क्रिकेटवर वेडय़ासारखं प्रेम करणाऱ्या आपल्या देशात विश्वचषक सामन्यांचे दिवस म्हणजे पर्वणीच. या स्पर्धेतील भारताच्या आजवरच्या कामगिरीवर दृष्टिक्षेप..

यंदाच्या विश्वचषकाचा आराखडा अत्यंत कठीण आहे. या आराखडय़ात उपांत्यपूर्व फेरीला स्थान नाही. या वेळी गटसाखळीला रजा देऊन राऊंड रॉबिन पद्धतीनुसार सामने खेळले जाणार आहेत. त्यामुळे दोन गटांमध्ये १० संघांचे सामने न होता यातील प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी सामना होईल. मग सर्वाधिक गुण मिळवणारे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. काही मातब्बर संघांना याचा फटका बसू शकतो. १९९२मध्ये झालेल्या विश्वचषकात हाच आराखडा वापरण्यात आला होता. त्या वेळी भारताला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता.

१९७५च्या विश्वचषकात भारतीय संघ फक्त हजेरी लावून आला होता. ६० षटके खेळताना भारताची दमछाक व्हायची. परंतु हळूहळू या संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील पकड घट्ट केली. आता एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील पहिल्या तीन स्थानांवर भारताची सत्ता असते. फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही भारतीयांची छाप दिसून येते.

१९८३च्या विश्वविजेतेपदानेच भारताला क्रिकेटच्या नकाशावर महत्त्व प्राप्त झाले. कालांतराने ‘इट क्रिकेट, स्लीप क्रिकेट’, ‘क्रिकेट खेळ नव्हे, तर तो आमचा धर्म आहे’, अशा संकल्पना भारतात रूढ झाल्या. कपिलदेव या ऐतिहासिक यशाचा शिल्पकार होता. ‘हरयाणा हरिकेन’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या कपिलने आपल्या पराक्रमाने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला. अष्टपैलू खेळाडूंची मोट बांधून त्याने भारतीय क्रिकेटला सुवर्णकाळ दाखवला. ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्कर यांनी आपल्या फलंदाजीची मोहिनी घातली. ते क्रिकेटच्या दुनियेतील पहिले महानायक ठरले.

मग भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकर नामक सुवर्णस्वप्न पडले. २४ वष्रे त्याने जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. याच काळात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनीही आपले योगदान दिले. त्यामुळेच भारतीय संघ २००३मध्ये अंतिम फेरी गाठू शकला.

२०११मध्ये श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना भारताने अब्जावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करीत दुसऱ्यांदा विश्वचषकाचे स्वप्न साकारले. त्यानंतर गेल्या काही वर्षांत भारताने अनेक चढउतारांचा सामना केला. सचिनने १९९२ पासून २०११ पर्यंत सहा विश्वचषक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सचिनयुगाच्या अस्तानंतर आता विराटयुग सुरू आहे. गेल्या काही वर्षांत परदेशात तिरंगा फडकावण्याची किमया साधणारा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री भारताला तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकून देण्यासाठी उत्सुक आहेत.

विश्वचषकात भारताच्या पहिल्यावहिल्या सामन्यात नेतृत्वाचा मान एस. वेंकटराघवन यांना मिळाला. डेनिस अमिसच्या १३७ धावांच्या बळावर इंग्लंडने ४ बाद ३३४ असा डाव उभारला. परंतु भारताने ६० षटके खेळून जेमतेम ३ बाद १२३ धावा केल्याने इंग्लंडला २०२ धावांनी दिमाखात विजय साजरा करता आला. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात संथ खेळी सुनील गावस्कर यांनी याच सामन्यात नोंदवली. त्यांनी १७४ चेंडू खेळून एका चौकारासह फक्त ३६ धावा केल्या होत्या. तेव्हा गावस्कर यांच्या कासवछाप फलंदाजीवर बरीच टीका झाली. मग भारताने गावस्कर आणि फारूख इंजिनीयर यांच्या अर्धशतकांच्या बळावर दुबळ्या पूर्व आफ्रिकेवर आरामात विजय मिळवला. त्यानंतर उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धचा साखळीतील अखेरचा सामना जिंकणे आवश्यक होते, परंतु तो सामना किवींनी ४ गडी आणि १.१ षटके राखून जिंकला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. १९७९च्या विश्वचषकात भारताला एकही विजय मिळवता आला नाही. साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.

