आज खूप दिवसांनी गोडांबेबाईंचे जुने विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांच्या घरी चहापाण्याला जमले होते. बाईंनी स्वत:च्या हातांनी गरमागरम कांदे पोहे व वाफाळलेला चहा बनविला होता. विद्यार्थी जरा जास्त असल्याने बाईंची कपबश्या जमविताना धांदल उडत होती. घरात होत्या-नव्हत्या, तेवढय़ा सर्व कपबश्या ओटय़ावर आल्या होत्या. काही कप चिनीमातीचे होते तर काही प्लास्टिकचे. काही नक्षीदार, सुडौल आकाराचे होते तर काही स्टीलचे उभट! बाईंच्या विद्यार्थिनींनी, सर्व कपांमध्ये जायफळ व वेलचीयुक्त चहा ओतला. दोन ट्रेमध्ये सर्व कप विराजमान झाले. काही कप बश्यांसोबत होते तर काही कप नुसतेच होते. एखाददुसऱ्या कपाचा कानही तुटला होता. दोन्ही ट्रे मुलांच्या समोर ठेवण्यात आले.

मनुष्यस्वभावाप्रमाणे नक्षीदार कप व सोबत तशीच सुंदर बशी असलेल्या चहावर सलीलने सर्वप्रथम डल्ला मारला. चिनीमातीचे कप हे प्लास्टिकच्या कपांपेक्षा जास्त भाव खाऊन जात होते. मनोज असो की राजश्री, हर्षवर्धन असो की संजीवनी, कोणीही हाताला सहज येणारा कप न उचलता त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दिसणारा कप उचलत होता. तुटक्या कानाच्या कपाला तर कोणी वालीच नव्हते. अपवाद प्रद्युम्नचा होता, त्याने काहीही खळखळ न करता सहज हाताला येणारा तुटका कप उचलला. गोडांबेबाई मिश्कीलपणे हे सर्व न्याहाळत होत्या. आपले विद्यार्थी खऱ्या अर्थाने भौतिक सुखात रमले असल्याचे पाहून त्या आनंदित होत्या, पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र आपल्या संस्कारांमध्ये काही तरी उणीव राहिली नाही ना, या चिंतेने अस्वस्थदेखील होत्या.

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

सलील व प्रद्युम्नला विशेषकरून बाईंनी प्रश्न केला, ‘काय रे, चहा कसा केला होता या म्हातारीने?’ यावर ते दोघेच नाही तर सर्वच जण म्हणाले, ‘बाई, हा काही प्रश्न झाला का? अप्रतिम, अगदी अमृततुल्य!’ बाई म्हणाल्या, ‘अरे, चहा सर्वाना एकाच प्रकारचा दिला होता, पण तरीही प्रत्येकाची धडपड चांगला, उत्तम कप उचलण्याकडे होती. म्हणून विचारले इतकेच!’ मुले आता गोंधळली होती व जराशी ओशाळलीदेखील होती. गोडांबेबाई म्हणाल्या, ‘अरे, यात तुमचे काही चुकले नाही. पण आपण शक्य असल्यास, बाह्य़रूपाला भुलून, सर्वात जास्त महत्त्वाचे, जे अंतरंग आहे त्याला विसरता कामा नये. खरे तर आपल्याला चहाचा आस्वाद घ्यायचा होता, पण चहापेक्षा आपले लक्ष होते ते कप कसा आहे, याकडे. खरे तर कप कसाही असो, चहाची चव बदलणार नव्हती. पण आपण अंतरंगाची किंमत बाह्य़रूपावरून ठरवण्याची चूक करतो.’

बाई पुढे सांगू लागल्या, ‘असेच काहीसे टेल्को कंपनीबाबत देखील झाले होते. मुली या नाजूक, मुली या स्वभावाने मृदू; अशा व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती, शॉप फ्लोअरवर धसमुसळ्या, रांगडय़ा, शिवराळ भाषा बोलणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांना काय आवर घालणार? मुली असल्याने त्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कसे काम करणार? केवळ बाह्य़रूपावर आधारित या गैरसमजामुळे टेल्को नवीन भरती करताना, जाहिरातीमध्ये एक टीप टाकायचे; महिलांनी या नोकरीसाठी अर्ज पाठवू नये. या अन्याय्य गोष्टीविरुद्ध आवाज उठवला तो सुधा मूर्ती यांनी. त्यांनी सरळ जेआरडी टाटा यांनाच पत्र लिहिले. टाटा हे बाह्य़ व्यक्तिमत्त्वापेक्षा अंतरंगाला जास्त महत्त्व देणाऱ्यांपैकी होते. त्यांनी टेल्कोच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की सुधा जर आपल्या निकषांवर उत्तमरीत्या पास होत असेल तर तिची निवड करा. तिचे अंतरंग कणखर असेल, तिची कुठलीही मेहनत घेण्याची तयारी असेल तर तिची निवड झालीच पाहिजे. टाटांच्या याच फिलोसॉफीमुळे (बाह्य़रूपापेक्षा अंतरंगाला जास्त महत्त्व देण्याची वृत्ती) सुधा मूर्ती या टेल्कोमध्ये भरती झालेल्या पहिल्या महिला प्रशिक्षणार्थी ठरल्या.

पण कधी कधी बाह्य़रूप हे अंतरंगाकडे खेचून आणण्यासाठी आवश्यक ठरते हे सांगायलादेखील गोडांबेबाई विसरल्या नाहीत. आपले हे म्हणणे पटवून देण्यासाठी, बाईंनी बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट सांगावयाचे ठरविले.

