|| उष:प्रभा पागे

पानगळ!  नित्यनेमाने घडणारी परिचित घटना. ती तर होतच असते. त्याची एवढी दखल कशासाठी घ्यायची? जंगलात तर केवढा दाट थर असतोच की पडलेला. पण आपण जंगलात नाही राहत. जंगलात झाडांवरून पाने गळणे, जमिनीवर त्यांचे आच्छादन पसरणे, पावसाच्या पाण्याने ते भिजणे, त्याचे कुजणे, खत बनून माती होणे, त्यात झाडाचे बीज पडणे आणि मातीतून बिजाचे अंकुरणे असे निसर्गचक्र अव्याहत चालूच असते. पण मानवी विकासाच्या वाटचालीत गावे, शहरे वसली, सडका बनल्या, झाडे काही प्रमाणात राहिली.

निसर्ग नियमाने हिवाळा आणि उन्हाळ्यात त्यांची पानगळ होतच राहिली, रस्त्याच्या कडेने, सोसायटय़ांमधून, जिथे जिथे झाडे तिथे तिथे पानगळ. शहरवासीयांसाठी ‘केवढा हा कचरा, उचला तो, फेकून द्या, त्यापेक्षा जाळूनच टाका ना. केवढी सोय आहे ना त्यात!’ या कृतीचे काय दुष्परिणाम आहेत याची जाणीवच नसते आपल्याला. अशामुळे निसर्गचक्र तर खंडित होतेच आणि ही कृती म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी ठरते.

झाडाची पाने विशिष्ट काळात गळतात म्हणजे ते झाडांनी केलेले नियोजन असते. एक तर हिवाळ्यात ऊन कमी त्यामुळे झाडांची हरितद्रव्य निर्माण करायची क्षमता कमी होते, उन्हाळ्यात पाणी मिळत नाही, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी, उपलब्ध पाणी काटकसरीने पुरवण्यासाठी झाडे हिवाळ्यापासून पाने गाळतात. झाड वाढीसाठी जमिनीतून अनेक पोषक द्रव्य शोषून घेतात, त्यापैकी निम्म्याहून किती तरी अधिक द्रव्य या गळून पडलेल्या पानात असतात. त्यांचा जमिनीवर थर तयार होतो, मातीवर त्यांचे पूर्ण आच्छादन तयार होते. मातीतली आद्र्रता टिकून राहते. पाने मातीला संरक्षण देतात. निसर्गात म्हणजे जंगलात गळलेल्या पानांतून त्याचे खत होऊन पोषकद्रव्यं पुन्हा मातीला परत मिळतात. ती मातीला सकस बनवतात. अनेक उपयुक्त कृमी कीटकांना या पानांच्या थराखाली आश्रय मिळतो. मातीला सकस बनविण्यात त्यांचा ही वाटा असतो. पण शहरवासी असलेल्या आपल्यासाठी वाळकी, पिवळी पाने हा फक्त कचरा असतो, त्यापासून सुटका मिळवायचा दुसरा मार्ग माहीत नसल्याने सोयीचा मार्ग म्हणजे तो जाळणे.

पाने जाळणे हा उपाय सोयीचा वाटलातरी हिताचा थोडाच आहे? पाने जाळण्यामुळे कार्बन मोनोक्साईड हा हरितगृह वायू निर्माण होतो तो प्रदूषण करतो, त्यामुळे काजळीचे कण, राख असे उपद्रवी कण श्वासाद्वारे छातीत जातात. खोकला ठसका, जळजळ, छातीत दुखणे, श्वास कोंडणे अशा तत्कालिक किंवा दीर्घकालीन व्याधी संभवतात.