१९८३च्या विश्वचषकात भारताकडून माफक अपेक्षा होत्या. साखळीत झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळायचे होते. भारताने यशपाल शर्माच्या खेळीच्या बळावर सलामीला विंडीजला हरवून क्रिकेटजगताला धक्का दिला. मग संदीप पाटीलच्या अर्धशतकाच्या बळावर दुबळ्या झिम्बाब्वेवर आरामात विजय मिळवला. नंतर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांनी भारतावर दणदणीत विजय मिळवले. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताची ५ बाद १७ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना कपिलने १३८ चेंडूंत १६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १७५ वादळी खेळी साकारून सर्वाचे लक्ष वेधले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळीतील अखेरचा सामना ११८ धावांनी जिंकून भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. मदन लाल आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी चार बळी घेत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. उपांत्य फेरीत यशपाल, मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडवर सहा विकेट राखून विजय मिळवला. मग अंतिम सामन्यात विंडीजने भारताचा डाव फक्त १८३ धावांत गुंडाळला. यात के. श्रीकांतचे सर्वाधिक ३८ धावांचे योगदान होते. मग भारतीय गोलंदाजांनी दोन वेळा जगज्जेत्या विंडीजची ६ बाद ७६ अशी अवस्था केली आणि नंतर फक्त १४० धावांत त्यांचा डाव कोसळला. अमरनाथने २६ धावा आणि १२ धावांत ३ बळी असे अष्टपैलुत्व सिद्ध केले. कपिलने लॉर्ड्सच्या गॅलरीत विश्वचषक उंचावून भारताचे जगज्जेतेपद साजरे केले.

कपिलच्या नेतृत्वाखाली १९८७मध्ये मायदेशात भारताने पुन्हा जगज्जेतेपदाचे स्वप्न पाहिले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या अ-गटात भारताने सहापैकी पाच सामने जिंकले, तर एक सामना एका धावेने गमावला. मोहिंदर आणि मदनलाल यांच्या अनुपस्थितीत श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, गावस्कर, नवज्योतसिंग सिद्धू, मोहम्मद अझरुद्दीन, रवी शास्त्री आणि कपिलदेव यांनी भारताच्या ताकदीचा प्रत्यय घडवला. परंतु उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले. चेतन शर्माने या विश्वचषकात ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदवली, तर त्याच सामन्यात गावस्कर यांना आपले पहिले एकदिवसीय शतक साकारता आले. गावस्कर यांच्या कारकीर्दीतील हा अखेरचा विश्वचषक होता.

१९९२च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन संघांविरुद्ध सामने जिंकले, तर पाच सामने गमावले. त्यामुळे भारताची साखळीत सातव्या क्रमांकावर घसरण झाली. १९९६मध्ये भारताने सहयजमानपद भूषवले. सचिन, अझरुद्दीन, अजय जडेजा, सिद्धू आणि संजय मांजरेकर ही भारताच्या फलंदाजीची तर अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, मनोज प्रभाकर, वेंकटपती राजू ही भारताच्या गोलंदाजीची बलस्थाने होती. गटसाखळीत भारताने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करले, तर विंडीज, झिम्बाब्वे, केनियाला पराभूत करीत आगेकूच केली. उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार वसिम अक्रमने दुखापतीमुळे माघार घेतली. मग सिद्धूच्या ९३ धावांमुळे भारताने पाकिस्तानला हरवले. या पराभवाचे पाकिस्तानमध्ये मोठे पडसाद उमटले. सरकारकडून या पराभवाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. मग ईडन गार्डन्सवर उपांत्य फेरीतील सामन्यात श्रीलंकेने २५१ धावांचे आव्हान उभे केले. सचिनच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने १ बाद ९८ अशी दमदार सुरुवात केली, परंतु थोडय़ाच वेळात भारताची फलंदाजी कोसळली आणि ८ बाद १२० अशी केविलवाणी अवस्था झाली. अशातच क्रिकेटरसिकांनी हुल्लडबाजी केल्यामुळे सामना थांबवला गेला. अखेर या सामन्यात श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. सचिनने या स्पध्रेत ८७.१६च्या सरासरीने ५२३ धावा केल्या.

