सौरभ कुलश्रेष्ठ – response.lokprabha@expressindia.com
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून देणाऱ्या राज ठाकरे यांना बरोबर दहा वर्षांनी पुन्हा एकदा विरोधी अवकाश व्यापण्याची संधी मिळाली. तिचा पुरेपूर फायदा घेत मोदी-शहा जोडगोळीविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे.

एखादी गोष्ट जिथे हरवते ती तिथेच गवसते, अशा आशयाची एक म्हण आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतीत ती आज तंतोतंत लागू पडत आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आणि मोदी यांच्या राजकारणात मनसेचे राजकीय अस्तित्व हरवले. आता त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाने मनसेला म्हणजेच राज ठाकरे यांना आपले राजकीय अस्तित्व पुन्हा गवसले आणि ते असे गवसले, की सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात मोदी यांना आव्हान देणारा विरोधी आवाज अशी ओळख राज यांनी मिळवली आहे. त्या अर्थाने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

मनसेच्या राजकीय ताकदीचा पहिला प्रत्यय आला तो २००९ च्या लोकसभा निवडणुकीत. मनसे एकही जागा जिंकली नाही; पण तिच्या उमेदवारांनी मिळवलेल्या हजारो-लाखभर मतांमुळे मुंबई महानगर प्रदेशात शिवसेना-भाजपा युतीला कल्याण लोकसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता १० पैकी ९ जागा गमवाव्या लागल्या होत्या. मनसेच्या या उमेदवारीचा सर्वाधिक फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना झाला होता. मनसेने घेतलेल्या मतांमुळे त्यांचे अनेक जण निवडून आले. त्यानंतर ‘एकही मारा लेकीन सॉलिड मारा’ हा ‘अमर अकबर अँथनी’मधील डायलॉग राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून मारला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच फटक्यात मनसेचे १३ आमदार निवडून आले. मनसेची ही उपद्रव क्षमता ओळखूनच पंतप्रधानपदावर नजर लावून बसलेले गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना गुजरातभेटीचे आमंत्रण देत त्यांच्यासमोर विकासाचे गुजरात मॉडेल ठेवले. राज ठाकरे त्याने प्रभावित झाले आणि त्यांनी पंतप्रधान असावा तर मोदी यांच्यासारखा अशी कौतुकाची फुले उधळली. राज यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित केल्यानंतर मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत त्याचे मोल घेतले. युतीमध्ये न घेताही राज यांचा पाठिंबा घेण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे २०१४ मध्ये मनसेचा पाठिंबा मोदी यांना असताना युतीविरोधात उमेदवार असल्याने  राज यांच्या राजकारणाबाबत संभ्रम निर्माण झाला व मनसे २०१४च्या निवडणुकीत संदर्भहिन ठरली. हा निर्णयगोंधळ म्हणजे मनसेसाठी राजकीय आत्महत्याच ठरली. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुका, मुंबई महानगरपालिका-नाशिक महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली सर्वच ठिकाणी मनसेचा गाशा गुंडाळला गेला.

अशा वातावरणात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष असले तरी आदर्श प्रकरणाने त्यांचे हात बांधलेले होते. कॉँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपाचे व त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्रच झाल्याची उघड चर्चा होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेले छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यापासून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी जवळपास मौनव्रतच स्वीकारले होते. लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अगदी फेब्रुवारीपर्यंत भाजपासह सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना हाच विरोधी आवाज होता; पण शिवसेनेने घूमजाव करत युती केली. त्यामुळे विरोधी पक्षाचे अवकाश व्यापण्यासाठी एक आयती पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचे कधी होईल ते होईल, पण आपल्या मोडकळीस आलेल्या पक्षाच्या नवनिर्माणासाठी संधीची वाट पाहत बसलेल्या राज ठाकरे यांनी ती अचूक साधली. आज राज ठाकरे हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आवाज झाले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्लाही मोलाचा ठरला. राज यांच्याकडे महाराष्ट्रातील तरुणांना आकर्षित करणारे वक्तृत्व असल्याची पावती त्यांनी दिली होतीच. आपल्या पक्षाच्या नेत्यांची प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात असल्याने भाजपावर सोडण्यासाठी राजअस्त्रच उपयोगी पडणार ही खूणगाठ पवारांनी किती आधी बांधली होती हे यावरून लक्षात यावे.

सध्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य महाराष्ट्रात चर्चेचा आणि नवनवीन विनोदांच्या निर्मितीचा विषय ठरले असले तरी राज यांच्या या वाक्याने राजकीय वातावरण गरम केले आहे.

आपल्या सभांसाठी राज ठाकरे यांनी मतदारसंघही अत्यंत हुशारीने निवडले. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे कॉँग्रेसचे बडे नेते व कोल्हापूर, सातारा, रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपाने खेळलेल्या चलाख खेळींना उत्तर देता येईल असे हे मतदारसंघ. चुरशीच्या लढतींमुळे प्रसिद्धी माध्यमांचा झोत या मतदारसंघांवर आहे. त्या मतदारसंघांमध्ये तरुण आणि कुंपणावर बसलेल्या मतदारांना मोदींच्या विरोधात मतदानास उद्युक्त करण्याचा एककलमी कार्यक्रम राज यांनी हाती घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणांमधील वाक्यांची ध्वनिचित्रफीत दाखवत कधी सैन्यापेक्षा मोदी यांना व्यापारी कसे मोठे वाटतात यावर राज ठाकरे प्रकाश टाकतात, तर काश्मीर व देशाच्या सुरक्षेचा विषय आम्हीच सोडवू शकतो या भाजपाच्या दाव्याची चिरफाड करण्यासाठी काश्मीरमधील सैनिकांना होणारी मारहाण दाखवतात.

