मानसी जन्मत: कर्णबधिर… समोरच्या व्यक्तीच्या ओठांच्या हालचालीतून बोलणं ओळखणारी आणि स्वत:च्या घशाखालच्या कंपनांच्या स्पर्शाने शब्द उच्चारायला शिकणारी… कंपनांच्या जाणिवेतून सुरू झालेला तिचा प्रवास आज तिला अभियंता म्हणून स्वत:च्या पायावर उभा करता झाला. यामागे आहे, तिच्या आईची अतूट इच्छाशक्ती… उद्याच्या मातृदिनानिमित्ताने या दोघींच्या अथक परिश्रमाविषयी…

मुलीला लहानाचं मोठं करायचं, तिला शिकवायचं आणि आपल्याच हातानं शेवटी लग्न करून सासरी पाठवायचं! आपल्या मुलीला चांगला जोडीदार मिळावा, तिचं सासर तिला समजून घेणारं असावं, हे प्रत्येक आईवडिलांचं जसं स्वप्न असतं अगदी तसंच… किंबहुना, मानसीच्या बाबतीत थोडं जास्तच होतं. कारण माझी मानसी जन्मत:च १०५ टक्के कर्णबधिरत्व घेऊन जन्माला आली. आज ती हैदराबादच्या एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करते आहे. इतरांशी बोलताना कुणालाही तिच्या बहिरेपणाची किंचितही शंका येणार नाही असा संवाद साधते. हे जरी सत्य असलं तरी तिचं अपंगत्व नाकारता येत नाही. हे अपंगत्व कोण स्वीकारणार? असा प्रश्न मला नेहमी पडायचा.

मात्र ते घडलं. स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नाही, असं स्थळ मानसीला सांगून आलं. इंदापूरचे राजू सुधीर सपकाळ हे ‘नॉर्मल’ आहेत, कसलीही शारीरिक उणीव नसलेले. त्यांचं शिक्षण बी. कॉम असून ‘कोटक महिंद्रा बँके’त उपव्यवस्थापक पदावर काम करतात. लग्नापूर्वी अर्थातच मानसीचं तोपर्यंतचं संपूर्ण आयुष्य त्यांना सांगितलं होतंच, पण सपकाळ कुटुंबाने आनंदाने या विवाहास संमती दिली. मानसीचा विवाह १४ डिसेंबर २०२४ रोजी निश्चित झाला. आणि मला आकाश ठेंगणं झालं. विवाहाचा दिवस उजाडला… पाहुणे रावणे, मित्र मंडळी खूप गर्दी, सगळ्यांचा मानपान, ऊठ-बस यात मी हरवून गेले. लग्नघटिका जवळ आली, लग्नाचे विधी सुरू झाले… आणि माझ्या डोळ्यासमोर मात्र मानसीचा जन्म आणि नंतरचं आयुष्य तरळू लागलं…१० नोव्हेंबर १९९३ला मानसीचा जन्म झाला.

मानसी जन्मत:च कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या (११० डेसिबल)आवाजाला ‘बेरा टेस्ट’ला (श्रवण परीक्षण चाचणी) मानसीने प्रतिसाद दिला नाही. बहिरेपणाबरोबर ही मुलगी मुकीसुद्धा आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्यावर माझ्यावर तर आभाळच कोसळलं, विचाराने माझं डोकं बधिर झालं आणि आत्महत्येशिवाय मला कुठलाच पर्याय दिसत नव्हता, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पुण्याच्या के.ई.एम. रुग्णालयामध्ये अपंग असलेल्या मुलांना व पालकांना अपंगत्वावर मार्गदर्शन करणारे केंद्र होतं. त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती, खूप कर्जही होतं. तरीसुद्धा सोलापुरात काही सुविधा नसल्याने मी पुण्यात भाड्याने घर घेतलं. माझा भाऊ संग्राम, समीर आणि सुशीलने मला अनमोल सहकार्य केलं.

मानसीचं बहिरेपण १२० टक्के (म्हणजे ठार बहिरेपण) पर्यंत पोहोचलं नसल्याने १५ टक्क्यांची पुसटशी आशा शिल्लक होती. म्हणून परिस्थिती नसतानाही आम्ही ‘श्रवण यंत्र’ खरेदी केलं. त्याने तिला सरावाने फक्त आवाज ऐकू येणार होते. शब्द कधीच ऐकू येणार नव्हते. मशीनचे साचे कानात घातले की ती खूप रडायची. आणि तिच्या वेदना सहन न होऊन मीही. रोज अर्ध्या तासाच्या प्रशिक्षणामध्ये तिला समोरच्या व्यक्तीच्या ओठांची हालचाल पाहून बोललेला शब्द ओळखणं शिकवणं सुरू केलं. उच्चार करण्यासाठी मानसीचा एक हात माझ्या गळ्याखाली पालथा व तिचा दुसरा हात तिच्या स्वत:च्या गळ्याखाली पालथा घालून प्रत्येक शब्द सावकाश उच्चारून गळ्याखाली होणारी कंपनांची जाणीव तिला करून देणं सुरू केलं.

