एकनाथ म्हणतात,  मी म्हणजे कोण हे खरं कुठं उमगतं? ‘मी’ म्हणजे देहच.. या देहाला चिकटलेलं नाव.. या देहाचं शिक्षण.. या देहाची आर्थिक, सामाजिक स्थिती.. या देहाच्या आधारावर प्रसवत असलेल्या भल्याबुऱ्या इच्छा, वासना.. या गोष्टी किती अस्थिर असतात.. त्यात किती चढउतार होत असतात.. तरीही या अनंत ओळखींचं बंधन ‘मी’ला जखडलं असतं. पण जेव्हा हे देहभावाचं संकुचित बंधन गळून पडतं तेव्हा मन व्यापक होतं..

मूल जन्माला येतं तेव्हा केवळ एक उघडा देह सोबत घेऊन येतं.. त्या देहाला जन्मत:च जाणीवही नसते ‘मी’ कोण आहे याची.. छोनुल्या, बबडय़ा, गुंडू किंवा शोनुली, बबडी, गुंडुली अशा मायेची पखरण करणाऱ्या ऐच्छिक नावांचा पडदा विरत जातो आणि त्या जीवाला ठेवलं जातं ‘त्याचं स्वत:चं’ नाव.. नाव एकाकी नसतंच. वडिलांचं नाव आणि आडनावही आपोआप चिकटतं आणि मग अशा ‘पूर्ण’ नावातून धर्म, जातीचं अस्तरही उघडंच राहातं.. जन्मभर!

How do you make sure there is no worm in a cauliflower
फक्त काही सेंकद फुलकोबी गॅसवर ठेवा, झटक्यात बाहेर येईल अळी किंवा किडे; पाहा भन्नाट Kitchen Jugaad
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
idli or dosa batter is never over-fermented
World Idli Day : इडली स्वादिष्ट व्हावी म्हणून पीठ जास्त दिवस आंबवता का? ही सवय आताच थांबवा….
How to make raw mango dal mango dal
तुम्ही कधी चटकदार कैरीची डाळ खाल्ली आहे का? नसेल तर ही घ्या सोपी रेसिपी

मग त्या नावासोबत बोट धरून चालता चालता बाळाची समज जसजशी वाढू लागते तसतसं त्याला येतं ‘आपल्या’ आर्थिक, सामाजिक ‘दर्जा’चं भान! एवढं कमी म्हणून की काय भाषिक, प्रांतिक ओळखीचीही जोड लाभते. मग अवघ्या जगाकडे याच आत्मकेंद्रित भिंगातून बघितलं जातं. ‘मी’ हळूहळू पक्का होत जातो आणि ‘मी कोण आहे,’ हे दुसऱ्याला दाखवून देण्याची खुमखुमी वयाबरोबर वाढतच जाते..

कुणीही आपली ओळख विचारली की आपण काय सांगतो? प्रथम सांगतो आपलं नाव.. तेवढं पुरेसं नसेल तर सांगतो, काय शिकलोय आणि सध्या काय करतोय..

अध्यात्माच्या वाटेवर आपण चालू लागतो तेव्हाही या ओळखीचं ओझं पाठीवर असतंच! आता अध्यात्म हे ‘मी’पणा संपविणारं असतं, पण या वाटचालीतून आपल्या ‘मी’ला एक सुरक्षित कवच लाभावं, हीच तर आपली सुप्त इच्छा असते. ‘मी’चा नाश व्हावा, असं कुणाला वाटेल?

व्यक्तिस्वातंत्र्याचे समर्थक तर या ‘मी’पणा नष्ट करण्याला विरोधच करतील.. पण व्यक्तिस्वातंत्र्य मानणाराही ‘दुसऱ्यानं माझंच ऐकावं,’ या भावनेतच अडकलेला असतो, हे कसं विसरता येईल.. ‘मी’ इतका चिवट आणि पक्का असतो.

वयाची तिशी पार केली होती आणि अध्यात्म मार्गावर पडत-धडपडत चालत होतो तेव्हा श्रीगुरुजींचं प्रथम दर्शन झालं. त्या क्षणीही हा ‘मी’ सावलीसारखा माझ्या सोबत होताच!

