गीतेत कर्म हे स्वधर्माचरण या अर्थाने अभिप्रेत आहे. कर्मयोगाच्या मार्गाने जाऊन अंत:करण शुद्ध झालेला मानव आपोआप आपल्या आत्म्याचं ज्ञान करून घेतो आणि भगवत् प्राप्तीरूपी परम शांती मिळवतो. याउलट अविवेकी अश्रद्ध संशयी माणसाला मात्र इहलोक-परलोक कुठेच शांती मिळत नाही.

परमात्म्याचं सर्वव्यापक स्वरूप आणि त्याची कार्यपद्धती सांगून झाल्यावर गीता आपल्याला कर्माची गती किती गहन आहे आणि ती पूर्णपणे समजणं कसं कठीण आहे ते सांगते. असं का बरं असावं?
याचं उत्तर असं, की एकच कर्म वेगवेगळय़ा परिस्थितीत, विचारांत, दृष्टिकोनात पूर्णपणे विरुद्ध टोकाचे भाव-परिणाम निर्माण करतं. उदाहरणार्थ, सैनिकाने सीमेवर शत्रूला मारले की त्याला वीरचक्र मिळतं. याउलट एखाद्या सामान्य माणसाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर तो खून होतो- तर तुरुंगातला फाशी देण्याचं काम करणारा जेव्हा गुन्हेगाराला फाशी देऊन शिक्षा कृतीत उतरवतो तेव्हा तो त्याचं कर्तव्य करीत असतो. अशा तऱ्हेने, माणसाला मृत्यू देण्याचं एकच कर्म, पूर्णपणे त्यामागचा विचार, त्यामागील परिस्थिती यावर ठरवलं जातं. यात चांगलं कर्म, वाईट कर्म असा सरसकट शिक्का मारता येत नाही. कर्माची गती कशी गहन आहे हे यावरून लक्षात येईल.
असं असूनही गीतेत कर्माचे कर्म, विकर्म, अकर्म असे निरनिराळे प्रकार सांगितले आहेत. आपण खातो, पितो, झोपतो ही जरी कर्मेच असली तरी गीतेत कर्म हे स्वधर्माचरण या अर्थाने अभिप्रेत आहे. विकर्माचा ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलेला अर्थ म्हणजे ‘विशेष’ कर्म. विनोबाजी म्हणतात, ‘चित्तसंशोधनासाठी करावयाची कर्मे, बाह्य़ कर्मात चित्त ओतणे म्हणजे विकर्म! तर इतर काही तत्त्वचिंतक विकर्माला ‘विपरीत कर्म’ असंही म्हणतात. अकर्म शब्दाच्या अर्थातही फरक आढळतात. जे टाळावे किंवा करू नये ते अकर्म असा एक अर्थ. तर जे करूनही न केल्याइतके सहज, ज्याचा बोजा किंवा कष्ट वाटत नाही असे ते अकर्म- तर काही प्रत्यक्ष कर्म न घटता खूप काही केले जाते ते अकर्म असे वेगवेगळे अर्थ या शब्दांचे घेतले गेले आहेत. सूर्य उगवल्यावर सर्व सृष्टी जागृत होऊन कामाला लागते. इथे सूर्य काहीच करत नाही तरी प्रचंड कर्म होतं. त्याचं सहज अस्तित्वही खूप काही करून जातं. शाळेचं उदाहरण घ्यायचं झाल्यास शिक्षक वर्गात शिरल्यानंतर बराचसा वर्ग शांत होतो, पण काही मस्तीखोर मुलं खोडय़ा काढतच असतात. इतक्यात मुख्याध्यापक वर्गाच्या दाराबाहेर येऊन कुणाशी बोलत जरी उभे राहिले तरी ते मस्तीखोरही गप्प बसतात. मुख्याध्यापकांचं सहज बाहेर उभं राहणंही बरंच कार्य करतं. इथे अकर्मात कर्म घडतं. असे कर्माचे निरनिराळे प्रकार आहेत, पण तत्त्वचिंतकांच्या भिन्न-भिन्न मतांमुळे सामान्यजनांना यातला गोंधळ समजणं कठीणच जातं. या कर्म घोटाळय़ाने कर्माची गती अधिकच गहन होते.
आणखी एक कर्माचा प्रकार म्हणजे नैष्कम्र्य स्थिती. ही कर्मयोगातील उच्चतम स्थिती. तिथवर पोचणं हे सामान्य माणसाला कठीण असलं तरी साधक-सिद्ध अशा आध्यात्मिक मार्गाला लागलेल्यांनी तरी ते ध्येय समजून तिथे पोचलं पाहिजे. हे कसं जमवायचं? आतापर्यंत आपण अनेकदा पाहिलं, की कर्म तर करायचंच पण ते कामनाविरहित, फळाची आसक्ती सोडून, कर्तृत्वाचा अहंकार सोडून, मन ताब्यात ठेवून करायचं. असं केल्यावर ते सहज नकळतपणे होते. कर्माचे अकर्म होते. कर्मात अकर्म पाहणारा ज्ञानी योगी होय असं गीताच सांगते. अशी मानसिक उत्क्रांती मनात वैराग्य बाणवते. वैराग्य आलं की वासना कमी होतात. वासना कमी की गरजा कमी! गरजा कमी की कर्म कमी. मग नैष्कम्र्य स्थितीला पोचणे सोपे होते.
