चाह गयी चिंता गयी, मनवा बेपरवाह,
जिनको कछू ना चाहीये, वो है शाहम शाह
– कबीर

ज्याचं हवं नको पण गेलं, ज्याच्या मनात कसली चिंता नाही. ज्याला जगाकडून काहीच नको, तो माणूस राजांचा राजा आहे. एकदा कोरिन्थ येथील प्रसिद्ध संत डायोजेनीस, याच्या दर्शनाला सिकंदर राजा गेला होता, त्यावेळी डायोजेनीस, सकाळी उन्हात बसले होते, थंडीचे दिवस होते, सिकंदर नम्रतेने म्हणाला, ‘‘मी आपणासाठी काय करू शकतो?’’ डायोजेनीस थोडेसे हसले, म्हणाले, ‘‘राजा, तू इथे उभा असल्यामुळे, मला ऊन मिळत नाही, थोडा बाजूला उभा राहा, एवढंच माझ्यासाठी कर.’’
शिवाजी राजांनी संत तुकारामांकडे नजराणा पाठविला, त्यावेळी नम्रतेने त्यांनी तो नजराणा परत केला. सोने-चांदी आम्हाला मातीसारखे वाटतात, असा निरोप देताना ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी’’
नजराणा परत आलेला पाहून, शिवाजी राजांनी, तुकारामांच्या दर्शनाला जायचं ठरवलं. लोहगावला राजे तुकारामांच्या कीर्तनाला गेले असताना, चाकणच्या सुभेदाराचे पठाण राजांना धरायला आले, एक हजार पठाणांनी देवळाला वेढा घातला. परंतु तुकारामांनी पांडुरंगाचा धावा केला, राजांच्या केसालाही धक्का लागला नाही.
संत स्वत:साठी जीवन जगत नाहीत,
‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति’
जगाचे कल्याण हेच त्यांचं ध्येय आहे, म्हणून तर त्यांचं हवं नको पण गेलेलं असतं, जगाकडून त्यांची कुठलीही अपेक्षा नसते म्हणून कबीर म्हणतात, संत हे राजांचे राजे, म्हणजे महाराजे आहेत.