मला एखाद्या गोष्टीची अत्यंत आवड असेल व त्या गोष्टीच्या आणि माझ्यामध्ये काही अडथळा आला की मनाची जी अवस्था होते तोच राग वा क्रोध. जे आवडीच्या गोष्टीबद्दल, तेच नावडत्या गोष्टीबद्दल. नेमकी तीच माझ्या वाटय़ाला आली तर मनाची जी स्थिती होते तोही रागच. क्रोधामुळे मनाची शांतता नाहीशी होते. आनंदाने जगण्यासाठी मन शांत असावं लागतं..

हिंदीमध्ये एक म्हण आहे : ‘पाँव गरम, पेट नरम, सिर हो जिसका ठंडा। डॉक्टर अगर आये, तो मारो उसको डंडा।’ लहानपणी प्रथम जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा बाकी काही कळलं नाही, पण डॉक्टरला डंडा मारायचा या कल्पनेनेच  मज्जा वाटली होती. याचं कारण म्हणजे लहानपणापासूनची डॉक्टरांबद्दलची भीती! इंजेक्शनची सुई आणि कडू औषधं यांचीही परतफेड करायची इच्छा असायची. असो. या म्हणीमध्ये डंडा शब्द ‘थंडा’ला यमक जुळतो म्हणून जरी वापरला असला तरी मथितार्थ इतकाच की डॉक्टरची गरज भासू नये.

rabies in marathi, how to prevent rabies in marathi, how to avoid rabies in marathi
Health Special : रेबीज होऊ नये म्हणून काय करावं?
Mom Finds Three Month Old Baby Rarest Cancer In Eyes By Mobile Flash Light What Are Signs Of Cancer Seen In Eyes Be Alert
मोबाईलचा फ्लॅश वापरून आईने बाळाला झालेला कॅन्सर ओळखला, काय होती लक्षणं, तुम्हीही काय काळजी घ्यावी?
Bitcoin Halving
बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?
have you ever eaten dancing bhel
Video : डान्सिंग भेळ खाल्ली का? भेळ विक्रेत्याचा मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

समाजात ज्या काही म्हणी प्रचलित असतात त्या अनेक वर्षांच्या निरीक्षणातून आणि अनुभवातून आलेलं सत्यच मांडत असतात. एखादा सार्वजनिक अनुभव/आशय फॉर्मुल्यासारखा आणि सहज लक्षात राहील व आठवेल अशा पद्धतीने एक-दोन ओळींत मांडलेला असतो. वरील ओळींमध्ये जो अनुभव मांडलेला आहे तो म्हणजे आरोग्याची त्रिसूत्रीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे ‘पाँव (पाय) गरम’ असले पाहिजेत. म्हणजे ताप आल्यासारखे गरम नाहीत तर हालचालीमुळे जे चांगले रक्ताभिसरण होते त्यामुळे गरम झालेलं अंग. दुसरी गोष्ट म्हणजे ‘पेट नरम’(मऊ)असलं पाहिजे. याचा अर्थ सात्त्विक आणि परिमित आहार. कारण कडक पोट हे पचनाचे विकार दर्शवते. तिसरं म्हणजे ‘सिर ठंडा’. डोकं शांत असलं पाहिजे. याचा अर्थ  विचारांचा समतोल असणे आणि आज आपण याच मुद्दय़ावर लक्ष केंद्रित करणार आहोत.

डोकं थंड, शांत असलं पाहिजे म्हणजे ते तापलेलं नसावं. डोके तापण्याचे मुख्य कारण म्हणजे क्रोध, राग किंवा संताप. या विकाराचा आविर्भाव झाल्याचं लगेच समजतं. चेहरा (डोळे, कानशीलं, नाक) लाल होणं, अंग कापायला लागणं, कपाळावर आठय़ा, नखे/दात खाणं वगैरे लक्षणांनी ओळखता येतं. आपण म्हणतोसुद्धा ‘त्याचं डोकं तापलंय’, ‘तो भडकलाय’ किंवा अधिक क्रोध असेल तर ‘तो पिसाळलाय’ वगैरे. ‘आता माझी सटकली’ याचा अर्थही ‘माझ्या विचारांचा तोल गेलेला आहे.’ हा नको असलेला क्रोध येतो तरी कुठून? वरवर पाहता काही तरी दृश्य कारण आपण ‘शोधतो’ आणि ‘याच्यामुळे मला राग आला’, ‘असं घडलं म्हणून माझा संताप झाला’ वगैरे कारणं पुढे करतो. पण जरा विचार केला तर असं दिसतं, की मला एखाद्या गोष्टीची अत्यंत आवड असेल व त्या गोष्टीच्या आणि माझ्यामध्ये काही अडथळा आला की मनाची जी अवस्था होते तीच राग/क्रोध. जे आवडीच्या गोष्टीबद्दल, तेच नावडत्या गोष्टीबद्दल. नेमकी तीच माझ्या वाटय़ाला आली तर मनाची जी स्थिती होते तोही रागच. आयुष्यात अशा गोष्टी तर सतत घडत असतात, त्यामुळे राग येण्याची जणू आपल्याला सवयच लागते.

