‘‘एवढय़ा कमी वयात मुख्यमंत्री बनण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य! वडिलांची प्रतिमा व इतर मोठय़ा माणसांच्या संस्काराचा आज माझ्या राजकीय वाटचालीत उपयोग होतो आहे. अटलजी, लालकृष्ण अडवाणीजी तसेच भाजपच्या अनेक मोठय़ा नेत्यांना जवळून पाहता आलं. त्यांच्या वागणुकीमधून खूप काही शिकता आलं. त्यातूनच मी घडत गेलो.. वॉर्ड अध्यक्ष, नागपूर युवा भाजप अध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भाजप महामंत्री, प्रदेश अध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री हा सारा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. वयाच्या ४४ वर्षी मुख्यमंत्री बनेन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.. माझ्यावरील जबाबदारीचीही मला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच मुख्यमंत्री बनल्यानंतर शेती आणि उद्योगाच्या विकासाचं सूत्र निश्चित केलंय.’’ आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वळणवाटांचा प्रवास.

पाच वर्षांचा असेन तेव्हा, आणीबाणीचा काळ होता. एक दिवस वडिलांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात टाकलं. घरातलं वातावरणच बदललं. फारसं काही समजत नसलं तरी सरकार नावाच्या यंत्रणेनं आणि कोणी तरी इंदिरा गांधी यांच्यामुळे वडिलांना कोणतीही चूक नसताना तुरुंगात जावं लागलं एवढंच कळलं.. तेव्हा सरकारविरोधात एक चीड निर्माण झाली. गांधींनी माझ्या वडिलांना तुरुंगात टाकलं, त्या नावाच्या शाळेतही जाणार नाही असे म्हणून इंदिरा कॉन्व्हेंट शाळेत होतो, तेथे आता जाणार नाही, असं घरच्यांना ठामपणं सांगितलं आणि माझा प्रवेश सरस्वती शाळेत झाला..
वडील गंगाधरराव हे जनसंघात, पुढे भारतीय जनता पक्षात होते. काकूही (शोभाताई फडणवीस) राजकारणात असल्यामुळं घरात राजकीय वातावरण होतं. राजकारण हे समाजाच्या भल्यासाठी करायचं असतं हे बाळकडू लहानपणीच मिळालं. वडिलांच्या कामाची छाप माझ्यावर आजही आहे व पुढेही राहील. त्यांचा जनसंपर्क अफाट होता. तत्त्वनिष्ठ जीवन जगण्याची त्यांची वृत्ती, मूल्यांवरील श्रद्धा ही माझ्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थानं गुरुकिल्ली ठरली. त्यांच्या अफाट जनसंपर्काचा अनुभव मी प्रत्यक्ष राजकारणात आल्यानंतर वेळोवेळी आला. विदर्भ-मराठवाडय़ात पक्षाच्या कामासाठी जेव्हा कोठे गेलो तेव्हा अनेक जण वडिलांनी केलेल्या मार्गदर्शन व मदतीचा आवर्जून उल्लेख करायचे. खरं तर विरोधी पक्षात असूनही त्यांनी उभा केलेला जनसंपर्क हे त्यांच्या संवेदनशील राजकारणाचं द्योतक म्हणावं लागेल. वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. कार्यकर्त्यांशी, वरिष्ठांशी तसंच सर्वसामान्यांशी कसं वागावं याचा एक वस्तुपाठच त्यांनी घालून दिला होता. मी सतरा-अठरा वर्षांचा असताना त्यांचं कर्करोगाने निधन झालं. ते राजकारणात असल्यामुळंच समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आलं. राजकारण व समाजकारणातील खऱ्या अर्थानं मोठय़ा असलेल्यांचं वागणं-बोलणं समजून घेता आलं. यातून जे संस्कार माझ्यावर झाले तसेच या महनीय व्यक्तींमुळे जे विचारधन मला लाभलं त्याचा सर्वार्थानं उपयोग आजच्या राजकीय वाटचालीत मला होत आहे.