गुरुजींनी विचारलं, ‘‘तुम्ही कोण?’’

कुणीही सहज सांगेल तेच स्वाभाविक उत्तर मी दिलं.. मी माझं नाव सांगितलं! गुरुजींनी माझं नाव जरा जोरातच घेत विचारलं, ‘‘साठ वर्षांपूर्वी तुम्ही कुठं होतात?’’

मी गोंधळून म्हणालो, ‘‘माहीत नाही..’’

गुरुजींनी हसून विचारलं, ‘‘साठ वर्षांनंतर तुम्ही कुठं असाल?’’

मी त्याच दिङ्मूढ अवस्थेत म्हणालो, ‘‘तेही माहीत नाही.’’

गुरुजी हसून म्हणाले, ‘‘मग या मधल्या साठ वर्षांना ‘मी म्हणजे अमुक,’ हे जे तुम्ही घट्ट धरून बसला आहात, ते विसरायचं, हेच फक्त अध्यात्म आहे!’’

अध्यात्माची इतकी साधीसरळ व्याख्या मी प्रथमच ऐकत होतो. माझं भारावलेपण न्याहाळत गुरुजी म्हणाले, ‘‘पण हो! ‘मी म्हणजे अमुक’ हे स्वत:पुरतं विसरायचं आहे, जगासाठी नाही! जगात आवश्यक तेवढा ‘मी’ राहू द्या, पण मनातून तो काढून टाका!’’

आणि सगळा गोंधळ इथंच आहे. जगासमोरचा ‘मी’ तर मावळत नाहीच, पण मनातूनही तो जाता जात नाही.

हा ‘मी’ आर्थिक पाठबळाच्या गर्वाचं ओझं बाळगेल.. शैक्षणिक कर्तृत्वाचं ओझं बाळगेल.. व्यावसायिक प्रगतीचं किंवा नोकरीतल्या मानाचं ओझं बाळगेल.. ही झूल त्याला कधी उतरवावीशीच वाटणार नाही.

‘ज्ञानेश्वरी’त एक ओवी आहे.. त्यात माऊली म्हणतात की, ‘‘म्हणौनि थोरपण पऱ्हां सांडिजे। एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे। जैं जगा धाकुटें होईजे। तैं जवळीक माझी।।’’ माझा संग हवा आहे ना? मग आपल्या मोठेपणाचा ताठा दूर सार.. ऐकीव, पढिक ज्ञानाचा आधार विसर आणि या जगात स्वत:कडे लहानपणा घे! साक्षात भगवंत हे सांगत आहेत आणि त्या भगवंताची कृपा आपल्याला लाभली आहे, या आविर्भावात वावरणारे स्वयंघोषित आध्यात्मिक महापुरुष मोठेपणाचा किती ताठा मिरवत आहेत!

जिथं लोकांना अध्यात्म शिकवणाऱ्यांचा ‘मी’ सुटत नाही तिथं शिकणाऱ्यांचा तरी कुठून सुटणार?

