सानिया म्हणाली, ‘‘ तुमचे लेख वाचून नेहमी वाटतं, आपलं पिल्लू एका चांगल्या घरात नक्की आहे, बाळाला आईबाबा पण मिळाले आहेत. परंतु मी पुन्हा आई होऊ शकले नाही. कदाचित मी स्वत:ला अजून माफ करू शकले नाही. एवढीच इच्छा आहे की आमचं पिल्लू नेहमी आनंदात राहावं आणि ज्यांनी त्याला आपलं म्हणून मायेने जवळ केलंय तेच त्यांचंही सर्वस्व असावं. आमच्या वाटय़ाला मात्र कायमचा विरह आला.’’ दत्तक दिल्या गेलेल्या मुलांच्या जन्मदात्रीचं काय होत असेल, तिची मन:स्थिती कशी होत असेल आयुष्यभर, हा नेहमीच विचारला गेलेला प्रश्न. या मालिकेतील काही लेखांमधूनही कधी ओघाने जन्मदात्या आईचा उल्लेख येत गेला. असेच माझे लेख वाचून एक जोडपे संपर्कात आले आणि त्यांनी त्यांची सगळी कथा ऐकवली. खरं तर त्यांच्या कथेवर लेख बऱ्याच आधी करणार होते, परंतु त्यांच्या मनाची तयारी व्हायला बराच अवधी गेला. लेखातील नावं बदलून त्यांचा प्रवास प्रसिद्ध करायला त्यांनी तयारी दर्शवली म्हणून नाण्याची दुसरी बाजू मांडण्याचा हा एक प्रयत्न. हा लेख दत्तक प्रक्रियेतील मुलांना व पालकांना नक्कीच भावेल व वाचकांना अंतर्मुख करेल. मिहीर आणि सानिया दोघे महाविद्यालयापासूनचे खूप चांगले मित्र. तसा मिहीर सानियापेक्षा तीन वर्षांनी मोठा, परंतु दोघांची ओळख एका कार्यक्रमादरम्यान झाली आणि पुढं त्याचं रूपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. सुरुवातीला फक्त फोनवरून तासन्तास गप्पा, एकमेकांना मनातलं सगळं सांगणं असं चालायचं. एक दिवस सानियाचे आईबाबा घरी नसताना मिहीर तिच्या घरी तिच्याशी गप्पा मारायला म्हणून आला खरं, पण घरातील एकांतामुळे त्या दिवशी दोघांनी शारीरिक जवळीक अनुभवली. या घटनेच्या १५ वर्षांनीसुद्धा मिहीर म्हणतो, ‘‘ताई, ते सगळे क्षण आमच्यासाठी खूप जवळीक निर्माण करणारे होते, आम्ही दोघेही एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून पुढं जात होतो. ते सगळे क्षण म्हणजे फक्त मजा किंवा फक्त शारीरिक जवळीक काय असते हे अनुभवण्यासाठी अजिबात नव्हते. आम्ही दोघांनी त्यादिवशी एकरूप होणं काय असतं, याचा अनुभव घेतला. परंतु त्या दिवसानंतर थोडी भीतीही वाटली, कारण सानियाचं वय होतं जेमतेम १७ वर्ष आणि माझं २०. त्या दिवशी आम्ही ठरवून असं एकमेकांना अनुभवलं नाही, त्यामुळे कुठलीही काळजी आम्ही घेतली नव्हती, असं काही होईल आणि अशा वेळेस काही काळजी घ्यायची असते याचीही कल्पना नव्हती. फक्त सानियाला दिवस राहू नये असंच मनोमन वाटत होतं. असं झालं तर काय म्हणतील घरचे? ही भीती वाटत होती. सानिया पण त्या दिवसानंतर घाबरलेली असायची. मला भेटली की विचारायची, ‘मिहीर, तू मला सोडून जाणार नाहीस ना रे? लग्न करशील ना माझ्याशी?’ मी तिला नेहमीच सांगत आलो, ‘तुला कधीच सोडून जाणार नाही गं वेडे! तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही.’ तिला मी काही दिवसांनी तिच्या पाळीबद्दल विचारलं, परंतु ती म्हणाली, ‘सगळं ठीक आहे.’पण अखेर माझी भीती खरी ठरली, सानिया गरोदर होती! सानिया आपल्याशी खोटं बोलली याचं खूप वाईट वाटलं. पण ती खूप घाबरलेली दिसायची. तिचं कॉलेजला येणं बंद झालं. नंतर उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. मी खूप प्रयत्न करूनसुद्धा तिच्याशी भेटणं शक्य व्हायचं नाही. काय करावं काहीच कळत नव्हतं. दोघांच्याही घरी सगळं कळलेलं होतं. दोन्ही घरी आईबाबा अजिबात आमची बाजू ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांना हा सगळा प्रकार म्हणजे आमचा शुद्ध मूर्खपणा वाटत होता. माझ्या आईबाबांना मी एवढंच सांगितलं, ‘तुम्ही तिच्या आईबाबांना भेटून लग्न ठरवा, त्या बाळाला जन्म दिल्यावर थोडे दिवस काळजी घ्या, मी या वर्षी पदवीची परीक्षा दिलेली आहे, लवकरात लवकर मी नोकरी सुरू करतो. सानिया पण १८ वर्षांची झाली आहे, मग आमचं लग्न करून द्या आणि आम्ही आमचा संसार सुरू करतो.’ परंतु हे त्यांच्या पचनी पडलंच नाही, ‘लग्नाच्या आधीच मूल? काय म्हणेल समाज?’ त्यांनी मला माझ्या शिक्षणावर लक्ष द्यायला सांगितलं आणि म्हणाले, ‘तुमचं लग्न कधीच होऊ शकणार नाही. कारण आपली जात वेगळी, तिची जात वेगळी. त्यात तुम्ही केलेलं काम आणि हे मूल?’ ताई, त्याही क्षणी वाटलं, ‘आपलं मूल यांच्या लेखी कुठल्या जातीचं असेल? तो जीव महत्त्वाचा की यांचे असे विचार? कधी बदलतील असले बुरसट विचार?’ आईबाबा म्हणून दोघांनी मला नेहमीच सोबत केली, खूप केलं त्यांनी माझ्यासाठी. परंतु त्या क्षणाला त्यांचे विचार ऐकून मी त्यांच्यापासून खूप दुरावला गेलो.’’ सानियाला मी विचारलं, ‘या सगळ्या काळात तू कुठल्या मन:स्थितीतून गेलीस गं?’ तशी सानिया शांत स्वभावाची आणि कमी बोलणारी. सानिया म्हणाली, ‘ताई, जे व्हायचं ते झालं होतं, आम्ही चूक केली असं आम्हाला कधीच वाटलं नाही. पालकांना आमचं वागणं चुकीचं वाटलं हेही आम्ही समजू शकलो. परंतु मला घरातून बाहेर पडायला बंदी, मिहीरशी संपर्क करायला मनाई याचा खूप मनस्ताप व्हायचा. पोटातलं पिल्लू तेवढं साथ देतंय असं वाटायचं. खरं तर मला दुसऱ्याच महिन्यात वाटलं की आपण गरोदर आहोत, परंतु घरच्यांची भीती, मिहीर साथ देईल का? असे एक ना अनेक प्रश्न मनात काहूर करायचे. मला खात्री होती, आईबाबांना कळलं की ते मला गर्भपात करायला भाग पाडतील, जे मला कदापि मान्य नव्हतं. त्यामुळे मनातलं बोलायचा कधी धीर झालाच नाही. ज्या वेळेस घरी कळलं त्यावेळेस गर्भपाताची शक्यता अजिबातच नव्हती. त्यामुळे