एकदा दीपक माझ्याकडे आला. उत्साहानं नुसता निथळत होता. ‘‘सापडला, मार्ग सापडला!’’ तो म्हणाला. ‘‘मुलांशी बोललोय मी. त्यांना नाचायला शिकवीन. मग ते अभ्यास करतील. गणितं सोडवतील.’’ दीपक गंमत करतोय असं मला वाटलं, पण नाही. दीपक किती तरी वर्ष संस्थेत येत राहिला. कुठलीही अपेक्षा न करता मुलांना नृत्य शिकवत राहिला. मुलांच्या एरवीच्या शुष्क आयुष्यात त्यानं गंमत आणली. जणू संजीवनी दिली. पण.. दीपक हळूहळू रिमांड होममध्ये येण्याचं थांबला. पैसे कमावणं, जागा बघणं, यात नृत्याची गतीही मंदावली. नृत्य थांबलं. मुलांचा सहवास संपला आणि दीपक मनानं खचला..

परवा एका कार्यक्रमासाठी मुंबईत गेले. अनेक सहकारी भेटले. खूप गप्पा झाल्या. पंधरा-वीस वर्षांपूर्वीचे बंध अजूनही जुळून आहेत, हे जाणवून खूप बरं वाटलं, पण त्यातही एक हुरहुर मनात राहिली. त्या सगळ्या गोतावळ्यात दीपक नव्हता. दीपक अनंताच्या वाटेवर निघून गेला, याला काही र्वष झाली. काहीसा विस्मरणात गेला तो, असं वाटायला लागलं होतं. पण परवा सगळे एकत्र आलो आणि वाटलं की दीपकला आम्ही कुणीच विसरलो नाही, विसरणारही नाही.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू
95 percent ofh maayutis seat allotment problem was solved says girish mahajan
“महायुतीतील जागा वाटपाचा तिढा ९५ टक्के सुटला, पण…” गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

दीपक एक उत्कृष्ट नर्तक होता. अतिशय सडपातळ देहयष्टी. जेमतेम पाच फुटांची उंची. हसरा चेहरा आणि त्याहूनही विलक्षण हसरे डोळे. ते हसरे डोळेच बघणाऱ्याला त्याच्याजवळ न्यायचे. त्या डोळ्यांतल्या भावनांनीच दीपकनं आम्हा सर्वाना आपलंसं केलं. रिमांड होममधल्या मुलग्यांना अभ्यास करायला प्रवृत्त करायचं म्हणजे काम तसं महाकठीणच! शिक्षणाशी पुष्कळ र्वष नाळ तुटलेल्या, भारताच्या विविध भागांतून आलेल्या बहुभाषक मुलांना अभ्यासाची गोडी न लागणंच स्वाभाविक होतं. अशा वेळी नृत्य शिकवतो, पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे, अशी लालूच दीपकनं त्यांना दाखवली आणि चित्र पालटलं खरं.

झालं असं की दीपक आपल्या मित्राबरोबर रिमांड होमच्या आमच्या सभांना यायला लागला. त्याचा मित्र जीतेंद्र याचं नृत्याशी दूरान्वयानंही नातं नाही, पण दोघांची मैत्री अगदी घट्ट. जीतेंद्र आमच्या मुलांना गणित शिकवायचा. मुलांवर चिडायचा, रागवायचा. दीपक एका कोपऱ्यात बसून शांतपणे हे सगळं ‘नाटक’ बघत असे. जीतेंद्रचा जसा नृत्याशी संबंध नव्हता तसंच दीपकचं गणिताशी अजिबात सख्य नव्हतं. त्यामुळेच की काय कोण जाणे मुलांच्या व्यथा दीपकला अचूक समजायच्या. त्या दिवसात मुलांना पुढील शिक्षणासाठी एका तंत्रनिकेतनात प्रवेश मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करीत होतो. त्यामुळे गणिताशी न जुळणं आम्हाला परवडण्याजोगं नव्हतं. त्यामुळे जीतेंद्रची गणिताची लढाई चालूच राहिली. सोबतीला दीपकचं निरीक्षण सुरूच होतं. (कधी कधी तर या रणधुमाळीत दीपकला अस्थानी हसू यायचं. तो हसायचा, त्याचे ओठ हसायचे आणि मुख्य म्हणजे त्याचे डोळे हसायचे. ते बघितलं की जीतेंद्र चिडायचा. पण वातावरणातला ताण कमी व्हायचा.) मग एकदा दीपक माझ्याकडे आला. उत्साहानं नुसता निथळत होता. ‘‘सापडला, मार्ग सापडला!’’ तो म्हणाला. ‘‘मुलांशी बोललोय मी. मी त्यांना नाचायला शिकवीन. मग ते अभ्यास करतील. गणितं सोडवतील.’’ सुरुवातीला दीपक गंमत करतोय असं मला वाटलं. पण ते तसं नव्हतं. दीपक खरंच मुलांशी बोलला होता. मुलांनी त्याला सहकार्य करण्याचं मान्य केलं होतं.

