वंचितांचं जग समजलं तर आपली पालकत्वाची सामाजिक जबाबदारी उचलता येते. ही आपलीच माणसं आहेत. त्यांचा जगण्याचा झगडा जीवघेणा आहे, हे आपण समजून घेऊ या आणि मुलांनाही समजावून देऊ या. निदान आपली मुलं तरी वंचित मुला-माणसांबद्दल बेपर्वा व्हायला नकोत.

आपल्या मुलांचे चांगले, सुजाण पालक होण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मुलांना सन्मानानं वागवताना, आपली घरं उबदार बनवताना, मुलांचं आणि आपलं जग मोठं करताना अपरिहार्यपणे समाजातली अनेक वंचित मुलं आपल्याला भेटत राहतात. कधी ती रस्त्यात सिग्नलपाशी गाडी थांबलेली असताना गाडीची काच पुसून पैसे मागतात, कधी रस्त्यातच कसरत करून दाखवतात, कधी रेल्वेच्या प्रवासात डबा साफ करून जातात, तर कधी बुट पॉलिश करायला येतात, कधी हॉटेलमध्ये काम करताना दिसतात. ही मुलं, त्यांचे पालक कसे राहतात, काय विचार करतात, कसं असतं त्यांचं जग हे समजून घेतलं तर आपल्या पालकपणातले अवास्तव आग्रह गळून पडतात, पडतील.
वंचितांचं जग समजलं तर आपली पालकत्वाची सामाजिक जबाबदारी उचलता येते. केवळ संख्याच पाहायची तर सुखवस्तू माणसांच्या किती तरी पट मोठी संख्या वंचितांची आहे. हा आपलाच समाज आहे. ही आपलीच माणसं आहेत. त्यांचा जगण्याचा झगडा जीवघेणा आहे. हे आपण समजून घेऊ या आणि मुलांनाही समजावून देऊ या. निदान त्यांच्याविषयीचं आपलं अज्ञान दूर व्हावं, गैरसमजुती नाहीशा व्हाव्यात यासाठी सुरुवात करू या. निदान आपली मुलं तरी वंचित मुला-माणसांबद्दल बेपर्वा व्हायला नकोत.
मला लहानपणी घडवण्यात जसा माझ्या आई-वडिलांचा, शिक्षकांचा हात आहे तसा माझ्या प्रौढपणातल्या काही आठवणींचा, कामाचा, अनुभवांचाही हात आहे. जर मी गरीब वस्तीतल्या बायांबरोबर, मुलांबरोबर काम केलं नसतं, जर ‘दलित पुरुषांच्या आत्मचरित्रातील स्त्री-प्रतिमा’ या प्रकल्पाचं काम केलं नसतं, तर माझी समज अपुरी राहिली असती. पशाच्या, पदाच्या, समाजातल्या उच्चस्थानाच्या जोरावर माणसं हवेत तरंगत असतात. त्यांना जमिनीवर आणण्याचं काम ही गरीब, वंचित माणसं-मुलं करू शकतात. तसं करण्याच्या हेतूनं ती काही बोलत नाहीत, पण त्यांच्याबरोबरचा संवाद आपला उच्चवर्गीय श्रीमंती माज नाहीसा करू शकतो. हा अनुभव प्रत्येकानं घ्यावा असाच आहे. आपलं पालकत्व ठिकाणावर आणण्याचं सामथ्र्य या अनुभवांमध्ये आहे.