तशी माझी राजकीय वाटचाल महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झाली. बारावीनंतर नागपूरच्या विधि महाविद्यालयात पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पहिल्या वर्षीच ‘जीएस’ची निवडणूक पॅनल टाकून लढवली. या निवडणुकीत पराभव झाला तरी खूप काही शिकायला मिळालं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवली. एक विश्वास यातून निर्माण होण्यास मदत झाली. तेव्हा महाविद्यालयीन विश्वात काँग्रेसप्रणीत ‘एनएसयूआय’चा मोठा दबदबा होता. त्याला आव्हान देण्यात आम्ही यशस्वी झालो. १९८८-८९ च्या सुमारास मला भाजपचं काम करण्यास सांगण्यात आलं. खरं तर तेव्हा राजकारणात जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. विद्यार्थी संघटनेत राहून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरच काम करायचं होतं. तथापि भाजपचं काम करण्याची जबाबदारी पडली आणि वॉर्ड अध्यक्ष म्हणून राजकीय वाटचालीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. १९९१च्या सुमारास महापालिका निवडणुका जाहीर झाल्या. मला निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं. मी २१ वर्षांचा झालो नसल्यानं निवडणूक कशी लढायची हा प्रश्नच होता. पण ७४ व्या घटनादुरुस्तीमुळे निवडणूक सहा महिने लांबली आणि मी २१ वर्षांचा झाल्यामुळे निवडणूक लढविण्याचा मार्गही मोकळा झाला. नगरसेवक म्हणून मी विजयी झालो. पुन्हा दुसऱ्या वेळीही नगरसेवक म्हणून मोठय़ा मतांनी निवडून आलो.
त्याच वर्षी महापौरपदी माझी निवड करण्यात आली. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा तरुण महापौर ठरलो. महापौरपदाची मुदत संपत असतानाच राज्यातील युती सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘मेयर इन कौन्सिल’ (महापौर परिषद) पद्धत लागू केली आणि पुन्हा दुसऱ्यांदा ‘मेयर इन कौन्सिल’चा महापौर म्हणून मला संधी मिळाली. नगरसेवक ते महापौरपदाच्या कालावधीत नागपूर शहरात अनेक चांगली कामं करता आली. दरम्यानच्या काळात जोशी पदावरून गेले आणि नारायण राणे मुख्यमंत्री बनले. त्यांनी महापौर परिषद पद्धत बंद करून टाकली. त्याच सुमारास जर्मनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी जाण्याची संधी मिळाली, बर्लिन येथे घेतलेल्या या शिक्षणाचा मला आता खूपच फायदा होत आहे.
जर्मन सरकारची एजन्सी जीटीझेड यांनी जेव्हा मला सांगितले की आम्ही तुमची निवड या डिप्लोमाकरिता केली आहे तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुमचा हा ट्रेनिंग डिप्लोमा उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांकरिता आहे. मग माझी निवड का करता? त्यांचे उत्तर प्रोत्साहन वाढवणारे होते. त्यांनी सांगितले की आम्हाला वाटते की तुम्हाला व्हिजन आहे आणि विकासाच्या क्षेत्रात खूप मोठे भवितव्य आहे. त्यामुळे तुमची निवड केली. या कोर्समध्ये १६ देशांचे उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी होते आणि मी एकटाच वेगळा होतो.
खरं तर तो काळ महाराष्ट्रात आणि देशात खूप संक्रमणाचा होता. इंटरनेटवर रोज बातम्या वाचायचो आणि अस्वस्थ व्हायचो, पण त्या कोर्समुळे जे ट्रेिनग आणि एक्सपोजर मिळत होते तेही खूपच महत्त्वाचे होते. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून प्रोजेक्ट करायचा होता. त्यावेळी मी ‘कम्युनिटी पार्टििसपेशन इन टॉयलेट बििल्डग फॉर मेकिंग सिटीज् ओपन डेसिकेशन फ्री’ या विषयावर प्रोजेक्ट तयार केला. मी जेव्हा तो वर्गात सादर करायचो त्यावेळी वर्गातले इतर माझी मस्करी करायचे. पण माझ्या प्रशिक्षकांनी सरतेशेवटी त्या प्रोजेक्टची खूप प्रशंसा केली.
