प्रवीण योगी

महाराष्ट्रात असलेली देवीची साडेतीन पीठे सगळ्यांना परिचित आहेत. पण त्यापलीकडेही देवीची विविध स्थाने असून लोकमानसात त्यांना महत्त्व आहे. विदर्भातील अशा काही स्थानांची माहिती-

आताच्या अमरावती शहराच्या नावाचा उच्चार एकेकाळी ‘उमरावती’ असा होता. अमरावती येथील भाजीबाजार विभागात श्री सोमेश्वर मंदिराशेजारी रुखबदेव (ऋषभदेव) संस्थानातील म्हणजेच आजच्या आदिनाथ दिगंबर मंदिरातील तळघरात श्री आदिनाथ रुखबदेव यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्या मूर्तीच्या बठकीवर लेख कोरलेला आहे. त्यावरून त्यांची स्थापना संवत ११५३ साली म्हणजेच इ. सनाच्या ११व्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुमारे इ.स. १०९७ साली झाली. यावरून त्यांचे प्राचीनत्व लक्षात येते. या मूर्ती स्थापन होण्यापूर्वी २५ ते ३० वर्षे अमरावतीजवळील एलिचपूरला (अचलपूर) ‘ईल’ नावाचा जैन धर्मीय राजा राज्य करीत होता. त्याने इ.स. १०५८ मध्ये एलिचपूर येथे आपले राज्य स्थापन केले. या पुराव्यावरून हे लक्षात येते की, ११ व्या शतकापासून अमरावती शहर अस्तित्वात होते. श्री गोिवदप्रभूंच्या (महानुभाव पंथाचे प्रवर्तक) चरित्रात १३ व्या शतकात ते उंबरावतीस आले होते असा उल्लेख आढळतो.

अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले आजचे कौंडिण्यपूर म्हणजे पुरातन कुंडीनपूर ही भीष्मक राजाची राजधानी होती. वर्धा नदीच्या काठावर असलेले विदर्भा नगरी ऊर्फ कुंडिनपूर येथे ‘विदर्भ’ राजाने आपले राज्य स्थापन केले. भोज शाखेतील यदुवंशातील विदर्भ नावाच्या राजाने कुंडिनपूर येथे आपली राजधानी व राज्य स्थापन केले. कुंडिनपूर या पुरातन राजधानीचा घेर २६ कोसांचा (सुमारे ६५ मल) होता. याच कुंडिनपूरच्या वेशीवर नगराच्या बाहेर श्री अंबादेवीचे मंदिर असून येथूनच राजा भीष्मकाची मुलगी राजकन्या रुक्मिणीचे हरण श्रीकृष्णाने केले अशी आख्यायिका आहे. त्यावेळी झालेल्या युद्धात रुक्मिणीचा भाऊ रुक्मि याचा श्रीकृष्णाने पराजय केला. त्यानंतर तो म्हणजेच रुक्मि कुंडिनपूरला परत गेला नाही. तर त्याने अमरावतीच्या पश्चिमेला १५-१६ मलावर भोजकट नावाचे नवीन नगर बसवून तेथे आपली राजधानी उभी केली. त्यामुळे त्यानंतर तो भाग भोजकट राष्ट्रक म्हणून ओळखला जाऊ लागला. हेच आजचे भातकुली गाव होय.

श्री अंबादेवी संस्थान

अमरावती शहराच्या मध्यभागी, अंबागेटपासून एक किलोमीटर अंतरावर श्री अंबादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ अंबानाला असून नाल्याच्या पलीकडच्या तीरावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीच्या मंदिरास लागूनच जगप्रसिद्ध अशा ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ या संस्थेचा बराच मोठा शैक्षणिक परिसर आहे. श्री अंबादेवीचे मंदिर अती प्राचीन असून स्वयंभू मानले जाते. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून पद्मासनात स्थित आहे. एक हजार ते १५०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी असे संदर्भ आढळतात. रुक्मिणी हरणाशीही याचा संबंध जोडण्यात येतो. त्यावरून याचे प्राचीनत्व लक्षात येते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इ.स. १८७० चे ‘गॅझेटियर फॉर दी हैद्राबाद असाईन्ड डिस्टिक्क्ट’ तसेच इ.स. १९११ व १९६८ च्या अमरावती जिल्हा गॅझिटियरमध्ये याच्या पुरातनत्वाचा उल्लेख आहे. ‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. इ.स. १८६३-१८६४ सालापर्यंत श्री अंबादेवीची मूर्ती केवळ एका चबुतऱ्यावर होती. मंदिर नव्हते. मात्र कालांतराने तेथे छोटे हेमाडपंती मंदिर बांधण्यात आले. त्या काळी वस्ती अमरावतीच्या परकोटाच्या आतच होती. त्यामुळे हे मंदिर जुन्या अमरावतीच्या वेशीवर जंगलात होते. मंदिराच्या शिखराचे बांधकाम इ.स. १८९६ मध्ये करण्यात आले.