पण जन्मभर सोबत करणारा हा ‘मी’ काय कायमचा टिकतो काय? त्या ‘मी’चा आविर्भाव किती पोकळ असतो, तकलादू असतो, हे ‘एकनाथी भागवता’त नाथांनी फार मार्मिकपणे मांडलं आहे. नाथ म्हणतात, ‘‘मी देह हे मानोनि चित्ते। निजरूप विसरता भावार्थे। हे मिथ्याबंधन जीवाते। सत्यत्वे त्याते अभिमानु।।’’ मी म्हणजे कोण हे खरं कुठं उमगतं? ‘मी’ म्हणजे देहच.. या देहाला चिकटलेलं नाव.. या देहाचं शिक्षण.. या देहाची आर्थिक, सामाजिक स्थिती.. या देहाच्या आधारावर प्रसवत असलेल्या भल्याबुऱ्या इच्छा, वासना.. या गोष्टी किती अस्थिर असतात.. त्यात किती चढउतार होत असतात.. तरीही या अनंत ओळखींचं बंधन ‘मी’ला जखडलेलं असतं. त्यातून अहंकारच झळाळून फोफावत असतो. मग जगात हा ‘मी’ कसा वावरतो? जसं बुद्धिबळाच्या पटावरचं प्यादं.. नाथ म्हणतात, ‘‘मिथ्या बुद्धिबळाचा खेळ। हारी जैती ही निष्फळ। तरी खेळत्या अभिमान प्रबळ। तैसे देहबळ जीवासी।।’’ बुद्धिबळाचा खेळ हा खेळच असतो ना? म्हणजे खरा नसतोच.. त्यातलं जिंकणं आणि हरणं या दोन्हीला तसा काही अर्थ नाही.. तरी खेळणारे कसे प्रबळ ईर्षेनं खेळत असतात. तसा देहबुद्धीच्या प्रबळ अभिमानाच्या जोरावर माणूस जगात वावरत असतो. जेव्हा हे देहभावाचं संकुचित बंधन गळून पडतं तेव्हा मन व्यापकच होतं.. नाथ म्हणतात, ‘‘जेव्हा बुद्धिबळाचा खेळ मोडे। तेव्हा राजाप्रधानादि लाकुडे। तेवी अहंकारु निमाल्या पुढे। प्रपंच उडे मिथ्यात्वे।।’’ बुद्धिबळाचा खेळ मोडतो म्हणजे संपतो तेव्हा.. एवढंही पुढं जायला नको! चौसष्ट चौकडय़ांच्या पटावर दोन्ही बाजूंनी दोन सेना सज्ज असतात.. काळी आणि पांढरी.. प्रत्येक बाजूनं आठ प्यादी, दोन उंट, दोन घोडे, दोन हत्ती, एक वजीर आणि अर्थातच एकमेव राजा! या एका अहंकाररूपी राजाला वाचविण्यासाठी आपण सरळ चालीनं जातो, तिरक्या चालीनं जातो आणि अगदी अडीच घरं उडय़ाही मारून पाहातो.. दुसऱ्याला जितकं चीत करता येईल तितकी जिंकण्याची शक्यता अधिक, असं आपलं गणित असतं. त्यामुळे अहंकाराची सत्ता शाबूत राहावी म्हणून आपण दुसऱ्याची अडवणूक करू पाहतो.. प्रसंगी किरकोळ इच्छांच्या प्याद्यांचाही मनावर दगड ठेवून बळी देतो! अगदी हत्ती, घोडे, उंटही गमावतो, पण अहंकार वाचविण्याची शर्थ करीत राहातो.. पण एकमेकांसमोर उभी ठाकलेली प्यादी किंवा हत्ती, घोडे ‘मारले’ जातात आणि शेवटी एकाच खोक्यात टाकले जातात.. त्या खोक्यात ‘मारामारी’ होते का हो? तेव्हा वजीर असो की प्यादे असो.. दोघांची किंमत एकच.. स्तर एकच.. तो म्हणजे लाकूड! अगदी त्याचप्रमाणे ‘मी प्यादे’, ‘मी हत्ती’, ‘मी वजीर’ हा अहंकार संपतो तेव्हा सर्व गोष्टींचं मोल एकच आहे, हे लक्षात येतं!

जीवनाच्या पटावर प्रारब्धानं उभे ठाकलो आहोत तर ‘खेळणं’ हे कर्तव्यच आहे.. पण पट मिटताच ‘खेळा’तली सारी द्वंद्वंही मिटलीच पाहिजेत, नाही का?

पण तोवर चला.. खेळायचं ते जिंकण्यासाठीच नाही का? अहंकार संपला आणि सगळ्या गोष्टींचं मोल एकच आहे, असं मानलं तर जगण्याला तरी काय अर्थ आहे? ही नकारात्मकताच नाही का?.. या प्रश्नांची प्यादी मांडू! शेवटी ‘मी’च जिंकणार, हे नक्की!!

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com