बाबासाहेब आंबेडकर स्वकर्तृत्वावर मोठे झाले होते. त्यांच्या नावाचा दिल्लीदरबारी खूप मोठा दबदबा होता. त्यांच्या बंगल्याचे खास वैशिष्टय़ होते. लोकांच्या नजरेत येणारा व लोकांची वर्दळ असलेला त्यांच्या बंगल्याचा भाग, ऐश्वर्य, सुंदरता यांचे मूर्तिमंत प्रतीक होते, तर बाबासाहेबांचे वैयक्तिक कक्ष खूप साधे व सुटसुटीत होते. बंगल्याच्या आवारात सुरेख कारंजे, सुंदर फुलांचे ताटवे तर दिवाणखान्यामध्ये उंची फर्निचर, सुवासिक अत्तराचे फवारे असा थाटमाट असायचा. खरे तर साधेपणामुळेच मोठेपणाला झळाळी येते हे त्यांना माहीत होते. पण सामान्य जनमानसाची वृत्तीही त्यांना ठाऊक होती. आपल्यासारखाच गरिबीतून व समाजातील खालच्या थरातून आलेला माणूस केवळ कष्ट, बुद्धी व चिकाटी यांच्या बळावर असे ऐश्वर्य, मानपान उपभोगू शकतो हे आपल्या दलित बांधवांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांनी हा ऐश्वर्याचा दरबार भरविला होता. पण ज्या अभ्यासिकेमध्ये, स्वयंपाकघर किंवा शयनकक्षामध्ये फक्त त्यांचाच वावर असायचा त्या सर्व खोल्या एकदम साध्या व कसलाही बडेजाव नसलेल्या होत्या.

बाई जरी शिक्षिका असल्या तरी त्यांचे कॉर्पोरेट क्षेत्राबद्दलचे वाचनदेखील अफाट होते. त्या आपल्या विद्यार्थ्यांना म्हणाल्या, ‘कॉर्पोरेट विश्वात, बाह्य़ व्यक्तिमत्त्वावरून गुणवत्ता जोपासण्याची फार जुनी सवय आहे. बाह्य़ व्यक्तिमत्त्व सात प्रकारे जोखले जाते.

आपल्या कपडय़ांचा टापटीपपणा, आपली केशरचना, आपली नखे, आपले शूज हे सर्व आपल्याबद्दलचे मत ठरवीत असतात. अत्यंत तंग कपडे, अंतर्वस्त्रांचे पेहेरावातून होणारे दर्शन यामुळे आपल्याबद्दलचे विपरीत मत तयार होते.

बसतानादेखील आपण सरळ व ताठ बसणे अपेक्षित असते. पाय जमिनीला टेकलेले असणे, खांदे मागे असणे, डोके सरळ रेषेत असणे या पोश्चरमुळे आपण आत्मविश्वासाने भारलेले आहोत हे दर्शविते. पाय सतत हलविणे, पायावर पाय टाकून बसणे यामुळे आपले व्यक्तिमत्त्व मलिन होते. पायावर पाय ठेवून बसल्याने तुम्ही समोरच्या व्यक्तीचा आदर करीत नाही असा गैरसमज होऊ शकतो.

आकर्षक रूप, सडपातळ बांधा, उंची यामुळे देखील तुमच्याबद्दल सकारात्मक मत बनते.

ब्रॅण्डेड कपडे परिधान करणे, घडय़ाळे वापरणे आपल्याबद्दल सकारात्मक मत तयार करतात; तर भडक ज्वेलरी नकारात्मक! त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला पाहिजे.

तुम्ही जरी वयस्कर असाल पण जर तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये तारुण्य डोकावत असेल तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो.’

गोडांबेबाई आता जरा आश्वस्त झाल्या होत्या. त्यांना जो निरोप विद्यार्थ्यांकडे द्यायचा होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. समारोप करताना त्या म्हणाल्या, ‘तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये उच्चपदावर कार्यरत आहात. तुम्हाला सुंदर, आकर्षक चहाच्या कपांसारखी व्यक्तिमत्त्वे जशी भेटत असतील तशी कावळ्यासारखी व्यक्तिमत्त्वेदेखील. उंची कपडे परिधान करणारी, बोलघेवडेपणा करणारी माणसे बुद्धिवान, कष्टाळू, रिझल्ट देणारी असतीलच असे नसते; तसे कावळ्यासारखी अनाकर्षक दिसणारी माणसे प्रत्यक्षात आखूड शिंगी बहुगुणी गायीपण असू शकतात. तेव्हा माणसाची पारख करताना त्याच्या अंतरंगात डोकावण्याची सवय ठेवा. बाह्य़रूपापेक्षा अंतरंग पारखा. ज्या लोकांना आपल्या बाह्य़रूपाबद्दल न्यूनगंड आहे, त्यांना त्यांच्या अंत:करणाची सुप्त शक्ती दाखवून द्यायला मदत करा. हो, पण बाह्य़रूप आकर्षक ठेवणेदेखील तेवढेच महत्त्वाचे असते, त्यामुळे त्याकडे पूर्ण दुर्लक्षदेखील करू नका. पण आकर्षक बाह्य़रूप कधीही आतल्या अंत:करणावर कुरघोडी करणार नाही याची मात्र काळजी घ्या.’
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com