श्री अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे. तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत. दोन्ही नेत्र अर्धोन्मिलित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे. नानाविध षोड्शोपचार पूजा झाल्यावर सुवर्णादि अलंकार, सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा आणि सर्व प्रकारचे अलंकार चढवून विविध पुष्पांची आरास करून देवीला सजविल्यानंतर तिचे देखणे व प्रसन्न रूप भक्तांना आनंदित करते. सोन्याचा मुलामा चढविलेला चांदीचा मुखवटा ९० तोळ्यांचा असून तो १९०५  मध्ये बनविला आहे. महापूजेनंतर आरती व दुपारी १२ वाजता महानवेद्य होतो. पुरणपोळी व खीर यांचा नवेद्य रोज असतो तसेच तांबूलाचा महानवेद्यही होतो. भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो.

श्री अंबादेवी मंदिरात जाण्यासाठी पूर्वेकडून मुख्य द्वार असून सुमारे दहा दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. आत गेल्यावर पुन्हा सहा-सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गर्भगृहाच्या समोरील सभामंडपात जाता येते. मंदिराला दोन घुमट असून ते दुरून दिसतात. त्यांच्यावर सोन्याचा मुलामा चढविलेले चांदीचे दोन कलश दिसतात, त्यांचे नूतनीकरण इ.स. १९०६ साली करण्यात आले. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मंदिर परिसराच्या उत्तरेकडे श्री हनुमानाचे छोटे मंदिर आहे. मागे महादेवाचे छोटे मंदिर आहे.

श्री अंबादेवीच्या गर्भगृहाला लागूनच डाव्या बाजूला भरवनाथाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला िभतीवरच्या कोनाडय़ात संगमरवरी श्री गणेशाची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे आणखी एक गर्भगृह असून त्यात श्री महादेवाची मोठी िपड आहे. मंदिरात शिरल्यावर उजव्या बाजूला मंदिराचे कार्यालय व देणगी इत्यादी देण्यासाठी काऊंटर आहेत. पलीकडे भोजनगृह वगैरे आहे. कार्यालयाला लागून हनुमानाचे मंदिर असून तेथे प्रवचनासाठी हॉल आहे.  मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवसांना भक्तांची गर्दी असते. मंगळवारी लहानशी यात्राच भरते. नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि सप्तशतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होतो, हवन करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. या काळात श्री एकवीरा देवी प्रतिनिधिक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात. त्यामुळे हवनासाठी दोन स्थंडिले तयार करतात. दोन स्थंडिलांपैकी एके ठिकाणी श्री अंबादेवी संस्थानाचे मानकरी व दुसरे ठिकाणी एकवीरा देवीचे मानकरी हवन करतात. दशमीला म्हणजे विजयादशमीचे दिवशी श्री अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते. ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत. वर सुवर्णाचा कळस असतो. पालखीसोबत दोन्ही मंदिराचे मानकरी व विश्वस्त असतात. समोर वाद्यवृंद असतो. फार मोठय़ा संख्येने लोक असतात. ही पालखी दुपारी चार वाजता सीमोल्लंघनाला निघते. मंगलवाद्य्ो आणि चौघडा आणि तुतारीही असते. रस्त्यात अनेक भक्त पालखीचे स्वागत सुवासिनींच्या हस्ते ओवाळून करतात. सीमोल्लंघनाच्या रात्री आरती होऊन पालखी परत निघते. मंदिरात आल्यावर दोन्ही देवींची पूजा व आरती होते. अश्विन वद्य दोन ते कार्तिक वद्य दोन या काळात मंदिरात काकड आरती होते. दरवर्षी चत्र महिन्यात शतचंडीचे पाठ रामनवमी महोत्सवात करतात. अष्टमीला हवन होऊन पूर्णाहुती देण्यात येते.

श्री एकवीरा देवी, अमरावती

श्री अंबादेवी मंदिराचे दक्षिण बाजूला, अंबा नाल्यावरील पूल ओलांडल्यावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीला मोठी देवी (मोठी बहीण) आणि अंबादेवीला लहान देवी (लहान बहीण) म्हणण्याचा प्रघात आहे. या मंदिराचा संबंध श्री जानर्दनस्वामी नावाच्या सत्पुरुषाशी लावण्यात येतो. १७ व्या शतकात इ.स. १६४० च्या सुमारास देवीचे भक्त श्री जनार्दनस्वामी अमरावतील आले. अंबा नाल्याचे जागी त्यावेळी एक ओढा होता. त्याचे काठी निसर्गरम्य वातावरणात त्यांचा मुक्काम होता. तीरावर त्यांची पर्णकुटी होती. ते रोज जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. एकदा पावसाळ्यात अंबा नाल्याला पूर आला, त्यामुळे त्यांना जगदंबेचे दर्शन घेणे अशक्य झाले. स्वामींनी तीन दिवस अन्न-पाणीही घेतले नाही. तेव्हा श्री जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला व अशी आकाशवाणी झाली की, ‘ज्या विहिरीचे पाणी तुम्ही स्नानसंध्येसाठी घेता तिच्या काठावर जो बाण आहे-तो बाण म्हणजे मीच होय. त्याची प्राणप्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे,’ असे सांगतात. स्वामींनी त्याप्रमाणेच केले. तीच आजची एकवीरा देवी होय. या आख्यायिकेनुसार एकवीरा देवीची ही स्थापना इ.स. १६६० मध्ये झाली. पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले. या एकवीरा देवीच्या मंदिरात एक भुयार आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या मंदिराच्या वाटेवरच्या विहिरीपर्यंत ते आहे. एक व्यक्ती सहज बसू शकेल असा एक मोठा कोनाडाही विहिरीत आहे. याच मार्गाने जनार्दनस्वामी स्नानसंध्येसाठी तेथे जात असावेत असे लोक सांगतात. जनार्दन स्वामी हे मूळचे अमरावतीजवळील नांदगावपेठ गावाचे राहाणारे होते. पेठकर या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.

मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालतात. अश्विन नवरात्र, मंगळवार, शुक्रवार या काळात भक्तांची गर्दी असते. एकवीरा देवीच्या नावाचा यज्ञ अंबादेवीच्या देवळातच होतो. दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला एकवीरा देवीची मूर्तीही अंबादेवीच्या पालखीतच सीमोल्लंघनास निघते. मंगळवार, शुक्रवार व सणांच्या दिवशी देवीस साजशृंगार केला जातो. या दोन्ही मंदिराच्या परिसरात दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. पूजा साहित्याबरोबरच धार्मिक पुस्तके, लाकडी वस्तू, संसारोपयोगी वस्तू, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. याच बाजारपेठेत श्री बालाजीचेही मंदिर आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा, कोराडी 

नागपूर जिल्ह्य़ातील कामठी तहसीलीत नागपूर-जबलपूर महामार्गावर नागपूरपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर कोराडी हे गाव आहे. कोराडीजवळ असलेले औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे. महामार्गापासून सुमारे एक कि.मी. आत गेल्यावर श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिर आहे. एकेकाळी येथे घनदाट जंगल होते. जुने मंदिर लहानसे असून हेमाडपंती धाटणीचे बांधले होते. परंतु आता त्याचे नूतनीकरण झाले आहे व होत आहे. मंदिर परिसरात शिविपड असून नंदी आहे. शिवपार्वती, गणेश आणि दक्षिणामुखी हनुमान यांच्याही मूर्ती आहेत, मंदिर प्रांगणात औदुंबराचा वृक्ष असून एक जलाशय पण आहे. त्यात कमळाची फुले फुलतात. श्री महालक्ष्मी जगदंबेची मूर्ती दगडी असून सुमारे तीन फूट उंचीची असावी. ती अतिप्राचीन असून स्वयंभू असावी असे मानण्यात येते. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या उजवीकडील दोन हातांमधे त्रिशूळ आणि खड्ग आहेत, व डावीकडील हातांमधे डमरू आणि धनुष्य आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या मूळ रूपाकडे पाहता सकाळी कन्या (बालरूप), दुपारी तरुण (युवारूप), सायंकाळी प्रौढ (वृद्धरूप) असे दर्शन होते असे भक्त मानतात. परंतु सामान्यत: मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा स्नानादि उपचारानंतर चढविलेला असतो. सोन्याच्या अलंकारांनी आणि पुष्पांची आरास करून मूर्ती सजवितात तेव्हा मूर्तीचे स्वरूप विलोभनीय दिसते. प्राचीन काळी ही देवी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्य़ांतील झाडीपट्टीच्या भागातून आली अशी लोकभावना आहे. सध्याच्या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर टेकडी असून तिच्यावर जगदंबेचा भाऊ दत्तासून याचे मंदिर आहे. या मंदिरात चत्र नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत असत. त्यात पाटोडे आणि गायधने हे लोक मोठय़ा प्रमाणावर बलगाडीने येत असत. जवळच असलेल्या सुरादेवी नावाच्या तलावावर स्नान करीत. जवळच्या गावांमधील घरांमध्ये जोगवा मागीत आणि रोडगा बनवून देवीला अर्पण करून दर्शन घेत. त्या काळी कोंबडा व बकरा यांचा बळी देण्यात येत असे. दारू प्राशन करीत असत. आता मात्र ही प्रथा बंद झाली असून बळीऐवजी काशी कोहळे किंवा खिचडीचा प्रतीकात्मक बळीरूपाने नवेद्य अर्पण करतात. हल्ली या मंदिरात रोजचा प्रसाद म्हणून हलवा (शिरा), रव्याची खीर देतात. चिरंजीचे साखर दाणे व शेंगदाणे यांचाही प्रसाद देण्यात येतो.  अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीची नवरात्र असते. सुमारे १५ ते २० लाख लोक या नवरात्रीच्या काळात दर्शनाला येतात. घटावर नारळ ठेवून अखंड दीपज्योती नवरात्र काळात लावण्यात येतात. यांची संख्या साडेसहा हजारांच्या जवळपास असते. चत्र शुद्ध प्रतिपदेपासून चत्रातील नवरात्रही असते. पूर्वीच्या काळी याच नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत आणि सव्वा महिन्यांपर्यंत हा उत्सव चालत असे. परंतु हल्लीच्या काळी भक्तांची संख्या कमी झाली असून आश्विन नवरात्रीलाच जास्त लोक येतात. या नवरात्रांत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगढ, मध्य प्रदेशपासून भक्त येतात. वर्षांतून आठ वेळा महापूजा होते. ही देवी नवसाला पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे.

