गेल्या चार-पाच वर्षांत रंजनचा दिनक्रम फारच विचित्र झाला होता. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि दुपारी उठणे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, रात्री चालणारे मोबाइलवरचे टेक्स्िंटग, इंटरनेट, टी.व्ही. इत्यादींमुळे आपला मुलगा रात्री जागतो, असं त्याच्या आई-वडिलांना वाटे, पण या सर्व घटनांच्या मुळाशी आहे, झोपेचे घडय़ाळ. रंजनचे झोपेचे घडय़ाळ आणि समाजाचे घडय़ाळ यांच्यात तफावत असल्याने संपूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य बिघडले.
रंजन हा बावीस वर्षांचा उमदा तरुण. सुनंदा आणि अरुण दामले या प्रतिष्ठित जोडप्याचा एकुलता एक मुलगा. अरुण दामले शिक्षणाने अभियंता; सामान्य कुटुंबात जन्माला येऊन, खटपटीने स्वत:च्या मेहनतीवर आणि व्यावहारिक बुद्धीने निर्णय घेऊन व्यावसायिक यश संपादन केलेले. त्यांच्या शहरात आíथकदृष्टय़ा उच्च वर्गात या जोडप्याची गणना होती. सुविद्य आणि गुणी पत्नी, रोजच्या जीवनात तिची योग्य साथ, आरोग्य, पसा, बंगला, कीर्ती वगैरे.. थोडक्यात ऐहिकदृष्टय़ा काहीच कमी नाही, असे जीवन दामले कुटुंब जगत होते. पण.. एक कमी या उभय नवरा-बायकोला सलत असे. रंजनने या परिस्थितीचा फायदा घेऊन आणखीन उंच भरारी घ्यावी, अशी आई-वडिलांची स्वाभाविक अपेक्षा होती. स्वत: रंजन हा निरोगी, उत्तम व्यक्तिमत्त्व असलेला, विनम्र स्वभावाचा मुलगा. त्याची बुद्धिमत्तादेखील चांगली होती. आई-बाबांवर त्याचे प्रेम होते. असे असूनही आत्तापर्यंत तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. गेल्या चार-पाच वर्षांतला त्याचा दिनक्रम फारच विचित्र होता. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि दुपारी उठणे. स्वत:च्या खोलीबाहेर क्वचित येणे. संध्याकाळी मोटरसायकलवरून मित्रांकडे जाणे असला प्रकार चालू होता. समाधानाची बाब एकच होती आणि ती म्हणजे त्याला कुठलेही व्यसन अथवा वाईट सवयी जडलेल्या नव्हत्या. रंजनच्या शिक्षणासाठी कितीही पसा खर्च करायची दामले कुटुंबाची तयारी होती. किंबहुना बारावी झाल्यावर, त्याला लंडनच्या एका युनिव्हर्सिटीतदेखील पाठवले होते. पण दोन वर्षांनीच तो परतला. येथे आल्यावर एका मॅनेजमेंटच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतली.
स्वत:सारखीच आपल्या मुलाला महत्त्वाकांक्षा का नाही? ही खंत दामले यांना होती. इलेक्ट्रॉनिक मीडिया, रात्री चालणारे मोबाइलवरचे टेक्िंस्टग, इंटरनेट, टी.व्ही. इत्यादींमुळे आपला मुलगा रात्री जागतो. या जागरणामुळे उशिरा उठणे आणि सगळा दिवस बरबाद करणे हे साहजिकच आहे, अशी नुसती दामले पती-पत्नीचीच नाही तर समस्त नातेवाईक मंडळी आणि परिवाराच्या स्नेही मंडळींचीदेखील ठाम समजूत होती. रंजनच्या मामाने तर त्याचे इंटरनेट तोडून टाका, घराबाहेर काढून नोकरीला लावा म्हणजे चटकन सुधारेल, असा जालीम उपायदेखील सुचवला होता. पण त्यामुळे सुस्वभावी रंजन इतका बिथरला की त्याने आजी, मामा यांच्याबरोबरचा संवादच टाकला आणि घराची शांती बिघडली.
या सर्व घटनांच्या मूळ कारणाचा संबंध झोपेच्या घडय़ाळाशी आहे. रंजनचे झोपेचे घडय़ाळ आणि समाजाचे घडय़ाळ यांच्यात तफावत असल्याने एकावर एक घटना घडत गेल्या आणि त्यांची परिणती ही सबंध कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्यात झाली. हे क्रमवार कसे घडले? हे समजण्याअगोदर झोपेचे घडय़ाळ (सर्केडियन क्लॉक) म्हणजे काय? आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी त्याचा किती निकट संबंध आहे? याची माहिती करून घेऊयात.