नागपूरच्या विधि महाविद्यालयानंही मला बरंच काही दिलं. तसा मी हुशार विद्यार्थी नव्हतो. परंतु विषयाची समज आणि आकलन मला पटकन होते, त्यामुळे कमी अभ्यास करूनही चांगले गुण मिळायचे. ‘लॉ’मध्ये मेरिटला आलो तेव्हा पदवीदान समारंभात तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते पदक मिळाले होते.
वडिलांचा आणीबाणीतील तुरुंगवास ते माझं महाविद्यालयीन जीवन या दरम्यान आयुष्याचं सत्य मला उलगडू लागलं.. लोकांसाठी काम करण्यात एक वेगळाच आनंद असतो हे अनुभवायला येऊ लागलं. खरं तर ते दिवसच वेगळे होते. मी दहा-बारा वर्षांचा असेन तेव्हाची गोष्ट.. नागपूरमध्ये भाजपचं अधिवेशन होतं. आमच्या घरात कार्यकर्त्यांचा राबता असायचा. मला अटलबिहारी वायपेयींबद्दल कमालीचा आदर व आकर्षण होतं. त्यामुळे त्यांना भेटण्याविषयी वडिलांना गळ घातली. त्यांनी ‘बघू’ असं उत्तर दिलं. त्यामुळे प्रमोदजींना विनंती केली. नागपूरला आले की प्रमोदजी आमच्याच घरी उतरत. वाजपेयीजींना भेटायचं आहे, असं सांगताच त्यांनी मला व माझ्या भावाला थेट त्यांच्याकडंच नेलं. त्याच वेळी नेमके वडीलही तेथे आले. आम्हाला तेथे फोटो काढताना पाहून ते चकित झाले. वाजपेयीजींनी आम्हा दोघा भावांच्या खांद्यावर हात ठेवून वडिलांना म्हटलं, ‘गंगाधरजी आपके दोनो बेटे शेर है.’ अटलजींची आणखी एक आठवण आहे. पहिल्यांदा आमदार झालो त्या सुमारास मी विवेक रानडे या आर्टीस्ट मित्राच्या आग्रहास्तव एका कपडय़ांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंगही केलं होतं. एका दूरचित्रवाणी वाहिनीवर याची माहिती झळकली. तेव्हा अटलजींनी मला दिल्लीला बोलावून घेतलं. खरं तर मी खूपच घाबरलो होतो. त्याच अस्वस्थ अवस्थेत त्यांच्याकडे गेलो, पण त्यांनी त्याचंही कौतुक केलं. माझ्या पाठीवर हात ठेवून ‘आओ मॉडेल एमएलए’ म्हणत दाद दिली. अटलजी, लालकृष्ण अडवाणीजी तसेच भाजपच्या अनेक मोठय़ा नेत्यांना जवळून पाहता आलं. त्यांच्या वागणुकीमधून खूप काही शिकता आलं. त्यातूनच मी घडत गेलो.. वॉर्ड अध्यक्ष, नागपूर युवा भाजप अध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भाजप महामंत्री, प्रदेश अध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री हा सारा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. वयाच्या ४४ वर्षी मुख्यमंत्री बनेन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
त्याच दरम्यान मी भारतात परत आलो आणि भाजपचं काम सुरू केलं. नंतर महिनाभरातच लोकसभा व विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. तेव्हा पश्चिम नागपूरमधील आमच्या आमदारांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आणि मला विधानसभा निवडणूक लढविण्यास सांगण्यात आलं. मी ब्राह्मण समाजाचा तर मतदारसंघ ओबीसीबहुल त्यामुळे मी निवडणुकीत जिंकणार नाही, असं काहींचं म्हणणं होतं. परंतु सर्वात जास्त मतं घेऊन मी विजयी झालो. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना आक्रमक व अभ्यास करून सभागृहात बोलण्यावर भर दिला. १९९९ मध्ये ‘गुगल’चा फारसा वापर होत नसे. तेव्हा विधिमंडळाच्या ग्रंथालयात जाऊन कसून वाचन केलं. वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी जुने संदर्भ तपासू लागलो. एखाद्या विधेयकावर बोलायचं असल्यास त्या संदर्भातील किमान दहा दहा पुस्तके वाचून काढी. अनुभवी ज्येष्ठ सदस्यांकडून विषय जाणून घेतले. या साऱ्याचा फायदा आज होत आहे. आमदार म्हणून योग्य प्रकारे पाठपुरावा केल्यास मतदारसंघासह वेगवेगळे प्रश्न सोडविता येतात याचा अनुभव आला. ओबीसींचा प्रश्न असाच पाठपुरावा करून सोडविला होता. २००४ मध्ये पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविली. या वेळी माझ्याविरोधात रणजित देशमुख उभे होते. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं असे ते तगडे उमेदवार होते. मात्र दुप्पट मतांनी मी विजयी झालो. दुसऱ्या वेळी निवडून आल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षाचा आमदार म्हणून चोख भूमिका बजावली. सत्ताधाऱ्यांवर आक्रमकपणे हल्ले केले.
अर्थशास्त्राचा अभ्यासही मला खूप उपयोगी पडला. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संपर्क साधून विषय समजून घेऊ लागलो. शेती, उद्योगासह राज्याच्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास तर केलाच, शिवाय माझ्या कार्यालयात त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली. केंद्र-राज्य संदर्भातील विषय तसेच जागतिक बँकेशी निगडित विषयांचा अभ्यास करू लागलो. यातूनच उत्कृष्ट संसदपटूसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. खरं तर आजही मला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाकडून मी काही तरी शिकत असतो. प्रमोद महाजन यांना नुसतं ऐकणं ही सुद्धा एक वेगळाच आनंद देणारी गोष्ट! कोणताही विषय संगतवार व सोपा करून कसा सांगायचा ते त्यांच्याकडून शिकायला मिळालं. विरोधकांवर न घाबरता कसा थेट हल्ला चढवायचा असतो हे गोपीनाथरावांकडून शिकलो तर विपरीत परिस्थितीत संघर्ष कसा करायचा ते नितीनजींमुळे समजू शकलं.
माझ्या आयुष्यातला आणखी एक टप्पा म्हणजे प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी माझं नाव पुढे येणं. माझ्या मनातही नव्हतं ते, परंतु गोपीनाथ मुंडे यांनी तू अध्यक्ष हो, असं सांगितलं. भाजपला आक्रमक आणि तडजोड न करणारा चेहरा हवा आहे, तो तू देऊ शकतोस, असं गोपीनाथराव म्हणाले. तेव्हा मला नितीन गडकरी यांच्याशी प्रथम बोलू दे, तुम्हा दोघांची इच्छा असेल तरच अध्यक्षपद हवं अन्यथा नको, अशी भूमिका मी मांडली. गडकरी यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले, देवेंद्र, तुझा स्वभाव सरळ आहे तेव्हा तुला जास्त त्रास होईल, हे लक्षात ठेव. त्यानंतर गडकरी यांनीच पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी बोलणं केलं. राजनाथ सिंह मला पूर्वीपासून चांगले ओळखत होते. २००७ साली मला भारतीय युवा मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्याच्या विचारात राजनाथ सिंह होते. तथापि मला महाराष्ट्राच्या विषयात रास्त रस असल्यामुळे तो विषय मागे पडला. नितीनजी व राजनाथ सिंह यांचं बोलणं झाल्यानंतर माझी रीतसर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी तसेच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागल्या. या काळात नरेंद्र मोदींना भेटलो. लोकसभा निवडणुका या तुमच्या नावे होतील, ही माझी भूमिका त्यांना सांगितली. खरं तर राज्यात ४२ जागा मिळतील, असा अंदाज त्या वेळी कोणालाच नव्हता. परंतु परिस्थिती अशी होती की मोदीजी जेथे हात ठेवतील तो उमेदवार विजयी होणार, असं चित्र होतं आणि झालंही तसंच.