मंदिर परिसर फार मोठा व प्रशस्त असून जलाशयाजवळ हरिसिंग बाबांचा आश्रम आहे. एक धर्मशाळाही आहे. मंदिरात शिरण्यापूर्वी पूजा साहित्य, फुले, प्रसाद, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. तसेच रांगोळी आणि नित्योपयोगी वस्तूंची तसेच तांब्यापितळेच्या वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती यांचीही दुकाने आहेत. मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी गुरव असून ते कार्य गेल्या सात पिढय़ांपासून परंपरेने श्री फुलझेले कुटुंबाकडेच आहे. त्यांच्यातीलच एक विश्वस्त मंडळावरही आहेत. हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या मालगुजारीत येत असल्याने त्याची व्यवस्था भोसल्यांकडे होती. मात्र आता पंजीकृत विश्वस्त मंडळाकडे व्यवस्था सोपविलेली आहे.

श्री महाकाली देवी, चंद्रपूर</strong>

कृतयुगात, हल्लीच्या चंद्रपूर शहराच्या जागी ‘लोकपूर’ या नावाचे मोठे शहर होते व तेथे कृतध्वज नावाचा राजा राज्य करीत होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा राज्य करू लागला. त्याच काळात तेथे महाकाली देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असता लोकपुरातून पुढे गेले व त्याच वेळी त्यांनी हल्लीच्या चंद्रपूरच्या ईशान्येस ५० मलांवर असलेल्या चिमूर जवळच्या ‘चिमूर’ टेकडय़ातील एका टेकडीवर निवास केला असे मानतात, ती जागा आज रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तिथेच ‘सीताकुंड’ आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे. कलीयुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर (महादेव) ही ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसविली व त्याच्या नावावरून त्या नगरीस इंदूपूर किंवा चंद्रपूर असे नाव पाडले अशीही आख्यायिका आहे. (चांदा सेटलमेंट रिपोर्ट १८६९ मध्ये देण्यात आलेल्या व नंतर चांदा गॅझिटिअर १९०७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका आख्यायिकेनुसार.) पुढे त्याचे राज्य नष्ट झाले व त्यानंतर भद्रावती ही नवीन राजधानी निर्माण झाली.

या भद्रावतीचा विस्तार उत्तरेस भटाळ्यापासून तो दक्षिणेस चंद्रपूपर्यंत होता. म्हणजे सुमारे ३५ मल लांब व १६ मल रुंद पसरलेली ही भद्रावती किंवा भांदक ही राजधानी होती. ‘भटाळा’ हे गाव वरोरा ते चिमूर या रस्त्यावर सध्या एक लहानसे गाव आहे. परंतु त्या गावात अनेक ठिकाणी खणले असता पुराणकालीन नाणी सापडतात असे तेथील लोक सांगतात. प्राचीन संदर्भाचे विश्लेषण केल्यास तत्कालीन शहर हे भद्रावती नसून भांदक आहे व पुराणातले भद्रावती हे हस्तिनापूरपासून जवळ होते. एका विस्तृत पठारावर पसरलेल्या भांदक या गावाच्या पश्चिमेला विजासन टेकडय़ा आहेत. त्यांच्यात गुहा असून त्या इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातल्या असाव्यात. त्यांच्यातल्या काही शिलालेखांचा काळ हा गुप्तांचा किंवा सातव्या किंवा आठव्या शतकातला असावा असे किनगहॅम यांनी म्हटले आहे. म्हणजेच भांदक ही प्राचीनकाळी विस्तृत पसरलेली नगरी होती, असे दिसते. मात्र आज त्याच नगराचा उल्लेख भांदक तसेच भद्रावती या दोन्ही नावांनी होतो. गणेशपुराणात त्याचा उल्लेख पुष्पकपूर या नावाने आला आहे. पुढे त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात भांदक आणि कलीयुगातही भांदक म्हणूनच ओळखले जाते. गुत्समद ऋषीने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या करून श्रीगणेशाची आराधना केली व वरप्राप्तीनंतर तिथेच श्री वरदविनायक गणेशाची स्थापना केली त्या स्थानाचा उल्लेख भृगु ऋषीने लिहिलेल्या गणेशपुरात खालीलप्रमाणे आढळतो.

इदं नगरं देवयुगे पुष्पक संजितम्।

त्रेतायां मणिपुरंच, भानकं द्वापारेपिच

कलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति॥

भानक, भद्रक या नामांचा अपभ्रंश भांदक असा होतो. भांदक हे मोठे शहर होते आणि त्यात विजासन, गवराळा, सुमठाणा इत्यादी भाग येत होते. भांदकपासून सोळा मलांवर चांदा/चंद्रपूर नावाचे खेडे आहे असे उल्लेख जुन्या साहित्यात आढळतात. भांदकच्या पश्चिमेला दोन मलांवर गौराळा हे गाव असून तिथे एक तलाव आहे. त्याला लागून असलेल्या टेकडीवर श्री वरदविनायकाचे मंदिर आहे. याच जागी गृत्समद ऋषीने तपश्चर्या केल्यानंतर श्री वरदविनायकाची स्थापना केल्याचे वरील आख्यायिकेत म्हटले आहे. याच ठिकाणी पूर्वी योवनोशाचा महाल होता असे सांगितले जाते. पुढे तो पडला व जुने देऊळ राहिले. म्हणूनच काही लोक यालाच यौवनोशाचे देऊळ किंवा महाल असे संबोधतात. याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या (मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताच्या िभतीत) एक शिलालेख होता. त्यात संवत ११६० असा उल्लेख आहे.

