घटनेतील कलम ३७० कलम रद्द करण्याच्या भूमिकेवर भाजप जम्मू व काश्मीरमध्ये प्रचारात वेगवेगळी भूमिका घेत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला. भाजपची या मुद्दय़ावर जम्मूत एक तर काश्मीर खोऱ्यात वेगळी भाषा असल्याची टीका ओमर यांनी केली.
लोकांना जर हवे असेल तर हे कलम राहील असे भाजप काश्मीर खोऱ्यात सांगत आहे तर जम्मूत ते रद्द करण्याची मागणी करत आहे. त्यांची ही सोईची भूमिका असल्याचा आरोप ओमर यांनी केला. बडगम जिल्ह्य़ातील बिरवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ओमर यांनी भाजपवर चौफेर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर दौऱ्यात आल्यावर याबाबत काय ते स्पष्ट करतील, अशी अपेक्षा असल्याचे ओमर यांनी सांगितले. भाजप बरोबर नॅशनल कॉन्फरन्स जाणार काय असे विचारता, आम्ही विजय मिळवण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवत आहोत. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाल्याचा पीडीपीचा आरोप ओमर यांनी फेटाळून लावला.