काय मी पामर, जाणे अर्थभेद वदवी गोविंद तेची वदे -संत तुकाराम या अनुभूतीला महात्मा गांधी ‘इनर व्हाइस’ अथवा ‘आतला आवाज’ म्हणत. लोकमान्य टिळक म्हणत, माझे महत्त्वाचे निर्णय, हे आतल्या आवाजाचे आदेश असतात. राजद्रोहाच्या खटल्यात त्यांना दोषी ठरविण्यात आले त्या वेळी न्यायालयात आपला खटला आपणच लढणार या निर्धाराने, त्यांनी जे भाषण केले, ते आजसुद्धा मुंबई उच्च न्यायालयात कोरलेले आहे. Inspite of the verdict of the jury, I maintain I am innocent ज्या शीळेवर हे शब्द कोरले, त्या शीळेचे अनावरण, न्यायमूर्ती छगला यांनी केले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘देशभक्तीचा गुन्हा केल्याबद्दल याच उच्च न्यायालयात लोकमान्य टिळकांना शिक्षा देण्यात आली, तो खरा न्याय नव्हता. माझ्यासारखा एक भारतीय या उच्च न्यायालयात सरन्यायाधीश आहे, याचे श्रेय, ज्यांनी स्वराज्यासाठी अपार दु:ख सोसले त्या लोकमान्य टिळकांना आहे.’’ एकदा लोकमान्य एका समारंभाला गेले होते. त्या वेळी त्यांचे जोडे चोरीला गेले. दुसऱ्या दिवशी ज्याने त्यांचे जोडे चोरले होते त्या माणसाने, त्यांना काही रकमेची मनीऑर्डर केली, त्या मनीऑर्डरबरोबर एक पत्र होते, त्या पत्रात लिहिले होते, ‘‘मी आपले जोडे चोरले त्याबद्दल मला माफ करावे, आपल्यासारख्या सत्पुरुषाचे जोडे मी माझ्या देवघरात ठेवले आहेत, मी पाठवलेल्या रकमेमधून आपण आपल्यासाठी नवीन जोडे घ्यावेत ही विनंती.’’ लोकमान्य म्हणत, ‘‘सदाचार ही माझी शक्ती आहे आणि शील हा माझा प्राण आहे.’’ सरकारने, ताईमहाराज प्रकरणात त्यांचा छळ केला, चिरोल हा ब्रिटिश अधिकारी, त्यानेच सर्व आरोप केले होते, पण लोकमान्यांच्या निधनानंतर, त्याने ‘इंडिया’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यात तो म्हणतो, ‘‘मी लोकमान्यांवर आरोप केले, परंतु ते खरे नव्हते, लोकमान्य अत्यंत शीलवान होते.’’ चारित्र्याशिवाय चरित्र शोभून दिसत नाही आणि पावित्र्याशिवाय पांडित्य शोभून दिसत नाही. चारित्र्य, पावित्र्य, पांडित्य आणि साधुत्व यांचा सुरेख संगम लोकमान्यांच्या ठिकाणी झाला होता. माधवी कवीश्वर madhavi.kavishwar1@gmail.com