प्रत्येक वस्तूला स्वत:ची वेगवेगळी कंपनं असतात याची जाणीव करून देताना तिचा कंपनांच्या जाणिवेतून प्रवास सुरू झाला होता. कानाने अजिबात ऐकू येत नसल्याने कंपनांची जाणीव हेच तिचं इंद्रिय झालं होतं. तिला आपण बोललेले शब्द ओळखण्यासाठी माझ्या ओठांच्या बाजूला माझा फोटो धरून आ… ई… तसेच गाईचं चित्रं धरून हं…म्मा… असे शब्द मी सावकाश म्हणायची. असे दोनच शब्द चार-पाच दिवस म्हणून सराव केल्यावर ओठांची हालचाल तिच्या लक्षात राहायची. सकाळ, दुपार, संध्याकाळ मी तासन्तास मानसीला शिकवायचे. अशी शिकवणी सुरू असताना मानसीने तीन महिन्यांच्या प्रयत्नाने पहिला ‘आ’स्वर उच्चारला आणि माझा आनंद गगनात मावेना, तेव्हाच मी ठरवलं आता थांबायचं नाही.

पुण्यात प्रशिक्षणासाठीचे दोन महिने संपले नि मी सोलापूरला आले. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, ‘ऐ बहिरे बाजूला हो… हो की बाजूला’ असं दोन-तीनदा म्हणाले. मानसीला ऐकू येत नाही यात तिचा काय दोष? पण त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल… मी निर्धार केला, जणू पेटून उठले… त्या प्रसंगानंतर मी मानसीला शिकवण्याचा जणू ध्यासच घेतला.

पुण्याच्या प्रशिक्षणानंतर मुंबईच्या आग्रीपाडा येथील ‘सेंट्रल स्कूल फॉर द डेफ’ येथे प्राथमिक विद्यालयात तीन वर्षं भाषा शिक्षणासाठी घातलं. या शाळेत तिला घालून मीही तिथेच डी. एड्. केलं…तिथल्या शिक्षिकांनीही मेहनत घेतली. मुंबईसारख्या ठिकाणी काळाचौकी येथे एका चाळीत खोली भाड्याने घेऊन तिच्यासोबत तीन वर्षं एकटीने राहून काढली. कारण आर्थिक प्रश्न होताच. मानसीच्या बाबांना त्यांचं काम सोडून माझ्याबरोबर राहणं शक्य नव्हतं. माझा पाच वर्षांचा मुलगा निखिल आणि ते सोलापुरात राहिले. दोघांच्या आठवणींनी मी कित्येक रात्री जागून काढल्या.

पुणे आणि मुंबईच्या शाळेच्या संचालकांनी स्पष्ट सांगितलं होतं की मानसीचा बहिरेपणा जास्त असल्याने ती बोलू शकणार नाही. ‘प’, ‘फ’, ‘ब’, ‘भ’, ‘म’ हे वर्ण ओठांवर उच्चारले जातात. ‘फ’ हा शब्द उच्चारताना आपण हवा तोंडाद्वारे बाहेर फेकतो… ‘ट’, ‘ठ’, ‘ड’, ‘ढ’,‘ण’ हे वर्ण टाळूला जीभ उलटी मारून उच्चारतो. तर सर्वात कठीण उच्चार ‘क’, ‘ख’, ‘ग’, ‘घ’, घशात एकाच ठिकाणी उच्चारतो. या सर्वांचा अभ्यास करून मानसीला शिकवावं लागायचं. सुरुवातीला मानसी ज्या शब्दात वर्ण आहेत त्याऐवजी स्वर म्हणायची. उदा. पोपट-पोपअ किंवा पोबअ असं उच्चारायची. फुलं या शब्दाला ती फुअं, लाल ला ताअ म्हणायची. काही शब्दांना चित्रं, वस्तू दाखवू शकत नाही, तर ते शब्द शिकवण्याची पद्धत वेगळीच आहे…क, ख, ग, घ हे वर्ण तिला सहा वर्षांच्या सततच्या प्रयत्नाने उच्चार करता येऊ लागले.

