मंगला सामंत यांचा १३ नोव्हेंबरच्या अंकातील लेख त्याच्या शीर्षकातूनच लग्न या गुंतागुंतीच्या, पण चिरतरुण विषयाबद्दल आजचा मनामनांचा गोंधळ दाखवून देत आहे. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा! ’ या चालीवर ‘आपुले लग्न पाहिले म्या डोळा’ या शीर्षकाने लग्नाबद्दलचा नकारात्मक कौल लक्षात आला. हल्ली लग्न करावे की नाही?, ते आवश्यक आहे की नाही?, लग्न करताना कोणकोणत्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे?, याबद्दलचा सखोल ऊहापोह वारंवार होत असतो. विवाह म्हणजे काय?- यावर ‘विवाह ही शरीरसंबंधाची एक पद्धत आहे’ असे उत्तर लेखिकेला अपेक्षित आहे. मला वाटते, त्या उत्तरातही थोडा नेमकेपणा आणून असे उत्तर देणे जास्त योग्य ठरवता येईल- ‘विवाह शरीरसंबंधाची कायदेशीर पद्धत आहे.’ यात ‘कायदेशीर’ शब्दास अधोरेखित करणे अपरिहार्य ठरावे. पण मग केवळ शरीरसंबंध मिळवणे हाच एक उद्देश ठरतो का? शारीरिक पातळीवरील सुख-समाधान पुरेसे ठरते का? मानसिक समाधानाचे जास्त महत्त्व नाही का? की शारीरिक हेच पूर्णत: मानसिक समाधान असे ठरवायचे? शारीरिक समाधान होऊनही ते काही काळाने मन:शांती देण्यासाठी कमी पडते हे जाणवत नाही का? शरीरसुखाशिवायही आयुष्यात जोडीदाराचा, साथीदाराचा मनाला आधार असणे गरजेचे नसते का?

असे नसते, तर मंगला सामंत यांनी पूर्ण लेखभर केलेल्या जोडीदार निवडीबद्दलचे विचारमंथन निर्थक होईल. आणि मग वाटेल, लग्नसंस्थाच निर्थक आहे. लग्नानंतरचे सहजीवन, आजच्या चढाओढीच्या, ताणतणावाच्या किंवा ‘अभिमाना’च्या काळात योग्य वर किंवा वधू अनुरू पतेअभावी मने न जुळणे, या सर्व प्रश्नांचे वास्तव कठीण झाले आहे. या प्रश्नांचे गुंते मंगला सामंत यांनी सर्व बाजूंनी उकलून दाखवले आहेत. व्यक्ती-व्यक्तींतील संघर्षांने विवाहबंधने तुटायची. त्याबरोबर आता व्यक्ती-व्यक्तींतील परिस्थिती, वास्तव, यामुळे विवाह हे जसे ‘असून अडचण, नसून दुर्दशा’ असे झाले आहेत. आणि म्हणूनच ओढाताण वा कुतरओढ लक्षात घेऊन विवाह करणे, ‘इझ इट वर्थ?’ असे वाटणे साहजिक आहे. मग प्रत्येकाने किंवा प्रत्येकीने लग्न करणे आवश्यक आहे का?, असा विचार हळूहळू उपवर वधूवरांच्या मनात येत आहे. लग्नानंतरची तडजोड, अपत्यानंतरची तडजोड, नात्यांची बंधनं वाटेपर्यंतची तडजोड, असे सर्व आयुष्य खडतर असेल, तर लग्न ही गोष्ट अनाठायी आहे की काय?, असे मनात येणे शक्य आहे. हल्ली लग्नाची स्थळे बघताना फक्त पत्नीचे शिक्षण, तिचे कमावणे, तिचे रूप, समाजातील स्थान, एवढेच लक्षात न घेता, त्याशिवाय पुढे थेट गर्भारपण, बाळंतपण, अगदी बाळाचे डायपर, इथपर्यंत सर्व आर्थिक जबाबदारीचा विचार करणारे दूरदूरदर्शी उपवरवधू अवाक झाले आहेत. ‘वारसासाठी विवाह’ अशी कल्पनाही शब्दश: राहिलेली नाही असे म्हणतात. स्त्री-पुरुषांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देणे आणि एकमेकांची जबाबदारी घेणे, असा विवाहाचा आजचा सुसंस्कृत अर्थ आहे आणि तो तसाच असायला पाहिजे, असे लेखिका म्हणते. पण मग त्यासाठी केवळ कायदेशीर बंधन असण्यासाठी, विवाह करणे सुरक्षित वाटते म्हणून लग्न करणे आवश्यक आहे का? अपेक्षा ठीक आहेत, पण त्यांचे अटींमध्ये रूपांतर करणे अपरिहार्य आहे का? त्या समस्या होणार असे असेल, तर त्या तुमच्या वैयक्तिक पातळीवर सोडवण्याशिवाय गत्यंतर नसते. कोणत्याही दोन व्यक्तींची विचारसरणी १०० टक्के  जुळणे शक्य नसते. आणि तडजोड करण्याची जेवढी जास्त तयारी, तेवढा विवाहवेदीवर जाण्याचा मार्ग सुकर. त्याचमुळे ‘ही शहाणीसुर्ती माणसे लग्नच का करतात?’ असा समाजाचा मानसिक कल होण्याची शक्यता वाटू लागली आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

