कलाकार असलेल्या आणि नसलेल्याही काही मित्रांनी एकत्र येऊन ‘मोटली’ हा थिएटर ग्रुप स्थापन केला, जो गेल्या जवळपास ५० वर्षांपासून रत्ना यांची कर्मभूमी आहे. ‘मोटली’चा अर्थ अनेक रंगांनी युक्त. जेव्हा याची सुरुवात झाली तेव्हा त्यातले सहभागी सगळे जण तसेच होते – काही अभिनेते, एक वकील, एक वास्तुविशारद, एक नगररचनाकार, काही विद्यार्थी. कोणत्या प्रकारचं नाटक करायचं याचा कोणताही ठोस आराखडा त्यांच्यासमोर नव्हता, पण सर्वांना रंगभूमीशी जोडून राहण्याची इच्छा होती. आपल्याला आवडतं ते सातत्यानं करत राहणारी ‘मोटली’ ही आज एक हौशी नाट्यसंस्था आहे. त्यांचं ब्रीदवाक्य आहे, काम हाच आनंद!
ते दोन तरुण कलाकार लखनऊमधील एका कॅफेमध्ये बसून आपल्या भविष्यातील विविध योजनांबद्दल चर्चा करत होते, ते वर्ष होतं १९७७. दोघेही रंगभूमीचे चाहते असल्याने मनापासून आवडतील अशीच नाटकं करायची त्यांची इच्छा होती आणि त्यातूनच त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वत:ची एक नाट्यसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पहिलं नाटक निवडलं, सॅम्युअल बेकटचं ‘वेटिंग फॉर गोदो’.
जगभरातील इंग्रजी साहित्यातील विद्यार्थ्यांसाठी शाप ठरलेलं हे नाटकच नसीरुद्दीन शाह आणि बेंजामिन गिलानी यांनी का निवडलं? कारण त्यांना ते नाटक अजिबात समजलंच नव्हतं! परंतु त्यांचं कुतूहल मात्र जागृत झालं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात कलाकारांचा चमू अगदी लहानसा होता, फक्त चार पुरुष आणि एक मुलगा. आणखी चांगली गोष्ट म्हणजे नेपथ्य म्हणून कुठलाही सेट किंवा क्लिष्ट निर्मितीची आवश्यकता नव्हती. पोशाख चोर बाजारातून घेतले आणि संपूर्ण निर्मिती खर्च झाला सुमारे ५००० रुपये!
या नाटकात त्यांनी टॉम ऑल्टर (एक अमेरिकी अभिनेता, जो आपल्या कित्येकांपेक्षा अधिक भारतीय होता.) याला ‘लकी’ या नोकराच्या भूमिकेसाठी घेतलं, तर रोशन तनेजा यांना मालक पॉझो यांच्या भूमिकेसाठी निवडलं, हे दोघंही अपेक्षित भूमिकेच्या अगदी विपरीत स्वभावाचे होते. नसीर व बेंजामिन ‘भटक्या’च्या भूमिकेत होते आणि मुलाच्या भूमिकेत समीर आर्य (सुलभा आर्य यांचा मुलगा) याच्या सहभागाने या नाटकाचा संच पूर्ण झाला.
हे नाटक १९७९ मध्ये रंगमंचावर आलं. ‘पृथ्वी’ थिएटरमध्ये त्याचे काही प्रयोग झाले, मग काही काळासाठी हे नाटक थांबलं. नंतर पुन्हा सुरू झालं, मग पुन्हा थांबलं. कलाकार अनेक वेळा बदलले. पॉझो आणि लकी येत आणि जात राहिले; मुले मोठी होत गेली आणि मग आम्हाला नवीन मुले मिळेनाशी झाली. पण नाटक जवळपास चाळीस वर्षं अधूनमधून सादर होत राहिलं आणि कलाकारांनी जसा जसा त्याचा अधिक खोल अर्थ लावायला सुरुवात केली, तसं तसा तो एक सौंदर्यपूर्ण अनुभव बनत गेला. ‘गोदो’बरोबरचं आमचं हे दीर्घकालीन प्रेम प्रकरण आमची कंपनी ‘मोटली’मधील आमच्या प्रयत्नांना शब्दांकित करतं, ज्याचा अर्थ आहे, बहुरंगी!