आपलं पिल्लू सुखरूप आहे, याचं समाधान होतं. परंतु आईबाबांनी फारच टोकाची भूमिका घेतली, त्यांनी मला निर्वाणीचं सांगितलं, ‘मूल जन्माला आलं की संस्थेत नेऊन देणार. तुला मान्य नसेल तर तुझ्यासोबत आपण सगळे या जीवनाचा अंत करू या. त्या दिवशी मी खरंच घाबरले. एकीकडे आपलं बाळ आणि दुसरीकडे जन्मदाते! मला कुठल्याही परिस्थितीत माझं बाळ सुखरूप पाहायचं होतं, त्यामुळे मनावर दगड ठेवून मी त्यांचा पहिला पर्याय मान्य केला. सारखं वाटायचं, मधल्या काळात आईबाबांचं मन बदलेल, मिहीर साथ द्यायला येईल, पण असं काही झालं नाही. बाळ जन्मल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी बाळाची रवानगी संस्थेत झाली. मला काय वाटलं त्या क्षणी कुणीच समजू शकणार नाही ताई. वाटलं, त्या क्षणाला आपला शेवट करावा, कशासाठी जगायचं?’’ मी मिहीरला म्हणाले, ‘‘अरे पण आता तुम्ही दोघं सोबत कसे काय?’’ मिहीर म्हणाला, ‘‘हे आमचं नशीब म्हणा की आमची एकमेकांवरची निष्ठा, आता आम्ही सोबत आहोत. सविस्तर सांगायचं म्हणजे, सानियाच्या बाळंतपणाबद्दल मला हिच्या घरांच्यानी खबर लागू दिली नाही. हिला तिच्या मामाच्या गावी नेऊन बाळाला संस्थेत देऊन हे सगळे परत आले. त्यानंतरही आम्हाला भेटायला अजिबात परवानगी नव्हती. वनवासाचे दिवस वाटायचे ते. माझं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं आणि मी नोकरीला लागलो. सानियाच्या घरी वरसंशोधन जोरात सुरू झालं. माझ्याही घरच्यांना वाटलं, याचं लग्न उरकलं की हे प्रकरण कायमचं संपेल. परंतु मी माझ्या मतावर ठाम होतो, लग्न करेन तर फक्त सानियासोबत. सानिया पण तिच्या मतावर ठाम होती, लग्न करेन तर फक्त मिहीरसोबत. दोघंही सज्ञान असल्याने दोघांच्या घरचे जाणून होते की कधीही आपल्या नकळत हे दोघं लग्न करतील. या भीतीने का होईना, दोघांच्या घरून समंती मिळाली आणि आमचं लग्न झालं. पण तोपर्यंत आमचं मूल दत्तक दिलं गेलं होतं. आज आमच्या लग्नाला १५ वर्ष झालीत. आम्ही दोघं सोबत आहोत या सुखापेक्षा आपलं पिल्लू आपल्या सोबत नाही याचं दु:ख खूप मोठं आहे.’’ सानिया म्हणाली, ‘‘ताई, तुमचे लेख वाचून नेहमी वाटतं, आपलं पिल्लू एका चांगल्या घरात नक्की आहे, त्याला आईबाबा पण मिळाले आहेत. परंतु मी परत आई होऊ शकले नाही. कदाचित मी स्वत:ला अजून माफ करू शकले नाही. एवढीच इच्छा आहे की आमचं पिल्लू नेहमी आनंदात राहावं आणि ज्यांनी त्याला आपलं म्हणून मायेने जवळ केलंय तेच त्यांचंही सर्वस्व असावं.’’ दोघांनी एकच खंत व्यक्त केली, ‘‘घरच्यांनी, समाजाने आमचा स्वीकार केला असता, आमचं प्रेम समजून घेतलं असतं तर आम्हीही संपूर्ण कुटुंबाचा आनंद घेऊ शकलो असतो. कधी बदलणार समाज?’’ संगीता बनगीनवार sangeeta@sroat.org