मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती यांचा फार जवळचा संबंध आहे. जी गोष्ट तुम्ही करायची ठरवली आहे ,त्याच्यावर तुमचे मन केंद्रित करा. एकाग्रतेमुळे मनाची शक्ती वाढते. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रथम ती गोष्ट करण्याची इच्छा पाहिजे. माणसाच्या जीवनात इच्छाशक्तीला फार महत्त्व आहे. इच्छाशक्ती हा मनाच्या सामर्थ्यांचा एक भाग असून ती एक अमूर्त शक्ती आहे. त्याची प्रचीती माणसाच्या कार्यातूनच येते. इच्छाशक्ती म्हणजे कल्पनेतली इच्छा किंवा मानोरथ नव्हे. जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते, ती म्हणजे इच्छाशक्ती! इच्छांची पूर्तता होण्यासाठी नतिक शक्ती आणि निश्चय असावा लागतो. लहानसहान गोष्टींमधून इच्छाशक्तीला बळकटी मिळते. जेव्हा एखादी गोष्ट जाणीवपूर्वक नित्यनेमाने केली जाते, त्यातून इच्छाशक्ती दृढ होते. इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मनावर पूर्णपणे नियंत्रण पाहिजे. ते अशासाठी की कधी कधी ध्येय गाठण्यासाठी मनाविरुद्धही काम करावे लागते. जर शरीर लवचीक ठेवायचे असेल तर नित्यनेमाने व्यायाम हा केलाच पाहिजे. ते करणे तुम्हाला आवडो न आवडो. मनाला तशा प्रकारचे वळण लावणे आवश्यक असते. त्यासाठी कधी कधी क्षणिक भावनांवरही मात करावी लागते. माणसाचं एक मन म्हणत असतं की तू आराम कर तर दुसरं त्याला काम करण्यासाठी सुचवत असतं. जो माणूस काम करण्याची मनाची आज्ञा पाळतो तो पुढे जातो. कुणाच्याही आग्रहाला बळी न पडता, जो स्वत:चा निश्चय टिकवतो त्याची इच्छाशक्ती वाढते. यशस्वी होण्यासाठी, लोकांना मान देऊन त्यांचे थोडेफार ऐकावे लागते. पण स्वत:चा इच्छेचाही मान तेवढाच ठेवावा लागतो. त्यासाठी लोकमताला मान देताना एक मर्यादा ठेवावी लागते. इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी समांतरच आहेत. इच्छा जर प्रबळ असेल तर माणसाला कार्यप्रवृत्त करते. इच्छाशक्तीचे सामथ्र्य माणसात सुप्तावस्थेत असते. माणसाची बुद्धी आणि इच्छाशक्ती यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. बिहारची अरुणिमा सिन्हाचं उदाहरण सर्वश्रुत आहे. एका पायाने अधू झालेल्या अरुणिमाने अपघात झाल्यापासून दोन वर्षांत एव्हरेस्ट सर केला. सर्वसामान्य माणसाला शक्य नसणारी गोष्ट तिने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर साध्य केली. पद्मश्री देऊन भारत सरकारने तिचा गौरव केला. जेव्हा आणीबाणीची, धोक्याची परिस्थिती निर्माण होते, तेव्हाही इच्छाशक्ती जागृत होते. प्रतिकूल परिस्थितीचे अनुकूल परिस्थितीत रूपांतर करण्याची किमया इच्छाशक्तीमध्ये असते. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी परतीचे दोर कापावे लागतात. हेलन केलर ही मूक, बधीर, आंधळी होती. पण इच्छाशक्तीच्या जोरावर तिनं शिक्षण घेतलं, भरपूर लिखाण केलं. भावनांच्या आहारी न जाता, ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करा. त्यासाठी छोटय़ा छोटय़ा कार्यापासून सुरुवात करायला हवी. ते प्रथम साध्य करा. त्याने तुमची इच्छाशक्ती आपोआपच समर्थ होईल. हवेत किल्ले बांधणं म्हणजे इच्छाशक्ती नव्हे. तुमच्या मनातील संकल्प