कोणाही व्यक्तीच्या आरोग्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आधुनिक वैद्यकशास्त्रात कोणताही रोग नसणे म्हणजे आरोग्य असे म्हटले गेले आहे. ही व्याख्या नकारात्मक आहे, पण जागतिक आरोग्य संघटना सांगते, आरोग्य म्हणजे शरीराचे आरोग्य, मनाचे आरोग्य, आत्म आरोग्य व सामाजिक आरोग्य या चारींचे स्वास्थ्य म्हणजे खरे आरोग्य. ही व्याख्या परिपूर्ण व सकारात्मक आहे. त्यात सर्वागीण आरोग्याचा विचार केलेला जाणवतो. थोडक्यात, आरोग्य म्हणजे देह-मन-आत्मस्वास्थ्य आणि समाजस्वास्थ्य होय. आधुनिक वैद्यकशास्त्रात कोणी व्यक्ती आजारी पडली किंवा तिला कोणताही रोग झाला तर त्याला सामान्यपणे दोन शब्द वापरले जातात -१ डिसीझ (Disease)  २. डिसऑर्डर (Disorder). याचाच अर्थ देहमनाची सहजता व लयबद्धता (तालबद्ध वेग) जाणे म्हणजे आजारी पडणे.
सारांश – देह, मन, आत्मा, समाज यांची स्वस्थता म्हणजे आरोग्य आणि या सर्वाच्या कार्यातील सहजता व लयबद्धता म्हणजे आरोग्य. आपण जेव्हा ओम् नादचतन्य म्हणजे ओम्कार या विश्वनिर्मितीचे मूळ असलेल्या नादाच्या सहजतेचा व लयबद्धतेचा विचार करतो तेव्हा तो नाद, या विश्वातील परमशुद्ध सहज नाद आहे आणि परमशुद्ध लयबद्ध नाद आहे, कारण त्याची लय विश्वलयीशी मिळतीजुळती आहे. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानात साडेतीन मात्रांच्या लयीला अतिशय महत्त्व आहे. ते कसे हे या लेखमालेतून आपण दर शनिवारी पाहणार आहोत.
डॉ. जयंत करंदीकर