वाळलेल्या पानांचे साठलेले ढीग किंवा ती जाळून टाकलेली पाहून अदिती अस्वस्थ व्हायची. अदिती देवधर एका सोसायटीत राहते. तिच्या परिसरातील वावळसारख्या सुंदर मोठय़ा झाडांवर खारी, पक्षी, कीटक, मधमाश्या यांची गर्दी ती पाहते. त्यांचे ते आश्रयस्थान आहे. या पानझडी प्रकारच्या झाडांची हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात खूप पानगळ होते. तो ‘कचरा’ ती पाहत होती.. नगरपालिकेचे सफाई कामगार ती गोळा करून टाकायचे किंवा साठवून तो कचरा पेटवून द्यायचे. अदितीने त्यांच्याशी संवाद साधला पाने जाळू नका, साठवून ठेवा, आम्हाला द्या हे तिने त्यांना पटवून दिले. यावर सकारात्मक उपाय शोधायचे तिने ठरवले. सुजाता नाफडे या वाळलेल्या पानांचा खत म्हणून बागेसाठी उपयोग करतात हे तिने पाहिले, पण त्यांना हे खत कमी पडत होते. त्यांना आणखी पाने, खत हवे होते. त्यांचा उपक्रम पाहून त्यावर चिंतन करून, तिच्या कल्पकतेतून तिने यावर मार्ग काढला. याचे मूर्त रूप म्हणजे समाज माध्यमांवर ‘ब्राऊन लीफ’ हा गट तिने कार्यरत केला. त्यातून तिच्या लक्षात आले की काही लोकांना या पानांचे महत्त्व माहीत आहे. ती पाने साठवून ठेवतात. पण त्यांचा उपयोग करू शकत नाहीत. याउलट काही लोकांना ही पाने खतासाठी हवी आहेत. पण त्यांना ती हवी त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. अशा देणाऱ्या आणि घेणाऱ्या लोकांचा दुवा यामुळे जोडला गेला. आणि पडलेल्या पानाच्या या ‘कचऱ्याची’ योग्य, नियमित देवघेव सुरू झाली. त्याचा आणखीएक फायदा असा झाला की अनेकांनी परसबागा सुरू केल्या. पानांचे नैसर्गिक खत मिळवायची सोपी युक्ती अनेकांना मिळाली. ज्या सोसायटीमध्ये या कामात अडचणी आल्या त्यांना इतरांच्या अनुभवाचा फायदा मिळू लागला आहे. फेब्रुवारी २०१६ पासून अदिती ने ‘ब्राऊन लीफ’ हा उपक्रम सोशल मीडियावर सुरू केला. ‘देशभरातील एकही पान जाळले जाणार नाही’ हे विशाल उद्दिष्ट आहे तिचे. २०१७च्या अखेपर्यंत या गटाने पाच हजार पोत्यांची, गोण्यांची देवघेव केली. लोक यामध्ये सामील होत आहेत. वाळलेल्या पानांचा उपयोग तीन प्रकारे करता येतो. मातीवर आच्छादन करणे, पाला कुजवून खत करणे. मातीतून पुन्हा मातीकडे ही निसर्गातील स्वाभाविक चक्राकार प्रणाली यात दिसते. आणि पानांची देवघेव करणे. पानांचे खत करायची पद्धत सोपी आहे. जाळीच्या कम्पोस्टरमध्ये ही पाने साठवायची आठवडय़ातून एकदा मायक्रोब कल्चर घालायचे आपण दुधाला विरजण घालतो म्हणजे जिवाणू देतो तसे हे जिवाणू वाढत जाऊन विरजण लागते तसे याचे खतात रूपांतर होते. मायक्रोबऐवजी थोडी माती टाकली तरी चालेल. रोज त्यावर थोडे थोडे पाणी शिंपडायचे. कम्पोस्टसाठी सूक्ष्म जिवाणू महत्त्वाचे आहेत कारण त्यामुळे खताची प्रक्रिया जलद होते. देशातील एकही पान जाळले जाणार नाही आणि मातीतून पानात गेलेली पोषकद्रव्ये मातीला परत मिळवीत या ध्येयाने हा गट काम करतो आहे, पर्यावरणाचे हे चित्र आशादायी आहे.

अदितीची संगणकावर चांगली हुकूमत आहे. त्यामुळे समाज माध्यमांचा तिने असा प्रभावी उपयोग केला. या सगळ्यासाठी तिचे शिक्षण, तिची तीव्र बुद्धी, तिचा अनुभव, मुख्य तिची पर्यावरणाची डोळस जाण, सकारात्मक वृत्ती आणि सक्रिय सहभाग कामी आले.

अदिती तंत्रज्ञान विषयातील एम.एस्सी. – (Industrial maths with computer application) प्रथम श्रेणीत विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाली आहे. ती वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टमध्ये सॉफ्टवेअर कन्सल्टंट होती. कॉर्पोरेट कंपन्यांसाठी तिने अनेक प्रकल्प केले आहेत. कामानिमित्त ती काही काळ परदेशातही होती. आयटी क्षेत्रात कामाचा अनुभव घेतल्यानंतर तिने आपले कामाचे क्षेत्र बदलले. पर्यावरण आणि विकास यामधील कामाची जास्त गरज, निकड तिला जाणवली आहे. २०१२ मध्ये तिने ‘इकॉलॉजिकल सोसायटी’चा ‘नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत विकास’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तिच्या प्रतिभेला दिशा मिळाली. तंत्रज्ञानाचा सक्षम उपयोग करण्याचे कसब आणि कौशल्य तिच्यात आहे.

कोणत्याही उपक्रमात ती या कौशल्याचा साधन म्हणून प्रभावी उपयोग करते. मात्र ते साध्य नाही तर साधन आहे याची सजगता आणि स्वावलंबन हे तिचे वैशिष्टय़ आहे. ‘विंदां’ सारखा प्रतिभावंत तिला भावतो. त्यामुळेच त्यांच्या काव्यवाचन कार्यक्रमात तिचा सहभाग असतो. तिचा पती आयटीमध्ये आहे. विचाराने तिच्याबरोबर असतो. आणि तिचा मुलगा लहान असला तरी तिच्या मुशीत घडतो आहे.

समविचारी मित्रांनी ‘जीवित नदी’ हा मुळा-मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून सुरू केला आहे. हा कार्यक्रम बहुआयामी आहे. लढा दीर्घ आहे पण ऊर्जा अमर्याद आहे.

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com