शरीराने पार पाडले पाहिजेत. तरच इच्छापूर्ती होईल. त्यासाठी शरीर आणि मनाने, एकत्र कार्य करणे जरुरी आहे. जर शरीर थकलं असेल तर त्यावेळी विश्रांती घेणं आवश्यक असतं. तसंच शारीरिक व्याधीतून मुक्तता मिळवण्यासाठी मनही खंबीर पाहिजे. मी या आजारातून बरा होणारच असे जो मनापासून ठरवतो, तो त्यातून मुक्त होतो. यासाठी योगासन, प्राणायाम हे आपल्या दैनंदिन जीवनात असणं आवश्यक आहे. एरव्ही अनियमित असणारे श्वसन प्राणायामाने नियमित होते. त्यामुळे शरीर आणि मनही शांत, समृद्ध बनतं. तुमचं शरीर आणि मन कार्यक्षम होतं. तुम्ही जसा हुकूम द्याल तशी कृती शरीर करतं. शरीराला तशी सवय लावावी लागते. त्यासाठी तुमच्या मनाचा निश्चय व्हायला पाहिजे. शरीर हे एक यंत्रच आहे. त्याची देखभाल नियमित करणं आवश्यक असतं. मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती यांचा फार जवळचा संबंध आहे. जी गोष्ट तुम्ही करायची ठरवली आहे ,त्याच्यावर तुमचे मन केंद्रित करा. एकाग्रतेमुळे मनाची शक्ती वाढते. एकाग्रता ही पूर्णपणे मानसिक शक्ती आहे. एकाग्रता म्हणजे मेंदूने दिलेली आज्ञा शरीराला आणि मनाला पाळायला लावणे. यासाठी मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. म्हणजे हाती घेतलेले काम अर्धवट न सोडता तडीस नेणे आवश्यक आहे. भटकणाऱ्या मनाला आधी स्थिर केले पाहिजे. म्हणजे एकदा का मन ताब्यात आले की ते तुमच्या इच्छेनुसार एखाद्या विषयावर एकाग्र होऊ शकेल. जसा शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक असतो त्याप्रमाणे मनासाठी चिंतनाचा व्यायाम आवश्यक असतो. इच्छाशक्तीचा विकास करण्यासाठी मनावर नियंत्रण पाहिजे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही इछाशक्तीचा उपयोग करून अनुकूलतेत बदलता येते. हातपाय गाळून बसण्यापेक्षा कामाने इच्छाशक्ती प्रबळ होते. इच्छाशक्तीचा आणि मनाच्या एकाग्रतेचा जवळचा संबंध आहे. जी गोष्ट तुम्ही करणार आहात त्यावरच मन एकाग्र केले पाहिजे. मनाच्या एकाग्रतेमुळे एखादी गोष्ट आपणास ताबडतोब आणि अचूक करता येते. हाती घेतलेल्या कामावर संपूर्ण अवधान देण्यामुळे मनाची एकाग्रता साधता येते. एकाग्रता होत नसेल तर एक सोपा प्रयोग आहे. शांत आणि एकांत जागा निवडा. शरीर शिथिल करून बसा. डोळे बंद करून तुम्हाला हवी असलेली संकल्पना समोर आणा. दुसरा कोणताही विचार मनात आणू नका. मन सतत निसटण्याचा प्रयत्न करेल. अनेक प्रकारचे विचार मनात येतील. पण असे चिंतन काही वेळ करत राहिल्याने तुमचे मन आपोआपच एकाग्र होईल. दिवसाच्या शेवटी दिवसभरातील घटनांचा आढावा घ्या. त्यामुळे तुमची स्मृती वाढेल. इच्छाशक्ती वाढवण्यासाठी दैनंदिन घटनांकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. एखादा लेख वाचताना मनाची एकाग्रता ठेवून वाचला तर तो लक्षात राहतो. त्याच्या मुद्दय़ांचा आढावा घेतला तर लेखाचा सारांश लक्षात राहतो. त्यासाठी सूक्ष्म निरीक्षणशक्तीसुद्धा तुमच्याकडे पाहिजे. अनेक वेळा वस्तूंची, व्यक्तींची वैशिष्टय़े लक्षात ठेवली तर ती गोष्ट लक्षात राहते. कल्पनाशक्ती आणि इच्छाशक्ती तुमच्या मनाचे सामथ्र्य आणखीन एका गोष्टीवर अवलंबून असते ते म्हणजे तुमची सर्जनशिलता