प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनेकदा फिरायला मिळालं. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांची प्रत्येक कृती हा एक संदेश असतो. ते बिनअर्थाचं काहीच करत नाहीत. परिस्थितीचं आकलन करण्याची त्यांची ताकद असामान्य म्हणावी लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले. गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री बनतील हेच डोक्यात होते. युती तुटेल असं कधी वाटलं नाही. दुर्दैवानं युती तुटली. दोन-चार जागांच्या मुद्दय़ावर युती तुटली याचं मला दु:ख आहे. त्याच वेळी ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा सुरू झाली. यामुळे मी अस्वस्थ झालो. एक दिवस गोपीनाथ मुंडेंना भेटून यात गडबड असल्याचं सांगितलं. माझ्याकडे भरपूर वेळ आहे. वय आहे. तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, मला त्याची आकांक्षा नाही, असं स्पष्ट केलं. मुंडेसाहेब खरे दिलदार स्वभावाचे. ते म्हणाले, ‘तुझ्यात क्षमता आहे.’ मुंडेसाहेब केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी घरी गेलो तेव्हा त्यांनी अत्यंत प्रेमाने मिठी मारली. ते आज आपल्यात नाहीत हे दुर्दैव..
नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला. युतीच्या जागावाटपाच्या बैठकीतून मार्ग निघत नव्हता. अशा वेळी अमित शहा पाठीशी ठामपणे उभे राहिले. जो निर्णय तुम्ही घ्याल त्याला माझे समर्थन असेल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. युती तुटल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले. अनेक ठिकाणी लढण्याची आम्ही तयारी केली नव्हती. अमितभाईंनी निवडणुकीदरम्यान मुंबईत मुक्काम ठोकला. नियोजनाची सारी जबाबदारी घेतली. बॅकअपची उत्तम तयारी केली. त्यांच्याकडे असलेले राजकीय आकलन व निर्णयक्षमतेचा प्रचंड फायदा विधानसभा निवडणुकीत झाला. एकीकडे मोदींजींनी सभा घेऊन वातावरण तापवलं तर दुसरीकडे अमितभाईंनी नियोजनामध्ये सुसूत्रता आणली. प्रचाराच्या दरम्यान मोदीजी व अमितभाई हे मला ‘प्रोजेक्ट’ करत असल्याचं जाणवलं. मात्र मुख्यमंत्री मीच होईन असं वाटलं नव्हतं. दरम्यानच्या काळात माध्यमांनी मुख्यमंत्री कोण, यावर बरंच लेखन केलं. या साऱ्यात काय होणार याचा मला पूर्ण अंदाज आला. राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून एकमतानं निवड झाली. सत्तास्थापनेच्या निर्णयापासूनच शिवसेनेनं सत्तेत यावं यासाठी प्रयत्न केला. त्यांनी विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळात आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर पुन्हा चर्चा सुरू होऊन शिवसेनेनं सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना सत्तेत आल्यामुळे एक प्रकारे स्थैर्य निर्माण झालं.