आज समोर उभं राहून बोलणाऱ्या व्यक्तीशी ती उत्तम संवाद साधू शकते. मात्र या प्रयत्नात मला सतत तिच्याशी बोलत राहावं लागे. त्यामुळे माझ्या घशाला घर्षणाने तोंडाद्वारे रक्तही पडू लागलं. तासन् तास बसून पाठीचं दुखणंही वाढू लागलं. मुंबईतील धावपळ, गर्दी, पावसात कमरेएवढ्या पाण्यातून मानसी, मानसीचे व माझे दप्तर, सामान आणि छत्री घेऊन दगडी चाळ ते काळाचौकी केलेला पायी प्रवास. सोलापूर-मुंबई प्रवासातील अनुभवही भयंकर आहेत.

मुंबईत तीन वर्षं मानसीसाठी अपार मेहनत घेतली आणि सोलापुरात ‘ज्ञानप्रबोधिनी’ शाळेत या सामान्य मुलांच्या शाळेत तिने स्वबळावर प्रवेश मिळवला. ती पाचवीत गेली तेव्हा माझ्या दोन्ही डोळ्यांना एकाच वेळी मोतीबिंदू झाला. डोळ्यात ड्रॉप घालून डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करून चार महिने तिला सहा तास सलग शिकवलं. मग शस्त्रक्रिया केली. पहिली ते दहावी उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीच सुट्टी न घेता तिला पुढचा अभ्यास शिकवायचे. नुसता अभ्यास एके अभ्यास नको म्हणून मानसीला कथ्थकच्या क्लासला घातलं. त्यात ती तीन परीक्षा पास झाली व चित्रकलेच्या दोन परीक्षा तिने दिल्या. मानसीला स्वत:च्या जोरावर दहावीत कुठलीही सवलत न घेता संस्कृत, सेमी इंग्लिश घेऊन ८१ टक्के गुण मिळाले. दोघींची पंधरा वर्षांची तपश्चर्या फळाला आली. मानसीचे अपार कष्ट कारणी लागले.

मानसीने अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. पहिल्या वर्षाचा निकाल लागला तेव्हा तिच्या बरोबर शिकणारी तिची मैत्रीण दोन विषयांत नापास झाली होती. मेकॅनिकल विभागातील एका मुलाने नापास झाल्याने हॉस्टेलवर गळफास लावून घेतला. पण मानसी कायम प्रयत्न करत होती. इयत्ता पहिलीपासून तिला सर्व गोष्टी समजून घेऊन अभ्यास करायची सवय होती. शिवाय मी तिला पाठ्यपुस्तकातील शब्दन् शब्द सगळे धडे शिकवायचे. आता मी शिकवू शकत नव्हते…तांत्रिक शब्दांचे अर्थ तिला समजेना. त्यामुळे ती निराश झाली. तिने अभ्यास करायचं सोडून दिलं. खूप समजावून सांगून तिच्यात आत्मविश्वास निर्माण केल्यानंतर तिने परीक्षा दिली. आणिउत्तम गुण मिळवले. त्या वर्षी महाविद्यालयात १५ ऑगस्टचं झेंडावंदन करण्याचा मान मानसीला मिळाला.

मानसी पाचवीत असल्यापासून, ती शाळेत गेली की तीन दिवस मी समाजातील कर्णबधिर मुलांना शिकवायला सुरुवात केली. आतापर्यंत ४० मुलांना मानसीसारखं बोलायला शिकवलं आणि शिक्षणाचे धडेही देत आहे… मानसी इंजिनीयर झाली आणि माझं एक स्वप्न पूर्ण झालं. मानसीच्या या यशामुळे मला बरेच पुरस्कार मिळाले. मी बऱ्याच ठिकाणी व्याख्याने दिली. या अनुभवावर मी ‘मनी मानसी’ हे पुस्तक लिहिलं. सध्या माझ्या या पुस्तकाचं अभिवाचन यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. (https://youtube. com/@laybhariadakari?si=xZ4eouTaN59YPRO8) कर्णबधिर मुलांना व पालकांना अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शनाची गरज भासल्यास माझं स्वत:चंसुद्धा यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे.

… तेवढ्यात ‘शुभमंगल सावधान…’ शब्द माझ्या कानी पडले आणि मी भानावर आले. मानसीचं लग्न लागलं होतं. सर्व गोष्टी आनंदात पार पडल्या आणि मानसीच्या पाठवणीच्या वेळी माझ्या भावनांचा बांध फुटला… गेली तीस वर्षं सतत जिच्यासोबत माझ्या शरीराचा अवयव म्हणून मी राहिले, जगले. आज तोच अवयव माझ्यापासून वेगळा होत होता… पण ती आता स्वत:च्या पायावर उभी होती… त्याचं खूप समाधान होतं… तिचं वेगळं, स्वतंत्र आयुष्य सुरू झालं होतं…

urmila.agarkar162@gmail.com