मला लागलेला आयुष्याचा अर्थ

पूर्वी चित्रपटांमध्ये नायक-नायिके चं लग्न झालं, की शेवटी ‘समाप्त’ची पाटी येत असे! ‘..आणि ते सुखासमाधानाने राहू लागले’  हे गृहीतच धरलेलं असतं त्यात, पण खऱ्या आयुष्यात मात्र लग्न अनेकांचं आयुष्य आमूलाग्र बदलणारं ठरू शकतं. काळानुसार कुटुंबाच्या कक्षा प्रचंड बदलत गेल्या. सकाळी १० ते ५  या वेळेतली नवरा-बायकोची नोकरी आणि पाळणाघरातली मुलं अशी  काहीशी  बंदिस्त कुटुंब रचना शैक्षणिक  प्रगती आणि आर्थिक उलथापालथ यामुळे इतकी बदलली, की काही पुरुष होममेकर झाले, तर काही स्त्रिया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक. काही कुटुंबांत तर दोघांच्या नोकऱ्या वेळेची ‘एैसी-तैसी’ करणाऱ्या. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे, की अनेक घरांत एकमेकांना फक्त पाहाणं होतंय. मनमोकळ्या गप्पा किंवा कुठे बाहेर जाणं हे साप्ताहिक सुट्टीसाठी राखून ठेवलं गेलंय. मुलांच्या शाळा, त्यांचं संगोपन हा अनेकदा कौटुंबिक वादाचा विषय ठरतोय, तर सण, उत्सव यांच्यासाठीचं वेळापत्रक अनेकदा कोलमडून पडतंय, पण तरीही बरीच कुटुंबं आपापल्या पद्धतीनं आयुष्य जगताहेत, त्यातच आनंद शोधताहेत. एकमेकांना सांभाळून घेत नात्याची वीण उसवून देण्याची काळजी घेताहेत.

तुमचे आहेत असे अनुभव? कसा केलात आजवर संसार? आहेत का तुमच्याही आयुष्यात असे प्रसंग, ज्याला तोंड देताना एकमेकांच्या हातातला हात अधिक घट्ट झालाय? आहेत का असे अनुभव, ज्यात सुटणारच नाहीत अशा वाटलेल्या समस्याही सुटत शेवट गोड झालाय? कधी नियोजन करत, तर कधी तडजोडी करत संसार टिकवायचाच या उद्देशानं तुम्ही कोणत्या प्रश्नांना भिडला आहात? कोणती तंत्र-मंत्र उपयोगी पडलीत जगताना? पोहोचवा आमच्यापर्यंत तुमचे काही अनुभव, ज्यांचा उपयोग होईल नवजोडप्यांना त्यांचा संसार मांडताना. ज्यांच्या लग्नाला १० ते १५ वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यांनीच पाठवावेत आपले हे अनुभव घटना-प्रसंगांसह. शब्दमर्यादा ५०० ते ७००.

आमचा ई-मेल आहे – chaturangnew@gmail.com लेखावर ‘सप्तपदीनंतर..’ असा उल्लेख असणे आवश्यक आहे. लेख कॉम्प्युटरवर ऑपरेट केलेले असतील, तर ‘वर्ड’ वा ‘आरटीएफ’ आणि ‘पीडीएफ’ फाईलही पाठवावी.

आयुष्याचा अर्थ!

‘मी का जगतेय/जगतोय?..’ असा प्रश्न कधी पडतो का तुम्हाला? काहीशी नकारात्मक छटा असलेल्या या प्रश्नाला एखाद्या ठोस तत्त्वज्ञानाची जोड मिळाली, तर त्या व्यक्तीसाठी त्याची उकल होते आणि आयुष्य अधिक समृद्ध होतं. ही उकल करण्यासाठी ती व्यक्ती कुणी साधुसंत किंवा तत्त्वज्ञच असली पाहिजे असं मुळीच नाही. कधी अगदी सामान्य माणूसही सहज बोलताना नकळत जीवनाचं सार सांगून जातो, याचा अनुभव घेतला असेलच तुम्ही. तसाच तुम्हीही आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला असेल. मिळालं का तुम्हाला त्याचं उत्तर? अंतिम उत्तर नाही, तर किमान विचारांना सकारात्मक दिशा तरी मिळाली का? मग आम्हाला लिहून पाठवा. एक गोष्ट महत्त्वाची- तुमचं ‘जगण्याचं तत्त्वज्ञान’ पूर्णत: तुमचं असावं. त्यात काही रूढ संकल्पना आल्या तरी चालतील, पण केंद्रस्थानी असलेला विचार आणि विश्लेषण सर्वस्वी तुमच्या शब्दांतलं, अनुभवसिद्ध असावं. शब्दमर्यादा ५०० शब्द.

आमचा ई-मेल आहे-  chaturangnew@gmail.com