एवढय़ा कमी वयात मुख्यमंत्री बनण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य! त्याचबरोबर माझ्यावरील जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बनल्यानंतर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून राज्याच्या विकासासाठी प्राधान्यक्रम निश्चित केला. शेती आणि उद्योगाच्या विकासाचं सूत्र निश्चित केलं. शेतीसाठी पाणी, वीज आणि यांत्रिकीकरणाची गरज आहे. राज्यातील केवळ १८ टक्के शेती ही शाश्वत पाण्यावर चालते तर ८२ टक्के शेती कोरडवाहू आहे. यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आगामी काळात किमान ४० टक्केशेती ही शाश्वत पाण्यावर झालेली दिसेल. तसेच देशातील पन्नास टक्के लोकसंख्या ही २५ वर्षांखालील आहे. त्याचा विचार केल्यास भारत हा जगात सर्वात तरुण वयाचा म्हणावा लागेल. याचा विचार केल्यास उद्योगांना प्राधान्य देत महाराष्ट्र हा ‘मॅन्युफॅक्चिरग हब’ बनविण्यावर भर दिला आहे. एके काळी युरोपात वस्तू तयार होत. पुढे कामगारांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्पादन होऊ लागलं. यापुढे भारतात मोठय़ा प्रमाणात उत्पादन होण्यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांची पुढची पिढी शिकल्यामुळे शेतीपेक्षा नोकरी व उद्योगात येण्याचं वाढतं प्रमाणही यासाठी लक्षात घेण्यात आलंय. उद्योग वाढवायचा असल्यास चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे. मुंबई ते नागपूर असा कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वे बनविण्यात येणार आहे. ऑप्टिक फायबरचं जाळं यासाठी टाकण्यात येणार असून या सुपर एक्स्प्रेस वेमुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकण एकमेकांना जोडले जाणार आहेत. स्वच्छ व पारदर्शक कारभार ही केवळ घोषणा नसेल तर ते एक वास्तव असल्याचं दिसून येईल. अधिकाऱ्यांना जनतेची कामे वेळेतच करावी लागतील. कामांच्या दर्जात कोठेही तडजोड होऊ दिली जाणार नाही.
माझ्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचा खूप मोठा पगडा आहे. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना मी विस्मयचकित होतो. ही इतकी विलक्षण व्यक्तिमत्त्वे आहेत की त्यांच्या जीवनातून प्रचंड प्रेरणा मिळते. लहानपणापासून माझ्या मनावर एक गोष्ट कोरली गेली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून भगतसिंग-राजगुरू, चाफेकर व कान्हेरेपर्यंत अनेकांनी आपली आत्माहुती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अनेकांनी प्रचंड हालअपेष्टा सोसल्या त्या काय राजकारणी व सनदी अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करावा, आपल्या पुढच्या चार-पाच पिढय़ांचे कोटकल्याण करण्यासाठी नाही. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय कोणत्याही परिस्थितीत मी करणार नाही. ‘मी पैसे खाणार नाही आणि कोणाला खाऊ देणार नाही,’ अशी भूमिका घेऊन प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे केल्यास ती खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यलढय़ात बलिदान देणाऱ्यांना आदरांजली ठरेल तसेच महाराष्ट्रही खऱ्या अर्थाने सुजलाम्-सुफलाम् होईल. आपला स्वातंत्र्य दिवस आपण अधिक आनंदानं-समाधानानं साजरा करू.
शब्दांकन- संदीप आचार्य

‘‘माझ्यावरील जबाबदारीचीही मला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच मुख्यमंत्री झाल्यानंतर शेती आणि उद्योगाच्या विकासाचं सूत्र निश्चित केलंय. आगामी काळात किमान ४० टक्के शेती ही शाश्वत पाण्यावर झालेली दिसेल. सध्याच्या तरुण भारतासाठी उद्योगांना प्राधान्य देत महाराष्ट्र हा ‘मॅन्युफॅक्चिरग हब’ बनविण्यावर भर दिला आहे. उद्योग वाढवायचा असल्यास पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे. मुंबई ते नागपूर असा कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वे बनविण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकण एकमेकांना जोडले जाणार आहेत. स्वच्छ व पारदर्शक कारभार ही केवळ घोषणा नसेल तर एक वास्तव असल्याचं दिसून येईल.’’

शब्दांकन – संदीप आचार्य

sandeep.acharya@expressindia.com