१९८१ मध्ये ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मधून परत आल्यावर मीही या प्रवासात सहभागी झाले, परंतु त्यानंतरची काही वर्षं ही एकांकिका आणि काही प्रामाणिक, पण फारसे यशस्वी न ठरलेले इंग्रजी नाटकांचे प्रयोग यामध्ये सरली. या काळातही आम्ही सतत समकालीन भारतीय नाटकांच्या शोधात होतो. दरम्यान, ९०च्या दशकात आम्ही हळूहळू एक ‘इंग्रजी नाट्यसंस्था’ म्हणून ओळखले जाऊ लागलो; आम्ही हर्मन वूक यांचं ‘द केन म्युटिनी कोर्ट मार्शल’, शेक्सपिअरचं ‘ज्युलियस सीझर’ आणि काम्यूचं ‘द मिसअंडरस्टँडिंग’ सादर केलं. या काळात नसीर दिग्दर्शनात हात- पाय मोकळे करत होता, आणि मी माझ्या अभिनय कौशल्यात प्रगती करत होते.
‘ज्युलियस सीझर’ हे नाटक, खासकरून आमच्या नाट्यसंस्थेच्या शिक्षणासाठीचा एक मोठा टप्पा ठरलं. ते सारं आम्हाला जमेल अशी कल्पना आम्ही कशी काय करू शकलो, माहीत नाही. कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून आमचा ७० लोकांचा चमू होता. नाटकात मिरवणुका, जमाव, लढाईची दृश्यं होती, त्यासाठी असंख्य पोशाख तयार करावे लागले, ते घालून कलाकारांची तालीम करणं आणि पुन्हा ते व्यवस्थित योग्य ठिकाणी बंद करून ठेवणं – हे सगळं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त खर्चीक होतं. त्यामुळे आम्ही एक माहितीपत्र (ब्रोशर) तयार केलं आणि जाहिरातींसाठी धावपळ सुरू केली. पोशाख, बूट, ढाल-कवचासाठी प्रायोजक शोधले. सेट्स, वाहतूक, खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. हे सगळं काही मोजक्याच लोकांनी अनेक भूमिका बजावत केलं.
नेहमीप्रमाणे, या अनुभवातला सर्वात मोठा शोध म्हणजे माणसंच होती. आम्ही जितक्या तरुण कलाकारांना विश्वासात घेऊ शकलो तितक्यांना जोडून घेतलं आणि त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना बोलावलं. त्यात त्यांची कुटुंबंही सामील झाली. वडील, आई, मुलं, पुतणे, असं एक मोठं कुटुंब तयार झालं, जे सहा महिन्यांहून अधिक काळ एकत्र काम करताना अधिक जवळ आलं… घट्ट झालं. या काळात जुळलेली आम्हा सगळ्यांची मैत्री आजही टिकून आहे.
इतकं सगळं झालं तरीही, या नाटकाचं स्वागत फारसं चांगलं झालं नाही. काही लोकांना भाषा खूप कठीण वाटली, काहींना मूळ नाटकात केलेले बदल धक्कादायक वाटले आणि काहींना हा धर्मद्रोहच वाटला, अनेकांनी तर नाटक बघायला येणंच टाळलं. आमच्यावर नकारात्मक परीक्षणांचाही मारा झाला आणि काही प्रयोगांनंतर आम्हाला हे नाटक बंद करावं लागलं. पण ‘सीझर’ने आम्हाला एक मोलाची गोष्ट दिली. आम्हाला नक्की कुठल्या प्रकारचं नाटक करायचं आहे याची स्पष्टता आणि व्यावसायिक प्रकल्पांपासून दूर राहण्याची शहाणपणाची जाणीव.
‘इस्मत आपा के नाम’ या नाटकाने नसीर आणि ‘मोटली’ला एक नवी दिशा दिली- स्टोरी टेलिंग. त्याने आम्हाला एका अशा प्रवासावर पाठवून दिलं जो आजही आम्हाला नवीन रस्ते, नवीन मौल्यवान गोष्टी दाखवतो आहे. यातही एक खास गोष्ट अशी की, अनेकांसाठी हा प्रशिक्षणाचा मार्ग ठरला- आम्ही एक नवीन भाषा शिकलो… उर्दू आणि कोणत्याही तामझामाशिवाय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कलासुद्धा.
