नातवंडांची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ नववृद्धांवर आली की त्यांनी त्यांच्या निवृत्तीच्या काळासाठी आखून ठेवलेल्या अनेक गोष्टींवर साहजिकच मर्यादा पडते. याबाबत दोघांमध्ये दुमत नसेल तर आपल्या इच्छाआकांक्षांना आवर घालताना त्यांना फारसे प्रयास पडत नाहीत. पण जबाबदारी किती वेळ घ्यावी आणि कशा पद्धतीनं घ्यावी याबाबत मतभेद असतील तर मात्र निवृत्तीनंतरच्या मानसिक स्वास्थ्याला तडा जातो.

‘‘हे काय माया, तू अजून तयार नाही झालीस? आज रोटरीचा वार आहे, विसरलीस का?’’ किशोरनं विचारलं.

extortion and robbery of couple by the police in nagpur
वा रे पोलीस! प्रेमी युगुलांची लुटमार, हफ्तावसुली…
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo

‘‘लक्षात आहे माझ्या. पण तासापूर्वी शिल्पाचा मेसेज आला की तिला यायला उशीर होत आहे. सान्वी आज किरकिर करत आहे त्यामुळे शिल्पाला आल्यावर स्वयंपाकासाठी मदत लागणार.’’

‘‘मला कळत नाही की यांना स्वयंपाकासाठी बाई ठेवायला काय जातं? एवढाले पैसे मिळवतात. आपण म्हणजे काय चोवीस तासांचे नोकर आहोत का यांचे? तुला तर काय सगळ्यांचं पडलं असतं. वेळ नसतो तो माझ्यासाठी. आज शिल्पा आली की मी चांगलं ठणकावून सांगणार आहे.’’

‘‘काही सांगायला वगैरे जाऊ  नका. ती किती भडक डोक्याची आहे हे माहिती आहे ना तुम्हाला.’’

‘‘हे बरं आहे. पूर्वी तुझं आणि आईचं वाजलं तर मी तुझी बाजू घेत नाही म्हणून मला बोलायचीस आणि आता तुझी बाजू घेतली तरी तेच. शेवटी मी मूर्ख हेच खरं,’’ असं बोलून किशोर तणतणत निघून गेला.

असं काही घडलं की त्याला कसं समजवावं हे मायाला कळायचं नाही. वास्तविक मायानंही आयुष्यभर नोकरी केली होती तेव्हा तिच्या सासू-सासऱ्यांनी तिच्या मुलांची जबाबदारी उचलली होती. आपण आजी-आजोबा झाल्यावर आपणही नातवंडांची जबाबदारी उचलायची, असं दोघांनी मिळून ठरवलं होतं. पण ही भूमिका निभावून नेताना तिच्या सासू-सासऱ्यांच्या नात्यात कधी ताण निर्माण झाला नव्हता, जो तिच्या आणि किशोरच्या नात्यामध्ये तिला पदोपदी जाणवत होता.

माया-किशोरप्रमाणे ज्यांना आज नातवंडांची जबाबदारी घ्यावी लागत आहे अशा अनेक जोडय़ांना या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. आजचे आजी-आजोबा हे मागच्या पिढीतील आजी-आजोबांपेक्षा वयानं मोठे नसले तरी मनाने अधिक तरुण असतात. साठी उलटली तरी आसुसून जगण्याची, मौजमजा लुटण्याची त्यांची उमेद कायम असते. लग्नाचे वा स्वत:चे वाढदिवस चारचौघांत साजरे करणं, शरीरस्वास्थ्य आणि तारुण्य जपण्यासाठी वेगवेगळे व्यायामप्रकार करणं, स्पा वा पार्लरमध्ये जाणं, याशिवाय भिशी पार्टीज, पिकनिक्स, लांबचे प्रवास, दूरचित्रवाणी मालिका यांसारख्या अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेल्या आहेत. तरुण वयात यापैकी अनेक गोष्टींना पैशाअभावी, वेळेअभावी मुरड घालावी लागलेली असते. नोकरीच्या व्यापातापातून मोकळीक मिळाली की त्या पुरेपूर उपभोगण्याची आस मनात बाळगली असते. अशा वेळी नातवंडांची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ नववृद्धांवर आली की या सगळ्या गोष्टींवर साहजिकच मर्यादा पडते.