पुढच्या शनिवार, रविवारपासून दीपकचे (अधीक्षकांची रीतसर परवानगी घेऊन) नृत्याचे वर्ग सुरू झाले. नृत्य त्याच्या रक्तात होतं. जणू तो नृत्यासाठीच जन्मला होता. मोठय़ा प्रेमानं दीपक मुलांना नृत्य शिकवायला लागला. मुलांतलं मूल होऊन गेला. त्याच सुमारास आम्ही सर्वानी मुलांचे वाढदिवस साजरे करण्याचा उपक्रम सुरू केला होता. मुलांना आपले जन्मदिनांक ठाऊक नसत. घरातून  पळून आलेल्या या मुलांपाशी जन्मदाखले अथवा कुठलीही कागदपत्रं नसत. यापूर्वी कधीही वाढदिवस साजरे झाले असण्याचा तिळमात्र संभव नसे. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या समारंभाला अनन्यसाधारण महत्त्व आल्यास नवल नव्हतंच. पण त्यासाठी खरा कार्यक्रम आम्हाला दिला तो दीपकनं. मुलांचं औक्षण, केक कापणं, टाळ्या वाजवणं या सगळ्यांच्या जोडीला दीपक आणि कंपनी (संस्थेतील दीपकनं तयार केलेली मुलं) यांच्या नृत्यानं बहार आणली. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षणच मुळी नृत्याचा कार्यक्रम झाला.

नृत्याच्या माध्यमातून मुलांना व्यक्त व्हायला मिळायला लागलं आणि त्यांच्या मानसिकतेत कमालीचा फरक पडला. गणिताच्या लढायांचा जोर ओसरला. जीतेंद्रच्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटू लागली. शनिवार, रविवारी नृत्याच्या ध्वनींनी एरवीच्या रिमांड होमच्या शुष्क वातावरणात जान आली. मग एकदा जीतेंद्र मला भेटायला आला. एरवी सहसा भावनावश न होणारा जीतेंद्र दीपकविषयी बोलताना हलून गेला होता. जीतेंद्रनं सांगितलं की, दीपकचे आई-वडील त्याच्या अगदी लहानपणीच गेले होते. एका अपघातात मृत्यू झाला त्यांचा. पाच ते दहा वयाचे हे तीनही भाऊ एकदम पोरके झाले. यथावकाश त्यांची रवानगी मामांकडे झाली. मुलांची शाळा सुरू राहिली. राहण्याची सोय झाली. पण आई-वडील नसल्यामुळे निर्माण झालेली पोकळी कशी भरून निघणार होती?

दीपकला नृत्य शिकायचं होतं. नर्तक होण्याची आकांक्षा होती त्याची, पण परिस्थितीनं प्रतिकूल वळण घेतलं. मात्र दीपकचा आशावाद मोठा चिवट होता. जिथं, जमेल तसं नृत्य शिकू लागला. जणू धनुर्विद्या शिकणारा एकलव्य मोठा झाला. शिक्षणात फारशी गती नसली तरी काम करण्याची तयारी होती. मामांच्याच कारखान्यातली नोकरी करत, मामींच्या हातात महिन्याची कमाई सोपवत, उरलेल्या पैशातून दीपक नृत्यवर्गाला जाऊ लागला. जीतेंद्र त्याचा वर्गमित्र. जीतेंद्रकडून त्याला या मुलांविषयी समजलं. जीतेंद्र सांगत होता, ‘‘मी त्याला सगळं सांगितलं आणि दीपकनं मुलांकडे यायचं ठरवलं.’’ दीपक म्हणाला, ‘‘अरे, मी त्यांचं दु:ख समजू शकतो. मी नाही समजणार तर कोण समजणार?’’

दीपक किती तरी र्वष संस्थेत येत राहिला. कुठलीही अपेक्षा न करता मुलांना नृत्य शिकवत राहिला. मुलांच्या एरवीच्या शुष्क आयुष्यात त्यानं गंमत आणली. जणू संजीवनी दिली. आजही त्या काही वर्षांतली स्नेहसंमेलनं, वाढदिवस आठवताना मन भरून येतं.