एकदा एका कार्यशाळेत असा प्रश्न विचारला होता, की तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ कोणता? कुणी सांगत होतं बालपणाचा काळ, कुणी म्हणालं लग्न ठरलं तेव्हा, कुणाला पहिलं मूल झालं तो काळ आठवला. माझ्या नकळत मी सांगून गेले की दोन वर्षे झोपडपट्टीत काम करत होते तो सर्वात आनंदाचा काळ होता. तो आनंदाचा अशासाठी, की आपण जेव्हा काही नवीन शिकतो, तेव्हा आपल्याला आनंद होतो. या काळात भेटणारी प्रत्येक बाई आणि प्रत्येक मूल मला रोज नवा साक्षात्कार घडवत होतं. नवं काही शिकवत होतं.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशनमध्ये मी १९७८ ते १९८२ या काळात काम करत होते. काम शोधताना माझ्या मनात असं होतं, की मला फायलींबरोबर काम नाही करायचं. माणसांबरोबर काम हवं. कामही शक्यतो असं असावं की जिथे शिक्षण आणि समाजकार्य एकत्र आहेत. नेमकं असं काम मिळालं ते ‘प्रौढशिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण’ या प्रकल्पांमध्ये काम करताना. प्रौढ शिक्षणाची तेव्हा तर देशभर मोहीमच चालू होती. सगळीकडे चर्चासत्रं, प्रशिक्षण कार्यक्रम, साहित्य निर्मिती, प्रत्यक्ष अनुभवासाठी गरीब वर्गातल्या प्रौढांचे वर्ग, रात्रीचे वर्ग चालवणं सुरू होतं. आम्हीही एक वस्ती निवडून काम सुरू केलं.
हे सगळं काम करताना मला वाटत राहिलं, की या प्रौढ स्त्रियांना, मुलांना आपल्याला काही शिकवायचं आहे. ते न ऐकताच आपण त्यांच्यावर आपल्या कल्पनांचा मारा करतो आहोत. यामुळे त्यांचं शिक्षण होत नाही आणि आपणही आपल्या कामाची दिशा बदलत नाही.
पहिल्याच दिवशी जेव्हा आम्ही दोघी-तिघी जणी वस्तीत गेलो, तेव्हा वस्तीच्या तोंडाशीच एक आजी बसल्या होत्या. त्यांनी आम्हाला हटकलं. आम्ही पोपटासारखं त्यांना म्हटलं, ‘‘आपल्याला खूप गोष्टी माहीत नसतात, त्या शिकण्यासाठी आपण एकत्र जमू या. त्याचा तुम्हाला उपयोग होईल.’’ आजी हसून म्हणाल्या, ‘‘चला बाई.. तुमचाबी पगार सुरू होईल. आमचंबी शिकनं सुरू होईल.’’ या पहिल्याच वाक्यानं आम्हाला खूप काही शिकवलं. आजी अनुभवी होत्या. त्यांना माहीत होतं की पगार मिळतो म्हणूनच कार्यकत्रे वस्तीत येतात. उपयोग त्यांच्यापेक्षा काम करणाऱ्यालाच अधिक होतो. प्रकल्प संपला, पसे संपले की कार्यकत्रे येणं बंद होतं आणि वस्तीतली माणसं तिथेच राहतात.
पुढे जेव्हा प्रौढशिक्षणाचे खेडय़ा-पाडय़ातले वर्ग बघायला आम्ही जायचो, तेव्हा असाच एक संवाद घडला जातो. आम्ही म्हणत होतो, ‘‘शिकलात तर तुम्हाला बसवरच्या पाटय़ा वाचता येतील.’’ एक बाई म्हणाली, ‘‘ते काय कुणीबी सांगतंय वाइच इच्यारलं की.’’ मग आम्ही म्हणायचो. ‘‘सावकार तुम्हाला लुबाडतात. शिकलात की तुम्हाला सही करता येईल.’’ दुसरी एक बाई म्हणाली, ‘‘निसती सही क्येली तर काय व्हनार? वरचं काय वाचता येयला नगं व्हय? म्हंजी सावकार आमची कशावरबी सही घ्येनार आन फशिवनार.’’ त्यांचं ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाचं होतं, आमचं पुस्तकी होतं!