जयमती दळवी

‘आपुले लग्न..’  लेख पटला

‘आपुले लग्न पाहिले म्या डोळा!’ हा मंगला सामंत यांचा लेख (१३ नोव्हेंबर) ज्येष्ठ पालक म्हणून पटला. वय वाढत जाणाऱ्या कित्येक तरुण-तरुणींची अवस्था अशी आहे. त्यातील अनेक कारणे लेखात वाचली. मी पाहिलेली दोन उदाहरणे सांगावीशी वाटतात- ओळखीच्या एका मुलीने स्थळ आलेला मुलगा सर्व दृष्टीने योग्य होता, पण त्याचे के वळ आडनाव आवडले नाही म्हणून नाकारला. तर दुसऱ्या मुलीने सासरी केवळ शौचालय घराच्या बाहेर आहे म्हणून मुलगा नाकारला. ‘आखूड शिंगी बहुदुधी’ अशी आपल्यात म्हण आहे. असे ‘सर्वागीण’ स्थळ मिळणे कठीण असते. मनासारखे सर्व सोयींनी युक्त घर बघणे कठीण असते, तसेच मनपसंत स्थळ मिळणे हाही नशिबाचा भाग! म्हणून लेखात म्हटल्याप्रमाणे मुलामुलींनी तडजोड करणे, जुळवून घेणे, अपेक्षेचे रूपांतर अटींमध्ये न करणे, असा अवलंब केल्यास विवाहाचे विस्तारित रूप घट्ट मैत्रीत करता येईल.

श्रीनिवास डोंगरे

‘कॉर्पोरेट सूनबाईं’नाही समजून घेणे गरजेचे

‘जगणं बदलताना’ या सदरातील ‘कॉर्पोरेट सूनबाई’ हा लेख (१३ नोव्हेंबर) सद्य सामाजिक परिस्थितीचा छान आढावा घेणारा आहे. पूर्वी आणि काही कुटुंबांत आजही लग्न होऊन नवीन घरात सामावून घेताना अनेक मुलींची खरोखर गोची होते. मुलींचीच नाही, तर त्यांच्या नवऱ्यांचीही! बहुतांश कुटुंबांत सुशिक्षित आणि नोकरी करणारी सून हवी असते. मुलीही उच्चशिक्षित असतात आणि मोठय़ा पदावर काम करत असतात. अशा वेळी सासूने तिला समजून घेणे आवश्यक असते. पण दुर्दैवाने अनेक सासूबाईंना याचे भान राहात नाही आणि सुनेला विविध बाबतींत प्रश्न निर्माण होतात. नवऱ्याने तिची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ‘बायकोचा बैल’ ही पदवी मिळते! साधारणत: सासरेबुवा सुनेला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात असे पाहायला मिळते. पण काही खाष्ट सासूबाई त्यांचीही बोलती बंद करतात व घरातील वातावरण गढूळते. त्याचे खापर मात्र समंजस असूनही सुनेवरच फोडले जाते. हळूहळू परिस्थितीत सुधारणा होत आहे हीच जमेची बाजू.                                                                                                                                  