याबाबत दोघांमध्ये दुमत नसेल तर आपल्या इच्छा आकांक्षांना आवर घालताना त्यांना फारसे प्रयास पडत नाहीत. पण जबाबदारी किती वेळ घ्यावी आणि कशा पद्धतीनं घ्यावी याबाबत मतभेद असतील तर मात्र निवृत्तीनंतरच्या मानसिक स्वास्थ्याला तडा जातो.

कधी कधी आई वा सासूवर जबाबदारी टाकणारी तरुण आई, अर्थात नवमाता त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा करत असते किंवा अवाजवी सूचना देत सुटते. आपल्या मुलानं काय, केव्हा आणि किती खाल्लं, त्याला कोणते कपडे घातले वा डायपर किती तासांनी बदलले या विषयी ऑफिसमधून चार-चार वेळा फोन करून हैराण करत राहते. या विषयी मुलगा-सुनेला काही सांगायला गेलं आणि त्यांनी तडकाफडकी वेगळं राहायचा निर्णय घेतला वा पाळणाघराचा पर्याय निवडला तर नातवंडं आपल्याला दुरावेल वा त्याचे हाल होतील ही भीती आजी-आजोबांच्या मनात असते. अजून एका गोष्टीचा ताण आजी-आजोबांवर येत असतो तो म्हणजे नातवंडं खेळता खेळता पडलं, त्याला कुठे लागलं तर कोण काय म्हणेल याचा. वास्तविक मुलं असंख्य वेळा पडत/धडपडत असतात याचा अनुभव आपली मुलं वाढविताना प्रत्येकानं घेतलेला असतो. पण नातवंडाला लागलं की जीव अधिक कासावीस होतो हा सार्वत्रिक अनुभव आहे. नातवंडं म्हणजे दुधावरची साय असते त्यामुळे त्याच्याविषयी अधिक कळकळ वाटते हे जितकं खरं तितकंच आपण जबाबदारी उचलली असताना त्या वेळेत ते धडपडलं तर त्याचे आई-वडील काय म्हणतील याची भीती असते.

ही भीती कधी अनाठायी असते तर कधी अनुभवातून आलेली. कारण मूल पडलं हे कळल्यावर आजी-आजोबा कुठे होते, काय करत होते अशी उलटतपासणी घेणारे काही तरुण आई-बाबा असतात. अनेक वेळा लहान मुलांचे लाड किती करावेत, त्यांना शिस्त कशी लावावी याबाबत त्यांच्या आणि आजी-आजोबांच्या मतांमध्ये अंतर पडते. कधी कधी आजी-आजोबा त्याबाबत नको इतका हस्तक्षेप करतात, अनाहूत सल्ले देत राहतात. तरुण पिढीला सल्ले देताना आपला पूर्वानुभव पुरे पडत नाही तर धोरणीपणा आणि व्यवहारज्ञान आवश्यक असतं हे भल्याभल्यांना उमगत नाही. काय बोलावं आणि कोणत्या शब्दात ते लक्षात येत नाही. आपलं ऐकलं गेलं नाही तर नातवंडांचं नुकसान होणार आहे या भावनेनं ते दु:खीकष्टी होतात. चिडचिडे होतात.

अशा अनेक कारणांमुळे आलेला राग-उद्वेग व्यक्त करायला हक्काचं माणूस म्हणजे त्यांचा जोडीदार ठरतो. त्यातून दुसरं नातवंडं आलं की मोठय़ाची रवानगी बहुतेक वेळा आजी-आजोबांच्या खोलीत होते. त्यामुळे होणारी कुचंबणा अजूनच वेगळी. कोणत्याही वयात नात्यातील ताजेपणा आणि पारदर्शीपणा अनुभवण्यासाठी परस्परांमध्ये संवादाचे पूल सदैव खुले असण्याची आवश्यकता असते; परंतु आपल्याच घरात वाटय़ाला आलेला खासगीपणा आणि निवांतपणाचा अभाव, नातवंडांच्या मागेमागे करून आलेला थकवा आणि स्वतंत्र खोलीची अपेक्षा केली तर मुलांना काय वाटेल याचा बागुलबुवा यापायी कसाला लागतं ते जोडीदाराशी असलेलं नातं.