विशिष्ट वेळेला येणारी जाग अथवा झोप, ठरावीक वेळेला भूक लागणे, उत्साह वाटणे वगरे घटना आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत. या घटना आगंतुक (रँडम) नसतात. निसर्गाने आपल्या पेशी पेशींमध्ये खरोखरीच एक घडय़ाळ दिलेले आहे. हे घडय़ाळ इतके पुरातन आहे की माणसांमध्येच नव्हे तर पशू-पक्षी, वनस्पती आणि अगदी जिवाणूंमध्ये(बॅक्टेरिया)सुद्धा हे घडय़ाळ आहे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती असलेल्या ज्ञानी ऋषींनी याचे महत्त्व ओळखले होते. ‘दिनचर्या’ क्रमबद्ध असावी आणि निसर्गाशी जुळते घेणारी असावी, अशी अनेक विधाने अथर्ववेदात आढळतात.
आयुर्वेदात या क्रमबद्धतेचे आणि पर्यायाने घडय़ाळाचे उत्तम वर्णन आहे. सकाळी ६ ते १० पर्यंतची वेळ ही कफप्रधान मानली गेली आहे. या वेळात स्नायूंची शक्ती वाढलेली असते, त्यामुळे ही व्यायामाची उत्तम वेळ. त्यानंतर म्हणजे १० ते २ ही वेळ पित्तप्रधान मानली गेली आहे. अन्न पचनाकरिता ही उत्तम वेळ आहे. २ ते ६ विशेषत: ही वेळ वाताची असून या काळात बौद्धिक क्रिया आणि सायंकाळी ५ ते ६च्या दरम्यान ध्यान करावे असे सांगितले आहे. संध्याकाळी ७ ते रात्री १० ही परत कफप्रधान वेळ असून पचनाची शक्ती क्षीण होत जाते. या कारणासाठी आयुर्वेदात अतिरिक्त भोजन करू नये (या वेळेमध्ये) असे प्रतिपादन आहे. रात्री १० ते पहाटे २ ही पित्ताची वेळ आहे. यात यकृत (लिव्हर) अधिक प्रमाणात उत्तेजित होते. शरीरातील अनेक अपद्रव्यांचे पचन करणे हे त्याचे काम चालू असते. सातत्याने या वेळामध्ये जेवण केल्यास यकृताच्या कामामध्ये अडथळा येऊ शकतो. अर्थात इतके उत्तम विवरण असूनदेखील पाश्चात्त्य देशांच्या पुस्तकांमध्ये हे घडय़ाळ आणि ही लयबद्धता (रिदम) पहिले नोंदवण्याचे श्रेय मात्र इसवी सनपूर्व चौथ्या शतकात असलेल्या अ‍ॅलेक्झांडर द ग्रेट याच्या नाविकदलाचा कप्तान ‘अ‍ॅड्रोस्थेनिस’ यास देण्यात येते. त्याने चिंचेच्या झाडाच्या पानांचे रात्र आणि दिवस असणाऱ्या अवस्थेचे वर्णन केले आहे. अर्थात याबद्दल पाश्चत्त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. आपण स्वत: किती गोष्टी सोडून देतो. उदा. पृथ्वी गोल आहे हे म्हणे सर्वप्रथम युरोपमध्ये (ग्रीसमध्ये इसवी सनपूर्व ६व्या शतकात) मांडले गेले. उपनिषदानंतर आलेली पुराणे आहेत. त्यातील वराह अवतारात ‘पृथ्वी गोल’ वराहाने आपल्या सुळ्यांनी उचलून धरला आहे. म्हणजे पृथ्वीचा आकार स्फेरिकल (गोल) आहे हे अगोदरच सांगितले गेले आहे. असो.
अर्थात निसर्गात असलेली ही लयबद्धता आणि त्यामागे असलेले घडय़ाळ यावरचा पहिला शास्त्रीय प्रयोग फ्रेंच शास्त्रज्ञ ‘मैरान’ याने १७२९ साली केला. त्याने लाजाळूचे झाड चोवीस तास अंधारात ठेवून हे दाखवून दिले की, लाजाळूच्या पानांची उघडझाप ही सूर्यावर अवलंबून नाही. एका विशिष्ट वेळेला ही पाने मिटतात आणि उघडतात. त्यानंतर १९२८ साली झीमानस्की या शास्त्रज्ञाने प्राण्यांमध्येदेखील असेच आंतरिक घडय़ाळ असल्याचे दाखवले.