त्यावरून इ.स. ११०४ मध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. या राजाच्या दंडनायक नावाच्या अधिकाऱ्याने इ.स. १०८७  मध्ये विजारण टेकडीजवळची काही जमीन चराईसाठी दान दिली होती.

चंद्रपूर येथील महाकाली मंदिर विदर्भ तसेच मराठवाडय़ातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते गोंड जमातीच्या लोकांचेही श्रद्धास्थान आहे. या देवीच्या संबंधातील उल्लेख स्कंध पुराणातील सह्य़ाद्री खंडात आढळतो. त्यानुसार असे सांगतात की, त्रेतायुगातील राजा कृतध्वज यास सुनंद नावाचा मुलगा होता. त्याला देवीने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली. ती त्याने पाषाणात एक गुहा करून त्याच जागी स्थापित केली. तीच ही महाकाली देवी होय. आणखी एक आख्यायिका अशी की, खांडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या राज्याची राजधानी बल्लारपूर येथे होती. ती पुढे त्याने चंद्रपूर येथे हलविली. झरपट नदीच्या कोरडय़ा पात्रात त्याला एक कुंड दिसले. त्यातील पाण्याने त्याने तोंड धुतले आणि तो ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्याच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तेथे अंचलेशर महादेवाचे मंदिर बांधले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोडय़ा अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ही महाकाली होय. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशीलांकडे पाहता इ.स. १४९५ ते १४९७ या काळात ही मंदिरे बांधण्यात आली असावीत. नंतरच्या काळात गोंड हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीचे मंदिर इ.स. १७०४ ते १७१९ ते या काळात बांधले गेले असावे. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोटय़ा भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याने भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी.

श्री महाकाली देवीची मूर्ती पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेले आहे. मुखवटासुद्धा बसविण्यात आला आहे. तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिरात गेल्यावर सुमारे आठ-दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन-तीन फुटांचेच अंतर आहे. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते. देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी आहे. मंदिर ६० बाय ६० फुटांचे असून उंची ५० फूट आहे. त्यावर मुगल स्थापत्य शैलीची छाप आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. देवीचे गर्भगृह हे दहा फूट खोल असून १८ बाय १८ फुटांचे आहे. महाकालीची मूर्ती ही एका ३.१५ मीटर बाय १.६० मीटर बाय १.८५ मीटर आकाराच्या गुहेत स्थापित आहे. मूर्तीसमोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाची मोठी पिंड/शिविलग स्थापित केले आहे. मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठय़ा आकाराचा घुमट आहे. या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात.

गोंड राजा वीरशहा (इ.स. १६९६-१७०४ ) याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरूकेली. तेव्हापासून चत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव आणि यात्रा सुरू होते. या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात. अश्विन महिन्यातील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. विजयादशमीलाही भक्तांची गर्दी असते. या यात्रेला विदर्भातून लोक येतातच परंतु मराठवाडय़ातूनही हजारोंच्या संख्येने लोक येतात. याची सुरुवात नांदेड जिल्ह्य़ातल्या तळेगाव उमरी या गाव्या राजाबाई देवकरीण हिच्यापासून झाली. असे सांगतात की, तिला देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘मी चंद्रपूर परगण्यात आले, तू माझ्या भक्तीचा प्रचार कर.’’ राजाबाई तिच्यासोबत मोठय़ा संख्येने देवी भक्तांना घेऊन देवीच्या दर्शनास आली. तेव्हापासून नांदेड, परभणी, बेदर इत्यादी भागांतून फार मोठय़ा संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तिसगड इ. भागातील गोंड आदिवासी तसेच इतरही जाती-जमातींचे लोक मोठय़ा प्रमाणावर येतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा इथून पोतराज या यात्रेला येतात. पोतराज म्हणजे देवीचे गावोगाव हिंडणारे भक्त. ते इथे दर्शनाला मोठय़ा प्रमाणात येतात. देवीच्या पुरुष भक्तांना पोतराज आणि स्त्री भक्तांना देवकरीण असे म्हणतात. पुरुष पोतराज स्त्रियांप्रमाणे केस वाढवून अंबाडा बांधतात आणि कपाळावर कुंकवाचा मळवट भरतात. कमरेभोवती हिरव्या रंगाचा घागरा व त्यावर घुंगराची माळ व पायात मोठे पितळी वाळे असतात. कमरेवरचे अंग उघडे असते. त्यांच्या हातात शेवटी निमुळता होत गेलेला चार ते पाच फूट लांबीचा व तीन ते चार इंच व्यासाचा ‘साठ’ (आसूड) असतो. कौल मिळाल्यावर तो सोट ते गरगर फिरवून स्वत:च्या अंगावर मारतात. त्याच्यासोबत एक स्त्री असून तिच्या डोक्यावर एका परातीत किंवा टोपलीत देवीचा मुखवटा ठेवलेला असतो. त्याची मळवट भरून पूजा केलेली असते. तिच्या हातात एक डफ असून ती दोन काडय़ांनी त्यातून आवाज काढत असते. यात्रेला दूरदूरून आलेले लोक रात्री मंदिर परिसरात पडाव टाकून विसावतात व रात्रभर डफरे वाजवून स्तवनगीते म्हणतात. देवीच्या मंदिर परिसरात आणि बाहेरील बाजूलाही प्रसाद, पूजा साहित्य, इतर संसारोपयोगी लहान वस्तू, प्लास्टिकची भांडी इत्यादींची पक्की दुकाने आहेत. चत्र महिन्यात फिरते दुकानदारही दुकाने लावतात.