१९९९च्या विश्वचषकात भारताची सुरुवात खराब झाली. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने गमावले. मग वडिलांच्या निधनामुळे मायदेशी आलेला सचिन पुन्हा विश्वचषकासाठी इंग्लंडला आला. केनियाविरुद्ध १४० धावांची खेळी आपल्या वडिलांना समर्पित करून त्याने भारतीय संघाला विजयाचा मार्ग दाखवला. मग भारताने श्रीलंका आणि इंग्लंडला हरवून सुपर सिक्समध्ये स्थान मिळवले. भारत-पाकिस्तान यांच्यात कारगीलमध्ये युद्धजन्य परिस्थिती चालू असताना भारताने मँचेस्टर येथे पाकिस्तानला ४७ धावांनी पराभूत केले. व्यंकटेश प्रसादने या सामन्यात ५ बळी घेतले. परंतु अन्य सामन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे भारताचे आव्हान सुपर सिक्समध्ये संपुष्टात आले.

२००३च्या विश्वचषकात भारताने ११ पैकी फक्त दोन सामने गमावले आणि ते दोन्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होते. सचिन, द्रविड, गांगुली असे धडाकेबाज फलंदाज आणि जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळेची प्रभावी गोलंदाजी तर युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ आणि वीरेंद्र सेहवाग ही नवी गुणवत्ता यांचा सुंदर मिलाफ भारताच्या कामगिरीत दिसून आला. दुबळ्या हॉलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा डाव २०४ धावांत गडगडला, परंतु तरीही भारताने ६८ धावांची विजयी सलामी दिली. मग ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा डाव फक्त १२५ धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय संघाच्या ढासळत्या कामगिरीवर जोरदार टीका झाली. खेळाडूंच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. त्यानंतर मात्र भारताची कामगिरी अनपेक्षितपणे बहरली. भारताने झिम्बाब्वे, नाम्बिया, इंग्लंड आणि पाकिस्तानला हरवून दिमाखात सुपर सिक्समध्ये स्थान मिळवले. सुपर सिक्समध्ये भारताने केनिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. या स्पध्रेत आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या केनियाला आरामात हरवून मग भारताने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. वाँडर्स स्टेडियमवर झालेल्या अंतिम मुकाबल्यात रिकी पाँटिंगच्या घणाघाती शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३६० धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु भारताचा डाव २३४ धावांत आटोपला आणि जगज्जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाले. या विश्वचषकात सचिन सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरला. त्याने सर्वाधिक ६७५ धावा काढल्या, तर फलंदाजांमध्ये सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर होता.

कॅरेबियन बेटांवरील २००७चा विश्वचषक म्हणजे भारतासाठी एक दु:स्वप्न होते. पहिल्याच सामन्यात बांगलादेशने हरवल्यामुळे भारतीय संघाला खडबडून जाग आली. मग नवख्या बम्र्युडाविरुद्ध भारताने ५ बाद ४१३ धावांचा डोंगर उभारून सहज विजय मिळवला. मग गटातील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध हार पत्करल्यामुळे भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. या विश्वचषकाचे तीव्र पडसाद भारतात उमटले. काही खेळाडूंच्या घरांवर हल्ले झाले, तर बंगळूरु तसंच मुंबईत क्रिकेटरसिकांनी खेळाडूंच्या घरांसमोर निदर्शने केली. कुंबळेने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केले तर प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी पदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयची परवानगी न घेताच इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) नामक स्पध्रेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