मुलं परदेशी असली की नातवंडांची जबाबदारी वेगळ्या पद्धतीनं स्वीकारावी लागते. घरकामासाठी मदत नसणं, तिथल्या नियमामध्ये बसतं म्हणून आणि गरज असते म्हणून, इच्छा असो वा नसो सहा महिने वास्तव्य करायला लागणं, शिवाय लांबलचक प्रवास, जेटलॅगचा त्रास, बंद घर उघडून नव्यानं चालू करताना पडणारे प्रयास यापायी आपलं आपलं असं आयुष्य उरतच नाही. तरीही नातवंडांच्या ओढीनं निवृत्तीनंतर १०-१५ वेळा परदेश वारी करणारी जोडपी आहेत. त्याबद्दल काही जणांच्या मनात नाराजी असते तर काही जणांनी या जीवनपद्धतीशी हसतमुखानं जुळवून घेतलेलं असतं.

त्यांच्याप्रमाणेच मुलं-नातवंडांशी जुळवून घेत तीन पिढय़ा गुण्यागोविंदानं नांदणारी घरंही असतात. त्या घरातील आजी-आजोबा आपापले छंद जोपासत असतात आणि नातवंडांचे लाड करणं, त्यांचा अभ्यास घेणं, खेळणं यातील निर्भेळ आनंद अनुभवत असतात. अशा कुटुंबांचं निरीक्षण करताना लक्षात येतं की त्यामधील प्रत्येक व्यक्तीनं एकमेकांशी असलेलं नातं समजून घेत स्वीकारलं आहे. प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात तशी बलस्थानंही. कोणती गोष्ट किती ताणायची, स्पष्टपणे बोलायची आणि सोडून द्यायची याचं तारतम्य ठेवण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. ही कला भरपूर पैसे आहेत किंवा घरात ढीगभर नोकरचाकर आहेत म्हणून साधता येते अशातला भाग नाही. पैशामुळे तो मार्ग सुकर व्हायला मदत होते यात शंका नाही; तरी पैसे हे परस्परांमध्ये सामंजस्य निर्माण करू शकतेच असंही नाही. त्यासाठी आवश्यक असते ती माणसातल्या नातेसंबंधांविषयी वाटणारी कळकळ आणि ते समजून घेण्याची ओढ. कोणतंही नातं वा कोणतीही कुटुंबव्यवस्था १०० टक्केचूक वा बरोबर असू शकत नाही. काही तरी मिळविण्यासाठी काही तरी सोडावं लागतं. फक्त या ‘काहीतरी’कडे आपण कशा पद्धतीनं बघतो यावर आपला आजचा आनंद वा विषाद अवलंबून असतो. शेवटी नातवंडं मग ते एकत्र कुटुंबात वाढत असो वा विभक्त, प्रत्येक आजी-आजोबांच्या काळजाचा तुकडा असतं. म्हणूनच वाटतं की त्याच्या प्रेमापोटी अनेक तडजोडी केल्या जात असल्या तरी त्यापायी आजी-आजोबांमधील नातं भरडलं जात असेल तर त्याविषयी एकमेकांशी आणि घरातल्या तरुण पिढीशी स्पष्टपणे बोललं गेलं पाहिजे. जे बोललं जाईल ते लगोलग कृतीत उतरवलं गेलं पाहिजे. कारण होणाऱ्या चुका दुरुस्त करायला मुलां-नातवंडांजवळ असतो त्यापेक्षा आजी-आजोबांजवळ कमी अवधी असतो याचं भान आजी-आजोबांनी ठेवायला हवं आणि तरुण पिढीनंही.

(समाप्त)

chitale.mrinalini@gmail.com