श्री क्षेत्र महाकाली देवस्थान, काचनूर.

हे देवस्थान वर्धा शहरापासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. तर वर्धा-कोंढाळी मार्गाने फक्त एक कि.मी. दूर आहे. हे पुरातन स्थान आहे असे सांगण्यात येते. या महाकाली देवस्थानात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती तीन शिलारूपी बाणांच्या स्वरूपात आहेत. त्रेतायुगात धौम्य ऋषींनी आपला आश्रम इथे स्थापन केला, असा लोकांचा समज आहे. हे स्थान चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेले असून जवळच ढगा हे महादेवाचे प्रसिद्ध स्थान, घोडदेव आणि वानरकुंड आहे. श्रीरामाच्या राज्यभिषेकानंतर परत जाताना वानरराज सुग्रीव तहान लागली म्हणून या आश्रमाजवळ आले तेव्हा ऋषी पत्नीने पाण्याने जे कुंड निर्माण केले, असे मानतात. ते आजही वानरकुंड म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे पाणी कधीही कमी होत नाही अशी लोकभावना आहे. इ.स. १९९२ साली या कुंडाजवळ शिवमंदिर निर्माण करण्यात येऊन तेथे धौम्य ऋषींची प्रतिमा बसविण्यात आली. सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वी वर्धा नदीच्या तीरावर जमिनीत गावकऱ्यांना दृष्टांत होऊन या तीन देवतांच्या मूर्ती सापडल्या, असे सांगितले जाते. त्यानंतर त्या जागी खणून गावकऱ्यांनी त्या मूर्ती बाहेर काढल्या व त्यांची विधिवत प्रतिष्ठापना केली. येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या देवींच्या श्रद्धाळू भक्तांना इच्छापूर्तीचे समाधान मिळू लागले व भक्तांची संख्या वाढू लागली. सध्या हे देवस्थान दक्षिणचे वैष्णदेवी संस्थान या नावाने प्रसिद्ध झाले आहे. या मंदिराच्या समोर  १४० बाय ३० अशी सर्व सोयींनी संपन्न अशी धर्मशाळा निर्माण केली आहे. एक विशाल सभागृहदेखील आहे. धर्मशाळेला लागूनच स्वयंपाकघर असून भक्तांना भोजन तयार करण्याची व्यवस्था आहे. प्रांगणात एक दीपस्तंभ स्थापिला आहे.

या मंदिरात नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडवा, गुरुपोर्णिमा, रक्षाबंधन, पोळा, नवरात्री-उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. नवरात्रात पहिल्या दिवशी भगवतीला स्नानांतर सिंदूर अर्पण, नवे वस्त्र, आभूषण तसेच पूजन केले जाते. नंतर कलशांची स्थापना करतात. नवमीला मोठय़ा प्रमाणावर कलश विसर्जन करतात. या वेळेला दहा ते १५ हजार लोक असतात. सायंकाळी होम हवन होऊन महोत्सवाचा समापन विधी होतो. कोजागिरी पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अखंड ज्योती उत्सवाचा प्रारंभ होतो. हा ४० दिवस चालतो. या काळात फक्त ओल्या वस्त्रानेच मंदिरात प्रवेश करता येतो. बाकी कार्यक्रम नवरात्रासारखेच असतात. ४१व्या दिवशी याचे समापन होते. या स्थानाला ‘पंचतीर्थ’ असेही म्हणतात. कारण या परिसरात पाच पावन क्षेत्रं आहेत ते म्हणजे श्री महाकाली देवस्थान, घोडदेव, वानरकुंड, ढगा आणि घानाड.

गोरजाई मंदिर, वैरागड 

गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी तहसिलीत वैरागड हे ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान असून त्याला पर्यटनस्थळ म्हणूनही महाराष्ट्र शासनाने दर्जा दिलेला आहे. हे ठिकाण गडचिरोलीपासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाजवळ खोब्रागडी आणि वैलोचना या दोन नद्यांचा संगम आहे. येथे पुरातन किल्ला आणि अनेक हेमाडपंती पद्धतीने बांधलेली मंदिरे आहेत. या भागात खोदकाम करताना दगडी मूर्ती आणि पुरून ठेवलेले धन अनेकांना सापडले आहे. वैरागडचा किल्ला ऐतिहासिक महत्त्वाचा व पुरातन आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेतेरा हेक्टर आहे. याची तटबंदी २५ ते ३० फूट असून पक्की दगडांची आहे. किल्ल्याला पूर्वाभिमुख असे भव्य प्रवेशद्वार आहे. आत गेल्यास दोन्ही बाजूला पडकी घरे आढळतात. विहिरींची संख्या पूर्वी १०० च्या वर होती. या किल्ल्याभोवती खंदक आहेत. वैरागडचे पुरातन नाव ‘वजरागर’ असे आहे. (वज्र-हिरा) येथे एकेकाळी हिऱ्यांची बाजारपेठ होती. इसवी सनाच्या नवव्या शतकात नागवंशीय माना लोकांचे राज्य होते. करुमप्रदोह हा त्यांचा पहिला राजा होता. १२ व्या शतकापावेतो त्यांचे राज्य होते. पुढे हैहयवंशीय राजांचे मांडलिकत्व मानांनी स्वीकारले. पुढे हा किल्ला इ.स. १४५० नंतर बल्लापूरच्या गोंड राजाच्या ताब्यात गेला. आज मात्र परकोटाच्या आत आणि बाहेरही पडझड झालेली असून झाडे वाढलेली आहेत.