२०११च्या विश्वचषकात यजमान भारताला आधीपासून संभाव्य विजेत्यांच्या पंक्तीत स्थान देण्यात आले होते. अनुभवी सचिन, सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युसूफ पठाण, सुरेश रैना अशी दमदार फलंदाजीची फळी भारताकडे होती. झहीर खान, आशीष नेहरा आणि हरभजन सिंग अशा  अनुभवी खेळाडूंचा मारा होता. भारताला बांगलादेश, द. आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, हॉलंड आणि आर्यलडसोबत ब-गटात स्थान देण्यात आले होते. बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात सेहवाग (१७५) आणि कोहली (१००) यांच्या शतकांच्या बळावर भारताने ४ बाद ३७० धावांचा डोंगर उभारला आणि ८७ धावांनी दमदार विजय मिळवला. मग बंगळूरुला इंग्लंडचा सामना टाय झाला. या सामन्यात सचिनने शतक साकारले. मग भारताने दुबळ्या आर्यलड आणि हॉलंडला हरवले. त्यानंतर नागपूरला सचिनने शतक ठोकले, परंतु नंतर भारताची फलंदाजीची फळी कोसळली. विश्वचषकातील पहिला पराभव भारताच्या पदरी पडला. चेन्नईत विंडीजविरुद्धच्या साखळीतील अखेरच्या सामन्यात युवराजच्या शतकाच्या बळावर भारताने ८० धावांनी विजय मिळवला आणि गटउपविजेत्याच्या थाटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. अहमदाबादला ऑस्ट्रेलियाचे आव्हान लीलया पेलत भारताने उपांत्यपूर्व फेरी जिंकली. मोहालीला झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या उपान्त्य सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. वहाब रियाझ (५/४६) टिच्चून गोलंदाजी करीत असतानाही भारताने ९ बाद २६० धावा केल्या. सचिनची (८५) खेळी भारताच्या विजयात महत्त्वाची ठरली. मग २ एप्रिल २०११ या दिवशी भारताने श्रीलंकेला हरवून विश्वविजेतेपद प्राप्त केले. महेला जयवर्धनेच्या शतकाच्या बळावर लंकेने ६ बाद २७४ धावांचे आव्हान उभारले होते. सेहवाग, सचिन झटपट तंबूत परतल्यामुळे भारताची २ बाद ३१ अशी अवस्था झाली. परंतु गंभीर आणि धोनीच्या जबाबदार खेळींच्या बळावर भारताने दुसऱ्यांदा विश्वविजेतपद मिळवले. धोनी सामनावीर ठरला. सचिनने स्पध्रेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा (४८२) नोंदवल्या. झहीरने स्पध्रेत सर्वाधिक बळी (२१) मिळवले. युवराजने ३६२ धावा आणि १५ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला. आता धोनीच्या नेतृत्वाखाली भारत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१५च्या विश्वचषकाची सुरुवात भारत-पाकिस्तान सामन्याने झाली. या सामन्याची तिकिटे फक्त १२ मिनिटांत विकली गेली. एक अब्ज प्रेक्षकांनी हा सामना पाहिल्याची नोंद आहे. विराट कोहलीच्या शतकामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३०० धावा उभारल्या. त्यापुढे पाकिस्तानचा डाव २२४ धावांत गडगडला. मोहम्मद शमीने चार बळी घेत पाकिस्तानी फलंदाजांवर अंकुश ठेवला. मग भारताने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती, वेस्ट इंडिज, आर्यलड, झिम्बाब्वे यांच्यावर मात केली. त्यामुळे सहापैकी सहा सामने जिंकत भारताने दिमाखात बाद फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत रोहित शर्माच्या शतकामुळे भारताने बांगलादेशवर शानदार विजय संपादन केला. परंतु उपांत्य फेरीत यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा निभाव लागला नाही.

आतापर्यंतच्या ११ विश्वचषकांमध्ये भारताने दोनदा विजेतेपद आणि एकदा उपविजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे राऊंड रॉबिन लीगचा अडसर ओलांडून भारतीय संघ बाद फेरीकडे सहज वाटचाल करेल अशी आशा आहे.

यंदाचे साखळीतील सामने 

  • ५ जून – वि. दक्षिण आफ्रिका,
  • ९ जून – वि. ऑस्ट्रेलिया,
  • १३ जून – वि. न्यूझीलंड,
  • १६ जून – वि. पाकिस्तान,
  • २२ जून – वि. अफगाणिस्तान,
  • २७ जून – वि. वेस्ट इंडिज,
  • ३० जून – वि. इंग्लंड,
  • २ जुलै – वि. बांगलादेश,
  • ६ जुलै – वि. श्रीलंका.

 

प्रशांत केणी

response.lokprabha@expressindia.com