अगदी लहानपणापासून याची सुरुवात होते. लहान मुलाला समज नसल्यामुळे त्याला दिसेल ती प्रत्येक गोष्ट हवी असते व ‘ते मला हवे’ म्हणून मागणी करतं. वस्तू नाही मिळाली की ते थयथयाट करतं. त्याच्या दृष्टीने दृश्य कारण म्हणणे ती वस्तू न देणारे आई-वडील. त्यांच्यावरच ते राग काढतं. बऱ्याच वेळा मुलं आई-वडिलांना मारायलाही कमी करत नाहीत असं पाहायला मिळतं. अशा वेळी (तात्पुरता उपाय म्हणून) पालक, केवळ त्या मुलाचं मोठमोठय़ाने ओरडणे थांबवावे म्हणून त्याला हवं ते देतात. त्यातून ते मूल त्याला हवं असलेला अर्थ काढतं व या युक्तीचा वापर वारंवार करायला लागतं. मुलाचं वय वाढत जातं आणि त्याची ती युक्ती कोणत्याही गोष्टीचा हट्ट पुरवून घेण्यात वापरली जाते. मग ती वस्तू पालकांना न परवडणारा मोबाइल असो किंवा वेळी-अवेळी पाहिजे तितका वेळ टीव्ही बघण्याची गोष्ट असो.

काही जणांच्या बाबतीत क्रोधाचं मूळ हे भीती, संशय यामध्ये असू शकते. संशयाचं पर्यवसान सूडबुद्धी, मत्सर वगैरेत होतं आणि मग पुढचं सगळं गणितच चुकतं. भीतीमुळेही क्रोध आतल्या आत धुमसत राहातो आणि योग्य वेळ आली की ज्वालामुखीसारखा स्फोट होऊन नको ती कृती होऊन जाते. परंतु मनाचा समतोल न बिघडेल एवढा क्रोध उपयोगीही पडू शकतो. उदाहरणच द्यायचं तर अग्नीचं देता येईल. घरामध्ये स्वयंपाक तयार करण्यास अग्नी मदत करतो. परंतु भडकलेला अग्नी घर जाळू शकतो. त्याचप्रमाणे जरुरीइतक्या क्रोधाला त्वेष म्हणतात. या त्वेषामुळे ‘मला हे जमतच नाही’ यासारख्या किंवा अनेक प्रकारच्या भीतीवर मात करता येते. त्वेषामुळे आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा चांगल्या कार्याकडे वळवता येते. देशभक्तांचा असा त्वेषच ब्रिटिशांविरुद्ध लढताना उपयोगी पडला. असं जर आहे तर असा त्वेषाच्या रूपातला क्रोध वाईट कसा म्हणावा? अस्मिता जपण्याइतका क्रोध जरूर वापरावा, परंतु अतिक्रोध हा घातकच. अहंकाराशी, मान-अपमानाच्या कल्पनेशी त्याचा थेट संबंध आहे.

अतिक्रोधामुळे शारीरिक आणि मानसिक विकार उद्भवतात. क्रोधाचा मेंदूशी अगदी जवळचा संबंध आहे. क्रोधामुळे रक्तदाब वाढून ताण वाढतो व मेंदूचे किंवा हृदयाचे विकार होऊ  शकतात. शरीरातल्या अ‍ॅड्रेनल ग्रंथीमधून अ‍ॅड्रेनलीन, नॉरअ‍ॅड्रेनलीनसारखी रासायनिक द्रव्ये स्रवली जातात. या द्रव्यांचं प्रमाण वाढत राहिलं की त्याचेही दुष्परिणाम दिसू लागतात. (ही प्रक्रिया खूपच मोठी आहे, आपण अगदी थोडक्यात पाहत आहोत.) अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे आपल्या शरीरातले अवयव आणि मनाच्या भावना यांचाही संबंध आहे. त्याला ‘ऑर्गन-इमोशन लिंक’ म्हणतात. त्यानुसार क्रोध या भावनेचा संबंध यकृताशी (लिव्हरशी) असतो. ‘रागाने पित्त खवळलं’ हा वाक्प्रचार हा संबंध दर्शवितो. म्हणूनच काही जणांचे क्रोधामुळे डोके दुखते, पोटाचे विकार जडतात, शरीरातील आम्लांचे प्रमाण जास्त होऊन अ‍ॅसिडिटी, पित्ताचे खडे, अल्सर वगैरे विकारही होऊ  शकतात. कारण क्रोध म्हणजे संताप. संताप म्हणजे दाह. सतत रागावणाऱ्या माणसाला रागीट म्हटले जाते (दाहक व्यक्तिमत्त्व) व अशा व्यक्तीपासून लोक चार हात लांब राहणंच पसंत करतात.