तरी एका आजीबाईंशी झालेलं संभाषण मला आठवत राहतं. त्या मला म्हणाल्या, ‘‘भाकरी करतीस का गं पोरी?’’ मी म्हटलं, ‘‘हो. करते की!’’ त्यांनी सवाल टाकला-‘‘थापून का हातावं?’’ ‘‘थापून. हातावरच्या नाही येत मला करायला.’’ आजीबाई म्हणाल्या, ‘‘आता कसं..? तुमच्या थापून भाकऱ्या. आमच्या हातावरच्या. तुमचं आमचं कसं व्हयाचं?’’ मला त्यांच्या बोलण्याचा रोख कळला. त्यांना असं म्हणायचं होतं, की आमचं जगणं वेगळं, तुमचं वेगळं. तुमचं शिक्षण आम्हाला काय कामाचं? म्हणून मी म्हटलं, ‘‘आज्जी, तुम्ही शिकवा की मला हातावरच्या भाकरी. तुमच्याएवढी मोठी नाही येणार. पण छोटी तरी जमेलच की!’’ आजीबाईंना कळलं त्यांना काय म्हणायचं होतं ते मला समजलं आहे. माझ्या तोंडावर हात फिरवून स्वतच्या कानशिलावर बोटं मोडून त्या म्हणाल्या, ‘‘लई ग्वाड बोललीस गं.. बया!’’
तुम्ही कशासाठी शिकायला येता? असा प्रश्न शिकणाऱ्यांना हमखास विचारला जायचा. वेगवेगळी उत्तरं यायची. एका बाईंनी मात्र अनपेक्षित उत्तर दिलं, ‘‘आम्हाला शिकवणारी ही पोरगी हाय ना, तिला शंभर रुपयं भेटत्यात म्हणून आपलं आम्ही येऊन बसतो हितं.’’
आता म्हणे अशा वर्गा-बिर्गाना बाया येत नाहीत. कुणी एखादा प्रकल्प घेऊन गेलं, की गावातले लोक म्हणतात-‘‘काय राबवायचं तेवढं सांगा आणि पसे द्या. तुमचं प्रशिक्षण नको आम्हाला. आम्हाला सगळं माहीत आहे.’’
आमचं ऑफिस जिथं होतं त्याच्या शेजारीच एका मोठय़ा इमारतीचं बांधकाम चालू होतं. तिथे विटा वाहणाऱ्या दोघी बायांशी माझी ओळख झाली. मी त्यांना म्हटलं, ‘तुमच्या जेवणाच्या सुट्टीत याल का माझ्याकडे? मी तुम्हाला शिकवीन.’ त्या बिचाऱ्या यायला लागल्या. मी त्यांना सह्य़ा शिकवायची, काही चित्रं दाखवून माहिती सांगायची. एकदा मी त्यातल्या रुपाबाईंना म्हटलं, ‘‘मला तुमच्यासारख्या विटा वाहून बघायच्या आहेत.’’ त्यांना फार आनंद झाला. त्या म्हणाल्या, ‘‘या की बाई उद्या सकाळला.’’ मी दुसऱ्या दिवशी गेले. त्यांना म्हटलं, ‘‘घेऊ का चुंबळ?’’ त्यांनी चुंबळ माझ्या डोक्यावर ठेवली, त्यावर फळी आणि त्यावर विटा रचायला लागल्या. बारा झाल्या तोवर माझी मान अवघडू लागली. त्या म्हणाल्या, ‘‘ठेवू का आणखी चार?’’ मी नको म्हटलं. मग म्हणाल्या, ‘‘चला आता चौथ्या मजल्याला’’ अर्धवट बांधलेला तो जिना, त्यावरून डोक्यावर ओझं घेऊन चढायचं, चौथा मजला येईपर्यंत माझी दमछाक झाली. मी विटा उतरल्यावर त्यांना म्हटलं, ‘‘कशा बाई तुम्ही खेपा घालता दिवसभर! माझी तर आत्ताच मान दुखायला लागली.’’ हे मी बोलल्यावर रूपाबाईंच्या चेहराभर आनंद पसरला. त्या हसायला लागल्या. मग म्हणाल्या, ‘‘बाई, तुम्ही मला ‘क’ काढायला लावता का न्हाई, तवा माजं आस्संच व्हतं.’’