आम्ही हिंदुस्तानी आणि इंग्रजीत अनेक कथा सादर केल्या, तसेच ‘अ वॉक इन द वुड्स’ व ‘आइन्स्टाइन’ ही दोन महत्त्वाची नाटके केली. ‘अ वॉक इन द वुड्स’ हे नाटक मी दिग्दर्शित केलं. त्यात नसीर आणि रजित कपूर हे दोन अनुभवी कलाकार होते, त्यामुळे माझं काम खूपच सोपं झालं. माझं खरं योगदान हे फैजल रशीद आणि रणदीप हुडा यांनी केलेल्या नाटकाच्या रूपांतरातील बारकावे शोधून ते अधिक परिणामकारक करण्याचं होतं. मूळ नाटक हे ‘कोल्ड वॉर’च्या काळातलं रशियन आणि अमेरिकी राजनैतिक नायकांवर आधारित होतं, पण ते आपल्या भारत-पाकिस्तानच्या संदर्भात अगदी सुरेख बसलं. भारतात, दुबईत, सिंगापूर आणि पाकिस्तानमध्येही आम्ही या नाटकाचे यशस्वी प्रयोग केले. आणि त्यानिमित्ताने ह्रदयस्पर्शी, पण काहीशा वादग्रस्त चर्चाही घडल्या.
कॅनडाचे नाटककार गेब्रिएल वाइसमन यांनी लिहिलेलं ‘आइन्स्टाइन’ हे नाटक तर तंतोतंत नसीरसाठीचं लिहिलं गेलंय असं, त्याने ते स्वत: दिग्दर्शित केलं आणि साकारलंसुद्धा. या नाटकात त्याने जर्मन उच्चारांवर इतकी मेहनत घेतली, की तोच आइन्स्टाइन आहे, असं प्रेक्षकांना सहज वाटावं.
परंतु माझ्यासाठी, ‘द फादर’ हे फ्लोरिअन झेलर यांनी लिहिलेल्या फ्रेंच नाटकाचं दिग्दर्शन करणं ही नसीरने घेतलेली हनुमान झेप होती. त्यात त्याने ‘आंद्रे’ची मुख्य भूमिकाही केली. जो हळूहळू डिमेन्शियाच्या गर्तेत अडकत जातो. आणि त्याची मुलगी अॅन मात्र या साऱ्या परिस्थितीला तोंड देण्याच्या संघर्षाशी झुंजत राहाते. लेखक आपल्याला आंद्रेच्या मनात घेऊन जातो आणि त्याच्या नजरेतून आपण जग पाहायला लागतो… यात एकच पात्र वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या सीनमध्ये साकारलं होते, ज्यामुळे आंद्रेचा डिमेन्शिया अधिक ठळकपणे प्रेक्षकांसमोर येत राहातो. सेटवरचं फर्निचर नाहिसं व्हायला लागतं. जसजसं आंद्रेचं मन रिकामं होत जातं तसतसा रंगमंचही रिकामा होत जातो. शेवटी रंगमंच पूर्णत: रिक्त आणि आंद्रे एकटाच उरतो… आणि समोरचे प्रेक्षक एका अनुत्तरित प्रश्नांसह थबकून राहतात. ‘हे जर माझ्याबाबतीत झालं तर?’
हेही वाचा
नसीरने आधीच ठरवलं होतं. यात कोणतेही ‘प्रॉप्स’ म्हणजे वस्तू वापरायच्या नाहीत, आंद्रेच्या नजरेतून दिसणारी दुनिया हीच प्रेक्षकांना अनुभवायला लागणारी दुनिया असेल. नाटकात सर्व कृती रंगमंचावर घडत आहेत अशाच पद्धतीने केल्या जात परंतु कोणत्याही वस्तूंशिवाय, सगळ्या हालचाली हवेतच. ध्वनी मात्र प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनेसारखे. हा आभास ध्वनीपटाच्या साहाय्याने अधिक प्रभावी करण्यात आला. त्यामुळे जेव्हा गोळ्यांची डबी उघडली जायची, तेव्हा त्या डबीचा होणारा ‘क्लिक’ आवाज, गोळ्या ओततानाचा आवाज ऐकू यायचा; जेव्हा वाइनची बाटली उघडली जायची, तेव्हा तिचे बूच उघडल्याचा आवाज आणि बाटली खाली ठेवण्याचा आवाज ऐकू यायचा. हे सगळं साउंड ट्रॅकवरून साकारण्यात आलं. साहिल वैद हा एक अभिनेता आणि ‘ध्वनी’ मध्ये प्रचंड रस असलेला कलाकार आहे, त्याने हे रंगमंचीय ध्वनीविश्व तयार केलं होतं. तो स्वत:ही या नाटकात होता. सगळ्या तालमींना तो उपस्थित असायचा. त्याने रंगमंचीय ध्वनीनिर्मितीत जितकी मेहनत घेतली, तितकीच अभिनयातही. ध्वनीनिर्मितीचं रंगभूमीवरील सादरीकरण हेही फार जबाबदारीचं काम होतं, आणि ते करणारा ध्रुव कालरा मला भेटलेला आत्तापर्यंतचा सर्वात संवेदनशील आणि मेहनतीने काम करणारा ध्वनीतज्ज्ञ आहे.