वा कल्पनाशक्ती. यावर नवनिर्मिती अवलंबून असते. पण या कल्पनाशक्तीवर इच्छाशक्तीचे नियंत्रण पाहिजे. कल्पनाशक्ती वाटेल तशी भटकत असेल तर ते मनात मांडे खाणं होय. इलियास होवे हा शिंप्याचा मुलगा आईला सुई-दोऱ्याने कपडे शिवताना पाहात असे. त्याच्या मनात आले की, टाके भराभर घालण्याचे यंत्र आले तर शिंप्याचे काम सोपे होईल. आणि शिवणाचे यंत्र शोधण्याच्या कल्पनेने त्याला झपाटले. लोक जरी त्याला वेडा समजत होते तरी त्याने त्या शोधावर मन एकाग्र केले आणि शिवण यंत्राचा शोध लागला. हीच इच्छाशक्ती. इच्छाशक्ती आणि सवयी इच्छाशक्ती आणि सवयी यांचाही दाट सबंध आहे. चांगल्या सवयी लावून घेतल्याशिवाय इच्छाशक्तीचा विकास होत नाही. एखादी कृती जेव्हा इच्छेविरुद्ध वारंवार केली जाते तेव्हा त्याची सवय होते. कालांतराने माणूस त्या सवयींचा गुलाम बनतो. तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा बनणाऱ्या वाईट सवयी सोडा. चांगल्या सवयीसाठी सातत्य, चिकाटी आणि प्रयत्न यांची गरज असते. आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून घ्यायला, सभोवतालची परिस्थिती समजायला भरपूर वाचन करावे लागते. वाचनाची सवय सगळ्यात चांगली. वाचनापासून खूप फायदे मिळतात. पुस्तके एकप्रकारे गुरूच असतात. दुसऱ्या व्यक्तीच्या स्वभावातले चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वत:ला जितक्या चांगल्या सवयी लावून घ्याल तेवढे तुमचे इच्छाशक्तीचे सामथ्र्य वाढते. स्वत:चे परीक्षण त्रयस्थपणे करायला शिका. म्हणजे तुमचे गुण-दोष समजतील. तुमच्या इच्छाशक्तीवर तुमचा ताबा पाहिजे. मनात आलेल्या कल्पनेला भरकटायला दिले की तुमचे ध्येय डळमळीत होते. तुमच्या भावना आणि विकारावर नियंत्रण ठेवण्याचे काम इच्छाशक्तीच करते. त्यासाठी स्वनियंत्रण हवे. मनातला क्रोध, मत्सर काढून टाकला पाहिजे. क्रोधाने माणसाचे शरीर थरथरू लागते. क्रोधामुळे निर्णयशक्ती दुबळी होते. क्रोधाच्या आहारी जाऊन तुम्ही व्यवसाय केला तर यश मिळणार नाही. मानसिक शक्ती खर्च होते. तुम्ही मनावर इतके नियंत्रण ठेवले पाहिजे की स्पर्धकाच्या यशाबद्दलही तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. तुमच्या मनात दुसऱ्याविषयी कडवट द्वेष भावना असता कामा नये. मत्सराची भावनाही मनातून काढून टाका. या सगळ्यात एकच फक्त लक्षात ठेवा की तुमचा वैयक्तिक विकास हा महत्त्वाचा असतो. प्रतिस्पध्र्याचे पाय खेचू नका. त्याच्या अपयशात तुम्ही आनंद मानू नका. तुमच्यातले निसर्गदत्त गुण वाढवा. म्हणजे तुमच्या ध्येयाच्या मार्गातील अडचणी नाहीशा होतील. जसे पेराल तसे उगवते. म्हणून तुमच्यातले चांगले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा. कधी कधी निर्णय परिस्थितीनुसार बदलावा लागतो. मोडेन पण वाकणार नाही असा बाणा कायम ठेवला तर काम होणार नाही. प्रसंगी वाकायलाही लागते. तुमचा निर्णय हट्टीपणाने दुसऱ्यावर लादू नका. आत्मपरीक्षण करा. यशाकडे जाताना तुम्हाला प्रथम स्वत:शीच झगडावे लागते. पण त्यातून मिळणारे यश हे झळझळीत असते. सविता नाबर savitanabar@gmail.com (‘रिया पब्लिकेशन’ ने प्रकाशित केलेल्या ‘माईंड पॉवर’ या पुस्तकातील संपादित भाग)