‘पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था’ ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या या लेखातून मुक्त विचारसरणीवर आधारित मानवी स्वभाव व भावना तसेच नातेसंबंधांवर उत्कृष्ट अशी माहिती देण्यात आली आहे. काळानुरूप सामाजिक रचनेत बदल होत असतो, त्यास होणारा विरोध व मिळणारे प्रोत्साहन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आधुनिक जगात विकासाच्या प्रवाहात वाटचाल करताना समाजबांधणीत नवनवे बदल घडून येत असतात. याची उदाहरणे म्हणजे स्वतंत्र कुटुंब-पद्धती, लिव्ह-इन रिलेशन, वीकेंड मॅरेजेस, एलजीबीटी कम्युनिटीचे प्रश्न, निओलोकल ट्रेंड (यामध्ये विवाहित मुलगा व मुलगी एकमेकांच्या घरी न राहता स्वतंत्र घर घेऊन राहतात).

समाजशास्त्र व मानसशास्त्राचा विचार करता मानवी स्वभाव व त्यानुसार असलेले मानवी वर्तन हे समाजाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे मुक्त विचारसरणीवर आधारित सामाजिक बदल अनुभवताना वैयक्तिक भावनिक हित, समाजातील स्थान, सामाजिक परंपरा व समाजाप्रति असलेला आदर या सर्व गोष्टींमध्ये समतोल राखणे हेच पॉलीअ‍ॅमरस व्यक्तींपुढे असलेले आव्हान आहे.

– शुभम व्हटकर, पुणे</strong>

 

अंतर्मुख करणारा लेख

मंगला सामंत यांचा ‘बॉयकोड’ पुरुष घडवताना, हा शास्त्रशुद्ध विश्लेषण करणारा लेख अंतर्मुख करणारा वाटला. मागील पिढय़ांना मुलासाठी काही वेगळं, काही हटके असावयास हवे अशी आईवडिलांची धारणाच होऊन बसली आहे. एखादा मुलगा आईच्या जवळपास असल्यास त्याचे ‘बायकी’ नामकरण केले जाते. खरं तर स्त्री ही संपूर्ण मानव आहे; पण आपल्याकडील पितृसत्ताक पद्धतीमुळे नेहमीच दुय्यम दर्जा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी मी आनंदवन, हेमलकसा येथे सहल घेऊन गेले होते. वृद्ध आईवडील आणि त्यांची तरुण कन्या, असा त्रिकोणी परिवार. सोबत काही तरुण मुलंमुलीदेखील होत्या. दिवसभर छान चेष्टामस्करी, विनोद सुरू होते. रात्री जेवल्यावर पुन्हा गप्पांची मैफल रंगात आली होती आणि अचानक त्या तरुण पिढीला ‘त्या’ मुलीची आठवण झाली. दरवाजा ठोकला, तर उघडाच होता. ती मुलगी आपल्या आईच्या पायाला तेल चोळीत होती. क्षणभर मुले आश्चर्यचकित झाली, कारण त्यांनी त्यांच्या घरी असे काही पाहिले नव्हते, केलेही नव्हते. शेवटी त्या मुलांनी आपल्या गप्पांचा अड्डा त्यांच्या खोलीत हलवला. तात्पर्य काय मुलगा असला तरी मन संवेदनशील असावे लागते.

दुसरी गोष्ट- तीन-चार मुलं असलेले आईबाप, संस्कार म्हणाल तर सर्वावर जवळपास सारखेच करीत असत. मग तीन मुले आपल्या बायकोसोबत वेगळा संसार मांडून संसारात मश्गूल होतात, तर एक मुलगा आपल्या संसाराची आणि आईवडिलांची काळजी घेत असतो. इतर तिन्ही भावंडांची वृत्ती पाहून मन उद्विग्न होते.

– शिल्पा पुरंदरे, मुंबई</strong>