करायला हवा. आपण काय खातो, काय पितो, काय वापरतो, ते कुठून येतं, त्याचा निसर्गावर काय परिणाम झाला, इत्यादी प्रश्न विचारणं जबाबदारीचं आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या काळात कदाचित एखाद्या साथीत जास्त मनुष्यहानी झाली असेलही, मात्र गेल्या शंभर वर्षांत अशा साथी येण्याची ‘वारंवारता’ पूर्वीपेक्षा वाढली आहे. याचा ताळमेळ औद्योगिकीकरणाशी आणि बदलत्या जीवनशैलीशी सहजच लावता येतो. अर्थात यातल्या अनेक गोष्टी उलटय़ा फिरवणं अवघड आहे. स्मार्टफोन वापर थांबवणं जवळजवळ अशक्यप्राय आहे.  औद्योगिकीकरणावर अनेक मजुरांच्या उपजीविका अवलंबून आहेत हे नाकारता येणार नाही. या परिस्थितीत काय शक्य आहे, तर संसाधनांचा नियंत्रित वापर आणि नैसर्गिक संस्थांचं पुनरुज्जीवन. म्हणजे संसाधनांचा वापर जबाबदारीनं करणं आणि ते भाग उपसा पूर्ण झाल्यावर त्या पूर्वस्थितीत आणणं.

बदलती जीवनशैली, वाढतं शहरीकरण, घटती जैवविविधता आणि रोगप्रतिकारकशक्ती याचा परस्परसंबंध आहे. शहरीकरण वाढतं आहे, त्यामुळे रानवा असलेले जैवविविधतायुक्त प्रदेश आता नाहीसे होत आहेत. जीवनशैलीदेखील बदलते आहे. या दोहोंचा परिणाम रोगप्रतिकारकशक्तीवर होतो आहे. यात शरीराचं ‘आंतरिक पर्यावरण’ आणि ‘बाह्य़ पर्यावरण’ दोन्ही महत्त्वाचं आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे स्वच्छता (‘हायजीन’) वाढली आहे, त्वरित उपचार घेणं वाढलं आणि प्रतिकारकशक्ती कमी झाली आहे. स्वच्छतेचं महत्त्व कमी लेखायचा उद्देश नाही, परंतु या टोकाच्या स्वच्छतेमुळे आणि उपचारांमुळे आपल्या शरीरातलं पर्यावरण बदलतं आहे. शेकडो र्वष ज्या पर्यावरणासोबत आपली रोगप्रतिकारकशक्ती सह-उत्क्रांत झाली आहे, ते बदलल्यानं गोंधळ होतो. जोवर हे जिवाणू, विषाणू आपल्याबरोबर आपल्या शरीरात सह-उत्क्रांत होत असतात तोवर ते त्रासदायक ठरत नाहीत. कारण आपण त्यांना आधार दिलेला असतो आणि तेही आपल्याला मारून न टाकता आपले दीर्घकालीन मित्र बनून शरीरात राहात असतात. परंतु आपण त्यांचं आपल्या शरीरातलं पर्यावरण बदललं, तर ते वेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देणार, यात शंका नाही. बाह्य़ पर्यावरण म्हणजे परिसर बदलला, तरी त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आजूबाजूला जैवविविधता नसेल तर ‘अ‍ॅलर्जी’ (सर्दी, दमा, त्वचारोग इत्यादी) वाढते, हे दाखवणारी अनेक संशोधनं आहेत. त्यातली पोलंडची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. २००४ मध्ये पोलंड युरोपिअन युनियनचा सदस्य झाला आणि त्यांची शेतीविषयक धोरणं बदलली. काही संशोधकांनी २००३ ते २०१२ या वर्षांत लोकांमध्ये दमा आणि इतर काही अ‍ॅलर्जींचा प्रादुर्भाव अभ्यासला. यात ८ ते १८ टक्क्यांनी वाढ झाल्याचं आढळलं. याचं मुख्य कारण शेतीपासून फारकत, गायी किंवा इतर प्राण्यांचा घटता संपर्क आणि त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊन आजार बळावला. विषाणूची साथ आणि अ‍ॅलर्जी हे दोन वेगळे आजार असले, तरी दोन्हींत रोगप्रतिकारकशक्ती महत्त्वाची आहे. याच कारणानं रोगप्रतिकारकशक्ती टिकवण्यासाठी घराभोवती जैवविविधता असणं गरजेचं आहे. शिवाय इथे सरकारी किंवा राजकारणी धोरणं महत्त्वाची आहेत, हे अधोरेखित करावंसं वाटतं.