रूपाबाईंनी मला धडा शिकवला होता. आम्ही त्यांना रोज साक्षरता शिकवत होतो. दमल्या-भागल्या शरीरानं आणि मनानं त्या लिहायचा प्रयत्न करत होत्या. मी मात्र आयुष्यभरात एकदाच गंमत म्हणून त्यांच्या विटा वाहणार आणि मान दुखली म्हणणार. खरंच एवढे शारीरिक कष्ट करणाऱ्या माणसांना शिकणं शक्य होतं का?
जाणीव जागृती, कार्यात्मकता आणि साक्षरता ही तीन प्रौढशिक्षणाची उद्दिष्टं होती. वर्गातल्या एखाद्या मुळात हुशार खणखणीत बोलणाऱ्या बाईला भाषण करायला लावायचं अन कार्यकर्त्यांनी म्हणायचं, ‘‘आमच्याकडे फार जाणीवजागृती, कार्यात्मकता केलीय आम्ही. साक्षरता काही जमत नाही फार!’’ फ्रिअरेचं तत्त्वज्ञान आदर्श मानून त्यावर प्रौढ शिक्षणाचा आराखडा बेतला होता, पण हाती काही फार लागत नव्हतं. खरंच सरकारला माणसं अन्यायाविरुद्ध जागृत व्हायला हवी होती का?
आम्ही ज्यांना शिकवत होतो त्या बाया हुशार होत्या. एकदा मी वस्तीत गेले तर ज्या झोपडीत आम्ही बसायचो वर्गाला, तिथे खूप आवाज येत होता. कालवाच होता. मी गेल्यावर सगळ्या बाया गप्प! मी म्हटलं, ‘‘काय म्हणत होतात तुम्ही? कशावर चर्चा होती?’’ त्यावर काही जणी तोंडाला पदर लावून फिदीफिदी हसत होत्या. एकीने मला विचारले, ‘‘तुम्हाला हय़ा (शिव्या) देता येत्यात का?’’ मी म्हटलं, ‘‘येतात की.’’ त्यावर जवळ उभा असलेला एक १०-१२ वर्षांचा मुलगा म्हणाला, ‘‘या बायांना काय बी येत नाही. धक्का दिला कुणी तर म्हणत्याल-  नालायक, मेला! बास!’’ मग त्या मला विचारू लागल्या ५० रुपयाची शिवी सांगू का? १०० रुपयाची? ५०० रुपयाची? अशा खूप शिव्या सांगून झाल्यावर मी म्हटलं, ‘‘आता सगळ्या शांत बसाल का? मला एक विचारायचंय.’’ सगळ्या गप्प बसल्या. मी म्हटलं, ‘‘मुळात मला सांगा शिव्या का द्यायच्या? शिवी दिली की काय वाटतं?’’ मला वाटलं सगळ्या गप्प बसतील. पण माझा प्रश्न संपायच्या आत एक बाई म्हणाल्या, ‘‘आता असं बगा बाई. तुम्ही हितलं काम संपवून घरी जाताल का? गेल्यावर काय बी करायला नसंल तर काय कराल? पुस्तक घ्याल, वाचत बसाल. तसंच आमचंबी आसतं. आम्ही कामावून घरी येताव तर शेजारनी पुसत नाईती. मंग आपुन काय करावं? शिव्या दिवून भांडान काढावं. त्याची लई िझग येती.’’
ही बाई मला सांगत होती. मानसशास्त्रच शिकवत होती. तुमचं पुस्तक तशा आमच्या शिव्या. आमचा विरंगुळा! त्याला नावं नका ठेवू.
संस्कार करणारे ही गोष्ट कुठे कधी समजावून घेतात?   
 शोभा भागवत -shobhabhagwat@gmail.com