राज यांच्या या भाषणांना मिळणारा प्रतिसादही उत्स्फूर्त आहे. केवळ शिट्टय़ा व टाळ्या म्हणजेच प्रतिसाद नव्हे. सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या साताऱ्यात राज यांनी सैन्यदलाबाबत दाखवलेल्या ध्वनिचित्रफिती आणि राज यांच्या भाषणाने सारी सभा सुन्न झाली होती. सभेत पसरलेली शांतता हाच राज यांनी उपस्थितांच्या संवदेनांना यशस्वीरीत्या हात घातल्याचे दाखवणारा असा प्रतिसाद होता. राज या भाषणांमध्ये कुठेही सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेवर टीका करत नाहीत. इतकेच काय, भाजपाच्या इतर नेत्यांवर ते काही बोलत नाहीत. केवळ नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हटवा असेच त्यांचे आवाहन असते. त्याचा अन्वयार्थ साधा व थेट आहे. मोदी-शहामुक्त भाजपा राज ठाकरे यांना चालणार आहे. भाजपाचे अनेक बडे नेते या दोघांवर मनातून नाराज असल्याने त्यांच्या मनात आपल्याबद्दल आपुलकी असावी आणि उद्या खरेच भाजपा मोदी-शहामुक्त झाला तर पक्ष म्हणून भाजपाशी वैर असू नये अशी रणनीती राज यांनी आखल्याचे दिसत आहे. राज यांच्या या हल्ल्यात भाजपा बेसावध सापडला. राज यांना उत्तरे द्यावीत तर त्यांचे महत्त्व वाढते आणि दुर्लक्ष करावे तर राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर नाही अशी प्रतिमा निर्माण होते अशा कात्रीत भाजपा सापडला आहे. त्यामुळे कधी शिक्षणमंत्री विनोद तावडे माध्यमांद्वारे राज यांच्यावर टीका करतात, तर कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभांमध्ये राज यांचा समाचार घेतात. कालपरवापर्यंत राजकारणात बेदखल असलेले राज ठाकरे यामुळे दखलपात्र ठरले आहेत.

आपल्या पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नसताना राज यांनी अत्यंत आक्रमकपणे मोदी-शहा जोडगोळीवर हल्ला चढवला आहे. मोदी-शहा यांची पक्षातील आणि विरोधकांमध्ये असलेली राजकीय दहशत माहिती असलेल्या सर्वसामान्यांना त्यांना न घाबरता शिंगावर घेणारे राज यांचे हे धाडस आवडत आहे. सर्व समाज ज्यांना वचकून असतो अशा लोकांना आव्हान देणारा नेता हे नेहमीच लोकप्रिय होतो. राज हे याच धोरणामुळे सध्या एकमेवाद्वितीय ठरत आहेत. जाहीर सभांमधील ध्वनिचित्रफितींची निवड असो की सोलापूरच्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांना त्रासदायक ठरत असलेल्या जातपातीचा विषय, साताऱ्यात मोदी यांच्या धोरणांमुळे सैनिकांचा होणारा अवमान असे वेगवेगळ्या ठिकाणी नेमके विषय काढत राज यांनी जनभावनेला हात घातला आहे. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लोकसभा निवडणूक न लढताही कार्यकर्ते, पक्ष जिवंत ठेवण्याची महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकीय इतिहासातील विलक्षण खेळी राज ठाकरे यांनी केली आहे. राज यांचा नेम मोदी-शहा यांच्यावर असला तरी खरा निशाणा साहजिकच विधानसभा निवडणुका आहेत. आता सुरू असलेल्या सभांमुळे निर्माण होणारे वातावरण तरुण मतदार व असंतुष्ट स्थानिक राजकीय नेते यांना मनसेकडे ओढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शिवसेना-भाजपा युती कायम राहिल्यास गेली साडेचार वर्षे भाजपाविरोधात लढण्यासाठी तयारी करत असलेले शिवसेनेचे उत्सुक उमेदवार काही प्रमाणात का होईना मनसेची वाट धरू शकतात हेही राज यांना चांगलेच ठाऊक आहे आणि त्या वातावरणात पुन्हा एकदा विरोधकांची जागा घेत मनसेसाठी विधानसभेत जागा तयार करण्याचे काम राज यांना सोपे जाईल.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार मिळण्याची दुरापास्त, निवडणुका लढवण्यासाठी पैसा नाही. आता कार्यकर्त्यांना प्रोत्साहन न मिळाल्यास विधानसभेवेळी आणखी परिस्थिती खालावणार अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना राज यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान देणाऱ्या सभा घेण्याचा राजकीय मार्ग निवडला. प्राप्त परिस्थितीत अत्यंत हुशारीने सरकारविरोधी जाहीर सभांचा सर्वोत्तम पर्याय निवडून आपले नेतृत्व आणि मनसे हा पक्ष जिवंत ठेवण्याचे राजकारण राज ठाकरे यांनी अचूकपणे साधले आहे. त्याचे फळ विधानसभा निवडणुकीत राज यांना निश्चितपणे मिळू शकते. त्यासाठी सभांसाठी घेतलेली मेहनत त्यांना पुढील पाच महिन्यांत राज्यभर पक्षसंघटना बांधणीसाठी करावी लागेल. अन्यथा अंगभूत हुशारीने मिळवले आणि आळसाने घालवले अशी वेळ पुन्हा येऊ शकते.