– रमेश वेदक

हिंदी कथेला विश्वासार्ह उंची देणाऱ्या लेखिका

‘स्वाभिमानी जीवनप्रवास’ (२७ नोव्हेंबर ) हा डॉ. मंगला आठलेकर यांचा लेख वाचला. साहित्यिका मन्नू भंडारी यांच्या लेखनातील सुगमता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उत्स्फूर्तता आहे. त्यांच्या लिखाणात आणि वागण्यात कुठेही विरोधाभास नाही. ज्या काळात हातच्या बोटांवर मोजण्याइतक्याच स्त्रिया लिहीत होत्या, त्या काळात त्या लिहीत होत्या. ज्या वेळेस भारतीय समाज संक्रमणाच्या काळातून जात होता त्या काळात मन्नूजी सुधारणावादी दृष्टिकोन घेऊन कथाविश्वात येतात. मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये विखंडन सुरू झाले होते आणि स्त्रिया त्यांच्या ओळखीबद्दल बोलू लागल्या होत्या. स्त्रिया घराबाहेर पडून काम करू लागल्या, त्यांचे आयुष्य बदलले आणि विचारही बदलला. त्या हे वास्तव आणि बदल अनेक कोनांतून पाहत होत्या आणि समजून घेत होत्या. नोकरदार स्त्रियांचे जीवन, त्यांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून मन्नू भंडारी यांनी अनेक कथा लिहिल्या. पुरुषाने अत्याचार केलेल्या स्त्रीच्या असहाय्यतेचे चित्रण करण्याऐवजी त्यांनी सर्व चांगुलपणा आणि सद्भावना असूनही, विरोधाभास आणि कपटी आचरणामुळे स्वत:च्या अवतीभवती वेढलेली स्त्री समोर आणली. साधी कलाकुसर, आजूबाजूच्या परिस्थितीवर बारीक नजर आणि आशयाची सहजता यामुळे त्या प्रत्येक युगात समर्पक राहतील. त्यांनी हिंदी कथेला विश्वासार्ह उंची दिली. आधुनिक संवेदनांनी प्रेरित अंतर्ज्ञानी भाषा ही त्यांची मौलिकता राहिली. स्त्री महानगरातील असो, वा एखाद्या खेडय़ातील, त्यांनी सातत्याने स्त्रियांच्या बाजूने उभे राहणे पसंत केले. कथेतही त्यांनी कधीही स्त्रीला कमकुवत होऊ दिले नाही, तर मार्गही सुचवला. त्यांनी एका फटक्यात सौम्य कथाकाराचा ‘टॅग’ तोडला आणि ‘महाभोज’ ही कादंबरी लिहली, ज्यात राजकारणातील क्रूर कारवाया मांडल्या. संवेदनशील, साधे, अतिशय संतुलित, कसदार लेखन हे मन्नूजींच्या लेखनाचे वैशिष्टय़ होते. आजच्या युगात जेव्हा लेखक आपल्या लिखित वाक्यावर कात्री वापरतो, तेव्हा मन्नूजींनी ‘यही सच हैं’सारखी प्रेमाच्या द्वैताची कथा ज्या अप्रतिम आत्मसंयमाने लिहिली, ती प्रेमकथांमध्ये उदाहरण म्हणून सदैव आठवणीत राहील. मन्नूजींनी परिमाणात फारसे काही लिहिले नाही, पण त्यांनी जे काही लिहिले, त्यात जीवनाचे वास्तव इतक्या सहजतेने, आत्मीयतेने आणि तपशिलाने प्रतिबिंबित झाले आहे, की ते वाचकांच्या मनाला भिडते. त्या त्यांच्या कथांमधील पात्रांच्या आतल्या कक्षेतील प्रत्येक संवेदनशील कोपरा अत्यंत शांततेने आणि प्रामाणिकपणाने शोधतात. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे. 

तुषार अ. रहाटगावकर