गोंड राजाचा सेनापती आणि किल्ल्याचा किल्लेदार हरिश्चंद्र याने जेव्हा किल्ल्याची सुधारणा केली तेव्हा त्याने आपल्या राज्यामध्ये सप्त धामांची निर्मिती केली. त्यातील एक धाम म्हणजे गोरजाईचे मंदिर आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. माना समाजाचे लोक या देवीला आपली कुलदेवता मानतात. मोठमोठय़ा दगडांनी हेमाडपंती पद्धतीने हे मंदिर बांधले आहे. याच्या जवळूनच नदी वाहते. देवळाच्या गर्भगृहाला एक सभामंडप लागूनच आहे. या पुरातन मंदिराची किरकोळ पडझड झाली असून ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आजही माना लोक गोरजाई मंदिराला भेट देतात.

श्री रेणुकामाता मंदिर, चिखली

चिखली हे गाव बुलढाणा जिल्ह्य़ाचे तालुक्याचे ठिकाण असून ते थंड हवेचे ठिकाण आहे. या गावात असलेले प्राचीन रेणुकामाता मंदिर  प्रसिद्ध आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगण्यात येते की, बच्चानंद महाराज बलगाडीने पेरकुंड घेऊन जात असता त्यांच्या गाडीवर रेणुकामाता आली. त्यांनीच तिची स्थापना केली. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जवळजवळ १५० वर्षांपूर्वी चिखलीपासून दोन कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात योगी शिवानंद आणि योगी बच्चानंद यांना रेणुकामातेचे दर्शन झाले. त्यांनी तेथेच तिची पूजा-अर्चना केली. एक छोटे मंदिर बांधले. पुढे हीच रेणुकामाता चिखली गावाची ग्राम देवता म्हणून प्रसिद्ध पावली. रेणुकामाता मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच समोर शेंदूरचर्चित, उत्तराभिमुख असलेली, प्रसन्न वदना रेणुकामाता मन मोहून टाकते. तिचे तेजस्वी रूप बघून भक्तगण आनंदित होतो; भक्तिभावाने तिच्यासमोर विनम्र होतात. देवीच्या कपाळावर मोठे कुंकू असून तिच्या भांगात खडय़ामोत्याची िबदी आहे, गळ्यात मंगळसूत्र आणि इतर दागिने आहेत. कानात मासोळीच्या आकाराचे कुंडल आहेत. हिरवे वस्त्र परिधान केलेली देवी अत्यंत सुंदर दिसते. देवीच्या गाभाऱ्यातील घुमटावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती चित्रित केल्या आहेत. मंदिराबाहेरच बच्चानंद महाराजांची समाधी आहे. अश्विन महिन्यात देवीचा नवरात्रोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शहरातील आणि आसपासच्या गावांतील भक्तगण मोठय़ा संख्येने दर्शनाला येतात. स्त्रिया खणा-नारळाने तिची ओटी भरतात. देवीला तांबूल आवडत असल्याने तिला विडय़ाच्या पानांचा तांबूल अर्पण केला जातो; तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. नवरात्रीच्या काळात या परिसरात नवचतन्य बघावयास मिळते. सनई, चौघडय़ांच्या गजरात, भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा होते; अंबेचा जयजयकार होतो. नवरात्रात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंबेचा जोगवा, कीर्तन, प्रवचन, नवमीला होम- हवननंतर गावातील लहान-थोर सर्वच मंडळी देवीला सोने द्यायला जातात आणि दर्शन घेतात. चत्र महिन्यातील पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. देवीची पूजा-अर्चना झाल्यावर येथे ‘वगदी’ खेळण्याची परंपरा आहे. ‘वगदी’ म्हणजे बलगाडीवर सपाट पाटामध्ये लाकडी बल्लीच्या दांडय़ावर दुसऱ्या बल्लीचा दांडा आडवा ठेवून त्या आडव्या दांडय़ाच्या मधोमध वर एक किंवा दोन माणसं मावतील एवढी राहटीसारखी बसण्याची जागा असते. त्याला दोन्ही बाजूला लोंबकळणारे दोन झुले असतात. या झुल्यावर  बसवून फेऱ्या मारायला लावले जाते. असे सांगतात की हा ‘बगाड’सारखाच एक प्रकार असतो. चत्री पौर्णिमेला देवीची मिरवणूक गावातून ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. यावेळी भक्तगण विविध खेळ खेळतात. पहाटेपर्यंत ही शोभायात्रा चालते. देवीची प्रतिकृती प्रतिमा सजविलेल्या बलगाडीत विराजमान असते.

