नोटबंदीनंतर निर्माण झालेला चलन तुटवडा आणखी काही महिने कायम राहील, असा रिझव्‍‌र्ह बँकेचाच अंदाज आहे. त्यामुळे नोटांसाठी करावी लागणारी धावपळदेखील काही काळ सुरूच राहाणार आहे. दरम्यानच्या काळात, राज्य आणि केंद्र सरकारतर्फे नागरिकांना रोखरहित व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. खरे तर रोखरहित व्यवहारांची सुविधा देणारी संकेतस्थळे आणि मोबाइल अ‍ॅप गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु याबाबतचे अज्ञान आणि अविश्वास यामुळे अनेक जण आजवर या व्यवहारांकडे वळत नव्हते. यातील बहुतांश मंडळींना आता रोखरहित व्यवहारांचे महत्त्व आणि गरज पटली असेल. आपल्या दैनंदिन व्यवहारांपैकी अनेक व्यवहार आपल्याला इंटरनेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा ‘डिजिटल वॉलेट’ अ‍ॅपच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. अगदी सरकारी सुविधाही या माध्यमातून मिळू लागल्या आहेत. महावितरणचे अ‍ॅप अशीच एक सुविधा आहे. राज्यभर वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या या अ‍ॅपमुळे केवळ वीज बिलाचा भरणा करणेच नव्हे तर मीटर रीडिंग तपासून पाहणे, तक्रारी नोंदवणे, आधीच्या बिलांची पडताळणी अशा अनेक गोष्टी करता येणे सहज शक्य आहे. ‘Mahavitaran’ अशा नावानेच हे अ‍ॅप अँड्रॉइड व आयओएसवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमची बिले ऑनलाइन भरू शकता. यासाठी तुम्हाला नेटबँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड या माध्यमांची मदत घेता येते. याशिवाय नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे, जोडणीच्या अर्जाचा पाठपुरावा करणे आदी सुविधा हे अ‍ॅप पुरवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही स्वत: तुमच्या मीटरचे रीडिंग महावितरणला कळवू शकता. ही अतिशय चांगली सुविधा आहे. अनेकदा आपल्याला भरमसाट वीज बिल आल्याचे दिसते. याचे सरळ-सोपे कारण म्हणजे, वीज मीटरचे रीडिंग घेण्यासाठी नेमलेले कर्मचारी अचूक मीटर रीडिंग न घेता, सरासरीच्या आधारे मीटर रीिडग नोंदवतात. त्यामुळे एखाद्या महिन्यात कमी वापर असतानाही आपल्याला वीज बिल जास्त येते. हे टाळायचे असेल तर महावितरणच्या अ‍ॅपद्वारे तुम्ही स्वत: तुमच्या मीटरचे रीडिंग कळवू शकता. यासाठी या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही मीटरवरील नोंदीचे छायाचित्र महावितरणकडे पाठवू शकता.

महा-ई-सेवा

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ असे म्हणण्याचे दिवस आता गेले आहेत. नागरिकांशी निगडित व्यवहारांत पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. ‘सेतू’सारख्या सुविधेच्या माध्यमातून आपल्याला अनेक आवश्यक प्रमाणपत्रे लवकर विनासायास मिळवता येतात. परंतु यासाठी आता सरकारी कार्यालयातही जाण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या ‘Maha E seva’ या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही कागदपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे, अधिवासाचा दाखला, परवाने, आधार कार्ड, पॅनकार्ड, सातबाराचा उतारा, जात प्रमाणपत्र अशा प्रकारच्या आवश्यक कागदपत्रांसाठी ‘महा ई सेवा’ अ‍ॅपद्वारे ऑनलाइन फॉर्म भरून अर्ज करता येतो. याखेरीज या अ‍ॅपवर ‘ई लॉकर’ची सुविधा पुरवण्यात आली असून त्या माध्यमातून तुम्ही आपली महत्त्वाची कागदपत्रे ‘डिजिटल’ रूपात जमा करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला गरज असेल त्या वेळेस ही कागदपत्रे तुम्हाला उपलब्ध होतात. याशिवाय या अ‍ॅपवर सरकारी तसेच खासगी कंपन्यांतील नोकरभरतीची सूचनाही पाहायला मिळेल.

असिफ बागवान – asif.bagwan@expressindia.com