माणसांमध्ये हे आंतरिक घडय़ाळ असते हे दाखविण्याकरिता नॅथेनियल क्लीटमॅन हा प्राध्यापक तब्बल ३२ दिवस गुहेत राहिला. त्या वेळामध्ये सूर्यप्रकाश, इतर मनुष्य आणि बाहेरील वेळ यांचा काहीही संपर्क नव्हता. शरीराचे तापमान, भुकेची वेळ, जाग/झोपेची आवर्तने, लघवीच्या वेळा आणि रक्त तपासण्या त्याने केल्या. संशोधनाकरिता असलेली इतकी तीव्र उत्सुकता बघून मन थक्क होते. या संशोधनामध्ये आणि इतर शास्त्रज्ञांच्या शोधानुसार मनुष्याचे घडय़ाळ हे २४ तासांचे नसून थोडेसे अधिक (२४.४) तास असते हे आढळले. १९५० मध्ये फ्रांझ हालबर्गने या घडय़ाळाला सर्केडियन (सर्का = सर्का मराठीत इतुका असे नाव दिले. ड्रियन = दिवस )याला आपण मराठीत ‘दैनिक लय’ असे म्हणू या. आपल्या सर्वसामान्य आयुष्यात ते २४ तासांचे बनते याला काही बाह्य़ गोष्टी कारणीभूत आहेत.
अर्थात या घडय़ाळाला स्वत:ची अशी लय जरी असली तरी काही गोष्टींचा परिणाम मात्र या घडय़ाळाच्या लयीवर होतो. सूर्यप्रकाश/अंधार, खाण्याची क्रिया, सामाजिक बंधने आणि व्यायाम यांचा उतरत्या भाजणीने परिणाम होतो. म्हणजे ‘सूर्यप्रकाश’ हा सगळ्यात जास्त परिणाम करतो. आणखीन एक विशेष म्हणजे या गोष्टींचा परिणाम एका विशिष्ट वेळामध्येच होतो. म्हणजे प्रकाशाचा परिणाम होण्याची वेळ ठरलेली आहे. चोवीस तासांतील इतर वेळेला या प्रकाशाचा सुतरामदेखील परिणाम या घडय़ाळावर होणार नाही. या माहितीचा वापर या घडय़ाळाची वेळ बदलण्याकरिता होतो हे आपण पुढे पाहू या.
आपण परत रंजनच्या गोष्टीकडे वळू या. वास्तविक पाहता रंजनचे घडय़ाळ हे थोडेसे पाठी होते. म्हणजे त्याच्या घडय़ाळाप्रमाणे झोपण्याची वेळच मुळी रात्री दोनची होती. इतर कुटुंबीयांची वेळ अकराची असली, तरी हे घडय़ाळ रंजनला रात्री अकरा वाजता आणखीन उत्तेजन द्यायचे. मध्यरात्री तर त्यांच्या कल्पनाशक्तीला बहर यायचा. ही सगळी प्रक्रिया त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी (म्हणजे नववीत असताना) सुरू झाली. दहा वाजता झोप येणारा रंजन हळूहळू उशिरात-उशिरा झोपू लागला होता. दहावीला जास्त अभ्यासाचे निमित्त झाले आणि झोपेची वेळ मध्यरात्रीनंतर गेली. जसे वय वाढत गेले तसा ‘निशाचर’पणा कमी होण्यापेक्षा वाढतच गेला. अर्थात हे घडय़ाळ रात्री जागे ठेवते, पण मग सकाळी उठायला (विशिष्ट वेळेआधी) प्रचंड विरोध करते! नेमकी कॉलेजची वेळ सकाळची असल्याने आणि लंडनमध्ये एकंदरीत सूर्यप्रकाशाची कमी असल्याने रंजनची पंचाईत व्हायची. इच्छा असूनही लेक्चर्समध्ये मेंदूभोवती एक प्रकारचे सावट असायचे, त्यामुळे लक्ष केंद्रित करायला अवघड जायचे. परिणामी बुद्धिमत्ता असूनही विषयात रस निर्माण झाला नाही. उत्तम अभ्यासक्रमात केवळ हुशारी असून चालत नाही तर विषयाची आवड असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. यामुळे ग्रेडस् कमी मिळाल्या. अशा रीतीने आत्मविश्वासाला तडा गेला आणि रंजन परतला. आई-बाबा आणि नातेवाईक मंडळींना रात्रीच्या जागण्याचे मूळ कारण हे इलेक्ट्रॉनिक मीडिया असे वाटले. तो एक परिपाक (फॉल आऊट) होता. अर्थात त्यामुळे मूळ कारणाला अधिक पुष्टी मिळत होती हे नि:संशय पण उपाय हा प्रथम मूळ कारणावर (घडय़ाळावर) आणि मग अनुषंगाने इतर परिणामांवर करणे उचीत.
हे उपाय कोणते? शिवाय या घडय़ाळाबद्दलची जास्त माहिती (उदा. पौगंडावस्थेतच हे घडय़ाळ का उशिरा वेळ देते वगरे) पुढील (१९ जुलै) लेखात..
(लेखातील व्यक्तींची नावे बदललेली आहेत)