यांची रोगप्रतिकारक क्षमता उत्तम आहे ते लोक लक्षणविरहित वाहक होतात. म्हणजे विषाणू त्यांच्या शरीरात शिरत आहे, परंतु ते आजारी होत नाहीयेत. यात ‘विषाणूच्या उत्क्रांती’चा महत्वाचा कार्यभाग असला तरी सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती (‘हर्ड इम्यूनिटी’) वाढण्यात ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे.  रोगप्रतिकारकशक्ती जरी आनुवंशिक असली तरी काही गोष्टींनी ती वाढवता येते. यावर समाजानं भर देणं गरजेचं आहे. यातच स्त्रियांचा मोठा कार्यभाग असू शकतो. भारतात अनेक वेगवेगळ्या संस्कृती आहेत आणि ही विभागणी मुख्यत: परिसंस्था, माणसाची धाटणी, क्षमता इत्यादी गोष्टींनुसार आकार घेते. प्रत्येक संस्कृतीत जीवनशैली, आहार, विहार, आचार कसे असावेत, यावर काही ना काही भाष्य केलेलं आढळतं. नियम बनवलेले आढळतात. जागतिकीकरणाच्या रेटय़ात या सगळ्याचं सपाटीकरण होत आहे. मुख्यत: अन्नाचं! औद्योगिकीकरण वाढलं तशी पिकं बदलली, पारंपरिक अन्नाचे प्रकार बदलले, पर्यायानं ‘पोषण’ बदललं. मैद्यापेक्षा ज्वारी पौष्टिक आहे, हे माहीत असूनही आपण मैद्याचे केक, बिस्किटं आवडीने खातो. कारण कदाचित आपण कमकुवत झालो तरी मरणार नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. कारण आपल्याला वैद्यकीय क्षेत्राचा आधार आहे. परंतु आहारात बदल झाला आणि इतर घटकही बदलले, तर हळूहळू संपूर्ण समाजाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती खालावते. करोनामुळे निर्माण झालेली सद्य:परिस्थिती आरोग्याचं महत्त्व पटवून देत आहे. यामुळेच जाता-जाता आपल्या पारंपरिक जीवनशैलीचा किंवा उपचारांचा पुरस्कार करणं गरजेचं वाटतं. पारंपरिक आणि आधुनिक या दोहोंचा समन्वय साधून आपण आपलं शरीर अशा साथीच्या रोगांमध्ये  पूर्वतयारीत ठेवू शकू.

सारांश काय, तर माणूस वाढत्या आकांक्षामुळे, अनियंत्रित उपभोगामुळे, पर्यावरणाचा चेहरामोहरा बदलून स्वत:वरच विविध संकटं ओढवून घेत आहे. स्थानिक, जागतिक हवामानबदलापासून ते विषाणू जवळ ओढण्यापर्यंत! परंतु याच माणसाला पर्यावरण संवर्धन, जबाबदार वर्तन, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, इत्यादींच्या साहाय्यानं टोकाची हानी होण्यापासून बचाव करणं शक्य आहे. ही शक्यता खरी ठरणार की खोटी हे केवळ काळच सांगू शकेल! आपण खरंच ‘सेपियन सेपियन’ असू, तर ही शक्यता खरी ठरावी! आमेन!

(लेखिका पर्यावरणतज्ज्ञ असून जमिनींवरील निसर्ग व जैवविविधता संवर्धन, निसर्ग शिक्षण या क्षेत्रात गेली १८ वर्षं कार्यरत आहेत.)

प्राणी खाणारे लोक ‘स्पिल ओव्हर’ची शक्यता वाढवत आहेत, असं म्हटलं जात आहे. परंतु हे केवळ प्राणी खाणारे लोकच करत आहेत असं नाही. आपण जर कोणतंही औद्योगिक उत्पादन वापरत असू, जसं की स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, तर आपण देखील अप्रत्यक्षरीत्या या विषाणूला आमंत्रण देत आहोत. कारण ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवण्यासाठी लागणारं बरचसं साहित्य हे खाणींमधून उपसून काढावं लागतं, जसं की धातू, ‘कोलटन’सारखं दुर्मिळ धातू संयुग, तांबं, निकेल, चांदी, कोबाल्ट, इत्यादी. यातल्या बहुतांश कच्च्या मालाच्या खाणी जंगलात आहेत. तिथे खाणकामाला सुरवात होणं म्हणजे आधीचं जंगल हटवून अधिवास नष्ट करणं. जमीन वापर बदलला, की आपण विषाणूला आपल्या जवळ खेचतो. या पाश्र्वभूमीवर आपण आपल्या निवडीचा सजगतेनं विचार करायला हवा. आपण काय खातो, काय पितो, काय वापरतो, ते कुठून येतं, त्याचा निसर्गावर काय परिणाम झाला, इत्यादी प्रश्न विचारणं जबाबदारीचं आहे.  निसर्गातील संसाधनांचा वापर जबाबदारीनं करणं आणि ते भाग उपसा पूर्ण झाल्यावर त्या पूर्वस्थितीत आणणं गरजेचं ठरणार आहे.