संदीप तसा सगळ्यांशीच चांगला वागायचा. पण त्यातही महादेवशी त्याचे खास बंध जुळले. संदीप गोरा, सडपातळ, थोडा बुटका, तर महादेव अगदी काळाभोर, उंच, बांधेसूद. अगदी परस्परविरुद्ध दिसायचे दोघं. मात्र त्यांच्यात एक साम्यस्थळ जरूर होतं. दोघांचेही पांढरे शुभ्र, चकचकीत दात. अर्थात महादेवच्या रंगामुळे दीपकच्या दातांपेक्षा महादेवचे दात अधिक उठून दिसायचे ही बात अलाहिदा. महादेवही आई-वडिलांच्या छत्राला पारखा झाला होता. त्याच्या वडिलांनी आईची हत्या केली होती. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर ते आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होते. महादेवला आजी होती. पण आईच्या मृत्यूनंतर महादेवनं घर सोडलं. भटकता भटकता पोलिसांच्या हाती लागला. बाल न्यायालयानं त्याची संस्थेत रवानगी केली. महादेव पाच वर्षांहून अधिक काळ घरापासून वेगळा झाला.

महादेव अतिशय सुंदर नाचायचा. दीपकनं दाखवलेला पदन्यास, मुद्राभिनय सही सही उचलायचा. त्यातूनच दीपकच्या मनात महादेवविषयी एक प्रेमाचा कोपरा निर्माण झाला. महादेवची संस्थेतली मुदत संपून तो आजीकडे (पुण्यातच पण पार दुसऱ्या टोकाला) जायला निघाला तेव्हा दोघेही खूप रडले. ‘‘महादेवसारखा दुसरा शिष्य मिळणं कठीण’’ असे उद्गार दीपकनं काढले.

तोपर्यंत दीपकच्याही जीवनात खूप बदल घडत होते. दीपकला पैशांची खूपच गरज होती. मामांकडे तरी राहणार म्हणजे किती काळ राहणार? स्वत:ची अगदी छोटीशी का होईना, जागा घेणं भाग होतं. भावांची शिक्षणं व्हायची होती. यात नृत्याचा, समाजसेवेचा नंबर शेवटचा लागणं किंवा अजिबात न लागणं अपरिहार्य होतं.

दीपक हळूहळू रिमांड होममध्ये येण्याचं थांबला. पैसे कमावणं, जागा बघणं, यात नृत्याची गतीही मंदावली. नृत्य थांबलं. मुलांचा सहवास संपला आणि दीपक मनानं खचला. त्याचं मन उभारी घेईना. त्याच्यातल्या कलावंताचं मन तळमळत राहिलं. शिक्षणात फारशी प्रगती नाही, हातात दुसरं म्हणावं तसं कसब नाही. त्यामुळे पैशाचीही चणचणच होती. दीपकच्या प्रकृतीवर याचा फार परिणाम झाला. त्याला कावीळ झाली. निदान प्रभावी उपचार होईपर्यंत दुखणं बळावलं होतं. शेवटी काविळीनं आणि खरं सांगायचं तर मनानं खचल्यामुळे दीपक गेला.

आणि त्याच सुमारास महादेवही गेला. महादेवचं नोकरीचं ठिकाण आणि त्याचं घर एकमेकांपासून खूप लांब होतं. रोज प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमधून त्याला प्रवास करावा लागे. एकदा अशाच गाडीच्या दरवाजात लोंबकळत प्रवास करताना गर्दीच्या मागच्या रेटय़ानं महादेवचा हात दांडीवरून निसटला आणि तो सरळ गाडीखाली गेला.

दीपक आणि महादेवचा मृत्यू साधारण एकाच वेळी व्हावा याचा आम्हा सर्वानाच फार चटका लागून राहिला. दोघेही हसतमुख, कधीही तक्रार न करणारे आणि भान हरपून नृत्य करणारे, गुरू-शिष्य. गुरू आणि शिष्यानं एकदमच हे जग सोडावं याची हळहळ लागून राहिली.

मुंबईला गेले. माझे जुने सहकारी भेटले आणि दीपकच्या सगळ्या आठवणी उफाळून आल्या. त्यानं केलेली निरपेक्ष मदत आठवली. त्याचं नृत्यातलं कसब आठवलं. महादेवला लावलेला जीव आठवला. पण त्या सर्वाहून व्याकूळ करून सोडणारी अशी एक आठवण आली. दीपक म्हणायचा, ‘आपण काही छान केलं की ते बघायला आपली आई हवी आणि काही वाईट झालं की डोळे पुसायलादेखील आईच हवी. एकदंर काय, आई असायलाच हवी.’

खरंच, आई असायला हवी, असायलाच हवी, या दीपकच्या म्हणण्यावर कुणाचंच दुमत असणार नाही.

रेणू गावस्कर eklavyatrust@yahoo.co.in