पारशिवनीची महालक्ष्मी

येथील मूर्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील मूर्तीमध्ये विशेष गणली जाईल अशी आहे. नागपूरपासून ४४ कि.मी. वर रामटेक-मनसर रस्त्यावर पारशिवनी फाटा लागतो. त्या गावात साधारण ४० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक पोलसाठी खड्डा खणताना व्यंकटराव सावरकर यांच्या घराच्या परसात महालक्ष्मीची दगडी प्रतिमा आढळली. दीर्घकाळ जमिनीत गाडलेली असूनही ग्रेनाइट दगडाची झळाळी कायम होती. शिरोभागी त्रिकोणी होणारी तिची पाठशिळा सुमारे ९० सेंमी. उंच आहे. त्रिकोणी शिरोभागात लहान लहान सव्यललितासनात बसलेल्या चार चार देवी प्रतिमा आहेत. तसेच दोन्ही हातांच्या पाठीमागे आणि मुकुटामागे पाठशिळेवर तीन छोटी छोटी कोष्टके आहेत. त्यातही देवी प्रतिमा आहेत. पाठशिळेवर पीठापासून वपर्यंत दोन्ही बाजूला सर्वात खाली हत्ती आणि नंतर क्रमाने घोडा, नर्तकी आणि व्याल अशा सममितिय प्रतिमा आहेत. चतुर्भुज मूर्ती समभंगात उभी असून प्रदक्षिणा क्रमाने पाहता मातुिलग, भंगलेली गदा, खेटक(ढाल) आणि पानपात्र ही आयुधे तिच्या हातात आहेत. पायापाशी डाव्या बाजूला तिचे वाहन सिंह आहे. देवीच्या आजूबाजूला चामर धारिणी, कुंभ-वाहिनी सेविका असून खाली दोन स्त्रिया हात जोडून बसलेल्या आहेत. महालक्ष्मी नखशिखान्त नटलेली आहे. मुकुट रत्नजडित असून त्याच्या दर्शनी भागावर नागयुगुल चित्रित आहे. विशेष म्हणजे मुगुटावर सयोनि लिंग आहे. शिवाय कुचबंध, उदरबंध, रत्नजडीत मेखला, कर्णकुंडले, बाजुबंद, मुद्रिका, कंकणे आणि सल नूपुर आहेत. देवी भागवतात एक वर्णन आहे-

‘‘मातुिलग गदाखेटं पानपात्रंच बिभ्रती

नागं लिंगं च योिनच बिभ्रती नृपमूद्र्धीने॥’’

हे वर्णन या मूर्तीला तंतोतंत लागू पडते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूपही बहुंशी असेच आहे. पानपात्राच्या ऐवजी तिच्या हातात कमंडलू आहे एवढाच फरक. ही त्रिमितीय प्रतिमा घडविण्यासाठी कलाकाराने अक्षरश: प्राण ओतले आहेत. ही सुंदर दगडी प्रतिमा बघण्यासाठी, अभ्यासासाठी, जगभरातून चिकित्सक मूर्तीशास्त्रीय मंडळी येथे येतात. देवी नवरात्राच्या काळात हजारो भक्त येतात. अभ्यासावरून ही प्रतिमा साधारण १० व्या ११ व्या शतकातील ठरते.

नेरिपगळाई देवी (अमरावती)

सतीच्या ५२ शक्तिपीठांपकी नेरिपगळाई हे एक पीठ आहे. अमरावती-मोर्शी रस्त्यावर ३० कि.मी. अंतरावर एक गोराळा नावाची वस्ती आहे. तेथून दीड कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर जगन्माता नेरिपगळाई देवीचे ठाणे आहे. मंदिर यादवकालीन म्हणजे १२ वे १३ व्या शतकातले असावे. मंदिराच्या प्राचीन बांधकामापकी गर्भगृह शिल्लक असून सभामंडप, तटबंदी महाद्वार हे नंतरचे आहे. स्वयंभू मानल्या गेलेल्या या स्थानावर असलेली तांदळा स्वरूपातील प्रतिमा विदर्भातील अनेकांची कुलदेवता आहे. सभामंडपाची व तटबंदीची बांधणी भक्कम काळ्या दगडांची आहे. मंदिर साधे असून गर्भगृह व सभामंडप हीच देवालयाची वैशिष्टय़े. पण तटबंदी मजबूत बांधणीची आहे. मंदिराचा सभामंडप व तटबंदीच्या बांधणीसाठी एलीचपूरच्या (सध्याचे अचलपूर) मुसलमान सरदाराने व भागानगरच्या नवाबाने आíथक मदत दिली अशी लोकश्रुती आहे. देवालयाच्या समोर नागपूरकर भोसल्यांनी बांधलेला जलाशय असून त्यास कर्पूर जलाशय असे म्हणतात. जलाशयाच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते. चर्मरोगांच्या विविध तक्रारींवर हे पाणी वापरले जाते. जलाशयात बाराही महिने पाणी असते. पिंगळमातेचे दर्शन अत्यंत विलोभनीय असून माता दिवसातून तीन वेळा रूप बदलते अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत यात्रा असते. याच दरम्यान येथे जनावरांचा बाजारही भरतो. पंचक्रोशीतून हजारो भक्तगण दर्शनासाठी पायी येतात. नऊ दिवस सतत कीर्तन, प्रवचन, करमणुकीचे कार्यक्रम सुरू असतात. शिवाय प्रत्येक मंगळवारी देवीची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्यांची गर्दी असते. विश्वस्त मंडळाने भक्तांच्या देणगीतून विविध पायाभूत सोयी उभारल्या आहेत. पेयजल, वीज, रस्ते, भोजन, निवास याची उत्तम व्यवस्था आहे