या नाटकासाठी आम्ही महिनोन् महिने तालीम केली, कारण क्रिया अगदी अचूक, आणि ध्वनी त्याच क्षणी येणं आवश्यक होतं. आणि हे सारं त्यातील ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या दृशांइतकंच महत्त्वाचं होतं. त्या दृश्यांशी जोडून घेण्याचा मार्ग शोधावा लागला, भावना मनापासून अनुभवाव्या लागल्या आणि तरीही स्वत:ला आवरावं लागलं, आतून जाणवणारा त्रास, असहायता, अगदी हिंसेची जाणीवसुद्धा आतून अनुभवून ती रंगभूमीवर उतरवावी लागली.
विशेषत: साहिलसाठी यात आणखी एक कसोटीचा प्रसंग होता. एका प्रसंगात त्याला नसीरच्या गालावर जोरात मारायचं होतं, एकदा नव्हे तीनदा. एक म्हाताऱ्या, अशक्त माणसाच्या गालावर जोरदार प्रहार करण्याचा प्रसंग विजेचा झटका देऊन जायचा. प्रेक्षकांचं श्वास रोखणं प्रत्यक्षात ऐकू यायचं. पण हे सर्व त्या बिचाऱ्या कलाकारांसाठी अत्यंत कठीण होतं. ते स्वीकारणारा नसीर सगळं सहन करत होता, पण साहिलसाठी जास्तच कठीण होतं, कारण त्याने अभिनय शाळेत नसीरकडून दोन वर्षं शिक्षण घेतलं होतं आणि आपल्या गुरूशी अशा प्रकारे वागणं त्याला भयानकच वाटत होतं. शेवटी नसीरनेच त्याला धमकावलं, तेव्हाच तो हे दृश्य योग्य प्रकारे साकारू शकला!
माझ्यासाठी ही एक अत्यंत वेगळी आणि अनोखी अनुभवप्रक्रिया होती, कारण मी अॅन म्हणजेच मुलीची भूमिका साकारत होते. हीबा (नसीरची मुलगी हीबा शाह) देखील हीच भूमिका करत होती (डबल कास्ट ), पण आमच्यासमोर उभ्या राहिलेल्या अडचणी खूप वेगळ्या होत्या. कोणत्याही मुलांना आपल्या पालकांबद्दल वाटणाऱ्या भीतीला हीबाला सामोरं जावं लागलं, ती म्हणजे आपल्या पालकाला हळूहळू ढासळताना पाहणं आणि तो एक ओझं बनताना अनुभवणं.
पण माझ्यासमोर मात्र वेगळंच आव्हान होतं, मला आधी माझ्या नवऱ्याला माझ्या वडिलांच्या रूपात स्वीकारावं लागलं, आणि मग दोन वेदनादायक गोष्टी स्वीकारण्याचं आव्हान होतं; एक म्हणजे त्याचं रागीट, हट्टी मुलात रूपांतर होताना बघणं, आणि दुसरं म्हणजे, नजिकच्या काळात कदाचित माझंही हेच भवितव्य असू शकतं, ही भावना.
नसीर आपल्या भूमिकेसाठी इतकी मेहनत घेतो की आजूबाजूचे सगळे लाजून तितकीच मेहनत घ्यायला लागतात. पण यावेळी सगळ्यांसाठी भावनिक थकवा फार होता. सुदैवाने, ‘मोटली’वाल्यांच्या थांबवता न येणाऱ्या उत्साही वृत्तीमुळे सर्व काही सुरळीत पार पडलं. प्रयोग मजेदार झाले; कोणी नाटक घरी घेऊन जात नव्हतं, आणि बॅकस्टेजवरचं वातावरणही पूर्णपणे सकारात्मक आणि उत्साही होतं.
जेव्हा लोक आम्हाला भेटायला रंगमंचामागे येत, तेव्हा ते हादरलेले, भारावलेले असायचे. कित्येक जण रडायचे, काहींनी त्यांचे वैयक्तिक अनुभव शेअर केले, काहींना फक्त एक मिठी हवी असायची. आम्ही नाटक करत असताना जे काही अनुभवलं ते आमच्या प्रेक्षकांना देऊ शकलो – संवेदना आणि स्वीकार.
रंगमंच म्हणजे एक अद्भूत चमत्कारच, आपल्याला आपलं सर्वोत्कृष्ट रूप साकारण्याची संधी देणारा!