अशा अतिक्रोधावर उपाय कोणता? (उपाय शोधण्याअगोदर आपल्याला क्रोध कमी करायचाय याची प्रथम जाणीव व्हायला हवी.) आपण लेखाच्या सुरुवातीला पाहिलेच आहे की क्रोधाचं मूळ हे बरेचदा बालपणात असतं. लहानपणीची ‘दिसेल ती गोष्ट हवी आणि आताच हवी’ ही अजाणतेपणी लागलेली सवय मोठे झाल्यावर (म्हणजे समज आल्यावरही) जात नाही असं दिसतं. समोर दिसणाऱ्या किंवा दुसऱ्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला आवश्यकता असतेच असं नाही किंवा ती परवडेल असंही नाही. पण तो विचार येत नाही. (काही वेळा केवळ स्वत:चं महत्त्व वाढविण्याकरता किंवा दुसऱ्याशी स्पर्धा करण्याकरितासुद्धा अशा गोष्टींचा आपण हट्ट धरतो.) म्हणजेच ‘मी आणि माझे’पणा हा स्थायिभाव असणे आणि त्यात येणारा अडथळा अशा प्रकारच्या क्रोधाला कारणीभूत ठरतो असं वाटतं. आमच्या शेजारी एक काका राहायचे. ते म्हणायचे ‘यू मस्ट डिझव्‍‌र्ह, बिफोर यू डिझायर’. एखादी गोष्ट मला हवी आहे तर त्याची पात्रता माझ्या अंगी आहे का, मी त्याला खरंच लायक आहे का हा विचार प्रथम आला तर बऱ्याचशा गोष्टी आपण मागणारच नाही. आपण लहान मुलांनाही नेमके तेच सांगतो ना की, ‘बाळ हे तुझ्याकरता चांगलं नाही. त्याचा हट्ट करू नको’. वयाने मोठे होऊनही आपलं मन जेव्हा लहान मुलासारखं वागायला लागतं तेव्हा ‘त्या’ लहान मुलाला तेच सांगावं. क्रोधाचं प्रमाण कमी होईल. ताण वाढणार नाही, कारण व्यवहारात सारखं रागावून चालत नाही हे आपल्याला अनुभवावरून कळतं.

क्रोधावरचा एक सोपा उपाय म्हणजे दीर्घ श्वसन करणे, क्रोध भडकवणाऱ्या वातावरणापासून काही काळ बाजूला जाणे वगैरे. या गोष्टी स्थूल असल्या तरी त्यांचा उपयोग राग शांत करण्याकडे होतो आणि मनाला अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. आपण एवढे का रागावलो किंवा हे टाळण्यासाठी मी काय करू शकतो (प्रत्येकाचे कारण वेगळे असू शकते) याचा विचार करावा. योग्य अशा मार्गदर्शकांशी चर्चा करावी. जसं आग विझवण्यासाठी (थंड) पाणी वापरतात तसं क्रोधाग्नी शमविण्यासाठीही त्याच्या विरुद्ध असलेली उपाययोजना करायला हवी. यासाठी मनाला स्वत:हून शिक्षण द्यायला हवं. भूतकाळात होऊन गेलेल्या घटना विसरायला हव्यात. (कारण पूर्वी होऊन गेलेल्या घटनांची सतत उजळणी करण्याने आपल्याच मनावरचा ताण वाढतो.) त्या घटनांशी संबंधित व्यक्तींना (त्या कितीही चुकीच्या असल्या तरी) क्षमा करण्याने आपल्याच मनावरचा ताण खूप कमी होऊ  शकतो. यासाठी मनाची शक्ती वाढवावी लागते. या ठिकाणी मला विनोबांचे एक वचन आठवते. विनोबा म्हणतात, ‘‘विष्णुसहस्रनामाच्या पाठाने स्नान होते. मन धुतले जाते. ती एक विशेष अनुभूती आहे. पाण्याच्या सहस्रधारा मस्तकावर पडाव्यात तसा स्वच्छतेचा, उत्साहाचा अनुभव येतो.’’ हा चित्ताच्या शांतीचा अनुभव आहे असे मला वाटते. नामस्मरणाने चित्त शांत (‘सिर ठंडा’) होऊन क्रोध आतूनच शमला जातो आणि मग बुद्धीचा- सद्बुद्धीचा- उपयोग करून सारासारविचार (विवेक) करून परिस्थितीला योग्य अशी वर्तणूक सहजच होते. अनेक स्तोत्रांच्या/सूक्तांच्या फलश्रुतीतसुद्धा म्हटले आहे, ‘न क्रोधो, न च मात्र्सय, न लोभो न-अशुभा मति:’ (स्तोत्र पठणाने क्रोध, मत्सर, लोभ आणि दुर्बुद्धी उत्पन्न होत नाही). यामध्ये सर्वात प्रथम ‘न क्रोधो’ असे म्हटले आहे. कारण क्रोधामुळे मनाची शांतता नाहीशी होते. आनंदाने जगण्यासाठी मन शांत असावं लागतं. नाही तर भगवद्गीता म्हणते त्याप्रमाणे ‘अशान्तस्य कुत: सुखम्?’

अंजली श्रोत्रिय

health.myright@gmail.com