‘संदूक’ या सदरातील रत्ना पाठक-शाह यांचा ‘नवी आव्हानं’ हा (२६ एप्रिल) लेख वाचनीय आहे. कोणतीही नवीन गोष्ट करायची असली की एक अनामिक भीती मनात असते. लेखिकेने तिच्या मनातील भावना उत्तम पद्धतीने मांडल्या आहेत. उंच हिमालयात खारदुंगपर्यंत प्रवास करणे फार जिकिरीचे आहे. मी स्वत: हा प्रवास मनाली- लेह- खारदुंगपर्यंत सायकलने केला आहे. हिमालयाची भव्यता आपल्याला नम्र होण्यास भाग पाडते. कठीण परिस्थितीत राहणारी तेथील मंडळी मात्र नेहमी हसतमुख दिसतात हे विशेष. जाता जाता रत्ना पाठक शाह यांनी उदारमतवादी स्त्री चित्रित करताना सध्या प्रत्येक चित्रपटात दाखवलेली अवाजवी स्वातंत्र्याची चुकीची समजूत यावर मार्मिक भाष्यही केले आहे.डॉ. रविराज खैरनारनाशिक

कामगार चळवळीचा आदर्श!

‘स्वयंरोजगाराचं मोल’ हा अरुणा बुरटे यांचा लेख, इला भट्ट यांच्या अफाट कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा, म्हणून भावी पिढीस मार्गदर्शक ठरणारा वाटला. कामगार चळवळ, सहकार चळवळ आणि स्त्री चळवळ यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या ‘सेवा’ या संस्थेची स्थापना इला भट्ट यांनी केली, त्यांनी स्त्रियांना स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी घेतलेल्या अचूक परिश्रमाद्वारे कामगार चळवळीचा आदर्श उभा केला आहे, तो स्तिमित करणारा आहे. आज गिरणी कामगारांचा संप मोडीत निघाल्यानंतर व डॉक्टर दत्ता सामंतांच्या नंतर, कामगार चळवळ जवळजवळ संपुष्टात आली असून, कामगारांच्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी, अशाच व्यक्तींनी सक्रिय होणे ही काळाची गरज आहे.प्रदीप करमरकरठाणे

पक्षी संवर्धनाचा आदर्श वस्तुपाठ

समाजभान असलेली, उच्च विद्या विभूषित स्त्री पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने किती उत्तुंग कामगिरी करू शकते हे शुभदा चंद्रचूड यांचा ‘पदरावरती जरतारीचा हरगिला हवा’ हा अभ्यासपूर्ण लेख वाचल्यावर समजले. (२६ एप्रिल) आपल्याकडे गिधाडे, कावळे हे पक्षी तसाच हा आसाम आणि बिहारमधील हरगिला पक्षी. हरगिलाच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. कारण ती पर्यावरणाची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अवैध वृक्षतोड किंवा पक्षी, प्राणी यांची शिकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.अशोक आफळेकोल्हापूर

आहारी न जाता फायदा करून घ्यावा

‘एआय’ या विषयावरचे मंगेश वाघ आणि अमित घोडेकर यांनी लिहिलेले दोन्ही लेख (१९ एप्रिल) आवडले. ‘एआय’चा भावनिक साथीदार म्हणून उपयोग करताना हे सदैव लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते एक टूल आहे. ती व्यक्ती नव्हे. त्याच्या वापरामुळे एकाकीपण वाढत जाईल हे नक्की. तेव्हा ते किती जपून वापरलं पाहिजे हेच त्या दोन्ही लेखांतून अधोरेखित झालं आहे. जितकं तंत्रज्ञान चांगलं होत जाईल, तितकी सावधगिरी जास्त पाळली पाहिजे. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत. एका विशिष्ट वयापर्यंत खेळ हे सवंगड्यांबरोबर खेळलेच पाहिजेत, काही नवीन शिकलंच पाहिजे. दुसरी चांगली बाजूही त्यातून समजावली आहे ती म्हणजे, हे माध्यम किती वापर करायचं आणि त्यातून स्वत:ला कसं प्रगत करायचं हे शिकलं पाहिजे. त्याच्या आहारी न जाता त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. शेवटी ते एक तंत्रज्ञान आहे.

पुरवणीतील सर्वच विषय आपल्या जगण्याशी निगडित असतात, विचार करायला लावणारे आणि अभ्यासपूर्ण असतात.माधवी भट

तज्ज्ञांचे वाचनीय लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चतुरंग पुरवणीमधील वेगवेगळ्या विषयांवरील तज्ज्ञ व्यक्तींनी लिहिलेले लेख मला वाचायला खूप आवडतात. आज माझं वय ५२ वर्षं असलं तरी लहान मुलांच्या कुतूहलाने दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या अंकाची वाट पाहत असते. यामधील वेगवेगळे विषय आनंद, सुख-दु:ख, पर्यटन याचा अनुभव वाचताना येतो. माझी वाचनाची भूक दरवेळी वाढतच जाते. लिहिणारी प्रत्येक व्यक्ती वेगळी तशीच प्रत्येकाची लेखनशैलीही वेगळीच. पंचपक्वान्नाने भरलेलं ताट असावं तसं वाटतं मला. जे अधिक आवडलं ते पुन्हा-पुन्हा वाचायचं आणि तृप्ततेचा ढेकर बसल्या ठिकाणी द्यायचा.माधवी तानाजी पोवारकोल्हापूर