 कर्माच्या या प्रकारानंतर गीता ‘यज्ञकर्म’ याविषयी आपले विचार मांडते. जीवनातील प्रत्येक कर्म हा एक यज्ञ व्हावा, कारण यज्ञासाठी केलेली कर्मे परमेश्वराला अर्पण केली जातात. ‘इदं न मम’- हे माझे नाही असे उच्चारून परमेश्वरार्पण करणं म्हणजेच यज्ञ! अनेक प्रकारचे यज्ञ गीतेमध्ये दिले आहेत. यज्ञद्वारा आपल्या पापांचा नाश व्हावा असेच यज्ञकर्त्यांला वाटत असते. याचा अर्थ असा की यज्ञ अनेक प्रकारचे असले, तरी त्या सर्वाचा हेतू मनातील कुविचारांचा, पापांचा म्हणजेच मनातील मलाचा नाश व्हावा असाच असतो.
या यज्ञकर्मातून आणखी एक ज्ञान व्हायला पाहिजे, ते म्हणजे यज्ञामध्ये जी अनेक प्रकारची द्रव्ये, हवन केली जातात. ती खरं तर परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टीतीलच असतात. विश्वरचना हे परमात्म्याचं प्रथम कर्म होय. त्यानेच निर्माण केलेल्या वस्तू ‘इदं न मम’ असं म्हणत त्यालाच अर्पण करणं आणि श्रेय मात्र यज्ञकर्त्यांने स्वत:कडे घेणं ही गोष्ट समजून घ्यायला हवी. सर्व काही त्याचंच आहे हे ज्ञान मनात ठसलं की आपोआप अहंकार वासना यांचा नाश होईल. हा ज्ञानरूप अग्नी सर्व कर्माची राखरांगोळी करतो. या ज्ञानामुळे बाकीच्या गोष्टींचा फोलपणा लक्षात येतो. परमात्म्याच्या सृष्टीरचनेच्या दिव्य कर्माची ओळख होते. सृष्टीतील चैतन्याची ओळख होते व सगळीकडे ते चैतन्यच दिसू लागतं. परमात्मतत्त्व समजू लागते.
 आतापर्यंतच्या सर्व विवेचनावरून आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की, कर्ममार्गाने जाणाऱ्या साधकाने कर्माचे एक एक टप्पे पार करत शेवटी आपलं कर्म हे यज्ञरूप करून अहंकार, वासना यांची आहुती देऊन मनोमलाचा नाश करायचा व परमात्म्याच्या सर्वव्यापक चैतन्याची ओळख करून घेऊन ‘ज्ञान’ प्राप्त करून घ्यायचं.
 भगवंतही गीतेत अर्जुनाला असं ज्ञान तू प्राप्त करण्यासाठी जाणकार ज्ञानी महात्म्यांकडे जायला सांगतात. भगवंत म्हणतात, अर्जुना तू अशा तत्त्वदर्शी पंडितांकडे जाऊन त्यांच्याकडून अगदी सरळ मनाने, प्रांजळपणे प्रश्न विचारून त्यांची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घे. हे परमात्मतत्त्व ते तुला नीट समजावून सांगतील.
‘‘या जगात ज्ञानाइतकं पवित्र दुसरं काही नाही. कर्मयोगाच्या मार्गाने जाऊन अंत:करण शुद्ध झालेला मानव आपोआप आपल्या आत्म्याचं ज्ञान करून घेतो आणि भगवत् प्राप्तीरूपी परम शांती मिळवतो. याउलट अविवेकी अश्रद्ध संशयी माणसाला इहलोक-परलोक कुठेच शांती मिळत नाही.’’ असंही भगवंत अर्जुनाला सांगू लागले.
 हे सांगत असताना भगवंतांना अशी शंका आली, की या अशा विचारांमुळे अर्जुन एखादेवेळी एकदम कर्मसंन्यास घेईल व लढण्याचे सोडून देईल. म्हणून त्यांनी लगेचच अर्जुनाला भानावर आणलं आणि सांगितलं की तू मात्र नैष्कम्र्यस्थितीला किंवा कर्मसंन्यास प्राप्त झालेल्या स्थितीला न जाता समत्वरूप कर्मयोगांत स्थिर राहून युद्धाला तयार हो. कर्म सोडण्याचं म्हणजे न लढण्याचं मनातही आणू नकोस. कारण कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. शिवाय ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते ते कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. आपली कर्मे जर आपण परमात्म्याला अर्पण केली किंवा कर्मफळांची अपेक्षा ठेवली नाही, तर आपल्याला कर्माचं बंधन लागत नाही.
आपली दृष्टी सर्वप्रकारे सम व्हायला हवी. सृष्टीत अनेक गोष्टी असल्या तरी त्यामागील चैतन्य एकच आहे हे जाणून ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चाण्डाल या सर्वाना अभेद दृष्टीने-सम दृष्टीने पाहणे जमले म्हणजे ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानाने सर्व संशय मिटतात.
अशा तऱ्हेने बद्ध जीवसुद्धा आपली मानसिक प्रगती कशी करून घेऊ शकतो, आपले चित्त तसेच आपला व्यवहार शुद्ध कसा करावा, एकाग्रतेसाठी लागणारी जीवनशुद्धी कशी मिळवावी हे आपल्याला गीतेने कर्ममार्गाच्या वाटेन शिकवलं. हे सर्व ज्ञान तमाम मानवजातीसाठी उपयुक्त नव्हे कां?   

indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…