उन्हाळ्यात जाणवणारा वातावरणातील उष्मा कमी होऊन पावसाळ्याला सुरुवात झाली की वातावरणात थंडपणा येऊ लागतो. वातावरणातील या बदलाबरोबरच आपणही आपल्या आहारात बदल केला पाहिजे.
गरम चहा/कॉफी आणि गरमागरम भजी, वडे हे या ऋतूमधील एक समीकरण झालेले आहे, पण वातावरणात होणाऱ्या बदलानुसार होणाऱ्या खाण्याच्या इच्छा आणि आपल्या शरीराची गरज, आवश्यकता यांची सांगड घालणे गरजेचे आहे.
या ऋ तूमधला आहारातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे स्वच्छता. वातावरणातील धुलिकण, जिवाणू सर्व पावसामुळे खालच्या पट्टय़ात येतात जिथून ते पटकन जंतुसंसर्ग करू शकतात. जंतुसंसर्ग लवकर होणे हे या ऋ तूचे वैशिष्टय़. हा जंतुसंसर्ग वेगवेगळ्या स्रोतांद्वारे होतो. उदाहरणार्थ विषाणुबाधित अन्न, पाणी, हवा इत्यादी.
अन्नाद्वारे जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. सर्व भाज्या, फळे, सॅलड चांगल्या प्रकारे धुऊन घ्यावेत. कोमट पाणी किंवा पोटॅशिअम परमँगनेटचे द्रावण यासाठी वापरावे. हिरव्या भाडय़ांना जास्त चांगल्या प्रकारे धुऊन घ्यावे. नीट न धुतल्यास त्यातून जंतुसंसर्ग लवकर होण्याची शक्यता असते.
या दिवसांमध्ये सॅलड करताना शक्यतो त्यात वापरणाऱ्या फळभाज्या साल काढूनच वापराव्यात. फक्त त्या एकदा धुऊन चिरल्यानंतर परत पाण्याने धुऊ नयेत.
ताजे अन्न खावे. शिळे अन्न, उघडय़ावरचे अन्न खाऊ नये. उघडय़ावरच्या अन्नावर बसणाऱ्या माशा व इतर कीटकांद्वारे जंतुसंसर्गाचे प्रमाण आणखी वाढते. त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घ्यावी. सर्व अन्न झाकून ठेवावे व बाहेरील पदार्थ खातानासुद्धा स्वच्छता हे परिमाण जरूर ठेवावे.
शिजवलेले अन्न शक्यतो गरम असतानाच खावे वारंवार गरम करणे टाळावे कारण त्यामुळे जीवनसत्त्वांचा ऱ्हास होतो.

– डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com